व्हीएस न्यूज - मोशी येथील संजय गांधी नगर येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर गेल्या दहा वर्ष पासून अंधारात आहे. सदर ठिकाणी पाणी,आरोग्य आणि विद्युत व वृक्ष सुशोभीकरण नसून सदर विषयी महापालिकेला वेळोवेळी कळवण्यात आले होते. महापालिका प्रशासन या समस्या सोडविण्यास दुर्लक्ष करत असल्याचे आरोप संतोष कसबे ( भोसरी चारोली मंडळ भा.ज.पा. सरचिटणीस ) यांनी केले.
दिनांक- ०२/०४/२०१८ रोजी मा.आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांना संतोष कसबे यांनी निवेदन दिले आहे . ४८ तासात जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात आणि परिसरात पाणी ,आरोग्य आणि विद्युत या वृक्ष सुशोभीकरण झाले नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा संतोष कसबे यांनी निवेदना द्वारे दिला आहे.
व्हीएस न्यूज - मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक आरक्षण मिळावे म्हणून 1982 सालापासुन पाठपुरावा सुरु आहे. मागील कालावधीत सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत राज्यभर लाखोंच्या संख्येने 58 मुक मोर्चा आणि 18 डिसेंबर 17 रोजी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडाळाशी चर्चा केली. लवकरच मराठा समाजाबरोबरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी त्यावेळी आश्वासन दिले होते. परंतू मुख्यमंत्र्यांना अद्यापपर्यंत बैठकीला वेळ नाही. सरकारच्या डोळ्यावरचे झापड उघडण्यासाठी व मराठा आरक्षण संघर्ष समितीची पुढची दिशा ठरविण्यासाठी शनिवार दि. 7 एप्रिल 2018 रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापुरमध्ये रेसिडेंन्सी क्लब येथे राज्यातील मराठा समाजाच्या सर्व संघटना, संस्था, मुख्य माध्यम प्रतिनिधी, इतिहास संशोधक, मार्गदर्शक यांची ‘गोलमेज परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी पिंपरी (पुणे) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. मधूकरराव पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष आबा पाटील, कोकण विभाग अध्यक्ष विलास सांवत, मराठा युवा अध्यक्ष रविंद्र खोत, ठाणे विभाग अध्यक्ष अविनाश पवार, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट सर, मराठा युवा संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, मराठवाडा युवा अध्यक्ष दत्ता मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी सुरेशदादा पाटील यांनी सांगितले की, यापुर्वी काढलेल्या मोर्चातून समाजाने प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे राज्यभर मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच 9 ऑगस्ट मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील सर्व मराठा आमदारांच्या माध्यमातून निवेदन दिले होते. या सर्व निवेदनामध्ये मराठा सामाजाच्या मागण्यांचा उल्लेख केलेला आहे. सदर सर्व मागण्यांवर उद्यापर्यत कोणतेही ठोस निर्णय झालेले नाहीत. मराठा समाजाची दिशाभूल करीत मुख्य मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन सरकारने त्यांच्या सोयीनुसार फसवे जीआर काढून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मागणी 50/ 45/ 5 अशी असताना सरकारने गरजूंना बँकेकडून कर्ज देण्यासाठी जीआर काढला. मात्र, या कर्जासाठी एकही टक्का अनुदान दिले नाही. उलट हे कर्ज मिळविण्यासाठी आर्थिक मागास प्रवर्गाच्या अनेक अटी लादल्या. 605 कोर्स जाहीर केले. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेल्या मुलांना सवलती न देता 1 लाख, 2.5 लाख उत्पन्न मर्यादेच्या अटी घातल्या आहेत. मात्र, त्याचा समाजासाठी काही उपयोग नाही. शैक्षणिक इबीसी सवलत 60 टक्क्यांवरुन 50 टक्यांवर आणली. तसेच पंजाबराव देशमुख वसतीगृहात प्रवेश घेणा-या विद्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट खालून इबीसी सवलतीची शिष्यवृत्ती 8 हजारापर्यंत केली आहे. मराठा समाजाला पुढे करुन काढलेल्या सर्व जीआरमध्ये एकाही ठिकाणी ‘मराठा समाज’ अशी नोंद नाही हे सर्व जीआर आर्थिक दृष्टया मागास प्रवर्गांसाठी आहे. प्रत्येक योजनेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावांचा वापर करुन बोगस फसव्या योजना पुढे करुन सरकारने छत्रपतींचा व सकल मराठा समाजाचा अवमान केला आहे. प्रत्येक जीआरमध्ये सरकारने व त्यांच्या अधिका-यांनी अनावश्यक अटी टाकून या जीआरचा व महामंडळांच्या सवलतीचा लाभ मराठा समाजाच्या युवकांना कसा घेता येणार नाही याची मात्र काटेकोरपणे दक्षता घेतली आहे. अशी टिका सुरेशदादा पाटील यांनी यावेळी केली.
