व्हीएस न्यूज - स्वावलंबन ही आत्मनिर्भरतेची पहिली पायरी आहे. आत्मनिर्भर झालो तरच ठरवलेले कोणतेही ध्येय सहज गाठता येते. मुलांनी आपली स्वतःची दिशा ओळखून मार्गक्रमण करावे. आपल्याला स्वतःला कळले पाहिजे की आपण कोठे आहोत. आपल्याला नेमके काय करायचे हे ज्याला कळतं तोच पुढे जाऊ शकतो.मोठे व्हायचे असेल तर पुस्तके वाचलीच पाहिजेत. निरनिराळ्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी निश्चित त्याचा फायदा होईल. माणूस किती मोठा झाला यापेक्षा तो कसा मोठा झाला हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते.असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे यांनी सांगवी येथे व्यक्त केले.
दिशा सोशल फाऊंडेशन आयोजित नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सांगवी येथे ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत ‘चला आत्मनिर्भर होऊ या’ ह्या विषयावर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तानाजी मोरे होते. याप्रसंगी विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, उपप्राचार्य सुरेंद्रनाथ वरुडे, मुख्याध्यापिका प्रमिला बर्गे, पर्यवेक्षक चंद्रकांत शिंदे,प्रा. नितीन कदम,नवनाथ करंजुले, शरद ढोरे,प्रदीप पाटील, क्षितीज कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संतोष ढोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
त्या पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावण्यासाठी शिक्षक आणि आई वडिलांनी तसे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. शिक्षकासारखा भाग्यवानया पृथ्वीतलावर नाही. फक्त त्याचे कामावर, आपल्या विद्यार्थ्यांवर व आपण शिकवत असलेल्या विषयावर प्रेम आणि निष्ठा असली पाहिजे. चांगला माणूस, चांगले व्यक्तिमत्व घडविणे हे सर्वस्वी शिक्षकांच्या हातात असते. विद्यार्थी शिक्षकांचे मापन करत असतात. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी फार महत्वाची आहे. सौंदर्यापेक्षा आत्मविश्वास महत्वाचा आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर माणूस कोणतेही आव्हान सहज पेलू शकतो.याकरिता शिकण्या-शिकविण्यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी हयगय करून चालणार नाही. कृतज्ञ असणे ही मानवी मूल्यांमध्ये असणारी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. खूप वाचा, मोठे व्हा, लिहा, मोठ्यांचा आदर करा, मान राखायला शिका.जे शिकाल ते उत्तमच शिका, जे कराल ते उत्तमच करा असे सांगत त्यांनी त्यांच्या जीवनप्रवासातील अनेक प्रसंग मांडत सर्वांनाच अंतर्मुख केले.विद्यार्थ्यांनी साहित्य वाचले पाहिजे, आपले अनुभव, प्रसंग लिहिले पाहिजेत विविध उदाहरणे देत दोन तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या साहित्यविषयक अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संतोष ढोरे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, विद्यापीठाच्या एकूण प्रक्रियेत विद्यार्थी हाच सर्वोच्च स्थानी असला पाहिजे असा माझा नेहमी आग्रह राहिला आहे. यापुढेही तो राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मी सातत्याने उपलब्ध आहे. आपण शालेय पातळीवर शिक्षण घेताना आपले उद्दिष्ट निश्चित केले आणि त्या दिशेने वाटचाल केली तर तुम्हाला ध्येय गाठणे सहज शक्य होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले. प्रास्ताविकात नाना शिवले यांनी साहित्यिक आपल्या भेटीला कार्यक्रमातून साहित्य वाचन व लेखनाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढावी या उद्देशाने ह्या उपक्रमाची मालिका शाळा महाविद्यालयात सतत सुरू सतत सुरू राहील असे सांगितले. पाहुण्यांचा परिचय गजानन वाव्हळ यांनी करून दिला. आभार उपप्राचार्य सुरेंद्रनाथ वरुडे यांनी मानले. अतुल शिंदे, राजेश सावंत, अविनाश ववले, राजेंद्र करपे, संतोष निंबाळकर, बाजीराव लोखंडे, गुरूदास भोंडवे, संतोष बाबर,नंदकुमार कांबळे, किशोर जवळकर, यांनी विशेष सहकार्य केले.
व्हीएस न्यूज - भोसरी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्पोरेट इमारतीत लागलेल्या आगीतून अडकलेले १३ कर्मचारी बचावले, त्यात ८ महिलांचा समावेश होता. अग्निशमन दलाच्या जांबाज जवानांच्या धाडसामुळे या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपअग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे आणि प्रताप चव्हाण यांच्यासह ८ जवानांच्या टीमने ही कामगिरी केली.
