व्हीएस न्यूज - चिंचवड येथे गोमातेच्या डोहाळ जेवणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. येथील अशोक बाफना यांच्या घरी शनिवारी संध्याकाळी नटून थटून आलेल्या सुवासिनी... सनई-चौघड्याचे सुर अशा या मंगलमय वातावरणात कार्यक्रम झाला.
दरम्यान, उत्सवमूर्ती 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-माता यांनाही नटवले होते. अंगावर हिरव्या रंगाचा झुल... गळ्यात फुलांच्या माळा... पायात पैंजण... या दोघी मायलेकींचे कौतुक का तर दोघींच्या डोहाळ जेवणाची जंगी तयारी करण्यात आली होती. मग काय महिला मंडळाने या दोन जीवांच्या लक्ष्मी आणि गौरीच्या भाळी कुमकुम तिलक लावून औक्षण करून पुजा केली. त्यांची मोठ्या प्रेमाने ओटी भरली. मिष्ठान्नासह आवडते खाद्य त्यांना भरवण्यात आले.
हिंदु धर्मात गो-मातेला खूप महत्त्व आहे. जैन समाजातदेखील गो-मातेला अनन्य साधारण महत्त्व दिले असून तिचा सांभाळ केल्यास कुटुंबाला मिळणारे समाधान, ऊर्जा याविषयी महत्त्व सांगितले आहे. महाभारतामध्ये महर्षी गुरु वसिष्ठ ऋषींनी सुध्दा गो-मातेचे महत्त्व विषद केले आहे.
उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने बाफना कुटुंब 25 वर्षांपूर्वी चिंचवडगावात आले. हळूहळू व्यवसायात जम बसत गेला. जैन समाजात गाईला महत्त्व असल्याने अशोक बाफना यांना आपल्याकडेही एक गाय असावी. तिची सेवा करावी अशी इच्छा होती. परंतु तेशक्य होत नव्हते. तीन वर्षांपूर्वी गुरुमहाजांनी एका कार्यक्रमात गो-मातेचे महत्त्व समजावून सांगितले आणि बाफनांनी गाय घेण्याचा मनाशी निश्चय केला. वडील तेजमल, पत्नी जयश्री, मुलगा तुषार, मुलगी निवेदीता किशोर चोपडा, बंधु संतोष, सुनिता बाफना यांनी त्यास पाठिंबा दिला. मग त्यादृष्टीने तयारी सुरू झाली. संकरीत नको तर देशी गायच हवी असल्याने शोधाशोध सुरु झाली. नगर जिल्ह्यातील नेवासे येथून एक गाय आणि वासरू बाफना यांनी घेतले. गाय-वासराचे घरी जोरदार स्वागत झाले. त्यांचे नामकरण करून लक्ष्मी आणि गौरी अशी नावे ठेवली.
प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांची सेवा करू लागले. हळूहळू बाफना यांना आपल्य उद्योग व्यवसायात बरकत होत असल्याचे निदर्शनास आले. आपली परिस्थिती बदलण्यात लक्ष्मी-गौरी या गो-मातेचा पायगुण असल्याची भावना अशोक आणि जयश्री यांनी व्यक्त केली. घरातील लहानथोर मंडहींची या गो-माते विषयी प्रेमभावना, आपुलकी दिवसेंदिवस वाढत आहे. लक्ष्मी-गौरीला वेळच्या वेळी खाद्य देण, पाणी देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे याकडे विशेष लक्ष दिले जाते. एक दिवस लक्ष्मी-गौरी या मायलेकी गरोदर असल्याची बातमी बाफना कुटुंबास समजली. आता आपलया परिस्थितीत बदल झाला आहे. स्थैर्य आले आहे. याचा विचार करून त्यांनी या दोघींचे होहाळ जेवण करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाची तयारी कुटुंबातील महिलांनी उचलली आणि एक सुंदर कार्यक्रम बाफना यांच्या घरी पार पडला. या कार्यक्रमास शरद बोथरा, मदनलालजी कर्नावट, किशोर चोपडा यांचे मोठे सहकार्य लाभले.
