व्हीएस न्यूज - लोणावळ्यावरुण पुण्याकडे जाणाऱ्या लोकलमधुन बोपोडी रेल्वे पुलाखालील मुळा नदी पात्रात रविवारी रात्री पडलेल्या विवाहीत महिलेचा मृतदेह तब्बल 16 तासांच्या शोधमोहीमेनंतर अग्निशामक दलास सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सापडला. शितल सुमित लोहरे (वय-26 रा.पडळ वसाहत आंबेडकर नगर बोपोडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पुणे औंध अग्निशामक दलाने शितलचा मृतदेह मुळा नदीपात्रातुन होडीच्या सहाय्याने शोधुन काढला. यावेळी हॅंरीश पुलावर तसेच पुला खालील सब वे मार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. रविवारी सायंकाळी शितल या पिंपरी येथे राहत असलेल्या बहिणीकडे तिला भेटण्यास गेली होती. रात्री 8 वाजुन 10 मिनीटांच्या लोकलने त्या पिंपरी रेल्वे स्थानकातुन खडकीकडे निघाल्या होत्या. लोकल बोपोडी रेल्वेपुलावरुण जाताना त्या रेल्वे पुलाखालील मुळा नदी पात्रात पडल्या. लोकल मधील एका महिला रेल्वे प्रवासीने रेल्वे डब्यात सापडलेली बॅंग खडकी रेल्वे पोलिसांना दिली. या बॅंग मधील मोबाईलवर कुटुंबियाचा फोन आला. तेव्हा पोलिसांना सदर बॅंग शितलची असल्याचे समजले.
रेल्वेतील एका प्रवासाने पुणे रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलिसांना बोपोडी रेल्वे पुलावरुण एक महिला मुळा नदी पात्रात पडली असल्याची खबर दिली. त्यानंतर रविवारी रात्री अग्निशामक दलाच्या मदतीने खडकी पोलिसांनी प्रथम शोध घेतला. नंतर सोमवारी सकाळी पोलिस उपनिरिक्षिक मदन कांबळे व पोलिस हवालदार मोमिन यांनी अग्निशामक दलाच्या मदतीने पुन्हा शोध मोहिम राबवली. दुपारी12.30 च्या सुमारास अखेर मृतदेह शोध शोधण्याकामी पोलिसांना व अग्निशामक दलास यश आले. उड्डान पुलाच्या कामानिमित्त नदीपात्रात भर टाकल्याने नदीचे पाणी अडुन राहते. त्यामुळे नदीपात्रातील मृतदेह शोधण्यात अडचण आली नाही.
व्हीएस न्यूज - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक घोटाळ्यामध्ये बॅंकेबरोबरच समांतर क्षेत्र तेवढेच जबाबदार आहेत. बॅंका या वित्तपुरवठ्याचे एक साधन आहेत. मात्र, दिलेल्या कर्जाचा उत्पादन क्षेत्रामध्ये पर्याप्त व योग्य वापर केला जात नाही, म्हणून सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये घोटाळे होत असल्याचे दिसून येत आहे, असे मत लेखक, संशोधक व आर्थिक सल्लागार डॉ. संतोष दास्ताने यांनी व्यक्त केले.
इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शिक्षक प्रबोधिनी व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅंकिंग विषयासाठी अल्पमुदत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी डॉ. दास्ताने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे, प्रा. के. व्ही. अडसूळ, डॉ. अर्चना जाधव, डॉ. एस.के. सानप, डॉ. एस.एस. मेंगाळ, प्रा. एम.व्ही. खांदवे, डॉ. बी.के. रसाळ, प्रा. डी.बी. पेठे, प्रा. एम.व्ही. देशमुख, प्रा. सुरेश थरकुडे, प्रा. श्रद्धा गुजराती, प्रा. डी.पी. काकडे आदी उपस्थित होते.
