व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री शहरात असताना भाजपाच्याच नगरसेवकाचा भरदिवसा खून होत आहे, शहरातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काय झाले? असा खडा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. वाघेरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकालात सव्वा वर्षात 30 सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी 21 सभा तहकूब करण्याचा राष्ट्रीय विक्रम करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणाऱ्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा. अशीही मागणीही वाघेरे यांनी केली.
सर्व साधारण सभा तहकूब करणे आणि उपसूचना देण्याला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नेहमी विरोधच होता. अगदीच अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीच्या काळात सभा तहकूब केली जायची. परंतू शहरातील भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टक्केवारीच्या राजकारणातच जास्त रस असल्यामुळे सभा तहकूबीचा राष्ट्रीय विक्रम करणे शक्य झाले आहे. स्मार्ट सिटी व नदी सुधार प्रकल्पासाठी किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरीकांना मिळाली पाहिजेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकालात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता भाजपच्या काळात 43 व्या क्रमांकावर फेकले गेले असून सत्ताधाऱ्यांनी याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
व्हीएस न्यूज- 'पश्चिम बंगालला जाण्यासाठी तुम्हाला फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो,' असे सांगून दोघांनी एका तरूणाची 25 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार प्राधिकरण येथे नुकताच उघडकीस आला.
अभिजीत कुलकर्णी (वय-36, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांना मोबाईलव्दारे संपर्क साधून आरोपींनी फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो, असे सांगून खात्यावर 92 हजार रूपये भरण्यास भाग पाडले. आरोपींनी ट्रिपचे आयोजन केले नाही. त्यामुळे कुलकर्णी यांनी आरोपींकडे दिलेले पैसे मागितले. आरोपींनी 67 हजार रूपये दिले. परंतू, उर्वरित 25 हजार रूपये न देता फसवणूक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज- गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वृद्ध दांपत्य गंभीररीत्या भाजले आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. प्रभाकर नगरकर (वय 60) आणि आशा नगरकर (वय 58) अशी स्फोटात जखमी झालेल्या वृद्ध पती-पत्नीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगरकर पिंपळे गुरवमध्ये ओम साई सृष्टी चौकात एका चाळीवजा घरात राहतात. त्यांचे घर एकाच खोलीचे आहे. मंगळवारी रात्री स्वयंपाक झाल्यानंतर गॅस सुरूच राहिला. जेवण झाल्यानंतर दोघेही झोपले. मध्यरात्री प्रभाकर लघुशंकेसाठी उठले. दरम्यान, गॅस संपूर्ण घरात पसरला होता. त्यांना याबाबत कल्पना आली नाही. त्यांनी घरातील दिवा सुरू केला. त्यावेळी लिकेज झालेल्या गॅसचा स्फोट झाला. यामध्ये नगरकर दांपत्य गंभीररित्या भाजले.
घटनेची माहिती पावणेएकच्या सुमारास अग्निशमन विभागाला समजली. माहिती मिळताच तात्काळ वल्लभनगर अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. राहटणी अग्निशमन विभागाचे भाऊसाहेब धराडे, विकास नाईक, चिपळूणकर यांच्या पथकाने आग तात्काळ नियंत्रणात आणली. आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
व्हीएस न्यूज - पर्यटनाचे आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरण मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ओसांडून वाहू लागले. यामुळे धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद पर्यटक घेऊ लागले आहेत.
दोन आठवड्यापासून पर्यटकांना भुशी धरण भरण्याचे वेध लागले होते. धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखिल पर्यटन धरणावर गर्दी करत होते. शुक्रवारपासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने मंगळवारी अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायकांची प्रतिक्षा संपवली व पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओसांडून वाहू लागले. धरणाच्या सांडव्यावरुन पायऱ्यांवर पाणी वाहू लागले आहे.
मागील आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. धरणावर येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःच्या जिवाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - रस्त्यावरून विजेच्या खांबाजवळून जात असताना एका ९ वर्षीय बालकाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील ओटा स्कीम, निगडी येथे मंगळवारी (ता.२६) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.
