व्हीएस न्यूज – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह असून भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी या चिन्हावर निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदविला आहे. निवडणुकीचे चिन्ह म्हणून मानवी शरीराच्या कोणत्याही अंगाला परवानगी देण्यात येऊ नये, असे त्यांनी आक्षेपात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अश्विनी उपाध्याय यांनी म्हटले आहे, की निवडणूक आयोगाने सुरुवातीला काँग्रेसला बैलजोडी असलेले चिन्ह दिले होते. त्यानंतर काँग्रेसची फूट झाल्यानंतर निवडणूक आयोगाने गायीचे दूध पिणारे वासरू, असे काँग्रेसला निवडणूक चिन्ह दिले. पुन्हा काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर हाताचा पंजा असे निवडणुकीचे चिन्ह काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून मिळाले.
केवळ काँग्रेसलाच देशातील ६ राष्ट्रीय पक्षांमध्ये शारीरिक अंग असलेले चिन्ह देण्यात आले. तसेच देशातील ७५ प्रादेशिक पक्षांपैकी असे चिन्ह नसल्याचे त्यांनी आयोगाचे लक्ष वेधले. आचारसंहिता लागू असल्याने मतदानापूर्वी ४८ तास निवडणूक प्रचाराला बंदी असते. त्यामुळे मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर कोणत्याही पक्षाला चिन्ह दाखविता येत नाही. मात्र काँग्रेसचा उमेदवार हात दाखवून प्रचार करत असल्याचे उपाध्याय यांनी पत्रात म्हटले आहे.