व्हीएस न्यूज - केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्यातील नागरिकांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. यंदाचे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ९ मार्चला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधिमंडळाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत चालणार आहे. म्हणजे यंदाच्या अधिवेशनात २२ दिवस कामकाज चालणार असून संपूर्ण अधिवेशनाचा कालावधी ३१ दिवसांचा असणार आहे.
विधिमंडळाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री गिरीष बापटी यांनी ही माहिती दिली. राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पिय अधिवेशन होत असून जीएसटी कराची अंमलबजावणी सुरु होवून ८ महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे या करप्रणालीमुळे राज्याच्या तिजोरीत किती निधी जमा झाला? याची माहिती राज्याच्या जनतेला कळणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी किती निधी उपलब्ध होणार याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या अधिवेशनात शेतकरी धर्मा पाटील यांचे आत्महत्येचे प्रकरण आणि मंत्रालयात येवून जनतेकडून करण्यात येत असलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.