व्हीएस न्यूज – शाळा प्रवेशासाठी दोघा पालकांनी एकाच्या मध्यस्थीने थेट पंतप्रधान कार्यालयातील सहसचिव यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले बनावट शिफारस पत्र शाळेत दाखल केल्याचे उघड झाले आहे़.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रणव विजय चौधरी (वय २१, रा़ सावित्री अपार्टमेंट, सोमवार पेठ) याला अटक केली आहे तसेच दोघा मुलांच्या पालकावर गुन्हा दाखल केला आहे़.
याबाबत बिशप्स कोएड स्कुलच्या वतीने शेन मेकफरसन ऊर्फ रसल फिलीप (वय ३९, रा़ कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे़. बिशप्स कोएड या शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी व दुसरा विद्यार्थी ज्युनिअर के़ जी़ चे प्रवेशासाठी त्यांच्या पालकांनी प्रणव चौधरी यांच्याशी संगनमत करुन बिशप्स स्कुलमध्ये २३ मार्च पूर्वी भिकू इदाते अध्यक्ष मिनिस्टर स्टेटस हायकोर्ट पॉवर ज्युरिसडिक्शन मेंबर ऑफ डिफेन्स अँड हायर प्लॅनिंग कमिटी गव्हरमेंट ऑफ इंडिया, न्यू दिल्ली यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले पत्र तसेच देवर्षी मुखर्जी सहसचिव प्रधानमंत्री कार्यालय, न्यू दिल्ली यांचे नावाचे राजमुद्रा असलेले पत्र असे दोन्ही बनावट लेटरहेड तयार करुन ते खरे असल्याचे भासवले़ प्रणव चौधरी याने ते पालकांना दिले़. त्यांनी ते बिशप्स शाळेत दाखल करुन शाळेची फसवणूक केली़. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी अधिक तपास करत आहेत़.
व्हिएस न्यूज - स्वस्तात परदेश दौरा घडवून आणण्याचे आमिष दाखवून 10 जणांना 9 लाख रुपयांना गंडविण्यात आले आहे.
या प्रकरणी महेश बळीराम हळंदे (वय 36, रा. चिखली) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संकेत शेखर गोपाळे, विजय शिवाजी कांबळे या कंपनी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान रहाटणी येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रिस्टीजा सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी चालवितात. रहाटणीतील कोकणे चौकात कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीकडून फसवणूक झालेल्या दहाजणांना पन्नास टक्के सवलतीत देशविदेशात पर्यटनासाठी पाठविण्याचे तसेच तिकडे थ्री व फोर स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचे आमिष दाखविण्यात आले.
त्यासाठी कंपनीत सुरुवातीला पैसे गुंतवणे आवश्यक असल्याचे सांगितल्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरात दहा नागरिकांनी आठ लाख 60 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली. ठरलेल्या कालावधीत सभासदांना कोणत्याही प्रकारे देशविदेशात पर्यटनासाठी पाठविण्यात आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक हरीश माने अधिक तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - पिंपरी मार्केटमध्ये एका दुकानदाराने उसने पैसे देण्यास नकार दिल्याने एका टोळक्याने रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दुकानदार आणि त्याच्या मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
अनिल हसाकराम मोहनदासानी (वय 59 रा. ओमसाई कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार राजेश रामगोपाल यादव (वय 19 रा. मिलींदनगर, पिंपरी) याच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल यांचे पिंपरी मार्केटमध्ये सुनील होजिअरी हे दुकान आहे. रविवारी अनिल आणि त्यांचा मुलगा प्रतिक दोघेजण काम करत होते. रात्री सव्वासातच्या सुमारास राजेश दुकानात आला. राजेश आणि अनिल हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. राजेशने अनिल यांना अडीच हजार रुपयांची मागणी केली. अनिल यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून राजेश याने आपल्या अन्य पाच साथीदारांना बोलावून अनिल आणि त्यांचा मुलगा प्रतिक यांना हातोडी, लोखंडी रॉड, आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. दुकानातील सामानाची तोडफोड केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात महापालिकेने घाई केल्याचा आरोप जागरूक नागरिक मंचाचे संयोजक अशोक मंगल यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे लोकार्पण सोमवारी झाले. परंतु लोकार्पण करताना महापालिकेने अतिघाई केली आहे. असे मंगल यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले असून अनेक ठिकाणी अर्धवट कामे व राडारोडा पडला आहे असेही म्हटले आहे. व याच्या पुष्टयर्थ त्यांनी काही फोटो देखील पाठविले आहेत.
