व्हीएस न्यूज – महापालिकेच्या वतीने रविवार 26 नोव्हेंबर रोजी माजी महापौर कै. सादबा उर्फ आप्पासाहेब काटे महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चऱ्होली गाव, मोशी फाटा देहू - आळंदी रोड डुडुळगाव मार्गे चिखली - कुदळवाडी स्पाईन रोड, वैष्णव माता चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर अशी ही स्पर्धा होईल.
पुरूष गटातील 21 किमीमध्ये चऱ्होली गाव ते संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर येथे तर महिला गट 10 किलोमीटरमधील चऱ्होली गाव ते संत प्रियदर्शनी स्कूल मोशी चिखली रोडपर्यंत स्पर्धा आहे. 18 वर्षे मुले शालेय गट सहा किमीमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलापर्यंत आहे. 16 वर्षे मुले व मुली शालेय गट चार किलोमीटर मधील व 18 वर्षे मुली शालेय गट सहा किलोमीटर मधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे आहे. तसेच 14 वर्षे मुले व मुली शालेय गटातील 3 किमी ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे आहे.
व्हीएस न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) इमारतीवर आता बहुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. याकरिता 50 कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाचा विषयासह नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरीडॉरमध्ये सुदर्शननगर चौकात ग्रेडसेपरेटर बांधण्यास 20 कोटी, तळवडे जकात नाका ते देहूगाव रस्ता विकसित करण्यास 30 कोटी असे एकूण 100 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी हे प्रस्ताव तातडीची बाब म्हणून महासभेत दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पाच कोटी रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. परंतु, वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवजात अर्भक विभागाचे नुतनीकरण, डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नुतनीकरण अशी आवश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी सन 2016-17 च्या अर्थसंकल्पात पाच कोटी रूपयांची तरतूद करुन त्यास 20 जून 2017 रोजीच्या महासभेत या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
वायसीएम रुग्णालयासाठी राज्य सरकारने वाढीव 0.50 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या आर्किटेक्ट शशी प्रभू ऍण्ड असोसिएशन यांना सुधारीत नकाशे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रुग्णालय आवारात बहुमजली वाहनतळ, कॅन्टीन, नाईट शेल्टर, इतर आवश्यक कामांसह शस्त्रक्रिया संकुलाच्या एकत्रित आराखड्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 50 कोटी रुपये सुधारीत अर्थसंकल्पीय रकमेची आवश्यकता आहे. यासह नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरीडॉरअंतर्गत सुदर्शननगर चौकात सद्यस्थितीत सिग्नल व्यवस्था आहे. प्रवासी वाहतूक वेळेत बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत व्हावी, याकरिता चौक सिग्नल मुक्त करण्याकरिता ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे.
या कामासाठी पालिकेच्या सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाखाली समाविष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी 20 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. तसेच तळवडे जकात नाका ते देहूगाव कमानीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच भूसंपादन होणार आहे. जागेचे संपादन झाल्यानंतर रस्ता विकसित करण्यास यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी हे कामही पालिकेच्या सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाखाली समाविष्ट केले आहे. या कामासाठी 30 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे 100 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता द्यावी, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - पुणे महापालिकेत पदोन्नती मिळालेल्या 11 कनिष्ठ अभियंत्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची वारजे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून चौकशी सुरु आहे. या कार्यकर्त्याने पैशांची मागणी करुन ब्लॅकमेल केल्याचा आरोप या अभियंत्यांनी केला असून यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पैसे न दिल्यास नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचाही आरोप या अभियंत्यांनी केला आहे. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते ( वय 31, रा. भवानी पेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रमेश विष्णु खामकर ( वय 61) यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात गिते यांच्यासह नऊ कनिष्ठ अभियंत्यांनी वारजे पोलिस ठाण्यात 16 नोव्हेंबर रोजी प्रथम एक तक्रार अर्ज दाखल केला होता. यामध्ये शासनाने 12 डिसेंबर 2005 मध्ये काढलेल्या परिपत्रकानूसार महापालिकेतील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत) या पदावरील महाराष्ट्राबाहेरील पदवी/ पदवीका प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदवी/पदवीकांस एआयसीटीई किंवा यूजीसीची मान्यता प्राप्त असल्याने पदोन्नती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी शैक्षणीक अर्हतेबाबत दाखल केलेली कागदपत्रे योग्य असल्याचा अहवाल संबंधीत विद्यापीठांनी महापालिकेला दिला आहे.
