व्हीएस न्यूज - काळाखडक झोपडपट्टीमधून दोन लहान मुलींसह आई घरात कोणासही काहीही न सांगता बेपत्ता झाली. हा प्रकार 30 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आला आहे.
कमला केशवसिंग सिंग (वय-25), करिष्मा (वय- सहा महिने) आणि कृतिका (वय- दीड वर्षे) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कमलाचे पती केशवसिंग दिलीप सिंग (वय-26, रा. काळाखडक झोपडपट्टी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला सिंग ही आपल्या दोन लहान मुलींसमवेत घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. त्यांची उंची पाच फूट, रंग गोरा, केस काळे, मोठे नाक जातेवेळी अंगामध्ये काळ्या पांढऱ्या रंगाचा सलवार कुर्ता घातला असून गळ्यात लाल मण्यांची माळ आणि कानात रिंगा आहेत. त्यांना हिंदी आणि नेपाळी भाषा बोलता येते.
सोबत नेलेल्या करिष्माची उंची दोन फूट, रंग गोरा, मध्यम बांधा आणि कृतिका हिची उंची दिड फूट मध्यम बांधा चेहरा गोल असे या बेपत्ता झालेल्यांचे वर्णन आहे. यांच्या विषयी कोणास काही माहिती मिळाल्यास त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन वाकड पोलिसांनी केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक डी.के. अढाव तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - परिसरात दहशत माजविणाऱ्या रावण टोळीतील सराईत गुन्हेगारांचा तपास करत असताना मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत आणि मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला गुन्हेगारी विरोधी पथकाच्या (उत्तर विभाग) पोलिसांनी देहूरोड येथे सापळा रचून अटक केली. ही कारवाई मंगळवारी देहूरोड येथील इंद्रायणी हॉटेल येथे करण्यात आली.
रमेश शंकर मारकड (वय 32, रा. शेलारवाडी, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आकुर्डी येथे रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा टोळी युद्धातून खून करण्यात आला. या टोळीतील सराईत गुन्हेगार अक्षय प्रभाकर साबळे आणि त्याच्या इतर साथिदारांचा गुन्हेगारी विरोधी पथकाचे पोलीस शोध घेत होते. निगडी, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेत असताना पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आणि मोक्का मधील सव्वा वर्षापासून फरार असलेला आरोपी रमेश मारकड याची माहिती मिळाली.
रमेश मारकडहा देहूरोड येथील हॉटेल इंद्रायणी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी या गुन्ह्याच्या तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 चे अधिकारी समीर शेख यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, राज देशमुख, अतुल मेंगे, किरण चोरगे, निलेश शिवतरे यांनी केली.
व्हीएस न्यूज - श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा व महाआरोग्य शिबिराचा ४१७ जणांनी लाभ घेतला.
चिंचवड येथे आज झालेल्या आरोग्य शिबिराचे ज्येष्ठ नागरिक सुर्याजी गावडे,क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे शंकरराव देशमुख, उत्सव समितीचे पांडूरंग बेणारे, गजानन चिंचवडे, सुनीता चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४५६ व्या संजीवन समाधी महोत्सवात पिंपरी चिंचवडकरांना विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. या महोत्सवात दरवर्षी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते.दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराचा परिसरातील ज्येष्ठनागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. त्यामध्ये ४१७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३८ जणांना अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. डॉ.एस.एस.चव्हाण, डॉ.आर.वाय.चव्हाण, डॉ. दत्ता संजय मोहरले व त्यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. दत्तात्रय संगमे, उमेश इनामदार, पूजा पाखरे यांनी संयोजनात पुढाकार घेतला.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालय व हिंदुस्थान एन्टीबायोटिक्स कंपनी यांनी संयुक्तपणे आज एच.ए. कंपनीच्या मैदानावर असणाऱ्या ८७ अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निर्देशानुसार क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, एच.ए. कंपनीचे
व्यवस्थापक अनघा मांढरे, प्रशासन अधिकारी प्रदीप मुथा व अतिक्रमण पथक प्रमुख एस.एम. कोंढरे, एच.ए कंपनीचे संजय घोसाळकर, संजय पंडित, बळवंत सुर्वे, रोहित कुलकर्णी, राजेश धुलिया, कॅप्टन सुरेंद्रसिंह यादव, कॅप्टन देवेंद्र सिंग यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मासुळकर कॉलनी लगत असणाऱ्या एच.ए. कंपनीच्या मैदानावर अनधिकृत झोपड्या झाल्या होत्या. त्यावरच अतिक्रमण पथकाने निष्काषनाची कारवाई केली. त्यासाठी २० पोलीस अधिकारी व कर्मचारी १५ मजूर १ जेसीबी, १ डंपर व अतिक्रमण पथकाचे पोलीसांमार्फत ही कारवाई करण्यात आली.
