व्हीएस न्यूज – कार व रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा सोमवारी (दि.13) सकाळी सहा वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 1 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता म्हाळुंगे येथे घडला. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
गोरख महादु कानगुडे (वय 40 रा. म्हाळुगे ता. मुळशी) असे या रिक्षाचालकाने नाव आहे. याप्रकरणी संतोष खांडेकर (वय 27 रा केमसेवस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानगुडे हे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने रिक्षा चालवत असताना समोरुन येणा-या कारला त्याची रिक्षा धडकली. यामध्ये कानगुडे गंभीर जखमी झाले. त्यांना तताडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
व्हीएस न्यूज - कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना हातातील लोखंडी पाईप विजेच्या ट्रान्सफार्मरला लागल्याने मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी येथे सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये घडली. सचिन अशोक गायकवाड (वय 35 रा. बौद्धनगर पिंपरी) असे या मजुराचे नाव आहे. हा एका मंडप व्यवसायिकाकडे मजूर म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये एक घऱगुती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना सचिन यांच्या हातातील लोखंडी पाईप सोसायटीमधील विजेच्या ट्रान्सफार्मरला लागला. लोखंडी पाईप असल्याने सचिन याला विजेचा जोरदार धक्का बसला. सचिनला तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
व्हीएस न्यूज – महापालिकेतर्फे विकास कामांमध्ये सल्लागाराची नेमणूक करण्यात येते. अलिकडच्या काळात बहुतेक विकास कामांमध्ये सल्लागार नेमण्याची पद्धत निर्माण झाली आहे. सल्लागाराकडून कामे न होणे व काही राजकीय व्यक्तींना हाताशी धरुन या सल्लागार संस्थांनी कामे केल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका प्रशासनाकडे प्रत्येक विभागातील सक्षम व तज्ज्ञ अधिकारी असताना अशा प्रकारे सल्लागार नेमणूक कशासाठी? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हडिकर यांना निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाला सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्यास प्रशासनाने शासनाला कळवले पाहिजे.“सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आता चौथा सल्लागार नेमला आहे. पहिल्या तीन सल्लागारांनी काय केले, याचा आयुक्तांनी खुलासा करावा. सर्व्हे करण्यासाठी एक सल्लागार, कामासाठी वेगळा सल्लागार, तर आयुक्त व अधिकारी यांचे पालिकेत काम काय? याचे स्पष्टीकरण द्यावे. झोपडपट्टी निर्मूलन व पुन: विकास, पंतप्रधान आवास योजना व इतर कामे सल्लागार करीत असतील, तर प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बिनकामाचा पगार दिला जातोय का? सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाच्या उधळपट्टीला जबाबदार कोण? आणि का?असे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
…अन्यथा आंदोलन छेडणार!
झोपडपट्टी निर्मूलन, पुन: विकास योजना व पंतप्रधान आवास योजनेबाबत शहरवासीयांत अद्याप संभ्रम आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडे दोन ठिकाणच्या प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध नाही. झोपडपट्टीतील नागरिकांना व भाडेकरुंना सत्ताधाऱ्यांनी आगामी लोकसभा- 2019 निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भूलथापा देणे सुरू केले आहे. अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर रद्द करणे, रिंग रोड बाधितांचा प्रश्न मार्गी लावणे, या ऐवजी महापालिका सल्लागार नेमण्यावर भर देत आहे. आयुक्तांनी याकडे कानाडोळा करू नये व नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पांडुरंग परचंडराव यांनी दिला.
व्हीएस न्यूज - थेरगाव येथील सोळा नंबर बस थांब्याजवळील उड्डाणपुलावर सोमवारी (दि.13) सकाळी ऑईल सांडल्याने दुचाकी घसरुन पडू लागल्या. याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासाच्या परिश्रमानंतर हा रस्ता धुवून साफ केला. त्यानंतर या रस्त्यावरुन वाहतूक पुर्ववत सुरु झाली.
