व्हीएस न्यूज – केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा संमत केल्यानंतर त्यासाठी आवश्यक नियमावली राज्य सरकारने केलीच नाही. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू ठामपणे मांडलीच नाही. म्हणूनच बैलगाडा शर्यतबंदीचा जू पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रति भाजप सरकारची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोप शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी येत्या शनिवारी (दि. 28) राज्यव्यापी आंदोलन करणार असून राज्यातील हजारो शेतकरी त्यात सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
भोसरी येथे बैलगाडा शर्यतीविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार आढळराव पाटील म्हणाले, जलीकुट्टीबाबत तमीळनाडूतील जनतेने आंदोलन केले. तेथील मुख्यमंत्री, अन्य मंत्र्यांनी दिल्लीत तळ ठोकून त्याबाबतचा वटहुकूम राष्ट्रपतींकडून मंजूर करून आणला. सहा महिन्यात कर्नाटकातही बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. परंतु, बैलगाडा शर्यतीचा कायदा संमत झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, मंत्री महादेव जानकर बैलगाडीत बसून केवळ फोटोसेशनमध्येच रमले. परंतु, शर्यतीसाठी नियमावली केली नाही की राज्य सरकारतर्फे न्यायालयात लढले नाहीत. त्यामुळे बैलगाडा शर्यत बंदीचा जू पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे.
कायदा संमत झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियमावली राज्य सरकारने केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली. आज पेटाच्या विरोधात सत्तेत असणारे ओरडत आहेत. मात्र, पेटा इतकेच फडणवीसांचे सरकार गुन्हेगार आहे. कारण, महाराष्ट्र ऍनिमल वेल्फेअर असोशिएशन या शासकीय संघटनेवर ऍड. जयसिंन्हा हा पेटाचाच व्यक्ती अशासकीय संचालक म्हणून काम करतो आहे, जो या बैलगाडा शर्यतीविषयी राज्य सरकारच्या विरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतो आहे. राज्य सरकारची ही भूमिका दुहेरीपणाचीच आणि दुटप्पी म्हणावी लागेल.
येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामध्ये बैलगाडा शर्यतीबाबत विधेयक आणल्यास ते मंजूर होईल आणि संपूर्ण देशातील बैलगाडाप्रेमी, शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कारण, लोकसभेने विधेयक मंजूर केल्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयही त्याला विरोध करणार आहे. मात्र, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे तसा शब्द टाकला पाहिजे. त्याचप्रमाणे ऍड. जयसिन्हा यांना हटवावे, पेटाला विदेशातून मिळणाऱ्या पैंडीगची इर्डीतर्पेै चौकशी करावी, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात ताकदीने लढण्यासाठी दिग्गज वकील द्यावेत, अशी मागणीही आढळराव पाटील यांनी केली.
चाकणमध्ये पक्षविरहीत आंदोलन
शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि बैलगाडा चालक-मालकांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी येत्या शनिवारी (दि. 28) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे,विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे, तसेच आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे आदींना पत्र दिले आहे. राज्यभरातून सुमारे सोळा जिल्ह्यातील अंदाजे चाळीस ते पन्नास हजार शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे या पक्षविरहीत आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. श्रेयवादामध्ये बैलगाडा शर्यतीचा प्रश्न अडकून राहू नये. यासाठी सर्वच पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी,पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
व्हीएस न्यूज – बोपखेल येथील रहिवाशांचा रस्ता लष्कराने अडविल्यानंतर पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून रस्ता केला जात नाही. या रस्त्यासाठी प्रशासनाच्या विरोधात रहिवाशी संतोष विठोबा घुले आणि महेंद्र वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याला पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
