व्हिएस न्यूज - पवना धरण 100 टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर लागू असलेली 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून नियमित, सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप पदाधिकारी जयेश चौधरी यांनी केली आहे.
पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना शहरात पाणी कपात सुरू ठेवण्याची आवश्यकता काय, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाणी कपात रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या संदर्भात निवेदन देऊन अनेक दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अधिकारी विविध कारणे सांगून सदर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, कार्यालयीन कामासाठी जाणारे नागरिक तसेच स्वयंपाकासाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना सकाळच्या वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीचा विचार करून सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणीही चौधरी यांनी केली आहे.
पिंपरी कॅम्प परिसरात सध्या दुपारी 12.30 ते 1.00 या वेळेत पाणीपुरवठा केला जात असल्याने महिला, नोकरदार वर्ग आणि इतर नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठ्याची वेळ बदलून सकाळच्या वेळेत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होईल अशा पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे योग्य नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे आवश्यक आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, अशी भूमिका चौधरी यांनी व्यक्त केली.
“पवना धरण 100 टक्के भरले असताना पाणी कपात कशासाठी? नागरिकांना नियमित, सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणी मिळाले पाहिजे. निवेदन देऊन अनेक दिवस झाले, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ कारणे सांगितली जात आहेत. आता कोणतीही सबब न सांगता 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि पाणीपुरवठ्याची वेळ सकाळची करावी,” अशी मागणी जयेश चौधरी यांनी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002