व्हीएस न्यूज - केवळ महाराष्ट्राचे वैभव वाढावे म्हणून शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणे बरोबर नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक सरकार उभे करत आहे. यामागे असलेला सरकारचा मानस चुकीचा आहे. ज्या ठिकाणी स्मारक उभे केले जात आहे, त्याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही. इतिहासाची साक्ष देणाऱ्या ठिकाणीच शिवस्मारक व्हावे, असे मत संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले. हिंदवी स्वराज्याचे प्रतिक आणि अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या रायगडावरील ३२ मण सुवर्ण सिंहासनाची लवकरच पुनर्स्थापना करणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. श्री मोरया गोसावी यांच्या ४५६ व्या समाधी महोत्सवानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने संभाजी भिडे गुरुजी यांना श्रीमोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य, खासदार श्रीरंग बारणे, माजी विश्वस्त विघ्नहरी देव, मोरेश्वर शेडगे, ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव,विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे यावेळी उपस्थित होते.
संभाजी भिडे म्हणाले, देशात सध्या अपप्रवृत्ती वाढत आहेत. स्वार्थीपणाची भावना देशासाठी मारक आहे. या सर्वांतून बाहेर पडण्यासाठी शिवनीतीचा वापर करायला हवा. राष्ट्रसंतानी समाजाला जगण्याची दिशा दाखविली आहे. राष्ट्रसंतांच्या जीवनप्रकाशात चालणारा हिंदू समाज निर्माण व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
करवीर पीठाचे शंकराचार्य यावेळी म्हणाले, हिंदूना आपला धर्म टिकवायचा असेल तर धर्मानेच एकत्र रहायला हवे. धर्माने वागलो नाही तर आपलाच नाश होईल. संतपरंपरेत सर्व संतानी धर्म पाळले आहेत. स्वधर्माचे आचरण म्हणजेच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्र येत धर्म वाढविला पाहिजे असेही ते म्हणाले.
व्हीएस न्यूज - पोलिसांच्यावतीने सुरु असलेल्या ‘डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप’ स्पर्धेअंतर्गत उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत लहान गटात भैरवनाथ विद्यामंदिर, नराळे, तळवडे शाळेच्या तर मोठ्या गटात डॉ. डी.वाय. पाटील, एबीएम महविद्यालय संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
पोलिसांच्यावतीने ‘डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप’ ही विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेअंतर्गत मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर प्रत्येक पोलिस ठाण्यातून निवड झालेल्या झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी (देहूरोड) गणपत माडगूळकर हे प्रमुख पाहूणे होते. यावेळी व्यासपिठावर डॉ. डी.वाय. पाटील महविद्यालयाचे प्राचार्य ए.एस. कोंडेकर, पोलिस निरीक्षक अरुण मोरे, सुरेश निंबाळकर, मुगूट पाटील, बी.आर. पाटील, पत्रकार अमोल येलमार उपस्थित होते.
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा सहा जिल्ह्याच्या स्तरावर सुरु आहेत. यामध्ये सुरुवातीला प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळेत या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतून प्रत्येकी एका शाळेची लहान, मोठ्या गटात निवड करुन त्यांची स्पर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर घेण्यात आली. या स्पर्धेत महिला व बालकांवरील अत्याचार, जलदगती न्यायालय, अल्पवयीन गुन्हेगारी, धार्मिक तेढ यासारख्या गंभीर विषयांवर वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये लहान गटात चार शाळांच्या संघांनी तर मोठ्या गटात तीन शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवला.