भोसरी येथील डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेज शेजारी के.पी.ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची चार मजली कार्पोरेट इमारत आहे. येथे ३२ कर्मचारी कामाला होते. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ए.सी.मधे बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. जिन्यातच आग लागल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर काम करत असलेले १३ कर्मचारी अडकले होते. हळूहळू आग पसरत होती. धुरांचे लोट देखील वाढत होते. अडकलेले कर्मचारी गुदमरून जाण्याच्या भिती निर्माण झाली होती. दरम्यान आग लागल्याचे समजताच तात्काळ पिंपरी आणि भोसरी येथील अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. उपअग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे आणि प्रताप चव्हाण यांच्यासह ८ जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करत आग आटोक्यात आणली. जवानांनी दाखविलेल्या या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत कंपनीतील कागदपत्रे जळून खाक झाली असून एका चार चाकी वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहाणी झालेली नाही.
व्हीएस न्यूज - पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीवर वडीलांनीच अत्याचार केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. या घटनेचा मुलीच्या आईला धक्का बसल्याने काल तिने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीनुसार पतीला अटक करण्यात आली आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालक आहे. त्याने दारूच्या नशेत ८ दिवसांपूर्वी बायको अंघोळीला गेलेली असताना आपल्या अडीच वर्षाच्या मुलीवर राहत्या घरात अत्याचार केला. आई अंघोळीवरून आली असता तिने स्वतः डोळ्याने हा प्रकार बघितला व आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला ही मारहाण केली. मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर तिने सांगवी पोलिसांत काल तक्रार दाखल केली. पोलिसांनी २५ वर्षीय बापाला अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी आपले विचार मांडले. आयुष्यभर विद्यार्थ्याच्या भूमिकेत वावरत ज्यांनी जातीव्यावस्थेचे जोखड झुगारून लोकशाहीची बूज राखले अशा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६१ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करतांना समतेचा लढा तीव्र करण्याचा निर्धार यावेळी अमित बच्छाव यांनी केला अमित बच्छाव यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या या अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी गणेश सर्वगोड, रवी राठोड, जगदिश पाटील, आकाश शिंदे सतीश कदम, राजू वऱ्हाडी, सुनिल सोनवणे, सोमनाथ बोलके, शशिकांत जाधव, हर्षद पाटील, अक्षय हांडे, अमोल लांडगे, अाकाश शिंदे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक बदल होणार असून शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची नियुक्ती निश्चित झाल्याचे समजते. लवकरच बाबर यांची वर्णी लागणार असून नियुक्तीची घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत युतीच्या आशेवर असलेल्या शिवसेनेला युती तुटल्याने स्वतंत्ररित्या निवडणुकीत सामना करावा लागला. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घातलेले लक्ष, राष्ट्रवादीतील दिगगजांचा ऐंन मोक्याच्या वेळी भाजपात झालेला प्रवेश, सेनेतील गटातटाचे राजकारण, तिकीट वाटपात झालेल्या काही चुका त्यामुळे शिवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. १२८ पैकी ७७ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता काबिज केली. तर सेनेला अवघ्या ९ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून अनेक मुद्द्यांवरून सेना विरोधकाची भूमिका बजावताना देखील दिसत आहे. दरम्यान, स्थानिक राजकारण, आणि आगामी विधानसभेच्या तयारीसाठी शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी आपल्याला पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची केलेली विनंती वरिष्ठांना केली आहे. राज्यात सेनेचे भाजपशी ताणले गेलेले संबंध पाहता आगामी लोकसभा, विधानसभेला स्वतंत्ररित्या सामोरे जावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन सेनेची तयारी सुरु आहे. त्यानुसार पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडे संपर्कनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतर सेनेत संघटनात्मक बदल होण्यास सुरूवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा मातोश्रीवर बैठक घेऊन याबाबत मते जाणून घेतली होती.
सप्टेंबरमध्ये मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शहरप्रमुखपदासाठी सुलभा उबाळे यांच्या नावाची शिफारस केली होती. चिंचवडला बारणे यांच्या रूपाने खासदार, पिंपरीत चाबुकस्वार यांच्या रूपाने आमदार अशी ताकद सेनेची आहे. भोसरीत शहरप्रमुखपद दिले तर समतोल साधला जाईल, पक्षातील आक्रमक चेहरा असलेल्या सुलभा उबाळे यांना शहरप्रमुखपदी संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र मावळचे खासदार श्रीरंग बारणे व पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शहरप्रमुख पदासाठी पिंपरी मतदार संघाचे माजी प्रमुख योगेश बाबर यांच्या नावाचा आग्रह धरल्यामुळे बाबर यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांनी पसंती दिली असल्याचे समजते.