बोपखेलच्या रहिवाशांना लष्कराच्या हद्दीतील रस्ता देण्यात आला होता. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी लष्कराने हा दळण-वळणाचा रस्ता बंद केला. त्यामुळे बोपखेलवासियांना पंधरा किलो मीटरचे अंतर कापावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी लष्कर प्रशासनाच्या विरोधात आंदोलने केली. तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन निवेदने दिली. तोपर्यंत पर्यायी रस्ता करून देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. तरीही, स्थानिक प्रशासनाने पर्यायी रस्त्याचा मार्ग मोकळा केला नाही. त्याच्या निषेधार्थ रहिवाशी संतोष विठोबा घुले आणि महेंद्र वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी आज गुरूवारी (दि. 26) उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी उपोषणाला राष्ट्रवादीचा पाठींबा असल्याचे जाहीर केला. यावेळी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर,युवक प्रदेश संघटक विशाल काळभोर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, उपाध्यक्ष संतोष वाघेरे, चिटणीस महेश झपके, श्रीकांत घुले, दिगंबर गायकवाड, निलेश टिकवणे, शुभम शिंदे, निळकंठ झपके, ओंकार घुले आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – उत्तर भारतीय भाविकांनी छट महापूजेच्या तिसऱ्या दिनी मावळत्या सुर्याला अर्ध्य अर्पित करून छटव्रताचा आणखी एक टप्पा पूर्ण केला. उद्योगनगरीत खूप मोठ्या संख्येने बिहार आणि उत्तरप्रदेशचे नागरिक वास्तव्यास असून गुरुवारी शहरातील वेगवेगळ्या घाटांवर आणि तलावांवर हजारोंच्या संख्येने भाविक एकत्रित झाले. पिंपरी, चिंचवड, मोशी, निगडी, वाकड, हिंजवडी अशा कित्येक ठिकाणी भाविकांनी आपल्या आराध्याची आराधना करून कुटुंबियांसाठी आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीची कामना केली.
दुपारी चारपासून शहरातील वेगवेगळ्या घाटांवर श्रद्धाळुंची गर्दी होण्यास सुरूवात झाली होती. सुप, हंगामी फळे व पूजेचे इतर साहित्य घेऊन महिला घाटावर पोहचल्या. आपल्या पूजेचे स्थान स्वच्छ असावे यासाठी श्रद्धाळुंनी आधीच घाटाची आणि नदीची स्वच्छता केली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिथे जिथे पूजा होणार आहे त्या सर्व घाट आणि तलावांची भाविक आणि छट पूजा समितीच्या वतीने स्वच्छता करण्यात आली होती. स्थानिक जनप्रतिनिधींनी देखील उत्तर भारतीय बांधवांची सहायता केली आणि त्यांच्या या धार्मिक कार्यात सहभाग ही घेतला. महापालिकेच्या वतीने देखील काही घाटांची आणि तलावांची स्वच्छता करण्यात आली होती.
मोशी येथील टोलनाक्याजवळ इंद्रायणी नदीच्या काठावर विश्व श्रीराम सेनेच्या वतीने काशीतील प्रसिद्ध गंगारती प्रमाणेच येथे ही भव्य आरती करण्यात आली. यावेळी विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता म्हणाले की,छटपूजेच्या निमित्ताने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या कार्यक्रमासाठी उपस्थित खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, नगरसेविका मंदा आल्हाट, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, सुरेश म्हेत्रे,प्रा. राधेश्यान मिश्रा उपस्थित होते. या सर्वांचा लालबाबू गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छटपूजेचे महत्व सांगताना लालबाबू म्हणाले की, लोकांच्या श्रध्देचा आणि आस्थेचे हे महापर्व आहे. यात उत्तम आरोग्य, परस्परांत प्रेम, सदभावनेचे समर्पण असते. या सणाच्या निमित्ताने सर्व सृष्टीचा निर्माता सूर्यदेवतेचे पूजन केले जाते. सूर्याबरोबरच सर्व प्राणी मात्रांचे जीवन सुखी सृध्द करणाऱ्या नदीचे ही महात्म्य आहे. नदी सर्वांचे जीवन समृध्द करते, यामुळे छठपूजा नदीच्या पाण्यात, घाटावरच साजरी केली जाते. आयोजन यशस्वी करण्यासाठी अक्रम शेख,प्रमोद गुप्ता, शामबाबू गुप्ता, सुनील सिंग, देंवेद्र पासवान, रामेश्वर गौड, रोहित प्रसाद, आदित्यकुमार, संजय विश्वकर्मा, उमेश सिंग, राजकुमार गुप्ता, मुन्ना सिंग, सतीश सिंग आदींनी घाटांवर आदींनी विशेष परिश्रम केले.