लहान गटात भैरवनाथ विद्यामंदिर, नराळे, तळवडे शाळेच्या वैभवी साहेबराव मराठे, संस्कृती वसंत पवळे आणि सरोज मारुती पोले या संघाने विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्येचे प्रमाण या विषयावर पहिला क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटात डॉ. डी.वाय. पाटील, एबीएम कनिष्ठ महविद्यालय, आकुर्डीच्या आकाश मनोहर पाटील, सुदर्शन रघुनाथ कारखीले आणि गौरव राजेंद्र काळे या संघाने धार्मिक तेढ या विषयावर प्रथक क्रमांक पटकावला. या स्पर्धेत लहान गटात वैयक्तीक प्रथम क्रमांक वैभवी मराठे तर द्वितीय क्रमांक संस्कृती पवळे हिने पटकावला. मोठ्या गटात वैयक्तीक प्रथम क्रमांक आकाश पाटील तर द्वितीय क्रमांक गौरव काळे याने पटकावला. विजेता संघाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे, या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून बाळासाहेब रासकर, अमोल येलमार आणि अनिल धर्माधिकारी यांनी काम पाहिले. डॉ.डी.वाय. पाटील महाविद्यालयात या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य एम.एस. हिरेमठ, आर.बी. सिद, तसेच कर्मचारी यांनी कष्ट घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. एस.आर. पाटील यांनी तर संयोजन प्रा. सपना ठाकुर यांनी केले.
व्हीएस न्यूज - काँग्रेस पक्षाने गेली ७० वर्ष देशातील सर्वसामान्य दलितांचा वापर फक्त राजकीय सत्तेच्या राजकारणासाठी केला. मात्र दलितद्वेष करणे ही काँग्रेसची मूळ संस्कृती असल्याचा घणाघात राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केला. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर जातीवाचक टीका करताना नरेंद्र मोदी हे ‘नीच आदमी’ व ‘असभ्य’ आहेत, असा उल्लेख केला. या वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या वक्तव्यानंतर राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात तक्रारअर्ज दाखल केला आहे. मणिशंकर आययर यांच्या विरोधात कलम २९८, ४९९, ५००, ५०१, १२० अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक, ‘अ’प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, युवा मोर्चाचे संभाजी फुगे, भाई सोनवणे, विशाल वाळुंजकर, वैजनाथ शिरसाठ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार साबळे म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले विधान हे आक्षेपार्ह आहे. या विधानातील नीच हा शब्द जातीय विद्वेष वाढविणारा आहे. हे विधान पंतप्रधान व देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करणारे आहे.
देशातील दलित, उपेक्षित, वंचीत वर्गाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भूमिका मणिशंकर अय्यर यांच्या विधानातून स्पष्ट होते. नरेंद्र मोदी यांचे देशाच्या विकासासाठी सुरू असलेले कार्य पाहून काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळेच त्यांच्याकडून अशाप्रकारची जातीवाचक व द्वेषपूर्ण विधाने करण्यात येत आहेत. या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यामुळे मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात योग्य ती न्यायालयीन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार साबळे यांनी यावेळी केली.
याबाबत निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी सांगितले की, या तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करणे शक्य आहे का, याबाबत कायदेशीर सल्लागाराबरोबर चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. केवळ तक्रार आली म्हणून गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, त्यासाठी पुराव्याची आवश्यकता असते. कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा याबाबतही कायदेशीर सल्ला घेण्यात येईल असे ही ते म्हणाले.