मात्र विष्णू खामकर यांनी यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवली असून ती प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे बोगस असल्याचे सांगून त्यांना धमकी देत आहे. या अभियंत्यांना पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास नोकरी घालवितो अशा आशयाची धमकीही देत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेत नव्याने तसेच यापूर्वी नियुक्त असणाऱ्या लेखनिक व अभियांत्रिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या शैक्षणीक अर्हतेबाबत खामकर यांनी आजवर कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र संवर्ग 3 मधील एक व 4 मधील 10 अशा 11 कर्मचाऱ्यांना खामकर सातत्याने ब्लॅकमेल करीत असल्याचे या अभियंत्यांचे म्हणणे आहे. खामकर हे महापालिकेतील निवृत्त सेवक असून त्यांना महापालिकेच्या कामकाजाची पुर्ण माहिती असल्याने ते माहिती अधिकार कायद्यानुसार विविध खात्यांमध्ये अर्ज करुन महापालिकेतील अधिकारी व अभियंता संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्रास देऊन प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत असल्याचाही तक्रार अर्जात उल्लेख आहे.दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते खामकर यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलिसांना तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या तक्रार अर्जाची सध्या चौकशी करण्यात येत आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
व्हीएस न्यूज – वृक्ष तोडीतील गैरव्यवहार थांबविण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज, कार्यप्रणाली सदस्यांचे अधिकार यामध्ये सुस्पष्टता येण्यासाठी लवकरच महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे स्वतंत्र धोरण अंमलात येणार आहे. याबाबतचा सोमवारी वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीच्या सदस्य शिल्पा भोसले यांनी याबाबत माहिती दिली.
सध्या शहरात विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. बांधकामांना अडसर ठरत असलेली वृक्ष रात्रीच्या वेळी उन्मळून पडण्याचेही प्रमाण वाढत आहे. वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याआधीच तोडल्याचा प्रकारही उघडकीला आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर शहरात कोणत्याही प्रकारचे वृक्ष तोडण्याला बंदी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, मात्र असे असतानाही शहरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वृक्ष प्राधिकरण समितीची महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये यामध्ये वृक्ष प्राधिकरणाचे सर्वसमावेशक स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभाग यांचे कामकाज, अंदाजपत्रक, कार्यप्रणाली पूर्णपणे वेगळी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या निर्णयामुळे उद्यान विभागाचा हस्तक्षेप वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजात होणार नाही. वृक्ष प्राधिकरणाच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यासाठी सहा डिसेंबर रोजी खास बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही भोसले यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे स्पेन दौऱ्यावर, आयुक्त श्रावण हर्डीकर स्वीडन दौऱ्यावर गेले असतानाच आता पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण हेही परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दोघांचा फिलिपाईन्स दौरा खासगी संस्थेने स्पॉन्सर केल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. मात्र, करदात्या नागरिकांच्या खर्चाने पालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या परदेश दौऱ्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांच्या दौऱ्यासाठी करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. महिला व बालकल्याण समितीचे सदस्य सिंगापूर दौरा करुन आले. पाठोपाठ बीआरटी विषयक माहिती जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक अधिकारी अहमदाबादला जाऊन आले.
महापौर नितीन काळजे सोमवारी (दि.13) युरोपमधील स्पेनच्या दौऱ्यावर गेले आहेत. बार्सिलोना शहरात आयोजित “स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस 2017′ या परिषदेत ते सहभागी झाले आहेत. 21 नोव्हेंबर रोजी ते दौऱ्यावरुन परतणार आहेत. महापौर शहरात येतील तोपर्यंत श्रावण हर्डीकर शनिवारी स्वीडनकडे रवाना झाले आहेत ते पुढील शनिवारी (दि. 25) शहरात परतणार आहेत. पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण हेही परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. फिलिपिन्स येथे विकास परिषदेच्या वार्षिक सभेत सहभागी होण्यासाठी पोमण आणि लांडे रवाना झाले आहेत. ते पाच दिवसांनी दौऱ्यावरुन परतणार आहेत. या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. या दौऱ्याचा खर्च एका खासगी संस्थेने केला आहे. त्यामुळे दौऱ्याचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसुल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पाडुरंग परचंडराव यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज – घरे नियमितीकरणासाठी नवनगर विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी, शर्तीं आणि खर्च नागरिकांना परवडणारा नाही. त्यामुळे रिंगरोडबाधित व प्राधिकरणातील करांचा प्रश्न जैसे थे राहणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या अटी-शर्तीं विरोधात लढा उभारण्याचा इशारा रिंगरोड बाधितांच्या स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने दिला आहे.