मराठा आरक्षण संघर्ष समितीची प्रमुख मागणी अशी आहे की, चालू शैक्षणिक (2017-18) वर्षापासूनच मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच सरकारी नोकरीमध्ये इएसबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची अद्यापर्यंत नेमणुक झालेली नाही ती ताबडतोब करावी. तसेच खाली नमुद केलेल्या मागण्या मान्य कराव्यात.
मागण्या: - कोपर्डी प्रकारणाबाबत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या मार्फत पुढील योग्य ती कारवाई करुन आरोपींना फाशी देईपर्यंत शासनाकडून पाठपुरावा करण्यात यावा. मराठा आरक्षण शैक्षणिक वर्ष 2018 सुरु होण्यापुर्वीच लागू करण्यात यावे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाचा गैरवापर रोखण्यासाठी तालुका व जिल्हावार कमीट्या स्थापन करण्यासदर्भात शासन परिपत्रक काढण्यात यावे. शेतक-यांच्या शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालास हमी भाव देण्यात यावा. शाहु महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) हि स्वायत्त संस्था त्वरित कार्यन्वीत करण्यात यावी व मराठा समाजासाठीच असावी. छत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणी त्वरीत सुरु करण्यात यावी. आण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळ पुर्ण क्षमतेने मराठा समाजातील लोकांसाठी कार्यान्वीत करावे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना MPSC / UPSC स्पर्धा परिक्षा यासाठी खासगी शिकवण्या (कोचींग क्लासेस) शिक्षण प्रशिक्षण व अभ्यासिका यासाठी रोख स्वरुपात अनुदान लागू करण्यात यावे. मराठा विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी भरीव अनुदान तसेच व्हीसा पासपोर्ट यासाठी सवलती देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संपुर्ण खर्च शासना मार्फत करण्यात यावा. मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज सुलभ विनातारण उपलब्ध करुन देण्यात यावे. सदर कर्जाचे व्याज शासनाने भरावे. शासनाने जाहिर केलेल्या 605 कोर्सेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांचा समावेश करुन अध्यादेश लागू करावा. सदर सवलत सर्व शासकीय व अशासकीय महाविद्यालयांना लागू करावी. शासनाने जाहिर केलेल्या मराठा वसतीगृहाचे बांधकाम शासनाकडून करण्यात यावे व वसतीगृह भाडे तत्वावर चालू न करता विद्यार्थ्यांना वसतीगृह निर्वाह भत्ता संबंधीत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीला पिंपरी-चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरमने विरोध दर्शविला असून या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. प्लास्टिक पिशव्यांना सक्षम पर्याय मिळेपर्यंत बंदी मागे घ्यावी. पर्यावरण व प्रर्दूषणाला आळा घालण्यात शासन अपयशी ठरत असल्यामुळे याचे खापर शासन उद्योजकांवर फोडत असल्याचा आरोपही फोरमने केला आहे. तसेच या निर्णया विरोधात फोरम न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना याबाबत फोरमच्या वतीने निवेदन पाठविले आहेत. त्यात म्हटले आहे की, प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन आणि वापरावर शासन निर्णयाने बंदी घातली आहे. परंतू,या निर्णयाने पर्यावरणास मदत होणार असे वाटत असले तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यापुर्वी शासनाने राज्यातील प्लास्टिक उत्पादकांच्या संघटना, उद्योजक, तज्ञ यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. पावसाळा दोन महिन्यावर आला असताना 2018-19 या आर्थिक वर्षासाठी प्लास्टिक देशभरातील वितरकांपर्यंत पोहचले आहे. तेव्हा हा निर्णय जाचक आणि अव्यवहार्य असून तो मागे घ्यावा. राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे. त्याचा फटका सुमारे 20 लाखाहून उत्पादक, व्यापारी, कामगार वर्गाला बसला आहे. आजची बाजारपेठ प्लाटिकच्या वस्तुंवर अवलंबून आहे. मात्र बंदीमुळे अनंत अडचणींचा सामना प्लास्टिक उद्योगाला करावा लागत आहे. प्लास्टिक ठराविक उत्पादनांवर बंदी हा पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रर्दुषण थांबविण्याचा एकमेव मार्ग नाही, शासनाने यापुर्वी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली होती. मात्र, योग्य नियंत्रण यंत्रणा नसल्याने अंमलबजावणी अयशस्वी ठरली असताना आताही एकतर्फे निर्णय घेवू नये. अन्यथा या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे फोरमचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, सरचिटणीस ऍड. आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.