डॉ. दास्ताने म्हणाले, पंजाब नॅशनल बॅंकेत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. इतरही अनेक बॅंकांमध्ये घोटाळे आहेत. बॅंका या कर्ज देण्याचे साधन असून, बॅंकांनी मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्रात कर्ज दिली आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात 1991 नंतरच्या आर्थिक उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण यामुळे तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडून या स्पर्धांना तोंड देण्यासाठी बॅंकांकडून मोठ्या प्रमाणात कर्जाच्या रुपाने भांडवलाचा पुरवठा केला जातो. कर्ज मिळवण्यासाठी कंपन्या आपले ताळेबंद फुगवून दाखवतात. त्यामुळे बॅंका त्यांना मोठ्या रकमेची कर्ज देतात. प्रत्यक्षात मात्र बॅंका अशा कंपन्यांच्या ताळेबंदाचा सखोलपणे अभ्यास करत नाहीत. दुसऱ्या बाजूला सूक्ष्म उद्योग, महिला उद्योग, बचतगट यांच्याकडून मात्र 95 ते 98 टक्के कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केली जाते. मोठे उद्योग स्वइच्छेने डिफॉल्टर असतात. त्यांची कर्जफेड करण्याची करण्याची क्षमता असतानाही ते हेतूपुरस्सर कर्ज फेडत नाहीत.
ते पुढे म्हणाले, कर्ज देत असताना प्रकल्पाच्या 150 टक्के तारण मालमत्ता असली पाहिजे. परंतु अलिकडे कर्ज वाटप करताना तारण नको, कारण पहा, असा विचार दृढ होत आहे. थकलेल्या कर्जदारासंबंधी कोठेतरी सरकारचे पाठबळ आहे. रिझर्व बॅंकेची स्वायत्तता कमी होत आहे. अलिकडे सरकार रिझर्व बॅंकेच्या धोरणात हस्तक्षेप करीत आहे. बॅंक रेट, सीआरआर, एसएलआरच्या प्रमाणात घट करा, असा सरकारचा रिझर्व बॅंकेवर दबाव येत आहे. निरव मोदीच्या कर्जासंबंधी रिझर्व बॅंकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारला पूर्वसूचना दिली होती. परंतु सरकारने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे पंजाब नॅशनल बॅंकेत मोठा घोटाळा झाला, असेही डॉ. दास्ताने यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. अर्चना जाधव यांनी, तर प्रा. अडसूळ यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - आईला सोडविण्यासाठी निगडी बस थांब्यावर आलेल्या एका तरूणीशी पावती फाडण्यावरून वाहतूक पोलीस महिलेने वाद घातला. तसेच मधस्थी करणाऱ्या एका पोलीस मित्र महिलेला मारहाण केली. हा प्रकार सोमवारी दुपारी एकच्या सुमारास निगडी पीएमपीएमएल बस थांब्यावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक तरूणी दुचाकीवरून आपल्या आईला सोडविण्यासाठी बस थांब्यावर आली होती. आईला सोडून ती दुचाकीवर बसली होती. त्याचवेळी निगडी वाहतूक शाखेची टोईंग मोटार तेथे आली. वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने तरूणीला पावती फाडावी लागेल, असे सांगितले. तरूणीने मी आईला सोडवून लगेच जाणार होते. मी गाडीवर बसले आहे,तुम्ही पावती फाडू शकत नाही. यावरून पोलीस कर्मचारी महिलेने तरूणीशी वाद घातला. हा वाद पाहून तेथे आलेल्या पोलीस मित्र महिलेने वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेला तुम्ही चुकीची कारवाई करत आहात, असे सांगितले. यावरून चिडलेल्या पोलीस कर्मचारी महिलेने पोलीस मित्र महिलेने मारहाण केली. पोलीस मित्र महिलेनेही टोईंग मोटारीला आडवी थांबत मोटार जाऊ देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे बघ्याची मोठी गर्दी जमली. जमावानेही पोलीस महिलेला चुकीची कारवाई करत असल्याचा जाब विचारला.
