गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात दिली गुन्हेगारांसारखी पाटी
उस्मानाबाद
2018-02-20
व्हीएस न्यूज – सराईत गुन्हेगारांसारखी वागणूक राज्यात गारपिटीच्या नुकसानीचा पंचनामा करताना शेतकऱ्यांना देण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली. पण शेतकऱ्यांना ही मदत देण्यासाठी घातलेल्या अनेक जाचक अटीमुळे सराईत गुन्हेगारांसारखी अपमानास्पद वागणूक मिळत आहे.
कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात पंचनामा करताना शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढण्याचा प्रताप केला असून सराईत गुन्हेगाराच्या हातात ज्याप्रकारे त्याच्या नावाची पाटी देतात त्याचप्रकारे शेतकऱ्यांच्या हातात पाटी देत फोटो काढले आहेत. मुळात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची शहानिशा करण्यासाठी आधार कार्डसह इतर पर्याय उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांच्या हातात नावाची पाटी देऊन त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. प्रशासनाने केलेल्या या प्रतापानंतर शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल हे मात्र अनुत्तरितच आहे. शेतकऱ्यांना पारदर्शक कारभाराचा नाहक त्रास होत असून यातून सरकारला काय साध्य करायचे आहे ? असे आता शेतकरी विचारात आहे.