व्हीएस न्यूज - एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड, चिंचवड या कंपनीमार्फत सामाजिक बांधिलकीतून एस. के. एफ. कंपनीजवळ (सी.एस.आर) फंडातून बांधण्यात आलेल्या महिला व पुरुषांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे तसेच काळभोर नगर येथील मनपा शाळेमधील मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे हस्तांतरण महापालिकेस करण्यात आले.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, झामाबाई बारणे, माधुरी उर्फ मोनाताई कुलकर्णी, करुणा चिंचवडे, मीनल यादव,नगरसदस्य नामदेव ढाके, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, उपअभियंता सी.बी.कोंडे, उमेश मोने, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे,पुंडलिक दरोडे, मुख्य आरोग्य निरीक्षक मकरंद पानसे, वसंत सरोदे, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.अनिरुद्ध, मुख्य कार्मिक अधिकारी संजय गायकवाड, उपकार्मिक अधिकारी निम्हा गिध आदी उपस्थित होते.
यापूर्वी एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने के.एस.बी.चौक व थरमॅक्स चौक चिंचवड येथे महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केलेली आहे. या उपक्रमासाठी आजपर्यंत कंपनीने (सी.एस.आर) च्या माध्यमातून सुमारे ३५ लाख रुपये इतका खर्च केला आहे. तसेच एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आकुर्डी, काळभोर नगर चिंचवड, रुपीनगर निगडी, श्रमिक नगर निगडी येथील मनपाच्या माध्यमिक शाळेत देखील सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवून त्याचे महापालिकेस हस्तांतरण केले आहे.
व्हीएस न्यूज - स्वावलंबन ही आत्मनिर्भरतेची पहिली पायरी आहे. आत्मनिर्भर झालो तरच ठरवलेले कोणतेही ध्येय सहज गाठता येते. मुलांनी आपली स्वतःची दिशा ओळखून मार्गक्रमण करावे. आपल्याला स्वतःला कळले पाहिजे की आपण कोठे आहोत. आपल्याला नेमके काय करायचे हे ज्याला कळतं तोच पुढे जाऊ शकतो.मोठे व्हायचे असेल तर पुस्तके वाचलीच पाहिजेत. निरनिराळ्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी निश्चित त्याचा फायदा होईल. माणूस किती मोठा झाला यापेक्षा तो कसा मोठा झाला हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते.असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे यांनी सांगवी येथे व्यक्त केले.
