व्हीएस न्युज - पुणे येथे कार्यरत तारा मोबाईल क्रेशेस हि संस्था बांधकाम मजुरांच्या शिक्षणा पासून वंचित असणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी गेले ३५ वर्ष विविध प्रकारे साहाय्य करत आहे . त्यापैकी ३७ मुलांनी २०१८ - २०१९ या कालावधी मध्ये इयत्ता १० वी , १२ वी, व त्या पुढील शिक्षण पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले. तारा मोबाईल क्रेशेस या संस्थेने (दि.२०) पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या कौतुक सोहळ्यामध्येे या मुलांनी स्वतःच्या शब्दांमध्ये आव्हानाची यशोगाथा मांडली.
संस्थेची नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या साहाय्याने या मुलांचे भविष्य उज्वल करण्याची वाटचाल चालू आहे. या मुलांन मध्ये संधीचं सोन करण्याची जिद्द, स्वीकारलेलं आव्हान पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आणि आव्हान पूर्ण करण्यासाठी लागणारी चिकाटी त्यांनी मांडलेल्या पॅनल डिस्कशन मधून स्पष्ट दिसून आली.
यावेळी या मुलांनी त्याच्या पालकांच्या व्यवसायामुळे होणाऱ्या स्थलांतरामुळे त्याच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी आणि अभ्यासापासून लक्ष विचलित करणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात या संदर्भात सर्वांपुढे आपली मते मांडली.
मुलांबरोबर पॅनल डिस्कशन मध्ये मुलांचे पालक, लेबर कँम्प मधील कॉम्युनिटीचे प्रतिनिधित्व करणारे सपोर्ट ग्रुप मेंबर्स , युवक गट या सर्वानी बांधकाम मजुरांची बाजू मांडताना पालक, युवक आणि कम्युनिटी प्रतिनिधी म्हणून ते कसे सहकार्य करीत आहेत आणि त्यात मुलांना शाळा प्रवेश, वैद्यकीय उपचार करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात या समस्यांना सर्वांपुढे मांडले.
या कौतुक सोहळ्यास, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. आयुष्य संदर आहे आणि यशाचे मार्गही भरपूर आहेत. आयष्यातील निर्णय घेताना आणि आयुष्य व व्यवसाय यांचा मिलाप करताना काळजीपूर्वक असाच व्यवसाय निवडावा कि, ज्याची आपल्याला आवड आहे. हे निवडताना स्वतःचा शोध कसा घ्यायचा, बदलत्या जगातील उपलब्ध संधी आणि प्रत्येक कामाचे महत्व आणि त्या कामातील गुणवत्तेचे महत्व यावर काही यशाचे मंत्र दिले. पुढे जाऊन त्यांनी मुलांना मदतीचा हात पुढे करत असेही सांगितले कि आयुष्यात पुढे जाताना ५ गोष्टी कधीही करायच्या नाहीत, त्या म्हणजे, अंधविश्वास भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, जातीयवाद आणि आत्महत्या. संस्थेच्या प्रयत्नाचे कौतुक करताना ते म्हणाले कि समाजातील गरजूपर्यंत सामाजिक संस्था पोचताना दिसतात जिथे शासन कमी पडते .