व्हीएस न्यूज - आयुर्वेदामध्येसुध्दा दातांचे महत्व अधोरोखित केले आहे. जब तक जान है, दात की जरुरत है. दंत वैद्याचे हार्ट म्हणजे हाताची बोटे आहेत. ‘डोन्ट अंडर इस्टिमेट दि पॉवर ऑफ डेन्टिस्ट’ असे सांगत कोणीही दंत वैद्याला कमी लेखू नये. माणसाच्या जीवनात दंत वैद्याचे महत्व खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सेलिब्रेटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर यांनी केले. चिंचवड येथे इंडियन डेन्टल असोशिएशनच्या ५६ व्या राज्य परिषदच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात या परिषदे अंतर्गत दंत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सिने अभिनेता तुषार कपुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर माऊली फरांदे, वायसीएम रुग्णालायाचे दंतविभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, सचिव डॉ. मनिषा गरुड, डॉ. प्रकाश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. मनिष फरांदे, डॉ. श्रीकांत गर्जे, डॉ. संदीप भिरूड, डॉ. निखिल दिवाण, डॉ. जयू तुपे, डॉ. दिपाली पाटेकर, डॉ. दिनेश चव्हाण, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, संघटनेचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संदेश मयेकर यांनी लिहिलेल्या ‘एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी’ या पुस्तकाचे प्रकाशन तुषार कपूरच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. मयेकर म्हणाले की, डॉक्टरांकडे उपचारांसाठी येणारा रुग्ण हा देव आहे. त्याची फसवणूक करू नका. तुम्ही निवडलेल्या व्यवसायावर मनापासून प्रेम करा. त्यातूनच तुम्हाला खरा आनंद, समाधान, यश, पैसा, प्रसिध्दी मिळेल. डॉक्टरांकडे उपचार करून रुग्ण समाधानाने घरी जातो, तो हॅपी मनी आणि रुग्ण असामाधानी झाल्यास तो अन् हॅपी असतो. शुभ्र दंतपंक्ती चेह-याचे सौंदर्य वाढविते. ज्यांना चांगल्या पध्दतीने आपले आयुष्य व्यतीत करायचे आहे. त्यासाठी दातांचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. ज्याचे दात मजबूत, निरोगी त्याचे आयुष्य चांगले. अन्यथा आजच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फुडमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. शरिराची योग्य काळजी घेतानाच दातांची निगा राखणे गरजेचे असल्याचे डॉ. मयेकर यांनी सांगितले.
प्रसिध्द अभिनेता तुषार कपूर म्हणाला, सिनेकलावंतांच्या आयुष्यामध्ये दंतवैद्याचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. कारण आम्हा कलावंतांना शरिराची अधिक काळजी घ्यावी लागते. आपला चेहरा आणि स्मितहास्य चांगले असावे यासाठी दंतपंक्तींवर फार लक्ष द्यावे लागते. ते शक्य होते केवळ दंतवैद्यांमुळेच, दंतवैद्य डॉ. संदेश मयेकर यांनी वेळोवेळी मोलाचा सल्ला मला दिला. त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे, अशा शब्दांत हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते तुषार कपूर याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक यांनी पिंपरी चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या या भव्य राज्य परिषदेचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांचा भरघोस पाठिंबा पाहता दंत वैद्यक शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे संघटनेची चळवळ पुढे जोमाने नेतील असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. अशोक ढोबळे यांनी राज्यस्तरीय दंत परिषद आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. राजेश प्रसाद यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. व्ही. व्ही. एस. वर्गीस, डॉ. निष्ठा कौशिक यांनी तर आभार डॉ. अभिजीत फरांदे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - मोबाईल घेण्यासाठी चौघांनी टपरीवर चहा पित बसलेल्या एका तरूणाचे अपहरण केले. त्याला पिंपरी येथे आणून एका दुकानातून मोबाईल घेवून त्याचे बिल देण्यास सांगून पुन्हा मारहाण केल्याची घटना गुरूवारी पिंपरी येथे घडली.
