जिल्हा प्रशासनाला यूआयडीएआयकडून ५० यंत्रे
व्हीएस न्यूज – पुढील आठवडय़ापासून केवळ आधारकार्डमधील दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी अपडेट क्लायंट लाइफ किट (यूसीएल) वापरण्याकरिता जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ही ५० यंत्रे दोन-तीन दिवसांत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहेत. ही सर्व यंत्रे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत. या यंत्रांद्वारे केवळ एका बोटांच्या ठशावरून पाच मिनिटांत आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यात येणार आहे.
गेल्या चार महिन्यांपासून आधार केंद्रांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील आधार केंद्रांवर येणारे बहुतांश नागरिक आधारकार्डात जन्म दिनांक, मोबाईल क्रमांक, निवास पत्ता, छायाचित्र याबाबत दुरुस्ती करण्यासाठी गर्दी करत आहेत. एका आधार यंत्रावर एका व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरुस्तीचे काम करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यानुसार सकाळी दहा ते सहा या वेळेत केवळ २० ते २५ आधारची कामे होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधार दुरुस्तीकरिता यूआयडीएआयकडे यूसीएल यंत्रांची मागणी प्रस्ताव पाठवून केली होती. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून ५० यूसीएल यंत्र तीन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे येणार आहेत.
या यंत्रांद्वारे एका बोटाचा ठसा घेऊन पाच मिनिटांमध्ये दुरुस्ती करता येते. एका यंत्राद्वारे प्रतिदिन ७० ते ८० आधार दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुब्बुळांचे स्कॅनिंग होत नसल्यास संबंधित नागरिकांची नोंद करून त्याबाबतची पावती यूआयडीएआयकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आधारचे नोडल अधिकारी आणि तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली.
यूसीएल डिव्हाइस काय आहे?
अपडेट क्लायंट लाइफ (यूसीएल किट) हे एक बायोमॅट्रिक डिव्हाइस आहे. या डिव्हाइसला लॅपटॉप आणि प्रिंटर जोडावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास यूसीएल यंत्र येणार असून महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पाच यंत्र बसविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. आधारची दुरुस्ती करताना छायाचित्राचे ओळखपत्र आणि पत्ता पुरावा आवश्यक आहे.
व्हीएस न्यूज – सांगलीतील पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरण राज्यातील पोलिसांना चांगलेच महाग पडले होते. असे असताना देशात सर्वाधिक कोठडीतील मृत्यू महाराष्ट्रात होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ‘क्राईम इन इंडिया २०१६’ च्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राईम इन इंडिया २०१६’ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये देशातील पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोठडीत मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात झाल्याची नोंद एनसीआरबीने अहवालात केली आहे. देशात २०१६ मध्ये ९२ जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ६९ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. २१ प्रकरणांत पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशात सर्वाधिक कोठडीत मृत्यू महाराष्ट्र (१६) झाले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश (११) आणि गुजरात (११) या राज्याचा क्रमांक लागतो. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोठडीत मृत्यू नोंदले गेले असून येथे घडलेल्या बारा घटनांमध्ये न्यायालयीन चौकशी सुरू आहे. तर, तीन प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात किंवा कोठडीत घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे असल्याचे दिसून आले आहे. कोठडीत आत्महत्या केल्याच्या सर्वाधिक म्हणजे ३८ घटना झाल्या आहेत. त्यानंतर विविध आजारांमुळे २८ जणांचा कोठडीत असताना मृत्यू झाला आहे. गुन्हेगारांसोबत कोठडीत असताना झालेल्या भांडणात दोघांचा मृत्यू झाला. तर, तपासासाठी बाहेर घेऊन जाताना अपघात होऊन देखील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच कोठडीतून पळून जाताना चारजण ठार झाले आहेत.
पोलीस अधिकारी किंवा कर्मचा-यांनी कोठडीत केलेल्या मारहाणीत मृत्यूच्या घटना आठ असल्याचे एनसीआरबीच्या अहवालात नमूद केले आहे. कोठडीत असताना पळून गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशात कोठडीतून १३२० आरोपी पळून गेले आहेत. त्यापैकी ९५० जणांना अटक करण्यात आली. कोठडीतील आरोपी पळून जाण्यांमध्ये उत्तर प्रदेश मध्यप्रदेश (१३३) आघाडीवर आहे. त्यानंतर (२८२) आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढली आहे. या यात्रेचा समारोप नागपूर येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला होणार आहे. या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील ५०० कार्यकर्ते सहभागी होणार असून ११ डिसेंबरला कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली आहे.