या कार्यमास प्रशांत कोठाडिया, यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले गेले. बदलत्या समाजामधील शिक्षणाची वाट निवडताना पालक, शिक्षण तज्ञ् , व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांना कालानुरूप बदलणे गरजेचे आहे. आपले शिक्षण हे पारंपरिक पठडीतून बाहेर येऊन अध्ययन, अभियक्ती आणि सृजनशील करण्यासाठी त्यांनी सर्वाना आव्हान केले. मुलांना भावी आयुष्यात पुढे जाताना आणि शुभेच्छा देताना, शिक्षण, शिकलेल्या कौशल्याचा भविष्यात वापर, संवाद कौशल्य, विश्लेषण कौशल्य, सृजनशील विचार, यावर प्रभुत्व मिळविणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने बेहेरे अँड राठी ग्रुप तर्फे, राम कुमार राठी, नाईकनवरे डेव्हलप्सर्स यांच्या वतीने राम कदम, आणि रोहन बिल्डर्स यांच्या वतीने शिला म्हस्के हे मान्यवर म्हणून उपस्थिती लाभलीे. रामकुमार राठी यांनी समस्त मान्यवर आणि उपस्थितांना आपल्या भाष्यातून तारा मोबाईल क्रेशेस च्या सुरवातीच्या काळात घेऊन जाऊन, झालेल्या मुलांच्या आयुष्यातील बदलांचे श्रेय हे संस्थेला दिले. तसेच संधी मिळाली तर हीच मुले मजुरांपासून कुठपर्यंत जाऊ शकतात आणि त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी संवेदनशील राहून त्यांना सहकार्य करावे असे आव्हान केले. या मुलांना संधी देणे हि बांधकाम व्यावसायीक म्हणून आपली जबाबदारी आहे हेही सांगितले.
रामकुमार राठी पुढे गुरुदक्षिणा विषयी बोलताना मुलांना म्हणाले की " सर्व मुलांनी शिकून आयुष्यात अशसवी व्हावा आणि आपले आयुष्य अशस्वी करायला जशी मदत मिळाली तशी मदत आपणही दुसऱ्यांना करावी ,ही केलेली मदत हीच गुरुदक्षिणा."
बांधकाम साईटवर राहणाऱ्या मुलांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी तारा मोबाईल क्रेशेस संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात व त्यातून अनेक संधी उपलब्ध करून दिली जाते. मुलांना सरकारी शाळांमध्ये दाखल करण्यापासून, वैयक्तिक मार्गदर्शन, अध्ययनासाठी विविध संधी ते अर्थसहाय्या पर्यंत सर्वच बाजूने संस्था या मुलांच्या पाठीशी ऊभी राहते. तसेच संस्थेतर्फे मुलांना विकासाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. बिकट परिस्थिती आणि आर्थिक चणचणीस सतत संघर्ष करणाऱ्या निवडक मुलांना संस्था नामांकित वसतिगृहात प्रवेश मिळवून त्याचा सर्व खर्चही देणगीदारांच्या मदतीने करून त्यांचे शिक्षणात सातत्य राखण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्थेच्या कामाची सुरवात पाय भरणीच्या काळात सुरु होते हे शास्त्रीय तत्वाच्या आधारावर संस्था शाळापूर्व संस्कार आणि अनुभवाची हि जोड लावत असल्याची संस्थेच्या माजी अध्यक्ष फ्रेनी तारापोर यांनी उपस्थितांना दिली .
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करुन पुण्यातील श्रमिक संघाच्या उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. तसेच कर्मचारी संघटनेचा संपुर्ण ताबा आणि सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेऊन प्रशासकांनी पुढील तीन महिन्यांत सभासदांची यादी तयार करावी, कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, असा आदेशही औद्योगिक न्यायालयाने दिला आहे.
कर्मचारी महासंघाचे खजिनदार तसेच वादी अंबर किसनराव चिंचवडे यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आपण ११ जून २०१८ रोजी कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर वेळोवेळी सुनावणी झाली. आपल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यावर कामगार आयुक्तांनी १ एप्रिल २०१९ रोजी या तक्रारींबाबत औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्याबाबत संमती पत्र दिले.
त्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ संतोष म्हस्के यांच्यामार्फत ३ मे २०१९ रोजी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन औद्योगिक न्यायालयाने कर्मचारी महासंघावर दैनंदिन कामकाज करण्यास मनाई करुन आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्याचा अंतरिम आदेश दिला या दाव्याव १८ जुलैरोजी अंतिम सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून औद्योगिक न्यायालयाचे सदस्य एम. आर. कुंभार यांनी कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश दिले. तसेच उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. याबाबतचा चौकशी अहवाल औद्योगिक न्यायालयाकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे.