व्हीएस न्यूज – जीएसटीची भरपाई म्हणून सरकारकडून महापालिकेला मिळणारे अनुदान अत्यल्प आहे. स्थानिक नेते शहराला अधिक निधी आणण्यात अपयशी ठरत असून त्याचा फटका महापालिकेच्या तिजोरीला बसत आहे. त्यासाठी विशेष सभा घेऊन शासनाकडे अधिकचा निधी मागावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी केला आहे.
परचंडराव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला जात आहे. हा निधी जीएसटीमुळे एलबीटीचे कमी झालेले उत्पन्न भरून काढण्यासाठी अनुदान म्हणून दिला जात आहे. त्यापोटी दरमहा फक्त 128 कोटी मिळत असून त्यातून पालिकेच्या नुकसानभरपाई होणार नाही.
पालिकेच्या उत्पन्न वाढीबाबत चर्चेसाठी पालिकेने विशेष सभा घ्यावी. त्यातून जास्त निधी मिळावा, असा प्रस्ताव मंजूर करुन शासनाकडे पाठविण्यात यावा. महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना निधीचा कधीच तुटवडा भासला नाही. मात्र, अधिकचा निधी आणून शहरात मोठे प्रकल्प उभारण्यासाठी सध्याचे सत्ताधारी कमी पडत असल्याचा आरोपही परचंडराव यांनी केला आहे.
व्हीएस न्यूज – - शिया मुस्लिम समाज मदरसा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह ३४ जणांच्या विरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात सामाजिक बहिष्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांनी ही माहिती दिली.
मदरसा ट्रस्टच्या कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या हमीदुल हसन मोहंमद सय्यद (वय ३५, रा. सय्यदवाडा, जुन्नर) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. हमीदुल यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुलांना शिया मुस्लिम समाजातून बहिष्कृत करण्यात आले असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी इस्माईल रोशनअली सय्यद (अध्यक्ष,शिया जमात २०१५), सय्यद अमीरअली रुस्तमअली, सय्यद मोहंमद अब्बास मुज्जहीद हुसैन, सय्यद मोहंमद काजिम अफजल हुसैन, सय्यद नुरे अब्बास एजाज हुसैन (अध्यक्ष, शिया जमात २०१६), मुराद अब्बास मोहंमद सादिक यांच्यासह ३४ जणांविरुद्ध रविवारी (ता. २२) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
हमीदुल यांच्या फिर्यादीनुसार, समाजाच्या मदरसा ट्रस्टमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत काम करीत असताना विविध आरोप करून २७ एप्रिल २०१६ मध्ये शिया मुस्लिम समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याची जाहीर नोटीस जामा मस्जिद समोरील नोटीस बोर्डावर लावण्यात आली होती. तसेच १२ ऑक्टोबर २०१६ मध्ये मोहरम (अशुरा) मिरवणुकीत असताना कलबेअली महंमद हुसेन सय्यद व महंमद हमीद सरफराज हुसेन सय्यद व शमीम महंमद हुसेन सय्यद यांनी फिर्यादीच्या हातातून माईक काढून घेऊन धक्काबुक्की केली व मिरवणुकीतून हाकलून दिले.
व्हीएस न्यूज – – भोसरी मधील पेठ क्रमांक दहामधील अग्निशमन केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेकायदेशीररीत्या सुरु केलेले कचरा विलगीकरण केंद्र तात्काळ बंद करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली होती. या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी औद्योगिक परिसराला भेट देत, विविध ठिकाणची पाहणी केली.
एमआयडीसीतील पेठ क्रमांक दहा मधील जागा अग्निशमन केंद्राकरिता राखीव ठेवण्यात आली आहे. सध्या ही जागा मोकळी असल्याने, याठिकाणी इंद्रायणी नगर, भोसरी परिसरातील कचरा आणून वेगळा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर कचऱ्याच्या बेपर्वाईबद्दल पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. याचे सविस्तर वृृत्त प्रसिद्ध होताच, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , क प्रभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे आणि संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे औद्योगिक परिसराची पाहणी केली.