संजोग वाघेरे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. कर्जमाफी फसली आहे. शेतक-यांना कर्जाचे पैसे अजून मिळाले नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य सरकार भरकटले आहे. सत्ता राबवायची कशी हेच त्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते शेतक-यापर्यंत प्रत्येक समाजघटकाला अहितकारक असे निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत. सरकारच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. या पदयात्रेला विदर्भात शेतक-यांसह सर्वच घटकातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आमचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह आजी-माजी खासदार आमदार मोर्चात सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील देखील काही पदाधिकारी हल्लाबोल पदयात्रेत सहभागी झाले आहेत. शेतक-यासह सर्वंच घटकातील नागरिक मोर्चात सहभागी होत आहेत. आपल्या व्यथा पक्षाच्या नेत्यांना सांगत आहेत. त्यांचे प्रश्न समाजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाचे नेते करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. या मोर्चात पिंपरी-चिंचवड शहरातून ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामध्ये माजी आमदार, महापौर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका सहभागी होणार आहेत अशी माहिती संजोग वाघेरे यांनी दिली.
बैठकीसाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष पवक्ते फजल शेख, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विजय लोखंडे, जगन्नाथ साबळे, प्रदिप गायकवाड, शुक्रुल्ला पठाण, यतिन पारेख, आनंदा यादव,सी.आर. कांबळे, गंगा धेंडे, विश्रांती पाडाळे, पुष्पा शेळके, कविता खराडे, सविता खराडे, शहजादी सय्यद, मनिषा गटकळ, शकुंतला भाट, सचिन माने, गोरोबा गुजर, तुकाराम बजबळकर, बाळासाहेब जगताप आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
व्हीएस न्यूज - एका रिअल इस्टेट एजंटचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना दिघी येथे घडली. ही घटना शनिवारी (दि.९) मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास दिघी येथील दत्तमंदीरा जवळ घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश अंताराम गंगणे (वय-40 रा. दत्तनगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर अरविंद वंजारी (रा. दिघी), तुषार (पूर्ण नाव माहित नाही), प्रमोद शेलार (रा. दिघी), निलेश कुदळे (रा. वडमुखवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश यांचा भाऊ सुरेश अंताराम गंगणे (वय-४५, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गंगणे हे रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. काल रात्री आरोपी आणि मयत हे सर्वजण न्यु मोहर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सव्वाएकच्या सुमारास आरोपी अरविंद आणि त्याचे भाचे तुषार, प्रमोद आणि निलेश या चौघांनी गणेशच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन गणेश यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कदम तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - ताथवडे येथील पंडीत ऑटोमोटिव्ह कंपनीला औद्योगिक न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत कंपनीच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा तात्पुर्ता मनाई आदेश दिला आहे. हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, अँड. गौरव पोळ, शांताराम कदम, गजानन जोध, हमिद ईनामदार आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना कैलास कदम म्हणाले की, मे. पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. या कंपनी विरूध्द त्यांच्या काही कामगारांनी दि.३० नोव्हेंबर रोजी त्यांचे थकीत असलेले ५ महिन्यांचे वेतन, दिवाळी बोनस व इतर अनुषंगिक फायदे मिळावेत यासाठी औद्योगिक न्यायालय पुणे यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आदेश देताना न्यायालयाने कामगारांच्या नोकर्यांना संरक्षण दिले होते. तसेच ४ डिसेंबर रोजी कंपनीच्यावतीने त्यांच्या अधिकार्यांनी कामगारांची बदली करण्याचा कंपनीचा विचार नसल्याचे सांगितले. न्यायालयाने ४ डिसेंबर रोजी मनाई आदेश वाढवून देऊन कामगारांच्या नोकरीस संरक्षण दिले. तरीही दि.५ डिसेंबर रोजी पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. व्यवस्थापनाने सायंकाळी उशिराने तडकाफडकी टाळे ठोकल्याने ३०० कामगार रस्त्यावर आले आहेत.