व्हीएस न्युज - लोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावरट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते. हे सर्वजण रायगडला सहलीला गेले होते. सहलीवरून घरी परतत असताना लोणी काळभोर येथे काळाने या तरुणांवर झडप घातली.
पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इर्टीका कार ही यवतच्या दिशेने जात होती. लोनी काळभोर वाक वस्ती येथे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधील दुभाजकावरून पलीकडच्या मार्गावर कार गेली. त्याच वेळेस शहराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकने कारला सुमारे शंभर फूट फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढणे अडचणीचे झाले होते. यामधील सर्व मृतदेह ही यवत परिसरातील रहिवासी आहेत. सर्वांना लोणी पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोरचे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अपघातात मृत झालेल्यांची नावे:
शुभम रामदास भिसे (वय १९)
विशाल सुभाष यादव ( वय २०)
निखिल चंद्रकांत वाबळे (वय २०)
अक्षय चंद्रकांत शिगे ( वय २०)
ऋषिकेश गणेश यादव ( वय २०)
अक्षय भरत वायकर ( वय २२)
नूरमोहम्मद आबास दाया ( वय २२)
परवेज अशपाक आतार ( वय २१)
जुबेर अजीज मुलाणी (वय २१)
व्हीएस न्युज - 'लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण तयार करण्यासाठी काही तरी बोलायचे, अशी सवयच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लागली आहे. त्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा त्यांना वर्षा बंगल्यावरच बोलावून घ्यावे. तेथे सीसीटीव्ही तसेच इतर सुविधाही असतात. तेथे बसून चर्चा करावी. परंतु, त्यांनी लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम थांबवावे,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात गुरूजन पुरस्कारांच्या वितरणानंतर पवार यांनी माध्यमांशी बोलताना पाटील यांच्यावर टीका केली. 'पाटील हे वरिष्ठ नेते असून, एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते राज्य सरकारमधील मंत्री असून, विधान परिषदेतील नेते आहेत. लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम त्यांनी थांबविले पाहिजे. काही गोष्टी राजकीयदृष्टीकोनातून बोलल्या जातात. परंतु, ते आता काहीही बोलत आहेत. त्यांच्या अशा बोलण्याने माध्यमांना खाद्य मिळते. त्यामुळे उलटसूलट बातम्या येतात. नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधीबद्दल उगाचच शंका निर्माण होते. आपला नेता आगळे-वेगळे करतोय का, असे वाटत राहते. परंतु, असे वागणे हा चंद्रकांत पाटलांचा स्वभाव असून, त्याला औषध नाही,' असा टोलाही पवार यांनी लगावला.
शिवसेनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चांचाही पवार यांनी समाचार घेतला. 'सरकार चालविणाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन कामे करायची असतात. कामे झाली नाही, तर अधिकाऱ्यांवर कारवाई करायची असते. मात्र, शिवसेनेचा तो वकूब नाही. सत्ताधारी मोर्चा काढत नाहीत. शिवसेनेला प्रश्न सोडवता येत नसल्याने मोर्चा काढण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातून आपण शेतकऱ्यांसाठी काही तरी करतोय, असे दाखविण्यात येत आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.
'विधानसभेत ज्या पक्षाकडे १४५ आमदार आहेत त्यांचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केला असेल तरी आमदारांची संख्याच शेवटी महत्त्वाची असते,' असे पवार म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाबाबत पवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, 'प्रत्येक पक्ष्याच्या कार्यकर्त्याला आपआपली जागा मागण्याचा अधिकार असून, त्यादृष्टीने चर्चा होत आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा निर्णय हा वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरच होणार आहे,' असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाबाबत नोटीस बजावल्याचे बातम्यांमधूनच माझ्या वाचनात आले आहे. पक्ष्याची त्याबाबत रविवारी बैठक असून नेमके काय झाले आहे, हे त्याचवेळी समजेल. तसेच पक्ष्याचा राष्ट्रीय दर्जाबाबत नेमक्या कोणती त्रुटी राहिल्या आहेत, हे शोधून आयोगाच्या नोटिशीला उत्तर देण्यात येईल.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढली आहे. चाकण, रांजणगावच्या औद्योगिक पट्टय़ातील खंडणीखोरी वाढल्याने परदेशी कंपन्या थांबायला तयार नाहीत. जागोजागी भंगारमाफिया तयार झाले आहेत. ही वाढलेली गुंडगिरी रोखण्यात सरकारला अपयश आल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगवीत केली.
राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पवार यांच्या उपस्थितीत झाली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नगरसेवक दत्ता साने, भाऊसाहेब भोईर, नाना काटे आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले,की शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. नगरसेवकांवरील हल्ले वाढले आहेत. माथाडीच्या नावाखाली होणाऱ्या गुंडगिरीमुळे उद्योगधंदे चालवणे अवघड झाले आहे. भंगार मालाचे ठेके मिळवण्यासाठी मंत्रालयातून दूरध्वनी येत आहेत. सगळीकडेच गुंडगिरी वाढली आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील सहभाग चिंताजनक आहे.
पिंपरी पालिकेचा कारभार चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. शहरहिताचे आणि जनहिताचे निर्णय होत नाहीत. कचऱ्याच्या निविदांचा घोळ घातल्याने हा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. १५-१५ दिवस कचरा उचलला जात नाही. शास्तीकराचा प्रश्न सुटल्याचा दावा खोटाच आहे. रेडझोनचा प्रश्न तसाच आहे. स्वच्छ भारत अभियानाचा नुसताच गाजावाजा असून सुंदर शहराची अवस्था वाईट शहरात करून ठेवली आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही.
पार्थच्या प्रश्नावर पवार भडकले
मावळ लोकसभेतील पराभवानंतर पार्थ पवार पुन्हा शहरात फिरकले नाहीत, पार्थचा पराभव पवार कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवार भडकले. पार्थपर्यंत तुमचा प्रश्न पोहोचवतो आणि त्याचे उत्तर तुम्हाला कळवतो, असे उत्तर देतानाच पार्थ एकटाच पराभूत झाला नाही. सर्व पराभूत उमेदवारांसाठी एकसारखेच दुख झाल्याचे पवारांनी स्पष्ट केले.
व्हीएस न्युज - ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी गेली चार दशके काम केलेल्या ‘वनस्थळी’ संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई बळवंत पुरंदरे (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी, तर पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होत. गेल्या काही वर्षांपासून निर्मलाताई आजारी होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
विद्यार्थी सहायक समिती आणि फ्रान्स मित्र मंडळाच्या माध्यमातून निर्मलाताई पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आदिशक्ती पुरस्कार आणि सावित्रीबाई पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
निर्मलाताई यांचा जन्म ५ जानेवारी १९३३ रोजी झाला. त्या माहेरच्या माजगावकर. ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर आणि ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर यांच्या त्या भगिनी होत. पुरंदरे यांनी पुणे जिल्ह्य़ातील आयआयएम ट्रस्टच्या माध्यमातून फुलगाव येथे निराश्रित विद्यार्थ्यांसाठी बाल सदनाची स्थापना केली होती. गेल्या चार दशकांपासून अव्याहतपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांसाठी सर्वस्व देऊन झटणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.
वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खेडय़ा-पाडय़ांतील अनेक हातांना एकत्र बांधले. मात्र, केवळ बालसदन किंवा बालवाडी निर्माण करून त्या थांबल्या नाहीत, तर तिथे शिकविण्यासाठी शिक्षिकासुद्धा तयार केल्या पाहिजेत, हे ओळखून त्यांनी तेथील महिलांसाठी सहा महिन्यांचा बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग सुरू केला. त्यातूनच वनस्थळी संस्थेचे कार्य विस्तारले. तसेच हे प्रशिक्षण वर्गाचे जाळे विस्तारल.