व्हीएस न्यूज - शहरातील प्रभाग क्रमांक 13 प्राधिकरण सेक्टर क्र. 22 मध्ये स्थलांतरीय झोपडपट्यांचा भाग नव्याने पुनर्वसन करण्यात आला आहे. या भागात अनेक नागरिक बेकायदेशीरपणे अथवा चोरून वीज वापरतात. त्यामुळे मागेल त्याला वीज मीटर द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मार्चाचे चिटणीस राहूल शिंदे यांनी केली आहे. याबाबत शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सेक्टर 22 मध्ये पुनर्वसन झालेल्या अनेक नागरिकांकडे वीज जोड नाही. त्यामुळे ते बेकायदेशी किंवा वीज चोरून वापरत आहेत. त्यामुळे मागेल त्याला वीज मीटर द्या, तुटलेले डीपी त्वरीत दुरूस्त करा, अंदाजे बीले न देता मीटर रिंडींग घेवून बिले द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी धनगर समाज जोडो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडेनगर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत या भागात सकाळी दहा वजात अभियानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यावेळी आघाडीचे अध्यक्ष दिपक भोजने, महावीर काळे, सुनिल बनसोडे, बंडू मारकड, राम दुधभाते, तानाजी कोपनर, नागनाथ वायकुळे, तानाजी गाडे, दादासाहेब कोपनार, शिवाजी आवारे, श्रीकांत धनगर आदी उपस्थित राहणार आहेत
व्हीएस न्यूज - गाडीचा धक्का लागला म्हणून एका त्रिकुटाने एकाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालत लाथा-बुक्यांनी जबर मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भोसरी येथील संजय गांधी नगर येथे घडला. विकास सर्जेराव इंगळे (वय 35, रा. संजय गांधी नगर, भोसरी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष ठोकळ (वय25), विशाल कांबळे (वय26), शुभम खरात (वय22) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास इंगळे भोसरीतून संजय गांधी नगर येथे घराकडे दुचाकीवरून जात होते. जाताना त्यांच्या दुचाकीचा धक्का आरोपींना लागला. यावरून तिघा आरोपींनी फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांना घरी जाऊन मारहाण केली. आरोपी संतोष ठोकळ याने बाजूला पडलेला सिमेंट ब्लॉक इंगळे यांच्या डोक्यात मारला. दोघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये इंगळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या एका दारूड्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. याबाबत भाऊसाहेब पाटील (वय 35, रा. भोसरी, पुणे) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौसुद्दीन रजाक अत्तार (वय 20, रा. बालाजी नगर झोपडपट्टी, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौसुद्दीन रजाक अत्तार गुरुवारी सायंकाळी हॉटेल थर्माईस जवळ दारू पिऊन गोंधळ घालत होता. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना तो विनाकारण त्रास देत होता. तसेच मोठ्या आवाजात अश्लील भाषेचा वापर करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत होता. याबाबत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गौसुद्दीन याला अटक केली आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत
व्हीएस न्यूज - बांधकाम व्यवसायासाठी जमीन खरेदी करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाख, 87 हजार रुपये घेतले. खरेदीखत न करता फसवणूक केली. याप्रकरणी लहानु यशवंत नरोटे (रा. लक्ष्मी तारा अपार्टमेंट, काळेवाडी) यांनी चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर आणि पवार नावाच्या एका वकीलाविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानू नरोटे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना बांधकामासाठी जागा हवी होती. आरोपी नार्वेकर आणि पवार यांनी त्यांना चिखली येथील एका जागेची कागदपत्रे दाखवून नरोटे यांच्याकडून चार लाख, 87 हजार रुपये घेतले. लाखोंची रक्कम घेऊन जमिनीचे खरेदीखत केले नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बांधकाम व्यावसायिक लहानू नरोटे यांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे करीत आहेत.