डांगे चौक मार्गे जगताप डेअरी, औंध तर औंधकडून डांगे चौक, वाकड, चिंचवडकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता सोळा नंबर बस थांब्याजवळ भुयारी मार्ग व उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. या पुलावर सोमवारी पहाटे एका वाहनातून सुमारे किलोमीटर अंतरावर ऑईलची गळती झाली होती. त्यामुळे अनेक दुचाकी वाहने घसरुन पडत होती. याची माहिती मिळताच महापालिकेच्या रहाटणी अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद केली. त्यानंतर या उड्डाणपुलावर सांडलेले ऑइल धुवून काढले. सकाळी सात ते आठ असे सुमारे एक तास हे काम सुरु होते. सांडलेले सर्व ऑईल धुवून काढल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. रहाटणी अग्निशमन दलाच्या भगवान यमगर, नामदेव वाघे, जयराम कदम, शाहू वनमाने आणि मारुती गुजर यांनी हे ऑईल धुवून घेतले.
व्हीएस न्यूज - महिला सहकारी कर्मचाऱ्याशी अश्लील बोलून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी, तसेच वाहतूक शाखेच्या प्रशिक्षण शिबिरास अनुपस्थित राहून त्याबाबत अधिकाऱ्यांना बेजबाबदार आणि बेशिस्तपणे उत्तर देणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
संपत ज्ञानदेव नागरगोजे असे निलंबनाची कारवाई झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. करण्यात आलेले आहे. काही कारणास्तव पुण्यातून 15 दिवसांपूर्वी चिंचवड वाहतूक शाखेत करण्यात आलेली होती. दरम्यानच्या काळात नागरगोजे याच्या विरोधात त्याच्या सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे अर्ज करून महिला पोलिसाकडे वाईट नजरेने पाहून, अश्लील बोलून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार दिली होती. तसेच शिवाजीनगर मुख्यालयात वाहतूक कवायत आणि वाहतूक नियमनाबाबतचे महत्त्वाचे प्रशिक्षण आयोजित केले होते.
यासाठी चिंचवड विभागाने नागरगोजे यांची निवड केली होती. मात्र, ते प्रशिक्षणास उपस्थित झाले नाहीत. या प्रकरणाची प्राथमिक आणि विभागीय चौकशी करण्यात आली. प्रशिक्षणास उपस्थित नसल्याबद्दल नागरगोजे यांना वरिष्ठांनी विचारणा केली असता त्यांनी बेजाबदार आणि बेशिस्त उत्तरे दिली. हा प्रकार पोलीस खात्याच्या शिस्तीत बसत नाही, असा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगावचा रस्त्याचा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कागदावर राहिले होते. परंतु, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्ली दरबारी जाऊन उड्डाणपुलाला लष्कराची जागा मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. लष्कराने उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. त्याबाबत संरक्षण मंत्रालयाने आमदार जगताप यांना पत्राद्वारे कळविले आहे.
बापखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी “सीएमई’च्या हद्दीतील रस्त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे बोपखेलमधील ग्रामस्थांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाणे सोईचे ठरत होते. मात्र, उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्कराने 2015 मध्ये सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. हा रस्ता पूर्ववत सुरू करावा, यासाठी बोपखेलकरांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली. त्याला लष्कराने कोणतीही दाद न देता सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता कायमचाच बंद करून टाकला. तसेच बोपखेलवासीयांची गैरसोय दूर करण्यासाठी मुळा नदीवर बोपखेल ते खडकीला जोडणारा तात्पुरता तरंगता पूल सुरू केला. मात्र, हा तात्पुरता तरंगता पूल तात्पुरताच ठरला. त्यामुळे बोपखेलवासीयांना सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटरचा वेढा पडत आहे. बोपखेलमधून पुढे खडकीत 512 येथे निघणारा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळा नदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात खर्चाची तरतूदही करण्यात आली. मात्र खडकीच्या दारूगोळा कारखान्याच्या आसपास निघणाऱ्या या रस्त्यासाठी लष्कराचे ना-हरकत प्रमाणपत्र व उड्डाणपुलासाठी जागा मिळत नसल्याने बोपखेल आणि खडकी दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल आजतागायत कागदावरच राहिला आहे.
भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी यांनी उड्डाणपूल व रस्त्यासाठी लष्कराने ना-हरकत प्रमाणपत्र आणि आवश्यक जागा द्यावी, यासाठी अनेकदा दिल्ली दरबारी जाऊन प्रयत्न केले. तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरूण जेटली आणि विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सितारमन तसेच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आहे. लष्कराने बोपखेल आणि खडकी दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला आवश्यक जागा हस्तांतर करण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केल्याचे संरक्षण मंत्रालयाने आमदार जगताप यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्याबाबत संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मनीष ठाकूर यांनी हे पत्र पाठविले आहे. त्यामुळे बोपखेल आणि खडकीला जोडणारा उड्डाणपूल उभारण्याचा लष्कराचा अडथळा लवकरच दूर होणार आहे.
व्हीएस न्यूज - दिल्ली येथील संसद भवन रोडवर ऑल इंडिया टिचर्स फेडरेशन व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी ऑल इंडिया टिचर्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रभाकर आरडे, महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष श्रीराम परबत, सरचिटणीस प्रभाकर बागुल, चिटणीस सुधाकर सावंत आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी केंद्रीय शिक्षकांप्रमाणे राज्यातीत शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी, सेवानिवृत शिक्षकांना केंद्राप्रमाणे पेन्शन मिळावी, केंद्रीय शाळेप्रमाणे राज्यातील शाळांना मोफत शिक्षण देण्यात यावे, सर्वांना पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, आदी विविध मागण्यांसाठी देशभरातील प्राथमिक शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
व्हीएस न्यूज - त्वरित चाचणी करुन रोग निदान करण्याच्या हेतूने ठाणे येथील भारतीय बनावटीचे वैद्यकिय चाचणी उपकरणे निर्मीत करणाऱ्या बायोसेन्स टेक्नोलॉजी कंपनीने विकसीत केलेले मशिन महापालिकेच्या रुग्णालय व दवाखाण्यासाठी खरेदी केल्यास नागरिकांना लॅब मध्ये जाण्याची आवश्यकता लागणार नसून त्यामुळे वेळ व खर्च वाचेल, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले. बुधवार दि. ०८ नोव्हेंबर २०१७ रोजी महापौर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास आरोग्य वैद्याकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी आदी उपस्थित होते. बायोसेन्स टेक्नोलॉजी द्वारे उत्पादीत सर्व वैद्यकीय उपकरणे ही त्वरीत चाचणी करुन रोग निदान करण्याच्या हेतूने विकसीत व निर्माण करण्यात आले असल्याचे यावेळी महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. बायोसेन्स टेक्नोलॉजी ही ठाणे स्थाईक डॉक्टर्स आणि आय.आय.टी इंजिनियर्स द्वारा स्थापित भारतीय बनावटीचे वैद्यकीय चाचणीउपकरणे निर्मीत करणारी कंपनी आहे. या कंपनीचे प्रतिनिधी डॉ. अभिषेक सेन, डॉ.अनुराग श्रीवास्तव, जितेंद्र सोनार यांनी महापौर नितीन काळजे यांना त्यांचे कार्यालयात सदर मशिनद्वारे करण्यात येणा-या विविध चाचण्यांचे (तपासणी) प्रात्यक्षिक दाखविले. या कंपनी द्वारा विकसीत केलेल्या Remote Dignostic Kit च्या सहाय्याने विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या, जसे हिमोग्लोबीन चाचणी ( शरिराला इजा न करता) युरीन (रुटीन), मलेरीया,डेंग्यू, चिकन गुनिया, युरीनरी प्रेग्नंसी, रक्त शर्करा, रक्त दाब, ऑक्सीजन संपृक्तता इत्यादी चाचण्या केल्या जातात.