हरीओम विनायक नराल – (वय ९, रा.पंचशील हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम हा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओटा स्कीम येथील अंकुश चौकातून रस्त्याने पायी चालला होता. तो विजेच्या खांबाजवळून जात असताना त्यास विजेचा जोरदार झटका लागला व तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित केला. मात्र त्यानंतरही या ठिकाणी विद्युत प्रवाह येत असल्याचे दिसून आले. यामुळे वीजचोरीतून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी व्यक्त केली.
व्हीएस न्यूज - जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्त मंगळवारी सकाळी देहुगाव येथे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.
यावेळी उपअधिक्षक तेजस्विनी सातपुते, डीवायएसपी जी.एस. माडगूळकर, मंदिराचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे कमिटी, देहूरोडचे निरीक्षक प्रकाश धस, सर्व प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी, परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुवारी (दि.५ जुलै) रोजी तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. यापूर्वी पालकमंत्री गिरीष बापट, उपअधीक्षक, डीवायएसपी यांनी बैठका घेतली आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत अद्याप पूर्ण न झालेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला.
लाखो भाविक सहभागी होणाऱ्या या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेल्या आहे. यासाठी अधिक्षक हक, उपाधिक्षक सातपुते, डीवायएसपी माडगूळकर यांच्यासह सात निरीक्षक, २२ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २७० महिला पुरुष पोलिस कर्मचारी आणि १५० होमगार्ड असणार आहेत. या सोबत एसआरपीएफ, दंगा काबू नियंत्रण पथक व इतरही पथके तैनात असणार आहेत.
व्हीएस न्यूज - आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक बालाजी सुधाकर कांबळे यांची कोयत्याने वार करून भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भडणातून झाली असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अजय संजय मेटकरी (रा. काळेवाडी झोपडपट्टी, देहूफटा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी मयत बालाजी कांबळे हे काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाला आले होते. त्यावेळी अजय मेटकरी याने दारूच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ करून त्यांच्या बरोबर झटपट केली होती. अजय मेटकरी हा मयत बालाजी कांबळे याचा मावस भाऊ आहे. भांडणानंतर त्याने बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याने अनेकवेळा धमकी दिली होती. त्यानेच भांडणाचा राग मनात धरून नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून केला. अशी फिर्याद घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्यूज - आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
व्हीएस न्यूज - मराठा समाजाला शिक्षण व नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पहिल्या पासून प्रयत्न करत आहे. महासंघानेच सर्वप्रथम या बाबत जनजागृती केली. आरक्षण हा आमचा हक्कच आहे, तो आम्ही मिळवणारच परंतु राज्यातील मराठा समाजातील सर्व युवक युवतींना शिक्षण, उदयोग, व्यवसाय व व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे.
त्यासाठी येणा-या अडीअडचणीवर मात करण्यासाठी राज्यभरातील महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करीत आहेत. वेळोवेळी मराठा समाजाच्या समविचारी संघटनांना बरोबर घेऊन आम्ही आमचे ध्येय गाठूच. असे प्रतिपादन अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रणजीत जगताप यांनी पिंपरी, पुणे येथे मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप, प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ, प्रदेश संघटक संतोष शंकर लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष उदय पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी सांगितले की, अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की, मागील वर्षी राज्य सरकारने काढलेला ‘श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची’ अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी. शासऩ फक्त आदेश काढून मोकळे झाले आहे. प्रत्यक्षात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेताना शाळा महाविद्यालयांकडून संपुर्ण फी भरण्याची मागणी केली जाते. अखिल भारतीय युवक मराठा महासंघ सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन करते की, चालु शैक्षणिक वर्षी प्रवेश घेताना संपुर्ण फी मागणा-या शिक्षण संस्थां विरुध्द तक्रार करण्यासाठी पुढे यावे. विद्यार्थ्यांची व पालकांची अडवणूक करणा-या अशा शिक्षण संस्थांना अखिल भारतीय युवक मराठा महासंघ धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकारने आदेश काढण्याचे काम केले, मात्र प्रत्यक्षात युवकांना हे कर्ज देण्यासाठी बँकाकडून अनेक कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत मागणी व अडवणुक केली जाते. गरजु युवकांनी ऑनलाईन प्रक्रीया पुर्ण करुन अर्ज भरल्यानंतर बॅंक अधिकारी मुलाखतीच्या वेळी आम्हाला शासनाचा आदेश प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे या योजनेखाली कर्ज देण्याचे नाकारतात. पिळवणुक करतात असे निदर्शनास आले आहे. तसेच शेतक-यांना कर्ज मिळवण्यासाठी व कर्जमाफीसाठी बॅंक अधिकारी अडवणूक करतात. माता भगिनींणा छळतात अशा निर्ढावलेल्या अधिका-यांना व त्यांच्या दलालांना वठणीवर आणण्यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ आवाहन करते की, अशा बँक अधिका-यांना उघडे पाडण्यासाठी मराठा महासंघाकडे तक्रार करावी.
