व्हीएस न्यूज - मध्यस्थांचा वावर कमी व्हावा, तसेच विवाहाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी विवाहासाठी द्यावयाची नोटीस आता ऑनलाइन पध्दतीने देता येणार आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे घरबसल्या विवाह नोंदणी, ई पेमेंट, अर्जदारांना ई मेलवर 30 दिवस मुदतीची नोटीस देणे आदी सुविधा 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली.
नोंदणी पद्धतीने विवाहामध्ये पारदर्शी व विनामध्यस्थ सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे विवाह नोंदणी कार्यालयातील गर्दी कमी होऊन मध्यस्थांकडून होणारी आर्थिक लूट पूर्णतः बंद होणार आहे. ऑनलाइन नोंदणीनंतर दोन्ही अर्जदारांच्या नोंदणी संदर्भात ऑनलाइन नोटीस जाहीर केली जाईल, त्यावर हरकती व सूचना ऑनलाइन नोंदवू शकणार आहेत. त्यानंतर 60 दिवसांच्या आत वर-वधू आणि 3 साक्षीदारांसमक्ष विवाह नोंदणी अधिकाऱ्यांसमोर विवाह संपन्न करून प्रमाणपत्र दिले जाईल,’ असेही महानिरीक्षक कवडे यांनी सांगितले.
“विशेष विवाह कायदा,1954′, प्रमाणे वधू-वर यांनी आवश्यक त्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. नोटिशीच्या दिवशी विवाहेच्छुक वधूचे वय 18 वर्षे आणि वराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महा ई सेवा केंद्रांवर शुल्क भरून देखील नोंदणी करू शकता येणार आहे. त्यामुळे नोटीस देण्यासाठी विवाह अधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. प्रत्येक टप्प्यावर मोबाइल मेसेज येणार आहे. नोटीस बोर्ड संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.
व्हीएस न्यूज - भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पेरु विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास काळेवाडीतील अमरदीप कॉलनीसमोर घडली.केशवराम किसन गनगे (वय 50, रा. अदिनाथ कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे मृत्यू झालेल्या हातगाडी चालकाचे नाव आहे.
या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवराम हे त्यांच्या हातगाडीवर पेरूची विक्री करत होते. भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात केशवराम यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाकड ठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – उभ्या केलेल्या कारची काच फोडून सुमारे सात लाखांचा ऐवज चोरला. ही घटना सोमवार दि. 6 ला खराळवाडी येथील बीएसएनएल ऑफीसजवळ दुपारी दीड वाजता घडली.
याप्रकरणी परेश चव्हाण (वय 32, रा. अजमेरा) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गाडीतील चार्जर, मॅकबुक, फिट बिट कंपनीचे ब्लेझ घड्याळ, इतर साहित्य असलेली सॅक, तसेच 5 लाख 33 हजार रोख रक्कम असा 6 लाख83 हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळवला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजमधून चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे. पिंपरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे तपास करत आहे
व्हीएस न्यूज – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण -2015-16 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यातील 51कामगरांची गुणवंत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील 10 कामगारांना देखील पुरस्कार मिळणार आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना गुणवंत पुरस्कार देऊन गौरविले जाते. डिसेंबर 2015 मध्ये पुरस्कारासाठी राज्यातील कामगारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. काही तांत्रिक कारणास्तव निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला होता. शासनाच्या मार्गदर्शनानुसार 30 ऑक्टोबरला सहसचिवांच्या उपस्थितीत कामगारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या गुणवंत कामगारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
गुणवंत कामगारांची नावे पुढीलप्रमाणे महेश मेस्त्री, हनुमंत माळी (टाटा मोटर्स), संजय साळुंखे (लोकमान्य हॉस्पिटल, निगडी), सुनील कुटे (महिंद्रा सी आय ई ऑटो लि.), किशोरकुमार शिंदे, श्रीकांत मुते (एसकेएफ लि.),दत्तात्रय येळवंडे (स्पॅको टेक्नॉलॉजी इं. प्रा. लि.), विकास कोरे (किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.), रविंद्र कुलकर्णी (जीकेएन सिंटर मेटल्स प्रा. लि.), कृष्णा ढोकले (हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ).
व्हीएस न्यूज – महाराष्ट्राबाहेरील मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गेल्या दहा वर्षांपासून कष्टकरी सर्वसामान्य महिलांना कर्जवाटप करून वेठीस धरले आहे. राष्ट्रीयकृत बॅंका गरजूंना कर्ज देत नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात हजारो कोटी रूपये मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिलांच्या घरी जावून वाटले आहेत. याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी केली.