त्यांच्या या कार्याची महती ग्रामीण भागांत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला चांगलीच परिचित आहे. डॉ. अच्युतराव आपटे यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी सहायक समितीमध्ये निर्मलाताई सुरुवातीपासूनच सक्रिय होत्या. ग्रामीण भागातून मोठय़ा शहरांमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची त्यांना जाणीव होती. स्नेहयात्रा हे त्यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक प्रसिद्ध आहे.
व्हीएस न्युज - डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा (Sports Medicine) विभागाच्यावतीने क्रीडा चिकित्सा विषयक एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी २०१७- १८ चा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कॉमनवेल्थ गेम २०१७ चा सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू उत्कर्ष पंढरीनाथ काळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्नल डॉ. दीप शर्मा, प्राध्यापिका डॉ. करुणा दत्ता, आदी उपस्थित होते.
कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांनी खडतर परिस्थितीतीवर मात करून कुस्तीला नवेस्थान निर्माण करून दिले. त्याच्या यशस्वी कारकीर्दीचा आढावा डॉ. डी. एस. भामरे विभाग प्रमुख क्रीडा चिकित्सा यांनी दिला. खेळाडूच्या आरोग्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अस्थीरोग विभागामध्ये क्रीडा चिकित्सा बाह्यरुग्ण विभाग नुकताच सुरू करण्यात आला आहे. याचा फायदा खेळाडूना नक्कीच होईल. खेळाडूनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी केले. "
कुस्तीपटू उत्कर्ष काळे ने कुस्तीत केलेल्या यशस्वी कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याला पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आपले नाव जागतिक पातळीवर झळकत रोहो" असे अधिष्ठाता डॉ भवाळकर यांनी आपल्या मनोगतात म्हंटले.
सदर कार्यक्रम कुलपती डॉ. पी. डी. पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्रीताई पाटील यांचा मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
क्रीडा चिकीत्सा विषयक परिसंवाद कार्यक्रमामध्ये खेळाडूचा आहार, व्यायाम, दिनचर्या, भौतिकोपचार, विविध व्याधी, दुखापती, विविध तपासण्या, योग्य उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना, परीक्षण, क्रीडा सराव आदी घटकांच्या माध्यमातून खेळाडूच्या आरोग्यासाठी आवश्यकते मार्गदर्शन व उपचार का गरजेचे आहेत आणि ते कोणकोणते या प्रमुख उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध तज्ञानी यावेळी मार्गदर्शन केले यामध्ये क्रीडा चिकित्साशास्त्रची व्याप्ती विषयी – डॉ. डी. एस. भामरे, भोतिकोपचार पध्दती - डॉ बासू, खेळाडूचा ताणतणाव व तणावमुक्ती - डॉ आलोख देवधर, आहार मार्गदर्शन - डॉ. सुयश भंडारी, स्पोर्ट्स फिजियोलॉजी - कर्नल डॉ दीप शर्मा, स्पोर्ट्स ऍन्थ्रोपोमेट्री आणि बायोमेकॅनिक्स विषयक - डॉ उर्वशी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी डॉक्टर्स, आहार तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, सर्जन व भावी डॉक्टर्स विद्यार्थी असे एकूण १५५ सहभागीर्थी उपस्थित होते.
व्हीएस न्युज - बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड व त्यांच्या पत्नीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. आकर्षक परताव्याच्या आमिषातून कंपनीत १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र त्याचा परतावा किंवा समभाग न देता फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद रामचंद्र जाधव व त्याची पत्नी सुवर्णा विनोद जाधव (रा. विमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव रामदास गायकवाड (वय ४६, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २६ ते ३१ मार्च २०११ दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी गायकवाड यांना आरोपी जाधव दाम्पत्याने कंपनीतील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दिले. गुंतवणुकीस करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी गायकवाड आणि त्यांच्या पत्नीने आरोपी जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड कंपनी, बायोडिल लॅबोरोटिज लिमिटेड, अनघा फार्मा प्रा. लि. या कंपन्यांमध्ये १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपयांची गुंतवणूक केली. यातील १२ कोटी ४५ लाख ९५ हजार ३७४ रुपयांची सावा मेडिको लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. त्याच्या मोबदल्यात एक कोटी ५३ लाख ९५ हजार २३७ रुपयांचे समभाग दिले. गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा तसेच समभाग किंवा मूळ मुद्दल न देता जाधव दाम्पत्याने फसवणूक केली.