व्हीएस न्यूज - पिंपळे सौदागर येथील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ आज करण्यात आला. पवना सहकारी बँक व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे तसेच सोसायटीतील पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
बोरा पार्क सोसायटीतील रहिवास्यांनी MNGL गॅस कनेक्शन मिळणेबाबत मागणी केली होती. नगरसेवक बापु काटे व निर्मला कुटे यांनी तातडीने MNGL अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून बोरा पार्क सोसायटी मध्ये तातडीने MNGLगॅस लाईन सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दिलेल्या सूचनांची दखल घेत MNGL मार्फत युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर बोरा पार्क सोसायटी मध्ये MNGL गॅस लाईन टाकून चार्ज ही करण्यात आली आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
व्हीएस न्यूज - दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने मंगळवार दि.२३ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड मोरवाडी येथे अॅटो क्लस्टर सभागृहात बडोदे येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्ताने पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने त्यांचा प्रातिनिधिक सत्कार माजी संमेलनाध्यक्ष डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे हे संमेलनाध्यक्षांची मुलाखत घेणार आहेत. याप्रसंगी माजी आमदार मा.उल्हासदादा पवार, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहील,अशी माहिती समन्वयक नाना शिवले यांनी दिली.
व्हीएस न्यूज - कान आणि मन समृद्ध व्हावे, डोळे दीपून जावेत, द्रूत होत जाणाऱ्या लयीने आपलीही धडधड वाढावी..अशा तालवाद्यांच्या जुगलबंदीने शनिवारी रसिकांच्या काळजाचा ‘ठेका’ चुकवला. संतुर व बासरी अशा तालवाद्यांची स्वरांची साथ मिळाल्याने अभूतपूर्व तालाविष्कार चिंचवड येथे घडला.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नव्या पिढीच्या कलाविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. निमित्त होते, पवनामाई संगीत महोत्सव ‘साद पवनेची’.. पवना नदी स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणूनच शनिवारी साद पवनेची या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने केले होते.
या कार्यक्रमाचे हे पहिले वर्षच होते. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरा शेजारील जिजाऊ उद्यान येथे सायंकाळी सहा वाजता ही जुगलबंदी रंगली. ही जुगलबंदी पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य संतूर वादक धनंजय दैठणकर, व पं हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य बासरी वादक सुनील अवचट यांच्यात झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. प्रशांत देशमुख, जिल्हा प्रांतपाल नॉमिनी रो. रवी धोत्रे आणि आनंदी ग्राम संकल्पनेचे सेक्रेटरी रो. दैवशहाणे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, करुणा चिंचवडे, महापालिका ब प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप खोत, रोटरीयन स्वाती अभ्यंकर, अर्जुन वाडकर, शीतल अर्जुन वाडकर, पिंपरी टाऊनचे माजी अध्यक्ष चिंतामणी अभ्यंकर, डायरेक्टर प्रोजेक्ट रो. राम भोसले, रोटरीयन बाळासाहेब उ-र्हे, पालिकेचे अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उज्वल बोरा या चार वर्षाच्या चिमुरड्याने सिंथेसायझरवर राष्ट्रगीत सादर केले व उपस्थितांकडून वाहवा मिळविली. तत्पूर्वी आतापर्यंत रोटरी क्लबने केलेल्या कार्याचा आढावा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर यांनी सांगितला. रानजाई प्रकल्पाचे सचिव सोमनाथ मुसुडगे यांनी ७८ दिवसांच्या प्रवासाची माहिती सांगितली. तर वर्षा पांगारे यांनीही रोटरीच्या कार्याची माहिती सांगितली.
यावेळी पंडितजींनी राग भूपालीने बासरी वादनाला सुरुवात केली. जोड, आलाप, नऊ मात्रा, तीन ताल, सोळा मात्रा असा रागाचा विस्तार करत पंडितजींची बासरी रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. धनंजय दहिठणकर व सुनील अवचट यांनी विलंबित झपताल, द्रूत त्रिताल, आलाप, झाला, तानांवर संतूरची तार छेडत त्यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या वादनाने प्रभावित झालेल्या रसिकांनी वेळोवेळी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. आयोजित कार्यक्रमाला शहरातील रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त साथ दिली. असा कार्यक्रम रोटरीच्या वतीने वारंवार घेण्यात येईल तशा सूचना रसिकांना दिल्या जातील.
कार्यक्रमाचे संयोजन रोटरीयन दीपक वाल्हेकर, रोटरीयन संदीप वाल्हेकर, रोटरीयन सोमनाथ हरपुडे, रोटरीयन सुभाष वाल्हेकर, रोटरीयन सुधीर मरळ, रोटरीयन चिंतामणी सोंडकर, रोटरीयन मारुती उत्तेकर, रोटरीयन सुनील वाल्हेकर, रोटरीयन वसंत ढवळे, रोटरीयन गणेश बोरा, रोटरीयन जगन्नाथ फडतरे, रोटरीयन संतोष वाघ, रोटरीयन सचिन काळभोर, रोटरीयन गजानन चिंचवडे, रोटरीयन शेखर चिंचवडे, रोटरीयन स्वाती वाल्हेकर यांनी केले.