शासनाच्या निर्णयात व प्राधिकरणाच्या धोरणात आर्थिक दुर्बल घटकांचा विचार केलेला नाही. अर्धा, एक गुंठ्यासाठी अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी चारपट दंडासह उपकर, विकासशुल्क, सुरक्षा ठेव, बांधकाम स्क्रुटिनी,पसेज, आर्किटेक्चर खर्च, मोजणी शुल्क अशा प्रकारचे दंड भरावे लागणार आहेत. त्याचा खर्च लाखो रुपयांमध्ये जाणार असून ते सर्वसामान्य कुटुंबांना मुळीच परवडणारे नाहीत. संपूर्ण शास्तिकर भरल्याशिवाय बाधितांना नियमितीकरनाचा अर्जही करता येणार नाही. त्यामुळे शास्तीकराच्या विरोधात ज्यांनी सत्तेत येण्यासाठी रान पेटवले, तेच बाधितांच्या गळ्यातील शास्तीचा फास आवळत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.
रिंगरोड बाधितांच्या घरासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. न्याय मिळणार नसेल, तर आणखी लढा तिव्र केला जाईल. पुढील चार दिवसांत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला समन्वयक राजश्री शिरवळकर, प्रतिभा कांबळे, नयना नारखेडे, भाग्यश्री सावंत, अर्चना मेंगडे, सुनिता फुले, सुरेखा बहिरट, मनीषा घाडगे, चंद्रकला नवाडे, ज्योती वायकर, विद्या पाटील, संगीता सोनावणे, धनाजी येळकर,मनोहर अण्णा पवार, विशाल पवार, प्रशांत सपकाळ, राजेंद्र देवकर, अमोल पाटील, शिवाजी पाटील, अतुल वर्पे, दत्ता चिंचवडे, देवेंद्र भदाणे, मनोज पाटील, सुदर्शन भराटे, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, गणेश सरकटे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – प्रवासादरम्यान महिलेकडील अडीच लाखाचे दागिने ठेवलेली पिशवी चार महिला चोरट्यांनी लांबविली. ही घटना मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावर वाकड ते लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज दरम्यान घडली.
शोभा उत्तम आढाव (वय 53, रा. सेंट्रल रेल्वे कॉलनी, सायन, मुंबई) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शोभा आढाव या शनिवारी पतीसमवेत द्रूतगती मार्गाने वाकडहून मुंबईकडे खासगी वाहनातून जात होत्या. त्याच गाडीमध्ये असलेल्या 20 ते 40 वयोगटातील महिलांनी हातचलाखी करत आढाव यांची पिशवी लंपास केली. त्यामध्ये सोन्याच्या तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या चेन, दोन पेंडल, दीड तोळे वजनाची साखळी, ब्रेसलेट, आठ सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याची व दोन मोत्याच्या नथ असा सुमारे 2 लाख 59 हजारांचा ऐवज चोरून नेला. लोणावळा ग्रामीणच्या सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान निगडी प्राधिकरणात घडली.
सुजित सुभाष डागा (वय 23, रा. डागा रेसिडेन्सी, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता डागा हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. सायंकाळी साडेपाच वाजता ते घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातील अडीच लाखाची रोकड आणि 10 तोळे सोन्याचे दागिने असा 6 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत ऐन थंडीत पावसाची रिमझिम पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळाली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने थंडीत पावसाळी वातावरण तयार झाले.
मागील दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होते. याचीच प्रचिती पावसाच्या स्वरूपात वरूण राजाने लावलेल्या हजेरीने दिसून आली. त्यामुळे वातावरणातही चांगलाच बदल झाला. पिंपरी,चिंचवड, आकुर्डी, रावेत, निगडी, प्राधिकरण भागासह पुणे आणि मावळमधील काही भागात सोमवारी दुपारनंतर पावसाने अचानक हजेरी लावली. भर हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये पावसाचीच चर्चा रंगली. अचानक आलेल्या पावसाने वाहतुकीचा थोडा खोळंबा झाला. ऐन हिवाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य होत आहे.
सलग तीन ते चार तास पावसाची रिमझिम सुरू होती. सायंकाळी कार्यालयीन कामकाज सुटण्याच्यावेळी देखील पाऊस सुरू राहिल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे तापमानातही चांगलाच मोठा बदल दिसून आला. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस पहायला मिळाले. तीन आठवड्यानंतर तापमानाने दोन दिवसात उच्चांक गाठला.