योगेश बाबर हे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे पुतणे आहेत. लोकसभेला मावळातून तिकीट नाकारले गेले तेव्हा गजानन बाबर यांनी शिवबंधन तोडले व शेकापच्या लक्ष्मण जगताप यांची पाठराखण केली होती. मात्र योगेश बाबर शिवसेनेतच राहिले महापालिका निवडणुकीत त्यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने बाबर यांनी मोरवाडी शाहूनगर मधून बंडखोरी केली व लक्षणीय मतेही मिळवली होती. दरम्यान ते भाजपच्याही संपर्कात होते मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून वजनदार पदाचा शब्द न मिळाल्याने अन् खासदार बारणे यांनी शहरप्रमुख पदासाठी शब्द दिल्याने ते सेनेतच राहिले आहेत.
व्हीएस न्यूज - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छ सर्वेक्षण ४ जानेवारी २०१८ पासून सुरु होणार असून शहर स्वछतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच, या अभियानामध्ये पिंपरी चिंचवड शहराला अव्वलस्थानी आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने महापालिकेतील आरोग्य, स्थापत्य, पाणीपुरवठा व जल:निसारण व उद्यान विभागासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक डॉ. उदय टेकाळे, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, सिताराम बहुरे, प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट, आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक व अभियंते आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशभरातून सुमारे ४ हजार ४१ शहरांचा सहभाग असणार आहे. सुमारे ४ हजार गुणांक या स्पर्धेत देण्यात येणार असून ३ टप्यामध्ये हे गुणांक होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत. डॉ. उदय टेकाळे यांनी यावेळी व्यक्त केले. सर्वेक्षण अंतर्गत संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट, स्वच्छता व हागणदारीमुक्तता, माहिती, शिक्षण व वर्तणूक बदल, कम्युनिकेशन (IEC), क्षमता बांधणी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उत्कृष्ठ कार्य या उपक्रमांना महत्व देण्यात येणार असून शहरमध्ये थेट निरीक्षण नागरिक अभिप्राय माध्यमातून शहरी स्थानिक संस्था आवश्यक माहिती गोळा केली जाणार आहे, असेही डॉ. उदय टेकाळे यांनी सांगितले.
केंद्रशासनाने स्वच्छतेबाबत जाहीर केलेल्या स्वच्छता अॅपचा अधिकाधिक नागरिकांनी डाऊनलोड करून त्याचा उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच स्वच्छतेबाबत येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी कालमर्यादित वेळेत सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. शहरातील शाळा, हॉटेल, मोहल्ला, सोसायट्या व मार्केट यांच्या स्वच्छतेबाबत स्पर्धा घेण्यात यावी व नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. के.पी.एम.जी.चे श्री. रघु गौडाव क्रिसिल चे अंकुर व्दिवेदी यांनी यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ बाबात सदरीकरण करून माहिती दिली. या सर्वेक्षानाअंतर्गत महापालिका सेवास्तरावरील प्रगती करिता एकूण १४०० गुणांक आहे. यामध्ये संकलन व वाहतूक (१४ मापदंड) ४२० गुणांक-३०%, प्रक्रिया विल्हेवाट (८ मापदंड) ४२० यासाठी ३०%, स्वच्छता हागणदारी मुक्तता (११ मापदंड) ३५० गुणांक २५%, माहिती, शिक्षण, संवाद आणि वर्तनातील बदल (९ मापदंड) ७० गुणांक ५%, क्षमता बांधणी (६ मापदंड) ७० गुणांक ५%, नाविन्यक्रम उपक्रम आणि उत्कृष्ठ कार्य ७० गुणांक ५%, तसेच स्वतंत्र प्रामाणिकरणासाठी १२०० गुणांक आहेत. प्रत्यक्ष निरीक्षण (१८ मापदंड) यासाठी १४०० गुणांक आहेत. यामध्ये नागरिकाच्या प्रतिक्रिया (६+३ प्रश्न) नागरिकांच्या प्रतिक्रिया १००० गुणांक ७२ % व स्वच्छता अॅप साठी ४०० गुणांक २८ % इतके असेल.
