आधार लिंक केलेल्या रेशनकार्डधारकांनाच मिळणार धान्य
मुंबई
2018-02-25
व्हीएस न्यूज – मुंबई उच्च न्यायालयाने आधारकार्ड रेशन कार्डला जोडणे अनिवार्यच असल्याचे म्हटले असून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच १ मार्चपासून स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार असल्याने आता आधारकार्ड रेशन कार्डशी जोडावे लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ता अझीझ पठाण यांच्याकडून यासंदर्भातील विरोध करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने जी निकाली काढताना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बायोमेट्रिक पद्धतीने रेशनिंग धान्य देण्याचा कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. रेशनकार्ड धारकांना यासाठी त्यांचा आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडावा लागणार आहे. पण यात मोठ्या चुका होत असून गरज नसतानाही आधारची सक्ती करणे योग्य नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. राज्यभरात या संदर्भात अनेक ठिकाणी माहितीचे संगणकीकृत करताना चुका झाल्याच्या तक्रारी आल्याचे म्हटले होते. एकट्या नाशिकमध्ये चुकीची माहिती अपलोड झालेल्या शिधापत्रिका ७४ हजारांच्यावर असल्याचेही या याचिकेत म्हटले होते. या संदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार करूनही तोडगा निघाला नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.