अधिक तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.
व्हीएस न्युज - पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत कोकेन या अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ८८ लाख रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी एका महिन्याच्या आत दुसरी मोठी कारवाई केली आहे. शोलोडॉये सॅम्युअल जॉय (वय-४४ रा. उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.
कपड्यांचा व्यवसाय असल्याचे सांगून तो व्यावसायिक व्हिसावर फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतात आला होता. काही काळ तो मुंबईत राहिला होता. त्यानंतर तो पुण्यात आला. पुण्यातील उंड्री परिसरातील रावत कॅप्सस्टोन सोसायटीत एका फ्लॅटमध्ये रहात होता. तो रहात असलेल्या फ्लॅटमध्ये कोकेनच्या छोट्या-छोट्या पुड्या तयार करून त्या उच्चभ्रू वस्तित राहणाऱ्या नशेखोरांना विकत असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरक्षीक विजय टेकाळे यांनी पथक तयार करून जॉय याचा शोध घेतला.जॉय अतिशय शिताफीने अमली पदार्थांची तस्करी करत होता,त्यामुळे मागील २० दिवस पोलिस त्याच्या मागावर होते. जॉय रहात असलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८७ लाख ९६ हजार रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन, ३ लाख ६८ हजार रुपये रोख, मोबाईल, तीन घड्याळ, वजन काटा, प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण ९१ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टेकाळे, पथकातील कर्मचारी अविनाश शिंदे, राहूल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छडीदार, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मातोश्री निवासस्थानी जाऊन पिंपरी येथील मातोश्री ग्रूप आणि पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले.
या दरम्यान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन तुळशीहार,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी शिवसेना भंडारा गोदिंया जिल्हा संपर्कप्रमूख निलेश धूमाळ, मातोश्री ग्रूप संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, शिवसेना विभागप्रमूख गोरख पाटील निलंगेकर, विभागप्रमूख प्रदिप दळवी,विभागसंघटक अंकुश कोळेकर, बाळासाहेब गायकवाड,जितू कुलकर्णी,मारुती म्हस्के, दत्ता गिरी,सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
व्हीएस न्युज - फेसबुकवरुन झालेली मैत्री पुण्यातील एका महिलेला जिवावर बेतली आहे. फेसबुकवर मित्र बनलेल्या एका महिलेची दागिन्यांच्या हव्यासापोटी निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधा अगरवाल (वय-40) असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आनंद निकम (वय-31) याला अटक केली आहे. दोन लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी राधाची हत्या केल्याचे आनंदने कबूल केले आहे.
काय आहे हे प्रकरण?
पुण्यातील रेंज हिल्स भागात आनंद निकमचा चहाचा स्टॉल आहे. आनंदने चार महिन्यांपूर्वी राधा हिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. राधाने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री वाढत गेल्याने दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. राधा ही श्रीमंत घरातील असल्याचे आनंदला माहीत होते. त्यात आनंदच्या डोक्यावर दोन लाख रुपयांचे कर्ज होते. आनंदचा राधाच्या दागिन्यांवर डोळा होता. कर्ज फेडण्यासाठी तिच्याकडून दागिने चोरावे, असा त्याचा प्लान होता.
वर्षा विहारासाठी आपण ताम्हिणी घाटात फिरायला जाऊ आणि फोटो सेशन करु, असे आनंदने राधाला सांगितले. विशेष म्हणजे फोटो चांगले यावेत यासाठी अंगावर भरपूर दागिणे घालून ये, असेही आनंदने तिला सांगितले होते. राधानेही आनंदवर विश्वास ठेवून 22 जूनला राधा हिच्या स्कूटरवरुन दोघे पुण्यापासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटात गेले. तिथे पोहोचल्यावर आनंदने राधाचे फोटो काढायला सुरुवात केली. वेगळे फोटो काढण्याच्या बहाण्याने राधाचे हात झाडाला बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली. यानंतर त्याने चाकूने राधाचा गळा कापला. राधाच्या अंगावरील असलेले दागिणे घेऊन तो पसार झाला.