दिशा सोशल फाऊंडेशन आयोजित नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सांगवी येथे ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत ‘चला आत्मनिर्भर होऊ या’ ह्या विषयावर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तानाजी मोरे होते. याप्रसंगी विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, उपप्राचार्य सुरेंद्रनाथ वरुडे, मुख्याध्यापिका प्रमिला बर्गे, पर्यवेक्षक चंद्रकांत शिंदे,प्रा. नितीन कदम,नवनाथ करंजुले, शरद ढोरे,प्रदीप पाटील, क्षितीज कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संतोष ढोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
त्या पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावण्यासाठी शिक्षक आणि आई वडिलांनी तसे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. शिक्षकासारखा भाग्यवानया पृथ्वीतलावर नाही. फक्त त्याचे कामावर, आपल्या विद्यार्थ्यांवर व आपण शिकवत असलेल्या विषयावर प्रेम आणि निष्ठा असली पाहिजे. चांगला माणूस, चांगले व्यक्तिमत्व घडविणे हे सर्वस्वी शिक्षकांच्या हातात असते. विद्यार्थी शिक्षकांचे मापन करत असतात. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी फार महत्वाची आहे. सौंदर्यापेक्षा आत्मविश्वास महत्वाचा आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर माणूस कोणतेही आव्हान सहज पेलू शकतो.याकरिता शिकण्या-शिकविण्यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी हयगय करून चालणार नाही. कृतज्ञ असणे ही मानवी मूल्यांमध्ये असणारी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. खूप वाचा, मोठे व्हा, लिहा, मोठ्यांचा आदर करा, मान राखायला शिका.जे शिकाल ते उत्तमच शिका, जे कराल ते उत्तमच करा असे सांगत त्यांनी त्यांच्या जीवनप्रवासातील अनेक प्रसंग मांडत सर्वांनाच अंतर्मुख केले.विद्यार्थ्यांनी साहित्य वाचले पाहिजे, आपले अनुभव, प्रसंग लिहिले पाहिजेत विविध उदाहरणे देत दोन तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या साहित्यविषयक अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संतोष ढोरे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, विद्यापीठाच्या एकूण प्रक्रियेत विद्यार्थी हाच सर्वोच्च स्थानी असला पाहिजे असा माझा नेहमी आग्रह राहिला आहे. यापुढेही तो राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मी सातत्याने उपलब्ध आहे. आपण शालेय पातळीवर शिक्षण घेताना आपले उद्दिष्ट निश्चित केले आणि त्या दिशेने वाटचाल केली तर तुम्हाला ध्येय गाठणे सहज शक्य होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले. प्रास्ताविकात नाना शिवले यांनी साहित्यिक आपल्या भेटीला कार्यक्रमातून साहित्य वाचन व लेखनाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढावी या उद्देशाने ह्या उपक्रमाची मालिका शाळा महाविद्यालयात सतत सुरू सतत सुरू राहील असे सांगितले. पाहुण्यांचा परिचय गजानन वाव्हळ यांनी करून दिला. आभार उपप्राचार्य सुरेंद्रनाथ वरुडे यांनी मानले. अतुल शिंदे, राजेश सावंत, अविनाश ववले, राजेंद्र करपे, संतोष निंबाळकर, बाजीराव लोखंडे, गुरूदास भोंडवे, संतोष बाबर,नंदकुमार कांबळे, किशोर जवळकर, यांनी विशेष सहकार्य केले.
व्हीएस न्यूज - भोसरी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्पोरेट इमारतीत लागलेल्या आगीतून अडकलेले १३ कर्मचारी बचावले, त्यात ८ महिलांचा समावेश होता. अग्निशमन दलाच्या जांबाज जवानांच्या धाडसामुळे या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपअग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे आणि प्रताप चव्हाण यांच्यासह ८ जवानांच्या टीमने ही कामगिरी केली.
भोसरी येथील डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेज शेजारी के.पी.ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची चार मजली कार्पोरेट इमारत आहे. येथे ३२ कर्मचारी कामाला होते. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ए.सी.मधे बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. जिन्यातच आग लागल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर काम करत असलेले १३ कर्मचारी अडकले होते. हळूहळू आग पसरत होती. धुरांचे लोट देखील वाढत होते. अडकलेले कर्मचारी गुदमरून जाण्याच्या भिती निर्माण झाली होती. दरम्यान आग लागल्याचे समजताच तात्काळ पिंपरी आणि भोसरी येथील अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. उपअग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे आणि प्रताप चव्हाण यांच्यासह ८ जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करत आग आटोक्यात आणली. जवानांनी दाखविलेल्या या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत कंपनीतील कागदपत्रे जळून खाक झाली असून एका चार चाकी वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहाणी झालेली नाही.