व्हीएस न्यूज - शहरातील रस्ते कामांच्या ४२५ रुपये खर्चाच्या निविदा प्रक्रियेत स्पर्धा होऊ न देता पदाधिकार्यांना पोसण्याचे काम आयुक्त करीत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांना पदाधिकारी उत्तर न देता आयुक्त श्रावण हर्डीकर हे उत्तर देत असून, ३० कोटींची बचत झाल्याचे खोटे सांगत आहेत. ते सत्ताधार्यांची ‘वकिली’ करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. या प्रकरणी चौकशी न झाल्यास प्रसंगी अधिकार्यांना काळे फासण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, दत्ता साने, अजित गव्हाणे, नगरसेविका वैशाली काळभोर, डॉ. वैशाली घोडेकर, अनुराधा गोफणे, गीता मंचरकर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, फजल शेख आदी उपस्थित होते. विरोधी पक्षतेने बहल म्हणाले की, रस्ते कामांतील भ्रष्टाचाराची चौकशी न करता आयुक्त सत्ताधार्यांची बाजू मांडत आहेत. या प्रकारे ते त्यांची वकिलीच करत असून, त्यांना ‘सुरक्षाकवच’ देत आहेत. त्या कृतीवरून त्यांची भ्रष्टाचारला मूक सहमती असल्याचे दिसते. पूर्वी १२ ठेकेदार १५ ते ३० टक्के कमी दराने कामे करीत होते. ‘डीएसआर’मध्ये सर्व्हिस टॅक्स व व्हॅट समाविष्ट होता. आता तो जाऊन एकत्रित ‘जीएसटी’ आला आहे. त्यामुळे निविदा ४५ ते ५० टक्के कमी दराने स्वीकारणे अपेक्षित होते. त्यानुसार ३० नव्हे, तर सुमारे ९० कोटी रुपयांची बचत व्हायला हवी होती. राष्ट्रवादीच्या काळात अजित पवार यांचा अधिकार्यांवर वचक होता. ठेकेदार दर कमी करून दर्जेदार काम करीत होते. सध्या पालकमंत्र्यांना कोणी विचारत नाही. महापौर, सभागृह नेते व स्थायी समिती अध्यक्षा यांच्या कोणताही ताळमेळ नाही. त्यांना केवळ आपल्या प्रभागापुरता ‘इन्टरेस्ट’ दिसतो, असा आरोप बहल यांनी केला.
पालिकेतील या भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे. आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांसह चर्चेस बोलाविल्यास आम्ही आवश्यक ते सर्व पुरावे व कागदपत्रे देऊ. त्यात सर्व स्पष्ट होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले. येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपाच्या ५ नगरसेवकांवर ‘टक्केवारी’ गोळा करण्याची जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व कामांमध्ये ‘टक्केवारी’ वसुली जोरात सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
प्रशांत शितोळे म्हणाले की, ४२५ कोटींच्या रिंगमध्ये मुळात निविदेचे एस्टिमेंट अधिक दराने तयार केले गेले आहे. आयुक्तांनी एकाच दिवशी सर्व फायलींवर सह्या केल्या. राष्ट्रवादीच्या काळात प्रत्येक फाईलवर कीस काढणारे मुख्य लेखापाल राजेश लांडे व मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर यांनी एकाही फायलीवर कोणताही शेरा मारलेला नसल्याने भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. टक्केवारी दिल्याशिवाय ठेकेदारांची बिल मंजूर केली जात नाहीत. सल्लागार नेमण्यास विरोध करणारेच आता एकसारख्या कामांसाठी वेगवेगळे सल्लागार नेमत आहेत. भ्रष्टाचार होत असल्याचे उघडपणे दिसत असूनही, पालकमंत्री पुरावे मागत असल्याबद्दल शितोळे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
समाविष्ट गावांमध्ये प्रथमच ४२५ कोटींचे रस्ते विकसित करीत असल्याचे फ्लेक्स लावून भाजपा श्रेय लाटत आहे; मात्र अद्याप जागाच ताब्यात नसून, निधीची तरतूद नाही. केवळ मंजुरी देऊन नागरिकांच्या निव्वळ फसवणुकीचा प्रकार आहे. प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल हेच सांगत येत नाही, असा आरोप नगरसेवक दत्ता साने यांनी केला. केवळ ‘टक्केवारी’ लाटण्यासाठी या कामांना मंजुरी दिली गेली आहे. भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी निविदा न भरण्याचा दम ठेकेदारांना देत असल्याचे रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित वृद्ध महिला आणि तिचा ४९ वर्षीय मुलगा हे दोघे रुपीनगर भागात राहतात. १३ जानेवारीला या महिलेचा मुलगा कामासाठी बाहेर गेला होता. पीडित वृद्ध महिलेने घराचा दरवाजा आतून लावला होता. मात्र, अज्ञात इसमाने घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि या वृद्ध महिलेवर बलात्कार केला. मुलगा घरी आल्यानंतर पीडित महिलेने त्याला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर शुक्रवारी देहूरोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल होताच पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली यात महिलेवर अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक बोरकर हे याप्रकरणाचा तपास करत आहेत. पीडित महिलेच्या ४९ वर्षीय मुलाचे लग्न झालेले असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. त्यामुळे आई आणि मुलगा दोघेचजण घरात राहात होते, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली.