व्हीएस न्यूज - साने चौक चिखली येथील भारतीय मूलनिवासी संघाच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागासह भारतीय मूलनिवासी संघाच्या वतीने विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महासचिव अशोक मंगल, भारतीय मूलनिवासी संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सरोदय रमेश, उद्योजक बी. बी. वर्मा यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. तसेच पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बाबासाहेबांच्या जीवनाचे आपल्या उदबोधनात सविस्तर माहिती दिली.
यावेळी, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रवक्ता आयुष मंगल, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एस टी कांबळे, मिलिंद बनसोडे, संजय तरकसे, राज तुतारी, रतन बोरोले, सुशील मोरे, सुनील मोरे, सुजाता ठोसर, रोहन ठोसर, भाऊराव राऊत,विद्या राऊत, मायाताई चोपडे, मंजू सुधीर चव्हाण, दर्शनाताई मांडवे, माधुरी ताई गुप्ता, शकुंतला विजय पटेल, मुहम्मद अझार, हनुमान वाघमारे, निर्मला पाटील, बाळकृष्ण गायकवाड, शिला सिंग, हिराचंद गायकवाड, प्रल्हाद पवार, राहुल मधुकर कांबळे आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - 'दुचाकीला कट मारल्याचे सांगून' दोन दुचाकीवरील भामट्यांनी एका तरूणाला एटीएममध्ये जबरदस्तीने नेत 11 हजार 680 रूपये काढण्यास भाग पाडले. रोख रकमेसह मोबाईल असा 29 हजार 680 रूपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. हा प्रकार हिंजवडी येथे 25 नोव्हेंबर रोजी घड़ला.
सिध्दार्थ घोष (वय-27, रा. मुक्ताईनगर, हिंजवडी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोष हे 25 नोव्हेंबर रोजी हिंजवडीतील फेज-2 कडे दुचाकीवरून जात होते. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी घोष यांना कट मारल्याचे सांगून जबरदस्तीने एटीएममध्ये घेवून गेले. 11 हजार 680 रूपये काढण्यास भाग पाडले. तसेच त्यांचा मोबाईलही जबरदस्तीने काढून घेवून 29 हजार 680 रूपयांची लुबाडणूक केली.
हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - येथील बाजारपेठेतील बॅक ऑफ महाराष्ट्राचे एटीेएम मशिन मंगळवारी रात्री फोडण्यात आले. यावेळी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत बॅकेचा सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर लोणावळ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एटीएम मशिनमध्ये किती रोकड होती याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
अभियंत्याची फसवणूक होण्याची दोन दिवसातील दुसरी घटना उघडकीस
व्हीएस न्यूज - एका नामंकित पॉलिसी कंपनीत कामाला लावण्याचे आणि पाच लाख रूपयांची पॉलिसी मॉरगेज कर्ज मंजुर करून देण्याचे अमिष दाखवून तिघांनी एका अभियंता तरुणाची 1 लाख 85 हजार रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी ते 5 ऑक्टोबर या कालावधीत आकुर्डी येथे घडला. दरम्यान, गेल्या दोन दिवसातीस अभियंत्यांना फसवणूक करण्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुलदिप जाधव (वय-28, रा. दत्तवाडी, आकुर्डी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत निगडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांनी माहिती दिली. कुलदिप हा अभियंता आहे. तो गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. दिल्लीतील तीन आरोपींनी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून एका नामांकित पॉलिसी कंपनीत नोकरी लावण्याचे आणि पाच लाख रूपयांचे पॉलीसी मॉरगेज कर्ज मंजुर करून देण्याचे आमिष दाखविले.
या अमिषाला बळी पडून कुलदिपने आरोपींच्या विविध बॅंक खात्यात व पेटीएमव्दारे 1 लाख 85 हजार रूपये भरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दोन भामट्यांनी अभियंता तरूणी रेखा अर्जुन (वय-25, रा. थेरगांव) हिला ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून एक लाख 30 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार थेरगांव येथे मंगळवारीच उघडकीस आला होता.
व्हीएस न्यूज - चिंचवडगावात पीएमपीचे बस स्थानक आहे. एमएच १२ एचबी ४०१ या क्रमाकांची पीएमपीची बस चिंचवड स्थानकात आली होती. स्थानकाबाहेर बस उभी होती. त्यावेळी पावणेदोनच्या सुमारास या बसला अचानक आग लागली. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास चिंचवडगाव येथे घडली.संत तुकारामनगर येथील अग्निशामन दलातील बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली आहे. आग कशामुळे लागली होती याचे नेमके कारण अद्यापर्यंत समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002