व्हीएस न्यूज - पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीवर वडीलांनीच अत्याचार केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. या घटनेचा मुलीच्या आईला धक्का बसल्याने काल तिने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीनुसार पतीला अटक करण्यात आली आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालक आहे. त्याने दारूच्या नशेत ८ दिवसांपूर्वी बायको अंघोळीला गेलेली असताना आपल्या अडीच वर्षाच्या मुलीवर राहत्या घरात अत्याचार केला. आई अंघोळीवरून आली असता तिने स्वतः डोळ्याने हा प्रकार बघितला व आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला ही मारहाण केली. मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर तिने सांगवी पोलिसांत काल तक्रार दाखल केली. पोलिसांनी २५ वर्षीय बापाला अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी आपले विचार मांडले. आयुष्यभर विद्यार्थ्याच्या भूमिकेत वावरत ज्यांनी जातीव्यावस्थेचे जोखड झुगारून लोकशाहीची बूज राखले अशा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६१ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करतांना समतेचा लढा तीव्र करण्याचा निर्धार यावेळी अमित बच्छाव यांनी केला अमित बच्छाव यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या या अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी गणेश सर्वगोड, रवी राठोड, जगदिश पाटील, आकाश शिंदे सतीश कदम, राजू वऱ्हाडी, सुनिल सोनवणे, सोमनाथ बोलके, शशिकांत जाधव, हर्षद पाटील, अक्षय हांडे, अमोल लांडगे, अाकाश शिंदे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक बदल होणार असून शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची नियुक्ती निश्चित झाल्याचे समजते. लवकरच बाबर यांची वर्णी लागणार असून नियुक्तीची घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत युतीच्या आशेवर असलेल्या शिवसेनेला युती तुटल्याने स्वतंत्ररित्या निवडणुकीत सामना करावा लागला. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घातलेले लक्ष, राष्ट्रवादीतील दिगगजांचा ऐंन मोक्याच्या वेळी भाजपात झालेला प्रवेश, सेनेतील गटातटाचे राजकारण, तिकीट वाटपात झालेल्या काही चुका त्यामुळे शिवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. १२८ पैकी ७७ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता काबिज केली. तर सेनेला अवघ्या ९ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून अनेक मुद्द्यांवरून सेना विरोधकाची भूमिका बजावताना देखील दिसत आहे. दरम्यान, स्थानिक राजकारण, आणि आगामी विधानसभेच्या तयारीसाठी शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी आपल्याला पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची केलेली विनंती वरिष्ठांना केली आहे. राज्यात सेनेचे भाजपशी ताणले गेलेले संबंध पाहता आगामी लोकसभा, विधानसभेला स्वतंत्ररित्या सामोरे जावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन सेनेची तयारी सुरु आहे. त्यानुसार पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडे संपर्कनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतर सेनेत संघटनात्मक बदल होण्यास सुरूवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा मातोश्रीवर बैठक घेऊन याबाबत मते जाणून घेतली होती.
सप्टेंबरमध्ये मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शहरप्रमुखपदासाठी सुलभा उबाळे यांच्या नावाची शिफारस केली होती. चिंचवडला बारणे यांच्या रूपाने खासदार, पिंपरीत चाबुकस्वार यांच्या रूपाने आमदार अशी ताकद सेनेची आहे. भोसरीत शहरप्रमुखपद दिले तर समतोल साधला जाईल, पक्षातील आक्रमक चेहरा असलेल्या सुलभा उबाळे यांना शहरप्रमुखपदी संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र मावळचे खासदार श्रीरंग बारणे व पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शहरप्रमुख पदासाठी पिंपरी मतदार संघाचे माजी प्रमुख योगेश बाबर यांच्या नावाचा आग्रह धरल्यामुळे बाबर यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांनी पसंती दिली असल्याचे समजते.
योगेश बाबर हे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे पुतणे आहेत. लोकसभेला मावळातून तिकीट नाकारले गेले तेव्हा गजानन बाबर यांनी शिवबंधन तोडले व शेकापच्या लक्ष्मण जगताप यांची पाठराखण केली होती. मात्र योगेश बाबर शिवसेनेतच राहिले महापालिका निवडणुकीत त्यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने बाबर यांनी मोरवाडी शाहूनगर मधून बंडखोरी केली व लक्षणीय मतेही मिळवली होती. दरम्यान ते भाजपच्याही संपर्कात होते मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून वजनदार पदाचा शब्द न मिळाल्याने अन् खासदार बारणे यांनी शहरप्रमुख पदासाठी शब्द दिल्याने ते सेनेतच राहिले आहेत.