अखिल भारतीय युवक मराठा महासंघ त्यांचा योग्य समाचार घेईल. शेतक-यांना व युवकांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करील. तसेच अखिल भारतीय युवक मराठा महासंघ राज्य शासनाकडे मागणी करत आहे की, मराठा समाजाच्या हितासाठी फक्त आदेश काढून उपयोग नाही. तर ३१ मार्च २०१८ पर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत किती विद्यार्थ्यांना, किती रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून किती गरजु युवक युवतींना उद्योग व्यवसायासाठी किती रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. याची सविस्तर आकडेवारी नागरीकांच्या माहितीसाठी वेबसाईटवर जाहिर करावी. आमचे असे म्हणणे आहे की, या दोन्ही योजनेचा मराठा समाजातील तरुणांना म्हणावा तसा उपयोग झाला नाही. या योजनेचा सक्षमपणे निधी वापरला जावा म्हणून शासनाने जाहिरात करावी.
प्रदेश संघटक संतोष शंकर लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरात केएसबी चौकातील उड्डाणपुलाखाली असलेला कै. अण्णासाहेब पाटील यांच्या अर्धपुतळा काढून पुर्णाकृती पुतळा उभारला जावा अशीही मागणी केली. तसेच नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने प्लॅस्टीक बंदीचा घेतलेला निर्णयाचे अखिल भारतीय युवक मराठा महासंघ स्वागत करत आहे. परंतु कोणतीही पुर्व तयारी न करता हा निर्णय घेतला असल्याचे दिसते. प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी, कागदी पिशव्या बनवणा-या उदयोजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक होते. मात्र असे न करता घाई गडबडीने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचे दिसते. यामुळे सामान्य नागरीक व्यापारी उदयोजक सर्वच सभ्रंमावस्थेत आहेत. या बाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रशासन मात्र प्लॅस्टीक उत्पादकांना पाठीशी घालुन सामान्य नागरीकांवर व छोट्या व्यवसायीकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. याचा अखिल भारतीय युवक मराठा महासंघ निषेध करत आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना कै. अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे. या वटवृक्षाचे अनेक शाखा, संस्था संघटनांमध्ये रुपांतर झाले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाला करावी लागली. अशीच मराठा समाजाची सर्व शक्ती एकत्र करुन शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण आम्ही मिळवुच, असा ठाम विश्वास अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी व्यक्त केला.
व्हीएस न्यूज - मान्सूनच्या पावसाची मावळ तालुक्यात जोरदार सुरुवात सुरुवात झाली असून खरीप पिकांच्यासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
मावळ तालुका अतिपावसाचा तालुका असून मावळात प्राधान्याने खरीप पिकेच घेतली जातात. तालुक्यातील 30 हजार एकर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. पावसाची दमदार सुरुवात झाल्याने भात पिकांच्या लागवडीना चांगलाच वेग येणार आहे.