निगडी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जाधव घटनास्थळी आल्यानंतर हा वाद निवळला. संबंधित तरूणीला वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने दमबाजी केल्यामुळे तिने फिर्याद दिली नाही. परंतू, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पावती फाडण्यासाठी दादागिरी करत असल्याचा प्रकार समोर आल्याने पोलीसांच्या कामाबाबत उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
व्हीएस न्यूज - श्री विठ्ठल रूक्मिणी प्रेरणा मंडळाच्या वतीने ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचन सोहळ्याचे दि. 21 ते 28 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
प्राधिकरणातील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात सकाळी आठ वाजता पारायण, सायंकाळी 5.30 वाजता हरिपाठ तर सायंकाळी 6 वाजता प्रवचन होणार आहे. यामध्ये सुरेश आगाशे, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, जयश्री सांगवीकर, ओजदा पोळ, चंद्रशेखर निलाखे, यशवंत लिमये, मधुवंती देव आदी प्रवचनकारांची प्रवचने होणार आहेत. तर शेवटच्या दिवशी ह. भ. प. नारायण महाराज आरडे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. पारायणास बसू इच्छिणाऱ्यांनी शरद अवचट 8275682164 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मोकाशी यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - पुणे येथून लोणावळ्याला मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्यासाठी आलेल्या विद्यार्थी तरुणाचा वाढदिवसाच्याच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यातील वळवण कॉलेज समोर घडली.
शुभम नानूराम सुखवाल (वय-22, सध्या रा. वडगाव धायरी, पुणे, मूळ राज्यस्थान ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मृताचे नाव आहे. शुभम हा पुण्यातील वडगाव धायरी येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभमचा रविवारी वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी शुभम आणि त्याचे इतर पाच मित्र त्यांच्या मोटारसायकलने पुण्याहून सकाळी पावणेदहाच्या सुमारास लोणावळ्याकडे निघाले होते. शुभम हा त्याच्या पल्सर मोटारसायकलने येत होता. त्याचे लोणावळ्यातील वळवण कॉलेजसमोर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी मार्गालगतच्या सिमेंट पुलाच्या खांबाला जोरात धडकली. यात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास युवराज बनसोडे करीत आहेत.
व्हीएस न्यूज - भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा गंभीर जखमी होऊऩ मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास निगडीतील अंकुश चौकात घडली.
गणेश शंकर सगर (वय-23, रा. मानाजी बाग, भोईर वस्ती, खडकी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याचे नातेवाईक रामेश्वर मर्ढेकर (वय-27) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास गणेश दुचाकीवरून जात होता. निगडीतील अंकुश चौकात त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये गणेशचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला. फौजदार वाघमारे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - फॅब्रिकेशन व्यावसायिकाची हत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता सांगवीतील समर्थनगर येथे उघडकीस आला. अनैतिक संबंधातून व्यावसायिकाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. कैलास रामजी तौर (वय-35, रा. समर्थनगर, नवी सांगवी, मुळ बीड) असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तौर यांचा पिंपळे-निलख येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.
याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी कैलास तौर कुटूंबासह बीडला धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर रविवारी ते एकटेच सांगवीला आले होते. सकाळी ते कामावर न आल्याने त्यांचा नोकर घऱी आला. घराला बाहेरून कडी लावण्यात आली होती. नोकराने दरवाजा उघडून पाहिले. कैलास तौर बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारपुर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, तौर यांच्या घरी आलेल्या कामगाराला पोलीसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासात कामगाराच्या पत्नीचे व कैलास तौरचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. यातून कामगाराने तौर यांचा खून केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणा (पीसीएनटीडीए) च्या निवासी भूखंड सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 38 भूखंडांपैकी पहिल्या टप्प्यात विविध पेठांमधील 23भूखंडांच्या लिलाव प्रक्रियेत 719 इच्छुकांनी भाग घेतला आहे. त्यांच्या अर्जांची छाननी शुक्रवारी सुरू झाली असून कोणी कोणत्या भूखंडासाठी किती रक्कम भरली याची माहिती मंगळवारी (दि. 21)जाहीर होणार आहे.