व्हीएस न्यूज - आनंदी जीवन जगण्यासाठी संपत्तीची नाही, तर संत विचारांच्या आचरणाची गरज आहे. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी अहिंसेचे तत्वज्ञान जगाला दिले. जगाने आता महावीरांचे तत्वज्ञान स्विकारायचे कि, महाविनाश स्विकारायचा याचा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
भगवान महावीर जयंती निमित्त आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील ‘श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या’वतीने गुरुवारी (दि.29 मार्च) आकुर्डी येथे शिंदे यांचे ‘भगवान महावीरांचे तत्वज्ञान व सद्यपरिस्थिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष संतोष कर्नावट, महामंत्री मनोज सोळंकी, राजेंद्र खिंवसरा, प्रकाश मुनोत, जयकुमार चोरडीया, सुभाष ललवाणी, राजेंद्र मुनोत, पुनम कर्नावट, अनिता सोळंकी आदींसह बहुसंख्य जैन समाज बंधू भगिनी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, गौतम बुध्द आणि भगवान महावीर यांनी आपल्या एैश्वर्याचा त्याग करुन बुध्दीप्रामाण्यवाद स्विकारुन सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने सम्यकदर्शकन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य शिकविले. सुख हे भौतिक गाष्टींशी संबंधित नसून तें आत्म्याशी संबंधित आहे. संपत्ती संचय करणारे झोपण्यासाठी लाखो रुपयांचे फर्निचर, बेड करतात. फकीराचे जीवन जगणा-या साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुगूट, सिंहासन अर्पण झोप येण्यासाठी नवस करतात. परंतू त्यांचे स्वास्थ बिघडल्यामुळे डॉक्टरांच्या सल्याने चटईवर झोपावे लागते. आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली व्हॉटसअप, फेसबुकच्या आभासी दुनियेत रमणारे ‘मम्मी - पप्पा’ पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार. उद्याच्या चिंतेपायी माणूस संपत्ती संचयाच्या मागे धावत आहे. या धावण्यामुळे माणुस म्हणून जीवन जगण्याचा खरा आनंद केंव्हा गमावून बसला हे कळलेच नाही. आता मानसांतील संवेदनशीलता जोपर्यंत जागी होत नाही. तोपर्यंत जगण्याचा खरा आनंद मिळणार नाही. असेही शिंदे म्हणाले. दुपारी औंध जिल्हा रक्तपेढी समवेत रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी जैन बंधू भगिनींनी उर्त्स्फुतपणे सहभाग घेतला.
व्हीएस न्यूज - आधुनिक संशोधनाचा व विज्ञानाचा उपयोग सर्व घटकांतील मानवीजीवन अल्प खर्चात समृध्द करण्यासाठी करता आला पाहिजे. पर्यावरणाचे व नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करीत संशोधन विकसित केले पाहिजे. त्या संशोधनाचा उपयोग दिर्घकाळ समाजाला करता आला पाहिजे. यातून वेळ, ऊर्जा व पैशाची बचत होणे देखील महत्वाचे असल्याचे प्रतिपादन भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्राचार्य डॉ. जि. ए. हिंगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे आयोजित केलेल्या ‘टेक्नोवेट 2018’ या तांत्रिक स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ न-हे येथील भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्राचार्य डॉ. जि.ए.हिंगे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्रकल्प समन्वयक प्रा. दिपक बिरादार, प्रा. संतोष रणदिवे आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य हिंगे यांनी पीसीसीओईआर मध्ये होत असलेल्या आधुनिक संशोधनाबाबत कौतुक केले. रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेल अंतर्गत या महाविद्यालयात मागील दोन वर्षात 90 पेक्षा अधिक पेटंटची, नोंदणी 25हुन जास्त संशोधन पेपर आणि 250 कॉपीराईटची एकाच वेळी नोंदणी करण्यात आली हे अभिनंदनीय असल्याचे हिंगे म्हणाले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, उपाध्यक्ष पद्माताई भोसले,विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, एस. डी. मराठे, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वागत प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, सुत्रसंचालन प्रा. दिपक बिरादार आणि आभार प्रा.संतोष रणदिवे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा शास्तीकर जाचक असल्याने मिळकतधारकांना तो भरणे शक्य नव्हते. त्यामुळे शास्तीकर कपात करण्याबाबत नव्याने अध्यादेश काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच हा नवा अध्यादेश जारी करणार आहेत. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले असल्याची माहिती भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.