न्यायालयात तक्रार अर्ज प्रलंबित असूनही कंपनीच्या अशा टोकाच्या भूमिकेमुळे कामगारांना त्यांच्या नोकरीबाबत आणि कंपनीने देय असलेल्या पगार, आणि इतर आर्थिक लाभ मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली. त्यामुळे व्यवस्थापना विरोधात हिंद कामगार संघटनेने ७ डिसेंबर रोजी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. कामगारांचे सर्व आर्थिक लाभ आणि देयके देईपर्यंत कंपनीच्या सर्व चल आणि अचल मालमत्तांची विक्री करण्यास मनाई करण्याबाबत व कंपनीची सर्व कागदपत्रे जप्त करण्याबाबत तात्पुर्ता मनाई करावी अशी विनंती करणारा अर्ज केला. त्या अर्जावर प्रथम औद्योगिक न्यायालय श्री.एस.व्ही.सुर्यवंशी यांनी कंपनीच्या वकिलांना जाब विचारला. परंतू कंपनीने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता अर्जावर जबाब देण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने त्यावर कंपनीने जर कामगारांना त्यांचे आर्थिक देय रक्कम दिली नाही तर कामगारांकडे काय पर्याय आहे असा सवाल करून पुढिल तारखेपर्यंत कंपनीने त्यांच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला. हिंद कामगार संघटने तर्फे अँड. गौरव पोळ यांनी कामकाज पाहिले. पुढील सुनावणी येत्या दि. ५ जानेवारी रोजी होणार असल्याचे अँड.पोळ यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये, तसेच मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, असे प्रतिपादन अॅड. मंजुषा इधाटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्पर्धा परीक्षा केंद्रात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अॅड प्रा. आण्णासाहेब ठोसर, अॅड मंजुषा इधाटे, अलका जोशी, नागरिक व अभ्यासक विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी अॅड मंजुषा इधाटे म्हणाल्या, मानवी हक्काच्या रक्षणासाठी न्यायालयांचा उपयोग होतो. मानव अधिकार म्हणजे सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होय. सन्मानाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये कुटुंब निर्माण करण्याचा कुटुंबात राहण्याचा, जीवन समृद्ध करण्यासाठी व जीवनाचा विकास करण्यासाठी म्हणून शिक्षण घेण्याचा अधिकार यामध्ये येतो. शिक्षण घेतल्यावर आवडीचा व्यवसाय करण्यासाठी व त्यासाठी मुक्त संचार करण्याचा तसेच स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार म्हणजे मानव अधिकार होय असेही, त्या म्हणाल्या. यावेळी अॅड प्रा.आपासाहेब ठोसर म्हणाले, राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु बहुतेक नागरिकांना या विषयाचे ज्ञान नसल्याने ते वंचित राहतात. कायदा म्हणजे सागर आहे. कशासाठी व कोणासाठी जगायचे याचे तत्वज्ञान मानव अधिकारामध्ये आहे. सर्वांचे संरक्षण करण्यासाठी घटना आहे. मानव अधिकारांचे संरक्षण व्हावे असेही ते यावेळी म्हणाले. मानवी हक्क दिनानिमित्त अलका जोशी यांनीही माहिती दिली. मानवी मूल्यांना बाधा न पोहचता प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य हि घटनेने दिले आहे. आजच्या युवा पिढीने मानवी हक्क व कर्त्यव्याची जाणीव परिसरातील नागरिक व मित्र परिवारांना करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असेही यावेळी अलका जोशी यांनी सांगितले. यावेळी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचनही करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी यांनी केले.
व्हीएस न्यूज - राज्यातील शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत केलेली कपात रद्द झाली पाहिजे, शेतक-यांना वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे, प्रस्तावित कामगार कायद्यातील जाचक तरतुदी मागे घ्याव्यात या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे हल्लाबोल मोर्चा होणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून 380 कार्यकर्ते नागपूरला रविवारी सायंकाळी रवाना झाले. यामध्ये सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, सरचिटणीस दिलीप पांढारकर, अशोक पांढारकर, अक्षय शिंदे, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, राजन नायर, तानाजी काटे, मनोज बिशप, गौतम आरकडे, भाऊसाहेब मुकुटमल, राजेंद्रसिंह वालिया, डॉ. नंदकुमार दुगड, जयप्रकाश बोराटे, सतिश भोसले, सुनिल राऊत, संकेत बो-हाडे, विश्वनाथ खंडाळे, परशूराम गुंजाळ, दत्तात्रय दातीर पाटील, बाबा बनसोडे, हिरा जाधव, शशीकिरण कांबळे, विरेंद्र गायकवाड, गौरव चौधरी, संदेश नवले, आबा खराडे, उबेंद्र मेनन, वासूदेव तैमल, राजन नायर, मल्लिका मेनन, मनिषा थॉमस, वत्सला नायर, एंजल नायर, मकर यादव आदींसह शहर कॉंग्रेस पदाधिकारी व महिला, युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
व्हीएस न्यूज - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस व मावळ लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी गुरव येथील ममता अंध अनाथ कल्याण केंद्रास आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मावळ लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर सरचिटणीस ॲड. क्षितीज गायकवाड, महिला काँग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल कसबे, विनीता तिवारी, हिरा जाधव, गौरव चौधरी, विरेंद्र गायकवाड, अभय तिवारी, नितेश जाधव, विराज साठे आदी उपस्थित होते. सचिन साठे व अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. सचिन साठे यांच्या हस्ते कल्याण केंद्राचे अध्यक्ष तुषार कांबळे यांना पाच हजारांचा धनादेष देण्यात आला. पांडूरंग खरसडे, आकाश शिंदे व नितीन भोईटे या अंध बांधवांनी सुश्राव्य गीताव्दारे सोनिया गांधींना उदंड आयुष्य लाभावे अशा शुभेच्छा दिल्या. समाजप्रबोधनकार शारदा मुंडे यांनी आई व बाप या विषयी प्रबोधन केले. स्वागत नरेंद्र बनसोडे, सुत्रसंचालन मयुर जयस्वाल, आभार विरेंद्र जाधव यांनी मानले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002