जयेश संजय आढूळकर (वय-24, रा. मंजुळा पार्क, नव महाराष्ट्र हायस्कूल मागे पिंपरी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक विष्णु कापसे (वय-31, कापसे आळी, पिंपरी), पंकज भानुदास कुदळे (वय-22, रा. शिवम बिल्डिंग, पिंपरी),सुरज दिलीप कापसे (वय-29, रा. सुखवाणी कॉलनी, पिंपरी), सागर तावडे (वय, पत्ता माहित नाही) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र निलेश नढे, प्रतूल घुले हे वाकड येथील गारवे मोटर्स येथे घुलेचा दाजी नितीन शेवाळे यांना मोटार घेण्याकरिता गेले होते. गारवे मोटारशेजारील चहाच्या टपरीवर सर्व जण चहा पित असताना आरोपी तिथे आले. कापसे याने आढूळकरला मारहाण करून जबरदस्तीने स्विफ्ट मोटारीत बसविले. मोटारीतही मारहाण करत त्याला पिंपरीतील मोबाईल दुकानात नेले. दुकानदाराला नवीन मोबाईलची ऑर्डर देवून आढूळकरला बिलाचे पैसे देण्यास सांगितले. पुन्हा मोटारीत बसवून पिंपरीतील सेंट्रल मॉलच्या पाठीमागे नेले. तेथेही त्याला मारहाण करून उर्वरित पैसे दिले नाहीत तर त्याला व त्यांच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली.
हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चौकशीसाठी जाणाऱ्या एका महिलेला पती व त्याच्या मित्राने भरस्त्यावर डोक्याचे केस ओढत हाताने मारहाण केली. तसेच तोंडावर ऍसिड फेकून जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी अकरा वाजता वाकड येथील प्रथम सोसायटीजवळ घडली.
याप्रकरणी अरूणा सुहास पवार (वय-27, रा. रहाटणी, श्रीनगर शिवशक्ती कॉलनी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुहास जनार्दन पवार, प्रशांत जनार्दन पवार, नितीन घोडेस्वार (तिघे रा. विजयनगर, काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूणा व पती सुहास यांची गेल्या काही दिवसांपासून वारंवार भांडणे होत आहेत. या भांडणाला वैतागलेल्या अरूणा यांनी वाकड पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीविरोधात वाकड पोलीसांनी त्यांना गुरूवारी सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी बोलविले होते. त्या दुचाकीवरून प्रथम सोसायटीजवळ जात होत्या. पाठीमागून आलेल्या एकाच दुचाकीवरून आलेल्या तिन आरोपींनी त्यांच्या दुचाकीला दुचाकी अडवी लावली. आरोपी पती, त्याचा नातेवाईक व एक मित्राने हाताने मारहाण करत डोक्याचे केस ओढून, कपडे फाडून तोंडावर ऍसिड फेकून जीवे मारण्याची धमकी दिली.
वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर जातीवाचक टीका करताना नरेंद्र मोदी हे 'नीच आदमी'व 'असभ्य' आहेत, असा उल्लेख केला. या वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या वक्तव्यानंतर राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात कॉंग्रेस नेते अय्यर यांच्याविरोधात तक्रारअर्ज दाखल केला आहे.
यावेळी आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक, 'अ' प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - नोकराने मालकाचा विश्वास संपादन करून घरातील आणि हॉटेलमधील दोन्ही तिजोऱ्या साफ करून तिजोरीमधील रोख रकमेसहित साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना 29 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत चिंचवड येथे घडली.