व्हीएस न्यूज - शिक्षणामुळेच बहुजनांची प्रगती होईल व समाजात त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रतिष्ठा मिळेल. यासाठी तरुणांना उच्च शिक्षण व वैद्यकीय, अभियांत्रिकीचे व्यवसायिक शिक्षण मिळाले पाहिजे. म्हणून सरकारने देखिल अनुकूल धोरण राबविले पाहिजे या उद्देशाने स्व. मुख्यंमत्री वसंतदादा पाटील यांनी प्रशासन राबविले. वसंतदादा पाटील हे उत्तम प्रशासक आणि उत्तम संघटक असणारे बहुजन समाजातील व्यक्तीमत्व होते. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सहकार भूषण ही पदवी देण्यात आली होती. देशात महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात कायम प्रगतीपथावर असावे यासाठी त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतले. या शब्दात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी स्व. वसंतदादा पाटील यांना अभिवादन केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त सांगवीतील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख,एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी माजी अध्यक्षा शामला सोनवणे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुदाम ढोरे,विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, मकर यादव, अनिरुध्द कांबळे, शेषराव कसबे, भाऊसाहेब मुगूटमल, विश्वनाथ खंडागळे, किसन भालेकर, सनी कसबे, संदेश नवले, अजय खराडे आदी यावेळी उपस्थित होते.
पिंपरी – डॉ. यंग..
आहारकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव यामुळे हाडांच्या आचाराचे प्रमाण जास्त - डॉ. यंग गर्ल-ही
व्हीएस न्यूज - सकस आहाराकडे दुर्लक्ष, अन्न धान्यातून वाढत्या प्रमाणात शरीरात जाणारे हानीकारक रसायने आणि व्यायामाच्या अभाव, विकसित तंत्रज्ञानामुळे एकाच जागी जास्त वेळ बसून काम करण्याची चुकीची पध्दत यामुळे भारतीय नागरीकांमध्ये हाडांच्या, विशेषता ज्येष्ठ नागरीकांमध्ये साध्यांच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे. यासाठी वयाच्या पंचेचाळीशीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार व व्यायाम करावा आणि नियमित आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे मार्गदर्शन दक्षिण कोरियातील जगप्रसिध्द सांधे शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. यंग गर्ल -ही यांनी केले.
संभाजी चौक निगडी प्राधिकरण येथील पॅन आर्थो हॉस्पिटल मध्ये दि. 2 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत मोफत अस्थिरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर्थोस्कोपी तज्ञ डॉ. उमेश जाधव, सांधेरोपण तज्ञ डॉ. राहूल बोंद्रे, पेड्याट्रिक आर्थो सर्जन डॉ. मंदार आचार्य, हॅण्ड व मायक्रो व्हॅस्कूलस सर्जन डॉ. प्रशांत, पेन मॅनेजमेंट तज्ञ डॉ. विशाल मोहिते आदींसह शिबिरात सहभागी नागरीक उपस्थित होते.
डॉ. यंग गर्ल -ही यांनी अत्यंत अवघड अशी ज्येष्ठ नागरिकाची सांधेरोपण शस्त्रक्रिया केली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे या शस्त्रक्रियेबाबत इतर डॉक्टरांना मार्गदर्शन केले. या शिबीराचा सुमारे 520 रुग्णांनी लाभ घेतला. डॉ. डॉ. यंग गर्ल -ही मार्गदर्शन करताना म्हणाले की, हाडांचे आजार होऊ नये म्हणून प्रत्येक गरोदर महिलेने आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थाचे प्रमाण वाढवावे, बाळाच्या सकस आहारामध्ये दूध, दही, अंडी, पालक, नाचणीचा समावेश करावा. तरुणपणात मैदानी खेळांसह आवश्यक तेवढा व्यायाम करावा. वयाच्या पंचेचाळीशीनंतर सर्वांनी हाडांची ठिसूळता तपासून घ्यावी. विशेषत: महिलांनी ऑस्टिओस्पोरोसिस बाबत माहिती जाणून घेऊन दक्षता घ्यावी. असे मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये खांदा व गुडघ्यांची दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, स्पोर्टस् इंज्युरी, वारंवार निखळणारा खांदा, रोटेटर कफ टेयर, लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन, मनगटाची दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, जन्मजात व्यंग, सेरेब्रल पाल्सी, क्लबफूट, खुबा व गुडघे रोपण शस्त्रक्रिया, स्लिप डिस्क, मानदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, फ्लॅट फूट, आर्थरायटिस आदी आजारांबाबत तपासण्या व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
व्हीएस न्यूज – रहाटणी, शास्त्रीनगर, नखातेवस्ती परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असून महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याविरोधात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महिला वर्गाकडून बांगड्यांचा हार घालण्याचा इशारा शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या वतीने शहर प्रमुख युवराज दाखले यांनी दिला आहे.
