व्हीएस न्यूज - टाटा मोटर्सच्या पिंपरी उत्पादन प्रकल्पातील नैसर्गिक वायूचा वापर करुन “प्री ट्रिटमेंट’ प्रकल्पाचे उद्घाटन कमर्शिअल व्हेईकल प्लांटचे प्रमुख अलोक सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पात लाईट,डिझेल ऑईल (एलडीओ) या पारंपारिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायूच्या वापरामुळे प्रदूषण कमी होऊन, पर्यावरणाची हानी कमी झाल्याने कंपनीला फायदा होणार आहे.
या प्रकल्पामुळे यापूर्वी एलडीओवर चालणारे तीन ओव्हन्स् नैसर्गिक वायूच्या वापरवर कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे पूर्वीची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. या बदलामुळे लॉंग मेंबरच्या रंगविण्याच्या दर्जामध्ये सुधारणा झाली असून त्याबरोबर वाहनांच्या फ्रेमच्या किंमतीमध्ये सुध्दा कपात झाली आहे.
यावेळी अलोक सिंग म्हणाले की, या सुधारित प्रकल्पामुळे पर्यावरणाच समतोल राखण्यास हातभार लागणार आहे. तसेच, नवनवीन संशोधनाद्वारे हरित पर्यावरण राहण्याच्या दृष्टीने काम असेच पुढे चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
व्हीएस न्यूज – चिखलीतील घरकुलमधील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.9) सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. रोहीत सुभाष कांबळे (वय 23 रा. योगायोग बिल्डींग,घरकूल चिखली) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीतचे पिंपरीतील मैत्रिणीसोबत भांडण झाले होते. त्यावेळी रोहितने तिला मारहाण केली होती. याप्रकरणी मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. रोहीतला त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली होती.
या गुन्ह्यामध्ये आपल्याला पोलीस अटक करतील या भितीने रोहीत ने आज सकाळी घऱात कोणी नसताना साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. त्याने दरवाजा ठोठावला परंतु आतून काही प्रतीसाद मिळू शकला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. रोहीत हा पिंपळे गुरव येथे एका खासगी कार्यालयात काम करत होता. चिखली येथील घरकूलमध्ये तो कुटुंबियांसोबत राहत होता. निगडी पोलिस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती आणि सासू यांच्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा पती निहाल विजय वेलानी (रा. आझाद हिंद कॉलनी, पाचपीर चौक, काळेवाडी) आणि त्याची आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर स्वाती निहाल वेलाणी (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पंडित पाटील (वय 58, रा. देशमुख गल्ली, अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती ही पुण्यात स्वारगेट येथे एका कंपनीत नोकरी करत होती. बुधवारी (दि. 1) ती नेहमीप्रमाणे नोकरीवर जाण्यास घराबाहेर पडली. मात्र, पिंपरी रेल्वे स्थानकावर येताच तिने जयपूर एक्स्प्रेस खाली आत्महत्या केली. स्वातीचे निहाल यांच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच पती आणि सासुने फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घेवून ये, असा स्वातीकडे तगादा लावला होता. त्यामुळे तिला नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. रोजच्या या त्रासाला कंटाळून ती कामाला निघाल्यावर पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सकाळी अकराच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेस खाली उडी घेवून तिने आत्महत्या केली.
व्हीएस न्यूज - पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तुषार कामठे यांच्यावर खोटी कागदपत्रे दाखल करुन निवडणूक लढवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कामठे यांनी बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथील कामठे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवताना बनावट कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणी 27 ऑक्टोबरला त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे कामठे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
कॉंग्रेसचे सचिन साठे यांच्या तक्रारीवरुन कामठे यांचे बारावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. कामठे यांनी डेक्कन येथील एम. एम. विद्यालयात शिकत असताना अकरावीच्या वर्गात ते अनुतीर्ण झाले होते. मात्र, बारावी उत्तीर्ण असल्याच्या दाखला सादर करुन सांगवी येथील घोलप महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. हेच प्रमाणपत्र त्यांनी निवडणुकीच्या काळात सादर केले होते. कामठे हे पिंपळेनिलख येथील प्रभाग क्रमांक 26 (ब) येथून निवडून आले आहेत.