जुनी सांगवी, नवी सांगवी, औंध कॅंम्प, पिंपळे गुरव परिसरातील खासगी मायक्रो फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेतलेल्या महिलांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण कर्जमुक्ती महिला मेळावा सांगवी येथील सुमनश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोझर बोलत होते. मनसेचे पिंपरी चिंचवड पालिकेचे गटनेते सचिन चिखले, माजी नगरसेविका जयश्री मारणे, शहर सचिव राजू सावळे, रविदास काळे, स्नेहल बांगर, शाम जगताप, हेमंत डांगे, संजय यादव आदी उपस्थित होते.
मोझर पुढे म्हणाले, गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सुरू झालेली महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची आर्थिक चळवळ या खाजगी कंपन्यांमुळे मोडकळीस आली आहे. कष्टकरी सर्वसामान्य महिलांना एकत्रित करून या कंपन्यां घरपोच कर्ज वाटतात. कर्ज परतफेड दर आठवड्याला करावी लागते. महिलांच्या समूहाला कर्ज दिले जाते. मात्र, घरातील पुरूषांना या ग्रुप बैठकीस थांबण्याची परवानगी नसते. समुहाद्वारे दिलेले कर्ज परतफेड करण्यासाठी ग्रुपमधील प्रत्येक महिलेला शेवटच्या कर्जदार महिलेचा कर्जहप्ता भरेपर्यंत थांबावे लागते. मायक्रो फायनान्स ही संकल्पना महाराष्ट्रात आणून त्यांना लायसन्स देण्यात आली आहेत.
आज ही विषावळ कष्टक-यांची आर्थिक पिळवणूक करत मोठी होत आहे. कर्ज परत फेडीसाठी कंपन्यातील ही मंडळी कर्जदार महिलांना, त्यांच्या कुटुंबांना धमकावतात, तुम्हाला दुसरे कुठलेच कर्ज मिळणार नाही,घरातील मुलांना सरकारी नोकरीसाठी अडथळा येईल, अशा धमक्या देऊन कर्ज परतफेड करून घेतात. अशा प्रकारचा मानसिक दबाव अनेक कुटुंबे सहन करत आहेत. या गोष्टींना वेळीच आळा घातला नाही, तर मनसेसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लवकरच मंत्रालयावर याबाबत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मोझर यांनी सांगितले. आमचा उद्रेक होतो, ते अशा घटनांमुळेच, असेही ते यावेळी म्हणाले.
व्हीएस न्यूज - एक वर्षांपुर्वी केलेल्या नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा बाहेर आला नाही. देशभर शेकडो गरीब नागरिकांना प्राण गमवावे लागले. नोटाबंदीचा फायदा फक्त भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीला झाला. शेतक-यांना कर्ज माफी दिल्याच्या कोट्यावधी रुपयांच्या फसव्या जाहीराती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात आली. सोळा महिन्यात एकोणिस वेळा गॅस सिलेंडरची भाववाढ करण्यात आली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन दारुची विक्री वाढविण्यासाठी दारुच्या बाटलीला महिलांचे नाव द्या असे वक्तव्य करुन महिला भगिनींचा अपमान करतात. या महाजनांना मंत्री म्हणण्याची आम्हाला लाज वाटते. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र सरकारने एक वर्षांपुर्वी केलेल्या नोटाबंदी विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस बिंदू तिवारी, महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शाहबुद्दीन शेख, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, राजन नायर, नंदा तुळसे, मयुर जैयस्वाल, लक्ष्मण रुपनर, आबा खराडे, मनोज बिशप, सतिश भोसले, मकरध्वज यादव आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - एक वर्षांपूर्वी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीवरुन काळापैसा बाहेर काढू, दहशतवादाला पायबंद घालू आणि भ्रष्ट्राचार मुक्त सरकार चालवू असे आश्वासन देणा-या ‘प्रधान सेवकांनी’देशभरातील जनतेची फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात मात्र युपीए सरकारने उपलब्ध कायद्याच्या आधारे सर्वाधिक काळा पैसा बाहेर काढला अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार (दि. 