मान्सून पावसाचा जोर पश्चिम पट्यात जास्त असून त्या ठिकाणी भाताच्या पिकांना याचा फायदा होत आहे. मान्सूनच्या पावसाने यावेळी वेळेपूर्वीच सुरुवात केली होती. मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली होती. मात्र रविवार, सोमवार पासून पावसाचे पुन्हा पुनरागमन झाल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.
मावळच्या पूर्व पट्यातही पावसाचे आगमन झालेले असल्याने खरीप भात पिक तसेच भुईमुग, कडधान्ये, आदी खरीप पिकांच्या पेरण्यांना चांगले वातावरण आहे. मान्सूनच्या पावसाने तालुक्यातील जलसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. शनिवार आणि रविवार जोडून सुट्या आल्याने मावळत वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. पर्यटक दुचाकी आणि चारचाकी गाड्यामधून आल्याने काही महत्वाच्या पर्यटनस्थळी वाहतूक कोंडी झाली होती.
मान्सूनच्या पावसाचे जोरदार आगमन झाल्याने पश्चिम पट्ट्यातील डोंगरी भागात ओढे, नाले, धबधबे भरभरून वाहू लागल्याने पुणे मुंबई कडील पर्यटकांनी मावळात वर्षाविहारासाठी मोठी गर्दी केली होती.
पुणे मुंबई महामार्ग या पर्यटकांनी फुलून गेला होता. महामार्गावरील धबध्ब्यावरहि प्रचंड गर्दी झाली होती. चहा, कॉफी, नाष्टा, भोजन करण्यासाठी पर्यटकांना वाट पहावी लागत होती.
व्हीएस न्यूज - खरोखर आपण ज्येष्ठ आहोत का ? जुनाट बुरसटलेले ज्येष्ठ आहोत हे या पिढीने तपासून पाहावं. जर मुलंबाळ आपल्या अन्न, वस्त्र, निवारा तसेच आजारपणाची काळजी घेत असतील तर संवादसारख्या आपल्या मानसिक गरजांची जबाबदारी त्यांच्यावर टाकणं कितपत योग्य आहे? निवृत्तीनंतर आपलं मनोरंजन करण्यासाठी वाचन, लिखान, टिव्ही, स्मार्ट फोन, फिरायला जाणं, संगीत आदी माध्यमांतून निवड करून पुढील पिढीवर संवादाच्या गरजेचा भार टाकता कामा नये, असे मत काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
नव्या पिढीला दोष न देता वृध्दांनी आपल्या स्वतःमध्येच बदल घडवून आणणे काळाची गरज आहे. नवीन पिढीचा व घरातील आनंदाचे वातावरण कसे राहील, यासाठी ज्येष्ठांनी प्रयत्न करावेत, असेही बकाल म्हणाल.
व्हीएस न्यूज - शिक्षण ही एक साधना आहे, जेवढे तन्मय होऊन तुम्ही ही साधना कराल. तितके चांगले तुम्ही शिक्षण साधक बनाल, असे प्रतिपादन चारित्र्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता यांनी केले.
ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राच्या आयोजित इयत्ता 10 वीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, प्राचार्य प्रज्ञा पाटील, सुभाष गदादे, मधुरा लुंकड आदी उपस्थित होते. शाळेच्या 49 विद्यार्थ्यांनी 90 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. 75 ते 89 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. मराठी माध्यमाचा 98.78 तर इंग्रजी माध्यमाचा 94.91 टक्के निकाल लागला.
अथर्व कुलकर्णी याला 99.80, साक्षी महाजन 97.40 तर श्रेया जगताप हिला 97.20 टक्के गुण मिळविले. श्रावणी कुलकर्णी, सोनिय जगदाळे, श्रृती पिंगळे यांनी गणितात तर अथर्व कुलकर्णी, साक्षी महाजन, प्रथमेश भोजने, ओम महाजन यांनी संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळविले. तंत्र शिक्षण विभागात अमृता साळुंखे प्रथम आली. सूत्रसंचालन कल्याणी पटवर्धन, वैशाली गायकवाड यांनी केले. अनिरूध्द पुरीगोसावी, नागेश जोशी, राजश्री मराठे आदींनी संयोजन केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002