राधा बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या 19 वर्षांच्या मुलाने मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी राधाचा कॉल रेकॉर्डची माहिती मिळवून तपास सुरू केला असता तिने शेवटचा फोन आनंद निकमला केल्याचे समोर आले. पोलिसांनी आनंदचा शोध घेतला. पोलिसांनी 11 जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले. आनंदच्या घरातून राधाचा मोबाइल आणि स्कूटर सापडली. आनंदने दिलेल्या माहितीनुसार ताम्हिणी घाटातून राधाचा मृतदेह 12 जुलैला पोलिसांनी ताब्यात घेतला.
व्हीएस न्युज - केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियान २०२०' अंतर्गत केल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी २५ लाख रुपयांचा खर्च करण्याचा घाट पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घातला आहे. विशेष म्हणजे निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने जनजागृती करण्याचे काम सूरज अॅडव्हर्टायझिंग या खासगी एजन्सीला देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. थेट पद्धतीने काम देण्याच्या पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे.
हे काम देताना कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबविता वैद्यकीय विभागामार्फत निश्चित केलेल्या दरानुसार हे काम थेट पद्धतीने सूरज अॅडव्हार्टायझिंग या खासगी एजन्सीकडून करून घेतले जाणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीला २५ लाख रुपयांचे शुल्क देण्यात येणार आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या 'आरोग्य विषयक शासकीय योजनांची अंमलबजावणी व आरोग्य विषयक जनजागृती' या लेखाशीर्षावरील उपलब्ध तरतुदीतून हा खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.
पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने हा ठराव मान्य केल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. जनजागृतीसाठी नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करता सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील एजन्सीला हे काम देत सर्वसामान्य नागरिकांकडून कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशाची उधळपट्टी केली असल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून केला जात आहे. स्थायी समिती बहुमताच्या जोरावर कामे न करता नियमाप्रमाणे कामे करावी, अशी अपेक्षाही विरोधी पक्षाच्या सभासदांकडून व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. देशभरात स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत असून 'स्वच्छ भारत अभियान २०२०' राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती, माहिती व प्रसार केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्वच्छता जागृतीविषयीची घोषवाक्ये, चित्रे, भिंतीवर रंगवून घेणे आवश्यक आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फेत दर वर्षी आरोग्यविषयक योजना, वैद्यकीय, आरोग्य, पर्यावरणविषयक जागृती तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांचे प्रभावी अंमलबजावणीसासाठी महत्त्वाचे चौक, सरकारी इमारती, विविध गृहरचना संस्था यांच्या सीमाभिंतींवर यावर वॉल साइन बोर्डाचे (भिंत रंगविणे) कामकाज केले जाते. त्याच पद्धतीने या अभियानाबाबत जनजागृती केली जाणार आहे. .
खर्चाला मान्यता देण्यात आलेली कामे -
विविध भागांत विकासकामे करणे - ८७ कोटी
पालिकेच्या रुग्णालयांमधील औषध खरेदी : ६ कोटी ४९ लाख
मोशी, देहू, आळंदीत पेव्हिंग ब्लॉक, गटारांचे काम : २९ लाख ४२ हजार
क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांचा भोजन खर्च : १८ लाख
भोसरी, इंद्रायणीनगरमधील स्केटिंग ट्रॅकची कामे : १ कोटी
३० लाख - पिंपळे निलखमधील लिनिअर गार्डन विकसन : १ कोटी
क्षेत्रीय कार्यालतून कचरा गोळा करणे : २५ लाख
शालेय खरेदी - १० कोटी ५० लाख
वैद्यकीय विभागातील फर्निचर खरेदी : ६२ लाख
क्रीडा शिष्यवृत्ती : ६ लाख
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002