हवामान खात्याने देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली होती ती खरी ठरली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या रविवार (दि. 26) पर्यंत हवामान ढगाळ राहण्याचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज – देशात 500 व 1000 रुपये चलनात बंद केल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने ठिकठिकाणी मृत्युमुखी झालेल्या नागरिकांना देहूरोड येथे रविवारी (दि. 19) सायंकाळी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
देहूरोड मेन बाजार पेठेतील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात रविवारी सायंकाळी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने नोटबंदी काळात मृत झालेल्या नागरीकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे, मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, ऍड. बालाजी गायकवाड, वैशाली अवघडे, अवघडे, विजय मोरे, पंकज तंतरपाळे, किरण कांबळे, मेजराज तंतरपाळे, रमेश पवार, मेनु शेख, पत्रकार उमेश ओव्हाळ, रामकुमार आगरवाल, देवराम भेगडे, संजय धुतडमल आदी यावेळी उपस्थित होते.
देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनात सुरू असलेले 500 व 1000 रुपयाच्या नोटा सरकारने बंद केले. जुन्या बंद केलेल्या नोटा बॅंकेत जमा करण्यास 30 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत नागरिकांना देण्यात आली. तारांबळ उडालेल्या गरीब नागरीकांनी 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान बॅंकेत रक्कम भरणा करताना, काढताना लावलेल्या रांगेत, पैशांच्या अभावामुळे, भुकेमुळे, दवाखान्यात, रुग्णालयाच्या उपचारापोटी, ताण-तणाव अशा वेगवेगळ्या कारणाने देशभरात ठिक-ठिकाणी सुमारे 125 हून अधिक नागरीक मृत्युमुखी पडले. या नागरिकांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उपस्थितांनी मेणबत्ती पेटवून मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
व्हीएस न्यूज - महाकाली टोळीतील एका सराईत गुन्हेगारास सोमवारी पाच पिस्टल व 15 जिवंत काडतुसासह हिंजवडी पोलिसांनी अटक केली. सागर कुमार इंद्रा (वय 23 रा. थेरगाव), असे अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला हिंजवडी येथील स्पाईन रोडवरून अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जबरी चोरीचा तपास करत असताना पोलीस कर्मचारी विवेक गायकवाड यांना खब-याद्वारे खबर मिळाली की, सागर हा शस्त्रासह स्पाईन रोडवरील आशिर्वाद हॉटेल समोर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आज दुपारी चार वाजता सागरला ताब्यात घेतले.
यावेळी त्याच्या ताब्यातील कार (एमएच 04 ई.टी.1002) मधून त्याने चार पिस्टल व 13 काडतुसे विक्रीसाठी आणली होती. तसेच त्याच्या कंबरेला एक पिस्टल त्यात दोन जिवंत काडतुसे असे पाच गावठी पिस्टल व 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच त्याच्या ताब्यातील पोलो कार, असा एकूण 6 लाख 26 हजार 550 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
सागर याच्यावर फरसखाना, हिंजवडी, देहूरोड, चिंचवड, निगडी या पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच तो महाकाली टोळीचा सक्रीय सदस्य आहे. महाकाली टोळी ही निगडी, आकुर्डी, रावेत, देहूरोड या परिसरात दरोडा, खून चोरी, दहशत पसरविण्याचे काम करते. सागर हा याच टोळीचा सक्रीय सदस्य आहे. त्यामुळे पोलीसही खूप दिवसांपासून सागर याच्या मागावरच होते.
ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे गणेश धामणे, कर्मचारी विवेक गायकवाड, किरण लांडगे, आनंद खोमणे, संदीप होळकर, अशिष बेटके, अतिक शेख, ज्ञानेश्वर मुळे व आण्णा गायकवाड यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज – शहरातील आकुर्डी परिसरात दहशत माजविणाऱ्या रावण सेना टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव (वय 22, रा. रावेत) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. शितळादेवी मंदिर परिसरात सोमवारीमध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
मागील काही दिवसांपासून आकुर्डी परिसरात रावण सेनेची दहशत आहे. अनिकेत हा त्या टोळीचा म्होरक्या होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वी महाकाली टोळीचा म्होरक्या हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात तो फरार होता. दरम्यान, टोळी वर्चस्वातून अनिकेतचा खून झाल्याचा प्राथमिकअंदाज पोलिसांनी वर्तविला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002