पीसीएनटीडीएने 2011 नंतर शिल्लक निवासी भूखंडाचा लिलाव यंदा आयोजित केला आहे. काही भूखंड मागास घटकांसाठी राखीव आहेत. पीसीएनटीडीएकडे सध्या दोनशे हेक्टर जागा विकासासाठी उपलब्ध आहे. त्यातीलच काही अविकसित निवासी भूखंड लिलावाद्वारे 99 वर्षांच्या भाडेकराराने देण्यात येणार आहे. या भूखंडांसाठी साडेबारा टक्क्यातील पात्र शेतकरी आग्रही होते. परंतु, तांत्रिक कारणांमुळे ते देता येणार नसल्याचे म्हणणे आहे.
पहिल्या टप्प्यात पेठ 1, 2, 4, 18, 19, 25 आणि 27 अ मधील 23 आणि पेठ 18 मधील 14 भूखंडांचा लिलाव होणार आहे. भूखंड क्रमांक 686 साठी सर्वाधिक 72 इच्छुकांनी आणि प्रभाग एक मधील 368क्रमांकाच्या भूखंडाला अवघ्या दोन जणांनी लिलाव अर्ज (बीड फॉर्म) भरले आहेत. पहिल्या टप्प्याचा लिलाव 21 मार्चला जाहीर होईल. त्यानंतर पुढच्या टप्प्याचा लिलाव जाहीर केला जाणार आहे. रडीरेकनरनुसार लिलावातील सर्व 38 भूखंडांची मूळ किंमत सुमारे 22 कोटी आहे. मात्र, सध्याचा बाजारभाव पाहता लिलावात सहभागी झालेल्यांनी तिप्पट, चौपट दराने मागणी केली आहे. यातून चाळीस ते पन्नास कोटींच्या आसपास महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे.
व्हीएस न्यूज - महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूंबियांसाठी राबविण्यात येणारी धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करण्यात येणार आहे. आता अधिकारी,कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा खासगी विमा कंपनीमार्फत काढला जाणार आहे. त्यासाठी खासगी विमा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटूंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटूंबिय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना 1 सप्टेंबर2015 पासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कुटूंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्याची आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्तींचा समावेश कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांमध्ये करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत 7400 कर्मचारी असून कर्मचारी आणि अवलंबितांची संख्या सुमारे 35 ते 40 हजार एवढी आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही योजना ऐच्छिक असून एकूण 3 हजार 400 सेवानिवृत्तांपैकी 1हजार 175 सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांची संख्या 2 हजार 350 एवढी आहे. या योजनेवर महापालिकेचा सुमारे 30 कोटी रूपये खर्च होतो.
महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी 12 जून 2017 रोजी विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत सुमारे 10 कंपन्यांनी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विमा लागु करण्यासाठी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आयुक्तांच्या सुचनेनुसार क्रिसील संस्थेकडे विनंती प्रस्ताव (रिक्वेस्ट टू प्रपोजल) तयार करण्यासाठी पाठविण्यात आला. क्रिसीलकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याला आयुक्तांनी 9 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. त्यानुसार, इच्छूक विमा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
व्हीएस न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार थरमॅक्स लि. चिंचवड येथे थरमॅक्स कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक मतदानाद्वारे संपन्न झाली. या निवडणुकीकडे जिल्ह्यातील दिग्गजांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये केशवराव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल एकमताने निवडून आला.
