व्हीएस न्यूज - भारतीय जनता पार्टीचे राज्य महाराष्ट्राच्या हिताचे नाही. शेतक-यांना कर्जमुक्ती करावी अशी मागणी शिवसेनेने प्रथम नाशिक मध्ये केली. त्यानंतर चारच दिवसात कर्जमुक्ती जाहीर झाली. ही कर्जमुक्ती शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखी आहे. सत्तेत राहून हे जाहीरपणे सांगण्याची हिंम्मत शिवसेनेत आहे. शिवसेना राजकारणात‘कच्चा लिंबू’ नाही. सत्तेची उलथापालट शिवसेना केंव्हाही करु शकते. महाराष्ट्रात कधीही निवडणूका होतील अशी आरोळी समोरील पक्ष ठोकतात. त्यांची हिंम्मत असेल तर निवडणूका घ्याव्यात. शिवसेना निवडणुकीला तयार आहे. महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेची संघटना बांधणी सुरु झाली आहे. कधीही निवडणूका घेतल्या तरीही शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल. असा ठाम विश्वास शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी चिंचवड येथे व्यक्त केला.
भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा निहाय मतदार संघांची बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहर प्रमुख व मनपा गटनेते राहूल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, मधुकर बाबर,भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.
यावेळी संजय राऊत पुढे म्हणाले की, हिमाचल प्रदेश आणि गुजरात मध्ये एकाच वेळी निवडणूका होणार असतील तर अद्यापपर्यंत गुजरातच्या तारखा जाहीर का केल्या नाहीत? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. सत्तेत राहून आंदोलने करणे हा विरोधाभास नाही तर विरोधी पक्ष आपले काम व्यवस्थित करत नसल्यामुळे शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने करीत आहे. मुंबईतील मनसेचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न बीजेपी करीत होते. पण त्यांच्या हाताला काही लागले नाही म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे. किरीट सोम्मया काय म्हणतात याला मी महत्व देत नाही. मुंबईत कायम शिवसेनेचा महापौर राहील. नांदेड मध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार आणि कॉंग्रेसचे नगरसेवक भाजपाने फोडले तरीही जनतेने त्यांना नाकारले. शिवसेनेला कायम लढण्याची सवय आहे. त्यामुळे सत्तेचा फायदा शिवसेनेला कधीही झाला नाही. या सरकारच्या कोणत्याही पापाचे शिवसेना भागीदार नाही. त्यामुळे आम्ही रोज सरकारला उठथा लाथ बसता बुक्का मारीत आहोत. असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
व्हीएस न्यूज - पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी रमाबाई आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीसाठी डीबीएन् ग्रुपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष आणि लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष धुराजी राणोजी शिंदे आणि आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी आज शुक्रवारी (दि 13 ऑक्टोबर 2017) रोजी महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे जाहिर अभिनंदन केले. धुराजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना रमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धुराजी शिंदे, सरिता जामनिक, विशाल कसबे, हिराभाई लांडगे, अरुण मैराळे, शरद कांबळे, संजय ओव्हाळ,दत्ता गोडसे, नसीम शेख, मनोज गजभार, माऊली बोराटे, उमेश गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अशी मागणी केली की, आगामी अर्थसंकल्पात या विषयी आर्थिक तरतूद करावी आणि पुढील वर्षभरात रमाबाई आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी उभा करावा.
10 जानेवारी 2017 रोजी मा. आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांच्याकडे प्रथम धुराजी राणोजी शिंदे यांनी पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी रमाबाई आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली होती. तसेच 16 जून 2017 रोजी एक दिवसाचे लक्षणिक उपोषण केले होते.