त्यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेतील अधिकारी मुजोर झाले आहेत. गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याऐवजी राजकीय नेत्यांची व ठेकेदारांची चमचेगिरी करण्याची सवय त्यांना लागली आहे. शास्त्रीनगर, नखाते वस्ती, रहाटणी परिसरातील महिला दूषित पाण्यामुळे त्रस्त आहे. त्यातच काही भागात विस्कळीत स्वरुपाचा अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करुनही जाणून-बुजून कानाडोळा केला जात आहे. निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना सामान्यांच्या प्रश्नांचे काहीही देणे घेणे नाही. पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक 4 (ब) मधील भाजपाचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य लक्ष्मण धोंडू उंडे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत माहिती दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची तक्रार वसंत नाथा रेंगडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार देवून नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण धोंडू उंडे यांनी निवडणूक लढविली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार म्हणून वसंत नाथा रेंगडे यांनी रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत लक्ष्मण धोंडू उंडे यांनी नगरसेवक पदावर विजय संपादन केला आहे.
लक्ष्मण उंडे यांनी नं.84/2 ब शिवगणेश कॉलनी रोड नं-1 साई पार्क दिघी या पत्त्यावर अनधिकृत बांधकाम केलेले असून त्या घरात वास्तव्य करीत आहेत. परंतु, त्यांनी निवडणूक आयोगाच्या शपथ पत्रात पत्ता बदलून तो प्लॉट नं-31जयगणेश अपार्टंमेंट सर्व्हे क्रमांक 84 साई पार्क असा दिलेला आहे. त्यामुळे वरील अनधिकृत बांधकाम हे त्यांनी स्वतः बांधलेले असताना त्यांनी माहिती दडवित निवडणूक आयोगाची फसवणूक करुन खोटी माहिती सादर केलेली आहे. हे अनधिकृत बांधकाम उमेदवारीसाठी बाधक ठरणार असल्याने सदरील मिळकत त्यांनी मुलगा दीपक लक्ष्मण उंडे यांच्या नावावर हस्तांतर केला. मात्र, शपथ पत्रात त्यांनी मुलगा कमविता नसून तो माझ्यावर अवलंबून असल्याचे सांगून शपथपत्रात अवलंबित-2 च्या रकान्यात दीपक उंडेच्या नावावर मिळकतीचा उल्लेख केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अनधिकृत बांधकामामुळे नगरसेवक पद्द करणार असल्याचे नमूद केल्याने नगरसेवक उंडे यांनी कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी पळवाट शोधली आहे. या अनधिकृत बांधकामाला सर्वस्वी नगरसेवक उंडे स्वतः जबाबदार आहेत. निवडणूक काळात त्यांनी निवडणूक आयोगासह महापालिका व जनतेची फसवणूक केली आहे. तसेच त्यांनी जोडलेल्या शपथपत्रातही बांधकामाची टॅक्स पावती, पालिका आरोग्य निरीक्षकांचा सर्च रिपोर्ट, शौचालयाचा दाखला यांचे दस्ताऐवज पुरावे म्हणून देण्यात आलेले आहेत. दरम्यान, नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे नगरसेवक पद करुन त्यांच्या कारवाई करावी, अशी मागणी वसंत नाथा रेंगडे यांनी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, महानगरपालिका आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. याबाबत नगरसेवक लक्ष्मण उंडे यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002