दिलीप कुमार बेहरा (वय 27 रा. मूळ कटक ओरीसा) असे या नोकराचे नाव असून या प्रकरणी सरोज गुजर (वय 35 रा. चिखली) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील गुजर यांच्या 'द टिफीन रुम' येथे दिलीप कामाला होता. त्याने मालकाचा विश्वास संपादन करून हॉटेलमधील आणि घरामधील तिजोरीमधून रोख दोन लाख 25 हजार रुपये, दोन मोबाईल, हि-यांचे कानातले, बँकेचे चेक असा एकूण तीन लाख 58 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून फरार झाला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - सायकलवरुन विक्रीसाठी सिगारेटची पाकीटे घेऊन जाणा-या विक्रेत्याला अडवून त्याच्याजवळची बॅग व मोबाईल फोन असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि.7) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी विशाल निस्वादे (वय 25 रा. निगडी) याने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निस्वादे हा पिंपरी एमआयडीसी येथील सी.डी.सी कंपनीच्या प्रवेशद्वारा जवळून जात असताना दोन अज्ञात इसमांनी निस्वादे याला अडवून 'तू आमच्या मुलींना का छेडतो? ' अशी विचारणा करत त्यांना रस्त्याच्या कडेला घेतले. निस्वादे याला काठीने मारहाण करुन त्यांच्या जवळची सिगारेटच्या पाकीटांनी भरलेली बॅग व एक ओप्पोचा फोन असा एकूण एक लाख 68 हजार 515 रुपयांचा ऐवज लुबाडून नेला. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - येथील ग्रीव्हज कंपनीच्या मोकळ्या आवारात एका 40 ते 45 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. संबंधीत इसमाचा मृत्यू दोन ते तीन दिवसापूर्वी झाला असावा. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला असून डुक्कराने त्याचे लचके तोडले आहेत. त्यामुळे पोलिसांना ओळख पटवणे कठीण आहे. शिवाय हा खून आहे की अपघाती मृत्यू हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी केली होती. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - कर्ज घेऊन एकही हप्ता न भरता बाप- लेक व सेल्स एक्झिक्युटिव्ह या तिघांनी संगनमताने एका फायनान्स कंपनीला 20 लाखांचा गंडा घातला आहे. हा प्रकार मार्च 2016 ते डिसेंबर 2017 या कालावधीत पिंपरी येथील कमला क्रॉस बिल्डींग येथे घडला.
यश सिंघाई (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बापु कोंडीबा साबळे (54), तेजस बापु साबळे (वय-30, रा. निगडी) या बाप लेकासह सेल्स एक्झिक्युटिव्ह आशीक अशोक माटे (वय-27, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फौजदार व्ही. बी. बढे यांनी माहिती दिली. फिर्यादी सिंघाई हे महिंद्रा ऍण्ड महिंद्रा फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. फायनान्समध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून आशीक माटे काम करत होता. तर आरोपी बाप लेकांना कर्जाची गरज होती. बाप-लेकांनी आरोपी सेल्स एक्झिक्युटिव्ह आशीक माटे यांच्याशी संगनमत करून महिंद्रा ऍण्ड महिंद्रा फायनान्स कंपनीकडून बनावट कागदपत्राच्या आधारे 17 लाख 56 हजार 688रूपयांचे कर्ज घेतले. आरोपींनी कर्जाचे हप्ते न भरता विविध खर्चासह कंपनीची तब्बल 20 लाख 13 हजार 396 रूपयांची आर्थिक फसवणूक केली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - शहरात राष्ट्रीय बॅंका, सहकारी बॅंका, पतसंस्थांनी नागरिकांच्या सोईसाठी विविध भागात एटीएम उघडण्यात आली आहेत. मात्र, बॅंकांच्या वतीने एटीएममध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणुक केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस एटीएम फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. बॅकांनी एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी केला आहे.
याबाबत बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विविध राष्ट्रीय बॅंका, पतसंस्था, सहकारी बॅंकांची सुमारे दोन हजार एटीएम केंद्र आहेत. तर देशभरात विविध बॅंकांची दोन लाख 15 हजार 38 एटीएम केंद्र आहेत. यामध्ये सर्वाधिक एटीएम केंद्र महाराष्ट्रात असून त्याची संख्या 24 हजार 829 आहे. त्याखालोखाल तामिळनाडूत एटीएमची संख्या आहे. महाराष्ट्रातील अनेक एटीएम केंद्रात अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आली नसल्याचा आरोप बकाल यांनी केला आहे. त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये एटीएममधील संपूर्ण रक्कम जळून खाक होत आहे. अनेक एटीएम केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात. परंतू, सुरक्षारक्षक नसतात. त्यामुळे ज्य़ांना पैसे काढता येत नाही, अशा व्यक्तींची भामट्यांकडून फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. तसेच काही ठिकाणी तर एटीएम केंद्रातील मशीन चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे बॅंकांनी प्रत्येक एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी अरूण बकाल यांनी केली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002