येत्या पंधरा दिवसांत औद्योगिक परिसरातील कचरा उचलण्याचे व आवश्यक त्याठिकाणी कचरा पेटी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कचरा उचलण्यासाठी चार गाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पेठ नंबर दहा मधील कचरा विघटन केंद्र बंद करून दुसरीकडे हलवण्यासाठी आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या सोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासन बोदडे यांनी यावेळी दिले. येत्या पंधरा दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
व्हीएस न्यूज – – रिंगरोडसाठी नागरिकांची घरे पाडू देणार नाही आणि याबाबत कायम बचनबद्ध राहण्याचा निर्धार घर बचाव संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. प्रत्येक घर वाचविण्याकरिता समिती वचनबद्ध राहणार असल्याचे सांगत संयोजकांनी या आंदोलनास बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. चिंचवड येथे आयोजित एका बैठकीत घर बचाव संघर्ष समितीने याबाबतचा ‘वचननामा’ जाहीर केला आहे.
यावेळी बोलताना विजय पाटील म्हणाले, ”अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने समिती स्थापन करण्याचे योजिले आहे. परंतु, समितीचे स्वरूप, उद्देश, आणि लोकसमावेश याबाबत स्पष्टता नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाच्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. सात ऑक्टोबर 2017अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी कायदा संमत झाला आहे. बाधित नागरिकांना संबधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी असून त्यावेळेत सर्व कागदपत्रे स्वायत्त संस्थांकडे जमा करणे आवश्यक आहे. प्राधिकरण समितीमुळे वेळेचा अपव्यय होणार आहे. रिंगरोड बाधित घरे नियमितीकरणासाठी प्राधिकरणाने वेळेत नियोजन करणे आवश्यक आहे. घरे अधिकृत करण्याच्या अध्यादेशामध्ये अनेक जटिल अटी- शर्थी आहेत. त्या शिथिल केल्या किंवा रद्द केल्या तरच घरे नियमित होऊ शकतात, असे पाटील म्हणाले.
चिंचवड येथे झालेल्या बैठकीत ‘रिंगरोड’ आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. चिंचवड, गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळेगुरव, कासारवाडी परिसरातील 40 समन्वयक बैठकीला उपस्थित होते. मुख्य समन्वयक विजय पाटील, राजेंद्र चिंचवडे, बाळासाहेब उबाळे, नरेंद्र माने, निलचंद्र निकम, सचिन काळभोर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रेखा भोळे, नारायण चिघळीकर, रजनी पाटील, शिवाजी इबितदार, गोपाळ बिरारी, राजेंद्र चिंचवडे, सचिन काळभोर, योगेश विरोळे, बाळासाहेब उबाळे, विशाल पवार, रवी पवार, नरेंद्र माने, मयुर पवार, नितीन पचपिंड, प्रदीप गणगे, निलचंद्र निकम, सुनीता गायकवाड, वैशाली कदम, वैशाली भांगीरे, चंदा निवडुंगे, आबा राजपूत, मोतीलाल पाटील, प्रदीप पटेल, माउली जगताप, सागर बाविस्कर, उमाकांत सोनवणे, किरण पाटील, भाऊसाहेब पाटील, अमोल हेळवर, बजरंग पवार, माणिक सुरसे बैठकीला उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – – बॅंकेतून बोलत असून आपले क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे असे खोटे सांगून एका महिलेची तब्बल 65 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13ऑक्टोबरला निगडी प्राधिकरणातील प्रतिक्षा बंगला येथे घडली. याप्रकरणी अनुराधा सूद (वय 52, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराधा यांना अनोळखी मोबाईल धारकाने फोन केला. मी बॅंकेतून बोलत आहे, तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, असे सांगून फिर्यादीच्या कार्डची गोपनीय माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्यांच्या कार्डवरून ऑनलाईन माध्यमातून परस्पर खरेदी करून सूद यांची 65 हजार 496 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. निगडी पोलिस पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुजू झाल्यानंतर हांगे यांची अवघ्या साडे चार महिन्यात बदली करण्यात आली. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणारे अच्युत हांगे आपल्या कार्यशैलीमुळे नेहमी चर्चेत राहिले. त्यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
राज्याच्या नगर विकास विभागाने अच्युत हांगे यांच्या बदलीचा आदेश मंगळवारी (दि. 24) जारी केला आहे. मुख्याधिकारी संवर्गाच्या अ श्रेणीतील हांगे हे एक जुलै 2017 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर रुजू झाले होते. त्यांनी यापूर्वी नागपूर, अहमदनगर महापालिकेत उपायुक्त म्हणून तर भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर या ड दर्जाच्या महापालिकेत आयुक्त म्हणून कामकाज पाहिले.