त्यांनी असे म्हटले आहे की, नव्याने सुरु झालेला हा उड्डाणपूल पाहण्यासाठी आम्ही गेलो. मात्र बऱ्याच ठिकाणी नवीन पुलाचे काम अपुरे असून राडारोडा पडलेला दिसून आला. त्यामुळे या वास्तूच्या उद्घाटनामुळे निर्माण झालेला आमचा उत्साह मावळला. ही कामे महापालिकेने तातडीने पूर्ण करुन स्वच्छ व सुंदर उड्डाणपूल नागरिकांना द्यावा.
त्याचबरोबर काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता यामार्गावर या महत्वाच्या उड्डाणपुलाचे काम ऑटो क्लस्टरजवळ काही कंपन्याच्या इमारतीमुळे रखडले आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूचे रस्ते पूर्ण तयार आहेत. परंतु कंपनीच्या जागेबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हा बीआरटी मार्ग कसा सुरु होणार, असा प्रश्न देखील अशोक मंगल यांनी उपस्थित केला आहे.
व्हिएस न्यूज - शहरात वाहनांच्या काचा तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. नेहरुनगरमध्ये आठ जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून परिसरातील 10 ते 12 वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. ही घटना मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास नेहरूननगर येथील टाकळे इमारतीजवळ घडली.
गणेश रामदास नेहरकर (वय-39, रा. नेहरू टॉवर, नेहरूनगर पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश गायकवाड, रिंकू ऊर्फ करण पिटेकर, नारायण शिंदे यांच्यासह त्यांच्या पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरकर व त्यांची बहिण मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता घऱी जात होते. यावेळी आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने आरडा-ओरड करत नेहरकर यांना शिवीगाळ केली. नेहरकर यांच्या पाठीत उजव्या बाजुला कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच परिसरातील 10 ते 12 मोटारींची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, भोसरी चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिंगबर सूर्यवंशी, फौजदार बाळासाहेब अंतरकर, मधुसूदन घुगे, विठ्ठल बडे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची चौकशी केली. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - एका 17 वर्षीय मुलगी दुकानात दूध आणण्यासाठी गेली असता तरूणाने 'माझ्यासोबत लग्न कर' असे म्हणत तिचा विनयभंग केला. ही घटना निगडी परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निगडी येथे घडली.
पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय जगताप (रा. चिंचवड गाव, चिंचवड) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित मुलगी मंगळवारी दुपारच्या वेळी दूध आणण्यासाठी दुकानात गेली होती. दूध घेऊन ती घरी परतत असताना, अक्षय याने तिला अडवले. तिचे कपडे ओढून तिच्याशी छेडछाड केली. 'माझ्यासोबत लग्न कर' असे म्हणत तिला मारहाण देखील केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - भोसरीतील टेल्को रस्त्यावर थरमॅक्स कंपनीसमोर जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. महापालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची नासाडी सुरू आहे. जलवाहिनी त्वरीत दुरूस्त करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. टेल्को रस्त्यालगत मागील दोन महिन्यांपासून या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. लाखो लिटर पाणी रात्रंदिवस वाया जाते. थरमॅक्स कंपनीतील कर्मचारी दशरथ शितोळे यांनी याबाबत महापालिका व एमआयडीसीकडे तक्रार केली. परंतु, दोन्ही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. नंतर मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता कल्पेश लाहीवाल व पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली. महापालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गळतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. परंतु, जवळत विद्यूत खांब असल्याने दुरुस्तीचे काम करता येणार नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले. त्याप्रमाणे विद्यूत विभागाला खांब काढण्याबाबत पत्र देण्यात आले. मात्र, तो खांब निघाल्याशिवाय गळती थांबू शकत नसल्याने मोठ्या प्रमाणे पाण्याची नासाडी होत आहे. याकडे महापालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही नासाडी होत असल्याचे जोगदंड, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, ऍड. सचिन काळे यांनी म्हटले आहे.
व्हिएस न्यूज - पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून वाकड येथील एका मद्यप्याने सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास आपल्या पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला.
