व्हीएस न्यूज - एका गारपीटग्रस्त शेतकऱ्याने काटोल भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपामागे आत्महत्या केली असून त्या आत्महत्या केलेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्याचे नाव दिलीप लोहे असे आहे.
काटोल शहरात दिलीप लोहे हे ऑटो चालवतात, त्यासोबतच ते ठेक्याने शेती करत असल्याचे गावकरी सांगतात. ते काटोल शेजारी लाडगावात ठेक्याने शेती घेवून लागवड करायचे. पण त्यांच्या पिकांचे नुकत्याच झालेल्या गारपीटीने मोठे नुकसान झाल्यामुळे तणावात असलेल्या दिलीप लोहे यांनी विष पिऊन आत्महत्या केल्यामुळे आता सरकारला जाग यावी म्हणून आज काटोलच्या व्यापाऱ्यांनी काटोल बंदची हाक दिली आहे.
१२ तारखेला नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गारपीटीचा काटोल परिसरातील १२५ गावांना फटका बसला. संत्रा, मोसंबी, चना, गहू आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडेलेले शेतकरी आता मरणाला जवळ करत आहेत. शनिवारी प्रल्हाद धोटे या शेतकऱ्याने आत्महत्या केली,तर रविवारी रात्री दिलीप लोहे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सर्वात धक्कादायद म्हणजे सरकारी कार्यलय असलेल्या तहसील ऑफीसच्या परिसरात त्यांनी आत्महत्या केली.