राहुल गांधींकडे मणिशंकर अय्यरना बरखास्त करण्याचीकाँग्रेस नेत्याची मागणी
नवी दिल्ली
2018-02-14
व्हिएस न्यूज - वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे नेते व माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना पक्षातून बरखास्त करा, अशी मागणी एका काँग्रेस नेत्याने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. पाकिस्तानबाबत अय्यर यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.
“मणिशंकर अय्यर यांनी अशा मुद्द्यांवर टिप्पणी करणे बंद करायला हवे. त्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी आता गप्प राहायला हवे. भारतीय जनता पक्ष याचा फायदा घेऊ शकते. अय्यरना पक्षातून काढावे, यासाठी मी राहुल गांधींना पत्र लिहिणार आहे,” असे काँग्रेस नेते व्ही. हनुमंत राव यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. हनुमंत राव हे तेलंगाणातील खासदार आहेत.
‘भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या मद्द्यांचा एकच मार्गच आहे – निरंतर आणि विना-अडथळा चर्चा. पाकिस्तानने या धोरणाचा स्वीकार केला आहे याचा मला अभिमान आहे. परंतु भारताने धोरण म्हणून त्याचा स्वीकार केलेला नाही, याचे दुःखही आहे. मी पाकिस्तानवर प्रेम करतो कारण मी भारतावर प्रेम करतो, ’ असे कराचीतील एका कार्यक्रमात भाषण करताना अय्यर म्हणाले होते.