व्हीएस न्यूज - भारत सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्या कोट्यधीश व्यक्तींच्या संख्येत गेल्या वर्षी वाढ झाली असून कोट्यधीशांनी देश सोडण्याच्या बाबतीत भारताचा चीननंतर क्रमांक लागला आहे. गेल्या एका वर्षात (2017) भारतातील तब्बल 7,000 व्यक्तींनी आपला कायमस्वरूपी निवास स्थायी निवास (डोमिसाइल) बदलला. आधीच्या वर्षाच्या मानाने ही संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, 2017 मध्ये 7,000 कोट्यधीशांनी अन्य देशात स्थलांतर केले. वर्ष 2016 मध्ये ही संख्या 6,000 आणि 2015 मध्ये 4,000 होती. जागतिक पातळीवर चीनमधील 10,000 कोट्यधीशांनी2017 या एका वर्षात अन्य देशांत घर केले. देश सोडणाऱ्यांपैकी भारतीय कोट्यधीशांनी अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या देशांना पसंती दिली आहे, तर चिनी कोट्यधीशांनी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला निवास करणे पसंत केले आहे. अन्य देशांतील श्रीमंतांनी अन्यत्र स्थलांतर करणाऱ्यांमध्ये तुर्कीतील 6,000, ब्रिटनमधील 4,000, फ्रान्समधील4,000आणि रशियातील 3,000 कोट्यधीश व्यक्तींनी आपला देश सोडला आहे.