या प्रकरणी सुरेखा संतोष सुळके (वय 30, रा. वाकड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून त्यानुसार संतोष अंकुश कुदळे (वय 35, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेख वाकड परिसरात धुण्याभांड्याचे काम करते. नवरा संतोष याला दारूचे व्यसन आहे. उभयतांमध्ये दारूसाठी पैसे देण्याच्या कारणावरून वारंवार भांडणे होतात. सोमवारी देखील अशाच प्रकारे दारूसाठी पैसे देण्याच्या कारणावरून भांडण झाले. सुरेखाने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या संतोष याने घरातील वरवंटा सुरेखाच्या डोक्यात घातला. यामध्ये सुरेखा गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - सांगवीतील जगताप डेअरी परिसरातील एका इसमाच्या नोकरानेच घरातील तब्बल 12 लाख 60 हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारून पलायन केले आहे.
हा प्रकार सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान घडला.
या प्रकरणी हरिश्चंद्र किसनराव गायकवाड (वय 66 रा. विशालनगर, जगताप डेअरी, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार बालाजी उर्फ प्रभाकर वाघणे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांच्या घरी बालाजी हा नोकर म्हणून कामाला होता. बालाजीने गायकवाड यांच्या घरातील थोडे दागिने चोरून काही दिवस सुट्टी घेतली. हा प्रकार सात महिने चालत राहिला. सात महिन्यानंतर गायकवाड यांना बालाजीवर संशय आला. त्यांनी घरातील दागिने तपासले असता, 12 लाख 60 हजार रुपये किमतीचे 41 तोळे सोन्याचांदीचे दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी अद्याप फरार आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - राजीनामा नाट्यातून पक्षावर दबाव निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मागील अनेक वर्षे याच पदाधिकाऱ्यांकडे पक्षाची सूत्र होती. मात्र त्यांना त्यांच्या काळात विशेष काहीच करता आले नाही. त्यामुळे त्या काळात पक्ष संघटना कमकुवत झाली असे प्रतिपादन शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील उर्फ बाळा कदम यांनी येथे केले.
दोन आठवड्यापूर्वी लोणावळा शहरातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. या प्रकरणावर पक्षाची बाजू मांडण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बाळा कदम हे बोलत होते. कोणत्या ना कोणत्या कारणाने नाराज असलेल्या कार्यकर्त्यांचे मत पक्षाबाबत कलुषित करण्याचे काम काही जणांनी पडद्याआडून केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी तालुकाध्यक्ष राजू खांडभोर यांच्या पदाला जी स्थगिती देण्यात आली त्यामागचे सूत्रधार ही हेच लोक होते असे संपर्कप्रमुख कदम यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला सेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख गणेश जाधव, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, माजी पं.स. सदस्या आशा देशमुख, लोणावळा शहरप्रमुख सुनील इंगुळकर, नगपरिषद विरोधी गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक माणिक मराठे, शिवदास पिल्ले, नितीन आगरवाल, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश केदारी, युवासेनेचे तानाजी सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुकाप्रमुख तसेच शहरप्रमुख यांच्या निवडी ह्या परस्पर केल्या गेलेल्या नसून त्यासाठी संपूर्ण निवडप्रक्रिया राबविली गेली असल्याचे सांगत सर्व नाराजांची पक्षाप्रती असणारी निष्ठा लक्षात घेऊन त्या सर्वांना पुन्हा पक्षकार्यात सामावून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच सेनेच्या मिशन 150 ची माहिती देत घराघरापर्यंत धनुष्यबाण पोचविण्यासाठी सेनेचे कार्यकर्ते सज्ज झाले असल्याचे कदम यांनी सांगितले.