यावेळी बोलताना केशवराव घोळवे म्हणाले की, सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं. हा विजय सत्याचा असत्यावर झालेला विजय आहे. हा विजय कारखान्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विजय आहे. ही कमिटी यापुढे कंपनी हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामगारांच्या हिताचे संवर्धन करणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याबद्दल त्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून थरमॅक्सचे प्रवीण खेसे तर निवडणूक कमिटी म्हणून प्रकाश जोध, शत्रुघ्न गोडगे, एम. एस. राखुंडे, बी. जे. सपकाळ यांनी काम पाहिले. केशवराव घोळवे यांनी कंपनी हित जोपासत कामगारांप्रती दिलेले योगदान, अहोरात्र कष्ट करून कामगारांच्या कल्याणासाठी झटत असताना कुटील कटकारस्थान करून अशा चांगल्या कामगार नेत्यांना कंपनीतून बडतर्फ करण्यात आले होते. कामगारांना मागील तीन वर्षे सतत दहशतीमध्ये ठेवण्यात आलेले होते. याचीच चीड कामगारांच्या मनात खदखदत होती. त्याचे परिणाम म्हणून कामगारांनी केशवराव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पॅनल निवडून देत पुन्हा एकदा केशवरावांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, अशा भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केल्या. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी शिवशंभो फाउंडेशन शाहूनगर येथे फटाक्यांचा आतषबाजीमध्ये गुलाल उधळून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कामगारांनी सर्व उमेदवारांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे यांनी केले. श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, मारुती जगदाळे, संतोष कणसे यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
केशवराव घोळवे यांच्या पॅनल मधील विजयी उमेदवार व त्यांना मिळलेले मतदान –
महेंद्र पासलकर (224), मिलिंद बायस्कर (224), प्रदीप तरटे (223), संदीप ठाकूर (221), सुशील मिरगल (220), विश्वास पोळ (218), किशोर सोमवंशी (215), संजय देशमुख (215), एकनाथ उगले (215), राजेंद्र पाटील (214), भीमराव धस (208).
व्हीएस न्यूज - अण्णासाहेब मगर बँक व्यवस्थापन व सेवक यांच्यामध्ये वेतनकरार संपन्न झाला. या वेतनकरारामध्ये सेवकांना भरघोस वेतनवाढ झाल्याचे बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी जाहीर केले. त्यामुळे बँकेच्या सेवकांचा गुढी पाडवा गोड झाला आहे.
वेतनकरार २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीसाठी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने हा वेतनकरार बँकेने एकूण पाच वर्षासाठी केला आहे. या वेतन करारामुळे सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वेतनकरारामध्ये सर्व सेवकांना समान न्याय देण्याचा बँकेने प्रयत्न केला आहे. करारानुसार सेवकांना पद व सेवा ज्येष्ठतेनुसार किमान चार हजार तर कमाल सोळा हजार रुपयांपर्यंतची वेतनवाढ मिळणार आहे. त्याचा लाभ ७७ सेवकांना होणार आहे. हा सर्वसमावेशक करार असल्याचे नंदु लांडे यांनी नमूद केले.
या करारावर व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष नंदकुमार लांडे, उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर, संचालक अँड. घनशाम खलाटे, शंकर मेटकरी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली. तसेच सेवकांचे प्रतिनिधी म्हणून संध्या द्विवेदी, तुषार मखामले, आदिनाथ देवकर, सरिता लुंकड, जयेश फुगे यांनी स्वाक्षरी केली. यावेळी संचालक मनोज बोरसे, गणेश पवळे, राजेश सस्ते, विजय गवारे, दीपक डोळस, लालचंद राठोड, सुलोचना भोवरे, सविता मोहरुत, सोनल लांडगे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे रस्त्यावर गाडी पुढे मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एका गुन्हेगारावर टोळक्याने गोळीबार केला आहे. यामध्ये जखमीला दोन गोळ्या लागल्या असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जयवंत चितळकर हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चितळकर हा त्याच्या मित्रांसोबत वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात बसला होता. त्यावेळी एक कार तेथून जात होती. मात्र रस्त्यावर दुचाकी असल्याने कारला अडचण होत असल्याने कार चालकाने दुचाकी काढण्यास सांगितल्याने त्यांच्यात वादावादी झाली. कार चालक निघून गेला आणि त्याच्या इतर साथीदाराना घेऊन आला. त्यावेळी मारामारी झाली आणि एकाने चितळकर याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याला दोन गोळ्या लागल्याची शक्यता आहे. त्याच्यावर बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002