व्हीएस न्यूज - ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना शुक्रवारी न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कुलकर्णी यांनी पुणे विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र,विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी बुधवारी तो फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्य़ात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज त्यांचे वकील अॅड. श्रीकांत शिवदे आणि अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी न्यायालयात सादर केला होता. ठेवीदाराची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलकर्णी यांच्याविरोधात पुण्यात ३५१ ठेवीदारांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या वर्षी ठेवीदारांना तीस कोटी रुपये परत करण्यात आले आहेत तसेच गेल्या महिन्यात त्यांनी पाच कोटी रुपये ठेवीदारांना परत केले आहेत. सोळाशे ठेवीदारांनी कंपनीची परतावा योजना (रिफंड स्किम) मान्य केली आहे. मुदत संपलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या ठेवीचे देणे कुलकर्णी यांना परत करायचे आहे. कुलकर्णी यांच्या कंपनीचे ४८ लाख चौरस फुट बांधकाम आहे. या बांधकामाच्या किमतीचा विचार केल्यास देय असलेल्या रकमेच्या पाचपट किंमत आहे. मार्च २०१८ पर्यंत ठेवीदारांना पैसे परत करण्याचे नियोजन आहे. कुलकर्णी यांनी स्वत:हून त्यांचे पारपत्र पोलिसांकडे जमा केले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या काही बदलांमुळे त्या कंपनीने व्यवहार केला नाही. त्यात बांधकाम क्षेत्रात होत असलेल्या बदलांचे परिणाम कुलकर्णी यांच्या नियोजित ड्रीम सिटी प्रकल्पावर झाले. कुलकर्णी यांच्या मोटारीचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. विविध कारणांमुळे कुलकर्णी यांच्या कंपनीसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीनअर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती अॅड. शिवदे यांनी युक्तिवादात केली होती. त्यानंतर त्यांना तात्पुरता जामीन मिळाला. मात्र, विशेष न्यायालयाने पुन्हा जामीन नाकारल्यानंतर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
व्हीएस न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे चार दिवसांच्या पुणे भेटीवर येत आहेत. गुरूवार, ०९ ते रविवार, १२ नोव्हेंबर २०१७ दरम्यान त्यांचा हा पुणे प्रवास असणार आहे.
हा पुणे प्रवास सरसंघचालकांच्या नियोजित प्रवासाचाच भाग असून ते या प्रवासादरम्यान विविध पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकींना उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. या प्रवासातील तीन दिवस म्हणजेच गुरूवार, ०९ रोजी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील एका सेवेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार १० व शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी तळेगाव येथील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर चौथ्या दिवशी रविवार, १२ नोव्हेंबर रोजी मयुर कॉलनी, कोथरूडमधील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात होणार्या महाराष्ट्र राज्य समन्वय बैठकीला उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान या बैठकीत महाराष्ट्रातील संस्था व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रतिवर्षी व विविध शहरांमध्ये होणारी ही बैठक यंदा पुण्यात होते आहे. संघ विचाराने प्रेरित होऊन काम करणार्या महाराष्ट्रातील विविध संस्था व संघटनांच्या कामांचा आढावा, संघटनात्मक वाढ, सेवा कार्यांची स्थिती,पुढील संकल्प याविषयी विस्ताराने चर्चा करण्यात येणार आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह विनायक थोरात यांनी कळविली आहे.
व्हीएस न्यूज - बिबवेवाडी : कोणीही जर आपणाला प्रश्न विचारला की भारत देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता, तर अगदी सहजपणे आपण सांगतो की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. कारण लहानपणापासुनच आपल्याला शाळेत हे शिकविण्यात आले आहे. आणि आजही विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हेच शिकविण्यात येते की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे.
परंतु जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या देशाला राष्ट्रीय खेळच नाही. माहितीच्या अधिकारात हे उघड झाले आहे. पुण्यातील सत्यम सुराणा या युवकाने केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडे काही दिवसांपूर्वी भारताच्या राष्ट्रीय खेळाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत खुलासा मागितला होता. त्याचे उत्तर असे आले की युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने कुठल्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला नाही. या बाबतची कोणतीही अधिसूचना मंत्रालयाने आजपर्यन्त काढ़लेली नाही. म्हणजेच भारत देशाला आज कोणतही राष्ट्रीय खेळ नाही.
माहिती आधिकार कार्यकर्ता सत्यम सुराणा सध्या १२ वीमध्ये शिकत आहे. सामाजिक कार्याची आवड त्याला आहे. विविध सामाजिक कार्यांत तो असतो.
1. आता या सगळ्यात हा प्रश्न आश्चर्याचा आहे, की ज्या देशाने १९२८ पासून आॅलिंपिक स्पर्धांमध्ये हॉकी खेळण्यास सुरूवात केली व १९२८ पासून १९५६ पर्यंत अनेक वेळा सुवर्णपदक पटकावले. त्या भारत देशाचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ नाही.
2. तसेच आपल्या देशात कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून दर्जा मिळालेला नाही. जगातील सर्व देशांना आपापले राष्ट्रीय खेळ आहेत. मग भारताला का नाही, हा प्रश्न या वेळी उद्भवतो. तरी सुद्धा आजतागायत सर्व शाळांमध्ये हे शिकविण्यात येते की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. मग ही चुकीची शिकवणी नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
व्हीएस न्यूज – ट्रकच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला; तर तिचा पाच वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री साडे आठ वाजता पिंपळे गुरव येथे घडली.
याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर निलेश पंडित पठारे (वय 24, रा. खांडवी, अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रज्ञा विक्रांत वाघमारे (वय 30, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचा मुलगा विहान विक्रांत वाघमारे (वय 5) हा किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी मयत वाघमारे यांचे भाऊ पंकज विलास कांबळे (वय 40, रा. मरकळ रोड, आळंदी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हे त्यांची बहीण प्रज्ञा व भाचा विहान यांना दुचाकीवरून प्रज्ञा यांच्या घरी सोडण्यास जात होते. यावेळी (एमएच 42, टी 1402) या ट्रकने पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगरमध्ये त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रकचे चाक प्रज्ञा यांच्या अंगावरून गेले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. तर विहान व कांबळे हे किरकोळ जखमी झाले. सांगवी पोलिसांनी ट्रकसह आरोपीला ताब्यात घेतले असून, याचा पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - ठेवीदारांची फसवणूक केल्याने अडचणीत आलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना बुधवारी न्यायालयाने दणका दिला. विशेष न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून आता कुलकर्णी यांना अटक होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रात बडे प्रस्थ असलेले डी. एस. कुलकर्णी हे ठेवीदारांची फसवणूक केल्याने अडचणीत आले आहेत. याप्रकरणी सुमारे ३५१ ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केले होते. १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले जाते. शेवटी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दीपक सखाराम ऊर्फ डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी कुलकर्णी दाम्पत्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. गेल्या आठवड्यात शनिवारी झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने कुलकर्णी दाम्पत्याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. बुधवारी विशेष न्यायालयात पुन्हा एकदा डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर सुनावणी झाली. बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाने कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. आता कुलकर्णी यांना अटक होण्याची शक्यता असून पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फसवणूक प्रकरणात चार विशेष पथकांनी आठवडाभरापूर्वी कुलकर्णी यांच्या पुणे आणि मुंबई येथील निवासस्थान आणि कार्यालयात एकाच वेळी छापे घालून काही पुरावे हस्तगत केले होते. दुसरीकडे मुंबई,कोल्हापूरमधील गुंतवणूकदारांनीही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.
काय होते प्रकरण ?
डी. एस. कुलकर्णी उद्योगसमुहाची मुदत ठेवींची जाहिरात वाचून अनेकांनी पैसे गुंतवले. या योजनेला रिझव्र्ह बँकेची परवानगी असल्याची माहिती देण्यात आली. त्यावर विश्वास ठेवून शेकडो वयोवृद्ध नागरिक तसेच महिलांनी गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर सुरुवातीला व्याज मिळाले. मात्र गेले वर्षभर व्याज मिळणे बंद झाले होते. मुदत ठेवींची मुदत पूर्ण होऊन ९० दिवस उलटले तरी गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर डीएसकेंवर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथेही गुन्हे दाखल करण्यात आले. डीएसकेंनी १४०० कोटींचे कर्जही बँकाकडून घेतले आहे.
व्हीएस न्यूज - राज्यातील अनुदानित खासगी शाळांमध्ये एखादा शिक्षक दीर्घ रजेवर गेला असेल किंवा तात्पुरत्या स्वरुपात एखादी शिक्षकांची जागा भरायची असेल, तर त्यांचे अधिकार आता संस्थांना देण्यात आले आहेत. शासनाकडून 2 मे 2012 नंतर शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. या तात्पुरत्या जागांवर शिक्षक भरण्यासाठी शासनाची परवानगी घेण्याची गरज संस्थांना भासत होती. मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. या भरतीसाठी आता संस्थांना शासनाची परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे संस्थांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त ठरल्यानंतर 2 मे 2012 नंतर शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. ती अद्यापपर्यंत शासनाकडून उठविण्यात आलेली नाही. दरम्यान काही ठिकाणी गरज भासल्यास काही अटींच्या अधीन राहून शिक्षक भरतीस परवानगी देण्यात आली होती. बंदीनंतर दोन वर्षांनी म्हणजे मध्ये शिक्षकांचे समायोजन आणि पदभरतीची कार्यपद्धती शासनाने निश्चित केली. त्यानुसार रिक्त पदांवरील भरतीसाठी संस्थांनी शासनाने नेमलेल्या समितीकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. नियमित पदांबरोबरच तासिका तत्वावरील शिक्षक, रजेवर गेलेल्या शिक्षकांच्या जागेवरील पर्यायी पदे भरण्यासाठीही शासनाची परवानगी घेण्याचे बंधन शिक्षण विभागाने घातले. आता या निर्णयात सुधारणा करण्यात आली असून पर्यायी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात किंवा तासिका तत्वावरील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी संस्थांना शासनाची परवानगी लागणार नाही. मात्र भरतीबाबतचे शासनाचे इतर सर्व निकष पाळून, जाहिरातीच्या माध्यमातून भरती करण्यात यावी असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यापुर्वीच्या किचकट प्रक्रियेमुळे अनेक तात्पुरत्या रिक्त जागा या रिक्त रहात होत्या. मात्र आता या जागा भरण्यात येणार आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002