व्हीएस न्यूज - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छ सर्वेक्षण ४ जानेवारी २०१८ पासून सुरु होणार असून शहर स्वछतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच, या अभियानामध्ये पिंपरी चिंचवड शहराला अव्वलस्थानी आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने महापालिकेतील आरोग्य, स्थापत्य, पाणीपुरवठा व जल:निसारण व उद्यान विभागासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक डॉ. उदय टेकाळे, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, सिताराम बहुरे, प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट, आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक व अभियंते आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशभरातून सुमारे ४ हजार ४१ शहरांचा सहभाग असणार आहे. सुमारे ४ हजार गुणांक या स्पर्धेत देण्यात येणार असून ३ टप्यामध्ये हे गुणांक होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत. डॉ. उदय टेकाळे यांनी यावेळी व्यक्त केले. सर्वेक्षण अंतर्गत संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट, स्वच्छता व हागणदारीमुक्तता, माहिती, शिक्षण व वर्तणूक बदल, कम्युनिकेशन (IEC), क्षमता बांधणी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उत्कृष्ठ कार्य या उपक्रमांना महत्व देण्यात येणार असून शहरमध्ये थेट निरीक्षण नागरिक अभिप्राय माध्यमातून शहरी स्थानिक संस्था आवश्यक माहिती गोळा केली जाणार आहे, असेही डॉ. उदय टेकाळे यांनी सांगितले.
केंद्रशासनाने स्वच्छतेबाबत जाहीर केलेल्या स्वच्छता अॅपचा अधिकाधिक नागरिकांनी डाऊनलोड करून त्याचा उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच स्वच्छतेबाबत येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी कालमर्यादित वेळेत सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. शहरातील शाळा, हॉटेल, मोहल्ला, सोसायट्या व मार्केट यांच्या स्वच्छतेबाबत स्पर्धा घेण्यात यावी व नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. के.पी.एम.जी.चे श्री. रघु गौडाव क्रिसिल चे अंकुर व्दिवेदी यांनी यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ बाबात सदरीकरण करून माहिती दिली. या सर्वेक्षानाअंतर्गत महापालिका सेवास्तरावरील प्रगती करिता एकूण १४०० गुणांक आहे. यामध्ये संकलन व वाहतूक (१४ मापदंड) ४२० गुणांक-३०%, प्रक्रिया विल्हेवाट (८ मापदंड) ४२० यासाठी ३०%, स्वच्छता हागणदारी मुक्तता (११ मापदंड) ३५० गुणांक २५%, माहिती, शिक्षण, संवाद आणि वर्तनातील बदल (९ मापदंड) ७० गुणांक ५%, क्षमता बांधणी (६ मापदंड) ७० गुणांक ५%, नाविन्यक्रम उपक्रम आणि उत्कृष्ठ कार्य ७० गुणांक ५%, तसेच स्वतंत्र प्रामाणिकरणासाठी १२०० गुणांक आहेत. प्रत्यक्ष निरीक्षण (१८ मापदंड) यासाठी १४०० गुणांक आहेत. यामध्ये नागरिकाच्या प्रतिक्रिया (६+३ प्रश्न) नागरिकांच्या प्रतिक्रिया १००० गुणांक ७२ % व स्वच्छता अॅप साठी ४०० गुणांक २८ % इतके असेल.
व्हीएस न्यूज - साने चौक चिखली येथील भारतीय मूलनिवासी संघाच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागासह भारतीय मूलनिवासी संघाच्या वतीने विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महासचिव अशोक मंगल, भारतीय मूलनिवासी संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सरोदय रमेश, उद्योजक बी. बी. वर्मा यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. तसेच पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बाबासाहेबांच्या जीवनाचे आपल्या उदबोधनात सविस्तर माहिती दिली.
यावेळी, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रवक्ता आयुष मंगल, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एस टी कांबळे, मिलिंद बनसोडे, संजय तरकसे, राज तुतारी, रतन बोरोले, सुशील मोरे, सुनील मोरे, सुजाता ठोसर, रोहन ठोसर, भाऊराव राऊत,विद्या राऊत, मायाताई चोपडे, मंजू सुधीर चव्हाण, दर्शनाताई मांडवे, माधुरी ताई गुप्ता, शकुंतला विजय पटेल, मुहम्मद अझार, हनुमान वाघमारे, निर्मला पाटील, बाळकृष्ण गायकवाड, शिला सिंग, हिराचंद गायकवाड, प्रल्हाद पवार, राहुल मधुकर कांबळे आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002