व्हीएस न्यूज - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गिरीश बापट यांच्या वक्तव्यावर गिरीश बापट अस्सल पुणेकर आहेत. त्यांच्या जे पोटात होते, तेच ओठांवर आले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी वर्षानंतर सरकार बदलणार, असे एका कार्यक्रमात म्हटले होते.
गिरीश बापट यांनी पुण्यातील डाळींब महासंघाच्या कार्यक्रमात सगळी कामे पुढील वर्षभरात करुन घेईन. कारण, त्यानंतर आमची सत्ता नसेल. काही घ्यायचे असेल तर आत्ताच आमच्या मागे लागा. पुढे काय होणार आहे ते मला माहीत आहे. त्याची चर्चा मी येथे करणार नाही, असे म्हटले होते. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, गिरीश बापट पुण्याचे आहेत, जुने नेते आहेत. ते कधीही खोट बोलत नाहीत. त्यांच्या पोटात होते तेच ओठावर आले. राऊत कोरेगाव भीमा प्रकरणी बोलताना म्हणाले, उमर खालिदला पुण्यातील एल्गार सभेत का बोलविण्यात आले याची चौकशी व्हायला हवी. हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र जातीपातीत फाटला जात आहे हे धोकादायक असून हे प्रकरण हाताळण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत पंतप्रधानांनी यावर भाष्य करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.