7 नोव्हेंबर 2017) रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, मागासवर्गिय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जयस्वाल आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, स्वत:ला प्रधान सेवक म्हणून घेणा-यांनी अर्थमंत्री व आरबीआयच्या अधिकारात हस्तक्षेप करुन केंद्रिय मंत्रीमंडळाला कोंडून ठेवून स्वत: दुरचित्रवाहिनी व्दारे 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्याचे समर्थन करताना त्यांनी भ्रष्ट्राचार, दहशतवाद व काळापैसा यातून बाहेर येईल असे सांगितले. प्रत्यक्षात हे सर्व दावे फोल ठरले आहेत. यानंतरच्या कालावधीत त्यांनी दिलेली सर्व आकडेवारी फसवी आहे. प्रत्यक्षात 2012 - 13 मध्ये 29 हजार 730 कोटी; सन 2013 - 14 मध्ये एक लाख एक हजार 183 कोटी; सन 2014 -15 मध्ये 23 हजार 108 कोटी; सन 2015 - 16 मध्ये 20 हजार 721 कोटी; सन 2017 - 18मध्ये 29 हजार 211 कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर काढण्यात आला. या आकडेवारी वरुन युपीएच्या काळात जास्त काळापैसा बाहेर काढल्याचे सिध्द होते. दोन लाख कंपन्यांना नोटाबंदी नंतर टाळे ठोकल्याचे प्रधान सेवक सांगतात मात्र अद्यापर्यंत याची यादी कोठेही उपलब्धं नाही. यामध्ये केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या 200 कंपन्या आहेत का? याची माहिती जनतेला कळायला पाहिजे. आम्ही सांगतो तेच खरे आमच्यावरच विश्वास ठेवा हि सरकारची अपेक्षा आहे. राज्य सरकारवर टिका करताना महाजन म्हणाले ‘फसणवीस’सरकारने राज्यातील शेतक-यांची, महिलांची, विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली आहे. 89 लाख शेतक-यांना इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याचे ते सांगतात हि काय अभिमानाची बाब आहे का? अजूनही 34 हजार कोटी कोणत्या शेतक-यांना दिले यादी जाहीर केली नाही. प्रत्यक्षात 4 हजार कोटी दिले असतील असे वाटते. या पारदर्शक सरकारला उरलेल्या दोन वर्षांत लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी राज्यभर कॉंग्रेस रचनात्मक विरोध करेल. या सरकारी यंत्रणेमुळे शेतक-यांच्या आयुष्यातला महत्वाचा पिक - पाण्याचा वेळ वाया गेला. दिवाळीचा मुहूर्त देखिल आता संपला आता काय शिमग्याची वाट पहायची का? अशीही टिका रत्नाकर महाजन यांनी केली.
व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी, अन्यथा स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ बोंबाबोंब आंदोलन करेल, असा इशारा स्वाभिमानीच्या समन्वयकांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची घरे नियमित करण्यासाठीचा जी आर ०७ ऑक्टोबर २०१७ रोजी पारित झाला. परंतु, एक महिना उलटूनही प्राधिकरणातील घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु झाली नाही. सहा महिन्याचा कालावधी हा खूप कमी आहे. त्यात आपण दिरंगाई करत वेळ वाया घालवून नागरिकांची फसवणूक करू नये, हा प्रश्न विविध कारणाने रेंगाळत आला आहे. अनधिकृत घरे नियमित करण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरु करावी अन्यथा या विरोधात स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ बोंबाबोंब आंदोलन उभारेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्राधिकरण अधिकारी डॉ. सतीशकुमार खडके यांना निवेदन देताना समितीचे समन्वयक धनाजी येळकर, राजेंद्र देवकर, दत्ता चिंचवडे, प्रशांत सपकाळ, अमोल पाटील, राजश्री शिरवळकर, शिवाजी पाटील, देवेंद्र भदाणे, विशाल पवार, ॲड. प्रतिभा कांबळे, भाग्यश्री सावंत, नयना नारखेडे,अर्चना मेंगडे, सुनिता फुले आदी उपस्थित होते.
शहरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मिळणार मोफत सुविधा
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) माहिती तंत्रज्ञान विभागात शहरातील पहिल्या ‘फॉस’ सेंटरचे उद्घाटन सीडॅकचे तांत्रिक अधिकारी चंद्रकांत दुधटमल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुंबई आयआयटीच्या समन्वयक विद्या कदम, प्राचार्य डॉ. अ.म. फुलंबरकर, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, विभाग प्रमुख प्रा.डॉ. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते. या सेंटर विषयी माहिती देताना प्राचार्य डॉ. अ.म. फुलंबरकर यांनी सांगितले की, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आयसीटी धोरणानुसार आणि मुंबई आयआयटीच्या सहयोगाने स्पोकन ट्युटोरीयल अंतर्गत पीसीसीओईच्या हे सेंटर उभारण्यात आले आहे. या ‘फॉस’ (FOSS - FREE OPEN SOURCE CENTER) सेंटरमध्ये पिंपरी चिंचवड शहरात शिकणा-या अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत सर्व सुविधा मिळणार आहेत. त्याचा लाभ घेणा-या यशस्वी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रमाणपत्र देखिल देण्यात येईल. यामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कॉम्प्युटरच्या सी, सी++, जावा, पायथॉन, पीचपी, लिनकम, लायब्ररी ऑफीस, स्कायलॅब यासारख्या अनेक सेल्फ लर्निंग प्रोग्रॅमींगचा अभ्यास करता येईल. अशी माहिती प्रा. फुलंबरकर यांनी दिली.