व्हिएस न्यूज - जेवन करून शतपावली करणाऱ्या एका तरूणाला जुन्या भांडणाच्या रागातून एका शस्त्रधारी टोळक्याने पाठलाग जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला व त्याच्या घरातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या मोटारीचीही तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता भुमकर चौकात घडली. अशिष उबाळे (वय-25, रा. वाकड) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय पवार याच्यासह त्याच्या 5 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशिष व संजय याची यापुर्वी भांडणे झाली आहे. याचा वादातून मंगळवारी रात्री अशिष भूमकर चौकात शतपावली करत असताना संजय साथीदारांसह हातात कोयता, तलवार घेऊन तेथे आला. अशिषचा पाठलाग करत त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशिष पळून जाण्यात यशस्वी झाला. अशिषची मोटार व त्याचा मित्र अमित भालेराव याची दुचाकीची आरोपींनी दगडाने, कोयत्याने तोडफोड केली. अशिषच्या घरातील व्यक्तींना धमकी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - जागतिक 'मातृदिना'च्या निमीत्ताने पिंपरी-चिंचवड मधील कलाकारांनी खास आई साठी समर्पित म्हणून एक विशेष गीत केले आहे. "सांग ना गं आई" असे या गीताचे नाव असुन पिंपरी-चिंचवड मधील रेझोनन्स स्टुडिअो आणि iDreamz फिल्मक्राफ्ट यांनी या गीताची निर्मिती केली आहे. अनावरण सोहळा चिंचवड येथे पार पडला, कार्यक्रमाला "दिल दोस्ती दुनियादारी" मधील आशू या भूमिकेतून चमकलेले तसेच "बापजन्म" या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते पुष्कराज चिरपुटकर हे विशेष अतिथी म्हणून लाभले होते. त्याशिवाय "फुंतरू" या चित्रपटाचे पुरस्कार विजेते संकलक बी मंहातेश्वर, "राधा ही बावरी" या मालिकेतून चमकलेले सुचेत गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुत्रसंचालन "डबल सीट", "बारायण" या चित्रपटांतून झळकलेल्या अभिनेत्री रूपाली पाथरे यांनी केले. आई नेहमीच आपल्या मुलांसाठी सतत राबत असते पण मुला-मुलींचे तिच्या कष्टांकडे दुर्लक्ष होते म्हणूनच गीतकार व निर्माता गणेश साबळे यांनी या गीताद्वारे आताच्या युवा पिढीला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. "सांग ना गं आई तुला काय हवे?" हा प्रश्न प्रत्येकाने आईला विचारला पाहिजे अर्थातच उत्तराने डोळे पाणावल्याखेरीज राहणार नाहीत. हे गीत अतिशय सुंदररीत्या संगीताच्या सुरांत गुंफलंय मराठी ब्रेथलेस फेम संगीतकार तेजस चव्हाण यांनी. यांच्या संगीताची जादू नेहमीच श्रोत्यांना भुरळ घालते, त्यात या गीताने आणखी एक भर पडली आहे. गीताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गीताला लाभलेला सुरेल आवाज. गतवर्षी पार पडलेल्या मराठी सा रे ग म प या कार्यक्रमातून चमकलेले आणि स्पर्धेचे उपविजेते ठरलेले अक्षय घाणेकर यांनी या गीताचे गायन केले आहे. गणेश शिलवंत, रोहित वनकर या कलाकारांनी अनुक्रमे गिटार व बासुरीचे स्वर दिले आहेत. हे गीत ऐकल्यावर ज्याप्रमाणे काळजाला भिडते त्याचप्रमाणे या गीताचा व्हिडियो देखील विचार करायला लावणारा आहे. हा सुंदर व्हिडीयो दिग्दर्शित केलाय नवोदित दिग्दर्शक आकाश थिटे यांनी. त्यांनी मांडलेली कथा, शुभम केदार यांचे छायाचित्रण, शुभम राऊत यांचे संकलन आणि नवोदित कलाकार रणजित कांबळे, उत्कर्ष कांबळे, नहुष अकोलकर यांच्या समवेत बारायण या चित्रपटातून व अनेक मराठी मालिकांतून चमकलेल्या रश्मी घाटपांडे व रूपाली पाथरे यांनी अभिनय केला आहे. याशिवाय सागर माने, राजस चव्हाण, अनिकेत घाडगे, सुरज वामन, प्रसाद वाडेकर, शार्दुल मांडे, प्रणिल साबळे, विशाल कालेकर, राहूल कचरे, निमेश हिरवे, सागर पांढरे हे गीत लोकांपर्यत पोहचवण्याचे काम करत आहे. आई आपल्याला भरभरून देत असते आणि म्हणूनच आपण आईची काळजी घेतली पाहिजे. युवा पिढीने या गीताद्वारे दिलेला हा संदेश समजून घ्यावा व रेझोनन्स टीमने आणखी नव नवीन कामे करून शहराचे नाव उज्ज्वल करावे अशी सदिच्छा पुष्कराज यांनी व्यक्त केली. हे गीत तुम्ही युट्यूबवर सांग ना गं आई हे नाव टाकून "रेझोनन्स स्टुडिअो" या युट्यूब चैनलवर पाहू शकता. आई ला समर्पित हे सुंदर गीत सर्वांनीच शेअर करून या गीताला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन तेजस चव्हाण, गणेश साबळे आणि सुंदर कांबळे यांनी उपस्थितांना केले.
https://youtu.be/daMdYDq4kGw
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002