अतिवृष्टीच्या काळात मीरा-भाईंदरच्या महापौरांनी पाच वेळा मोबाईलवर संपर्क साधला असतानाही हांगे यांनी महापौरांचा फोन घेतला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महापौरांनी हांगे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली होती. त्यामुळे त्यांची दीड वर्षांपूर्वी हांगे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. गेले वर्षभर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. अखेर, एक जुलै रोजी त्यांची पिंपरी महापालिकेत वर्णी लागली. पिंपरी महापालिकेतही विवादांनी त्यांचा पीछा सोडला नाही. साडेचार महिन्यांच्या काळात हांगे नेहमीच वादात राहिले. स्थायी समितीत नगरसेवकांना प्रत्युत्तर देणे, कनिष्ठांना शिवराळ भाषा वापरणे, गणेश विसर्जनासाठी नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणे, अशा घटनांनी त्यांना कायमच वादात अडकवून ठेवले. तसेच, स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनाही त्यांनी उद्धट भाषेत प्रत्युत्तरे दिली होती. त्यामुळे हांगे यांच्यावर पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांची बदली झाली असली तरी त्यांच्याजागी कोणाची नियुक्ती करायची याबाबत राज्याच्या नगर विकास विभागाने अद्याप आदेश काढलेले नाहीत, अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.
व्हीएस न्यूज – प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीवर चाकूने वार करण्यात आले. ही घटना काल (दि. 22) रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील गोकुळ हॉटेल जवळ घडली.
याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बबलू शिवप्रसाद (वय 30, रा. पिंपरी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. या प्रकरणी सुरय्या वजीर शेख (वय 26, रा, वाशी, ठाणे) या तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुरय्याचे आरोपी बबलूशी प्रेमसंबंध होते. तसेच सुरय्या हिची मैत्रिण गंगा मण्डल हिच्याशी देखील प्रेमसंबंध होते. दरम्यान गंगा सोबत बबलू सुत जुळाले असल्याची कुणकुण सुरय्या हिला लागली होती. त्यामुळे तीने गंगाला मुंबईला घेऊन जायचे ठरविले होते. याचा राग बबलूच्या मनात होता.
दरम्यान सुरय्या बबलूला भेटायला पिंपरी येथे आली असताना त्या दोघांमध्ये वाद झाले. यावेळी आरोपी व फिर्यादी यांच्यात झालेल्या वादातून बबलूने सुरय्याच्या गळ्यावर व अंगावर चाकुने वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) उपचार सुरु आहेत. सुरय्या ठाणे येथे मजुरीची कामे करते. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
व्हीएस न्यूज – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने रिक्षा चालकाने प्रवाशाकडील पाच हजार रुपये लुटले. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री एक वाजता जगताप डेअरी चौकाजवळ साई चौकात घडली.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात प्रमोद बोर्डे (वय 26 रा. जय मल्हारनगर, थेरगाव) यांनी रिक्षा चालक व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे. प्रमोद बोर्डे हे कामानिमीत्त मुंबईला गेले होते. मुंबईहून रात्री एकच्या सुमारास परतल्यानंतर त्यांना रिक्षा मिळाली नाही. त्यामुळे ते पायी जात असताना एका अज्ञात रिक्षाचालकाने त्यांना लिफ्ट देऊ केली. मात्र रिक्षात बसल्यानंतर रिक्षा चालक व रिक्षात बसलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी प्रमोद यांच्याकडील पाच हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – दिघी येथील ज्ञानदीप बालकाश्रमातून 12 वर्षाचा मुलगा काल, रविवारी (दि 22) सकाळपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गणेश विठ्ठल जाधव (वय 12 मूळ रा. कनकुरी, ता. गंगापूर, औरंगाबाद) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव असून गणेश हा काल सकाळी साडेअकरा वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे.
याप्रकरणी ज्ञानदीप बालकाश्रम येथील आर्यन नामदेव डोलारे (वय 19 ) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश हा काल सकाळी साडेअकरा वाजल्यापासून कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. त्याची उंची चार फूट, रंग सावळा, चेहरा गोल, नाक दबलेले, अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट, निळी जीन्स असे असा पेहराव असून त्याला मराठी भाषा बोलता येते. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002