यावेळी प्रा. स्वाती शिंदे यांनी फॉस सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या माहिती तंत्रज्ञान साक्षरता अभियानाची माहिती दिली. हे सेंटर उभारण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रा. वैशाली कुल्लोली, आभार प्रा. सचिन जाधव यांनी मानले.
व्हीएस न्यूज - राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील एनडीए सरकारबाबत देशभरातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून आगामी काळात गुजरातसह देशभरातील सर्व निवडणूकांत मतदार राजा भाजपाला घरी बसवेल. त्यांच्या परतीचा प्रवास नांदेड महापालिका निवडणूकीच्या निकालापासून सुरु झाला आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांनी केले. कॉंग्रेस भवन पुणे येथे शुक्रवार (दि. 3 नोव्हेंबर) रोजी डेविस डेनी देवदास यांची कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली. यावेली आयोजित केलेल्या अल्पसंख्यांक समाज मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन नायर, पुणे शहर अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष पॉल जोसेफ, मेरी डिक्रुज, जॅकलिक फोरस्टर, रफीक मुल्ला, जावेद शेख,
अल्पसंख्यांक विभागाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष फय्याझ शेख, भाऊसाहेब मुगूटमल, मंदार भंगारी, जय सावंत, सिध्दार्थ वानखेडे, आदी उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारने मागील तीन वर्षांत अल्पसंख्यांक, ओबीसी व मागासवर्गीय समाजावर अन्याय केला आहे. या समाजाच्या विकासासाठी केलेली आर्थिक तरतूद वेळोवेळी कमी करुन इतर ठिकाणी वापरली आहे. या समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकाबरोबर जोडून त्यात दरवर्षी वार्षिक वाढ द्यावी. अशी तरतूद युपीए सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय नियोजन समितीचे सदस्य खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली होती. याकडे दुर्लक्ष करुन एनडीए सरकारने व राज्य सरकारने शिष्यवृत्तीत वाढ न करता त्यासाठी केलेली तरतूद दुसरीकडे वापरली आहे हि अल्पसंख्यांक, ओबीसी व मागासवर्गीय समाजाची फसवणूक आहे. असाही आरोप नदीम मुजावर यांनी केला.
व्हीएस न्यूज - लोकजनशक्ती पार्टी आणि भीमपूत्र ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि परिसरात चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सोशल मीडियावर येथील अस्वच्छतेबाबत ‘पोस्ट’व्हायरल झाली होती. त्यामुळे शनिवारी (दि. 4) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे, भीमपूत्र ग्रुपचे अध्यक्ष अतुल जगताप, अरुण मैराळे, दत्ता गोडसे, ज्ञानेश्वर बोरकर, दिनकर ओव्हाळ, संजय ओव्हाळ, ज्ञानेश्वर बोराटे, शरद कांबळे, अनिल काकडे, प्रकाश अरसुमुळ, राज साबळे, अंकुश सागर, सुनील घबाळे, मनोज टिगोटे आदी या वेळी भीमपूत्र ग्रुपचे अध्यक्ष अतुल जगताप आदी या वेळी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 82 हजार प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून तब्बल 4 कोटी 82 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई गेल्या सात महिन्यांत करण्यात आली आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान रेल्वेने केलेल्या विविध कारवाईची माहिती प्रशासनाने दिली. यामध्ये रेल्वेत गैरमार्गाने प्रवास करणाऱ्या 77 हजार प्रवाशांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 94लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय 12 हजार 500 प्रवासी हे क्षमतेपेक्षा जास्त साहित्य नेत असल्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 11 लाख 33 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिली.
गेल्या सात महिन्यांपैकी ऑक्टोबरमध्ये सर्वात जास्त कारवाई करुन दंड आकरण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये 33 हजार 58 प्रकरणांमध्ये तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्यावर्षी याच महिन्यात 31हजार 201 जणांवर कारवाई करुन 1 कोटी 75 लाख 65 हजार दंड जमा करण्यात आला होता. या कामगिरीबद्दल रेल्वेचे पुणे विभाग प्रमुख मिलिंद देऊस्कर यांनी रेल्वेच्या तिकीट तपासणीस विभागाचे कौतूक केले आहे.
म्हणून केली जाते कारवाई
रेल्वे प्रशासनाच्यावतीने अशाप्रकारची कारवाई सतत केली जात असते. काही वेळा विशेष मोहीम राबवून प्रत्येक प्रवाशांचे तिकिट तपासणी केली जाते. विशेषत: लोकल ट्रेन तसेच मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या रेल्वेमधील प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. यामध्ये मग विनातिकीट प्रवासी आढळतात. अनेक वेळा फ्लॅटफॉर्म तिकीट नसतानासुध्दा अनेकजण दिवसभर निरनिराळ्या फ्लॅटफार्मवर फिरत असतात. अशा फुकट्यांना जरब बसवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002