अमोल थोरात यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, शहरातील मिळकतधारकांना शास्तीकर जाचक होता. त्यामुळे तो कमी करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. शहर भाजपतर्फे त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर कमी करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांनी त्यांची भेट घेतली. जुन्या शास्तीकरातील जाचक अटी शिथिल करून शास्तीकराबाबत लवकरच नवा अध्यादेश जारी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नव्या अध्यादेशामुळे शास्तीकराची जाचकता कमी होणार आहे. त्यामुळे मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व सामान्य मिळकतधारकांना कर भरणे शक्य होणार आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - ‘चाळिशीनंतरच्या वेश्यांचे जीवन एक चिंतन’ या विषयावर व ‘आफ्टर ४०’ या वेश्यांच्या जीवनावरील शॉर्ट फिल्मचा विशेष शो येत्या शनिवारी ( दि.३१) रोजी पिंपरीत होणार आहे. पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार कै. भा.वि. कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पिंपरीतील अॅटो क्लस्टर सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लांडगे यांनी दिली.
या परिसंवादामध्ये ख्यातनाम साहित्यिक डॉ. अनिल अवचट, पुण्याच्या पोलीस उपायुक्त व लेडी सिंघम अशी प्रतिमा असलेल्या ज्योती प्रिया सिंग, सामाजिक कार्यकर्त्या व तृतीयपंथी कवियत्री दिशा पिंकी शेख आणि वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन केंद्र चालविणार्या ज्योती पठानिया यांचा सहभाग असणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवडमधील नवोदित कलाकारांनी एकत्र येऊन वेश्यांच्या जीवनावर बनविलेली ‘आफ्टर ४०’ ही शॉर्टफिल्मही यावेळी दाखविण्यात येणार आहे. या फिल्मचे लेखन व दिग्दर्शक विजय जगताप यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वृत्तपत्रसृष्टीचा प्रारंभ करणारे कै. भा.वि. कांबळे यांच्या अष्टपैलू कार्याला समोर ठेऊन व उपेक्षित वर्गाविषयीची त्यांची जीवनभरातील धडपड विचारात घेऊन त्यांच्या समाजरूपी कार्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती पत्रकार अरूण कांबळे यांनी दिली.
समाजाने दुर्लक्षिलेला हा विषय व ही वेदना शहरात प्रथमच फिल्म व परिसंवाद अशा दुहेरी माध्यमातून प्रकट होणार आहे. डॉ. अनिल अवचट हे संवेदशील लेखक म्हणून परिचित आहेत. आपल्या विविध पुस्तकांमधून वेश्यांचे जीवन, त्यांच्या समस्या व प्रश्नांची त्यांनी मांडणी केलेली आहे. त्यांची मुक्तांगण व्यवसनमुक्ती केंद्र ही पुण्यातील देश विदेशात नावाजलेली संस्था व्यसनमुक्ती कार्यासाठीचे ‘आयडॉल’ म्हटले जाते. तर धाडसी,बंडखोर अशी प्रतिमा असलेल्या पुण्यातील आयपीएस अधिकारी ज्योती प्रिया सिंग या पोलीस उपायुक्त म्हणुन शहरात काम करीत आहेत. आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाच्या पुण्यातील रॅकेटचा पर्दाफाश करणार्या व गरजू व गरीब महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणार्या दलालांना पळता भूई थोडी करणार्या ज्योती प्रिया सिंग या आपले अनुभव यावेळी उलगडणार आहेत.
याचबरोबर वेश्यांना वृद्धावस्थेत आधार देणार्या व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी मोशी येथे केंद्र स्थापन करून दोन दशकांहून अधिक काळ कार्य करीत असलेल्या ज्योती पठानिया यांचाही या परिसंवादात विशेष सहभाग असणार आहे.
तर आपली तृतीयपंथी ओळख अभिमानाने मिरवणारी व परखड व स्पष्ट विचारांची कवियत्री अशी महाराष्ट्रभर ओळख असलेली दिशा पिंकी शेख या परिसंवादाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. वेश्यांचा चांगला व वाईट काळ अशा दोन्ही काळांची सखोल माहिती असलेली दिशा आपल्या अनुभवांचे विविध पदर यावेळी उलगडून सांगणार आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002