भाजप नगरसेवक हिंगे यांच्या विरुध्द पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी त्यांना पोलिसांकडून अजूनही अटक झालेली नाही. ते अद्याप फरार आहेत. मात्र, फरार असलेल्या हिंगे यांनी आज २० जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ वाजता झालेल्या महापालिका सभेत उपस्थित राहून हजेरी लावली आहे.
दरम्यान, निगडी पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे म्हणाले की, तुषार हिंगे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तीन महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीसांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असून ते सध्या फरार आहेत.
तुषार हिंगे फरार असताना महापालिकेच्या सभागृहापर्यंत पोहचतात. मात्र, पोलीस यंत्रणा हिंगे यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. याबाबच आश्चर्य व्यक्त केले आहे. हिंगे अजून किती दिवस पोलिसांपासून फरार राहणार, असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे. ‘आधी पिंपरीपर्यंतची मेट्रो धावू दे, मग निगडीच्या विस्ताराचे पाहू,’ अशा शब्दांत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे, आता मेट्रोचा निगडी आणि कात्रजचा विस्तार पहिल्या टप्प्यात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असे दोन मार्ग विकसित केले जाणार आहेत. मात्र, पिंपरीचा मार्ग निगडीपर्यंत हवाच, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी निगडीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) केल्या आहेत. तसेच, त्यासाठीचा निधी देण्याची तयारी पिंपरी चिंचवड महापालिकेने दाखवली होती. मात्र, पिंपरीतील पहिल्या मेट्रो स्टेशनच्या भूमिपूजन सोहळ्यात मेट्रोचा विस्तार सध्या शक्य नसल्याचे स्पष्टीकरण बापट यांनी दिले. डीपीआर तयार होऊन त्याला केंद्र-राज्याची मान्यता घेण्यात बराच कालावधी जातो. त्यामुळे, सध्या हे काम पूर्णत्त्वास जाऊ दे, त्यानंतर विस्ताराकडे पाहू, अशी टिप्पणी त्यांनी केली.
व्हीएस न्यूज - पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावे, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. मंत्री पुरी यांनी हे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांना देखील पाठविले आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली होती. मंत्री पुरी यांनी महापालिका सर्वाधिक आर्थिक सहभाग उचलण्यास तयार असेल तर पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला तत्काळ मंजुरी दिली जाईल, असे सांगितले होते. मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारने संमती दर्शविली आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याबाबत राज्य सरकाराने उचित कारवाई करावी, असे पत्र त्यांनी राज्य सरकारला पाठविले आहे. त्यामुळे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, ”केंद्र सरकारच्या वतीने पुणे महानगर क्षेत्रातील सार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्र.१ स्वारगेट ते पिंपरीला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्येच निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सुरु व्हावी, ही पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत मी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांना पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याची विनंती केली होती”.
”पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने सात डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावे, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याबाबतचा निर्णय आता राज्य सरकारच्या कोर्टात आहे”, असेही बारणे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती केली आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या विचारात घेता. तसेच नागरिकांच्या मागणीचा विचार करुन पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या मार्गास राज्य सरकारने त्वरित मान्यता द्यावी. राज्यसरकारतर्फे आर्थिक मदत करुन महामेट्रोला निगडीपर्यंतच्या मेट्रोचा डीपीआर त्वरित तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे, असेही बारणे यांनी सांगितले.
बारणे म्हणाले, ”मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची शहरवासियांची मागणी आहे. त्याला केंद्र सरकारने त्वरित मान्यता दिली आहे. पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. त्याला राज्य सरकारने मान्यता द्यावी. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत आर्थिक सहकार्य करावे. काही आर्थिक भार पिंपरी चिंचवड पालिका पेलेल. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. चालू कामात निगडीपर्यंतचे देखील काम मार्गी लागेल. त्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा”.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002