यावेळी धुराजी शिंदे यांच्या समवेत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, बौध्द विकास महासंघाचे अध्यक्ष शरद जाधव, डीबीएन्.ग्रुपचे शहराध्यक्ष नितीन वाघमारे, पुतळा पुष्पहार समितीचे पदाधिकारी, लोकजनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र सचिव सचिन जाधव, कायदा सल्लागार ॲड. सुनिल जामनिक, महिला शहराध्यक्षा ॲड. सरीता जामनिक, डीबीएन् ग्रुप रिक्षा वाहतुक आघाडीचे शहराध्यक्ष हिरा लांडगे, मोशी अध्यक्ष माऊली बोराटे, एन्एस्युआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बिरसा मुंडा संघटनेचे पांडूरंग परचंडराव, पिंपरी चिंचवड शहर सचिव लोकजनशक्ती पार्टी अरुण मैराळे, कार्याध्यक्ष दत्ता गोडसे, धम्म दिप प्रतिष्ठानचे राहूल वडमारे, भिमाई महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सज्जनबाई गायकवाड, यशोधरा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भामाबाई जगताप, एम्आयएम्चे शहर प्रवक्ते धम्मराज साळवे, भारतीय बौध्द महासंघाचे पिंपरी अध्यक्ष मनोज गजभार, पिपल्स रिपब्लीकन शहराध्यक्ष सुनिल ढसाळ, ज्ञानेश्वर बोरकर, फारुख कुरेशी, नसीम शेख, प्रविण कांबळे, दत्ता प्रधान, शिवाजी कदम, उमेश गायकवाड, शरद कांबळे, कौसाबाई गजभार, राधाबाई गायकवाड, कमल कांबळे, सुमन कांबळे, संजीवनी शिंदे, सखूबाई शिंदे, कांताबाई कांबळे, सुशाला शिंदे, सुनिता दळवी, विजय कांबळे, केशर वाघमारे, ललीता सावंत आदींसह अनेक आंबेडकर अनुयायांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला होता. यानंतर मनपा प्रशासनाने रमाबाई आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत कारवाई सुरु केली.
व्हीएस न्यूज – मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर मोशी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भूमिपुजन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते गुरुवारी (दि.12) करण्यात आहे. गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे.
या कार्यक्रमाला यावेळी महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मौजे मोशी येथे सेक्टर क्रमांक 5 व 8 मधील सुमारे 98 हेक्टर जागेमध्ये “आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र’ उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता, विविध विभागाच्या परवानगी मिळविण्याचे काम प्राधिकरण प्रशासनाकडून सुरु आहे. पिंपरी- चिंचवड शहरात व चाकण परिसरात बहुराष्ट्रीय उद्योग समूहांचे उत्पादन प्रकल्प आहेत. आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामुळे या परिसरात येणाऱ्या उद्योग समुहांच्या प्रकल्पांमध्ये भर पडणार असून, त्यामुळे भूमिपुत्रांना नोकरीच्या संधीही निर्माण होणार आहेत. या केंद्रामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ तयार होणार आहे. तसेच,स्थानिक कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
व्हीएस न्यूज - आग लागण्याच्या दुर्घटनांमुळे दिवाळीत आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर (फ्लाईंग लॅटर्न) पुणे व मुंबई पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने राज्यभरात ही बंदी कायम केली असून, आकाश कंदील उडविण्याबरोबरच विक्री व साठा करण्यावर बंदी घातली आहे. आकाशात दिवे उडविल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वात पेटविल्यानंतर पॅराशुटप्रमाणे हा आकाश कंदील उंच जातो. त्यानंतर पुन्हा दिवा जमिनीच्या दिशेने येतो. हा दिवा खाली झेपावताना तो घरांच्या छतांवर तसेच झाडांवर पडतात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना दरवर्षी दिवाळीदरम्यान घडतात. दिवाळी पहाट कार्यक्रमांबरोबरच रात्री उशिरापर्यंत “फ्लाईंग लॅटर्न’ आकाशात झेपावताना दिसतात. अशाप्रकारे 17 जानेवारी 2015 मध्ये उडविलेला आकाश कंदील मालाडमधील इमारतीवर ठेवलेल्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या व इतर बांधकाम साहित्यावर पडून मोठी आग लागली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस उपायुक्तांनी आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर बंदी घातली आहे. आकाशात दिवे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त,नगरपालिका मुख्याधिकारी व विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आकाश कंदीलाचा वापर करुन, दहशतवादी कृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नसून, या पार्श्वभूमीवर अमेरिका, थायलंडसारख्या देशांकडूनही “फ्लाईंग लॅटर्न’वर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय अग्निशमन सुरक्षा संस्थेने देखील अशाप्रकारच्या आकाश कंदीलवर बंदी घालण्याचे समर्थन केले आहे. यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.
व्हीएस न्यूज – पर्यावरण संरक्षणसाठी एक प्रभावी उपक्रम म्हणून “फटाके मुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा संकल्प मॉडर्न निगडी संकुलातील 1500 शालेय विद्यार्थ्यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली व पैशाची बचत करून पुस्तके खरेदी करणे, अनाथाश्रमाला व वृद्धाश्रमाला मदत करण्याचा संकल्प घेतला.
याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार यांनी मार्गदर्शन करताना फटाके उडविण्याची परंपरा, सद्यस्थितीत पर्यावरणाची होणारी हानी,परिसरातील पशुपक्षी यांवर होणाऱ्या परिणामाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्याचबरोबर प्रदूषणातून कॅन्सरसारख्या भयावह रोगाची कल्पना विध्यार्थ्यांना दिली. विदेशी फटाक्यांतून निर्माण होणाऱ्या घातक रासायनिक पदार्थांमुळे फटाक्यांपासून स्वतःला, कुटुंबाला अलिप्त ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक गोकुळ कांबळे,पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, अनिसच्या कार्यकत्या श्रीमती बुद्धीसागर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रतिज्ञा वाचन विजय गायकवाड यांनी केले.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या हद्दीलगत प्रभाग क्रमांक 26 मधील विशाल नगर ते बाणेर पुलासह 24 मीटरचा नदीच्या पलीकडील डीपी रस्ता पुणे महापालिकेच्या स्मार्ट वॉर्डात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी या भागाला लागून असलेला पिंपळे निलख येथील डीपी रस्ता देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट वॉर्डात समाविष्ट करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.
यासंदर्भात कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पिंपळे-निलख हा उच्चभ्रू व सुशिक्षीत लोकवस्तीचा भाग आहे. त्यातच नदीपलीकडील पुणे महापालिकेच्या हद्दीतील बाणेरचा भागही उच्चभ्रू लोकवस्तीचा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही महापालिका हद्दीला जोडणारा डीपी रस्ता विशालनगरमधून बाणेरला जोडला आहे. दोन्ही महापालिकांसाठी हा रस्ता म्हणजे प्रवेशद्वार मानला जातो. बाणेरमधील डीपी रस्त्याचा भाग पुणे महापालिकेने स्मार्ट वॉर्डात समाविष्ट केला आहे व तो विकसित करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे विशालनगर भागातील रस्ता पिंपरी पालिकेनेही स्मार्ट वॉर्डात समाविष्ट करावा, असे कामठे यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – भारनियमन जाहीर करून राज्याला अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या महा-वितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीने शुक्रवारी कंदील मोर्चा काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. महा-वितरणचे पिंपरी विभागीय कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांना कंदील-कोळसा भेट दिला.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे व युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, नगरसेविका संगीता ताम्हणे, अपर्णा डोके, पक्ष प्रवक्ते फजल शेख, मछिंद्र तापकीर, आनंदा यादव, कविता खराडे, गंगा धेंडे, विजया काटे, विश्रांती पाडाळे, मिनाक्षी उंबरकर, वर्षा शेडगे, प्रदीप गायकवाड, अभिषेक बोके, उत्तम आल्हाट, फिरोज शेख, यतीन पारेख, धैर्यशील धर्मे, महेश झपके, संदीप पाटील, विशाल काळभोर, विनोद कांबळे, ऋषिकेश वाघेरे, रवींद्र वाकडकर, अतुल वाकडकर, ऋषिकेश वाकडकर, निशांत वाकडकर, बाळासाहेब पिल्लेवार, विठ्ठल गुजर, संतोष वाघेरे, रशीद सय्यद, अलोक गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संजोग वाघेरे म्हणाले, दहा दिवसांपूर्वी राज्यात भारनियमन जाहीर केल्याने महा-वितरण विरोधात राज्यात असंतोष पसरला. अतिरिक्त वीज उपलब्ध असताना देखील भारनियमन करणे चुकीचे असल्याची टीकेची झोड उठल्यानंतर केवळ शहरी भागाला भारनियमनातून वगळल्याचे जाहीर केले. मात्र अद्याप ग्रामीण भागात भारनियमनाच्या नावाखाली बारा-बारा तास वीज नसते. शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता अतिरिक्त विजेचा सर्व भागांत पुरवठा करावा. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी दिला. नगरसेवक भाऊसाहेब भोईर व विशाल वाकडकर यांनी देखील महा-वितरणच्या पक्षपाती धोरणावर टीका केली.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्यात कमतरता येत नाही. डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. डॉक्टरांना काही सवलती व भत्ते वाढवून आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे, असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सत्तारुढ पक्षनेते यांच्या उपस्थिती डॉक्टरांच्या संख्या वाढविण्यासाठी गुरुवारी (दि.12) बैठक घेण्यात आली. वायसीएमसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची आवश्यकता आहे. हे डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी काही पर्यायांचा विचार केला जात आहे. प्रामुख्याने डॉक्टरांसाठी असलेला व्यावसायरोध भत्ता (एनपीए) स्विकारणे ऐच्छिक केले जाणार आहे. त्यामुळे काही डॉक्टर खासगी क्षेत्रात सेवा बजावून देखील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करू शकतील,असेही पवार यांनी सांगितले.
त्याचबरोबर पालिकेच्या निवासी डॉक्टरांना त्यांच्या शिफ्टनुसार कमी-अधिक भत्ता देणे गरजेचे आहे. बंधपत्रित डॉक्टरांची संख्या कमी असल्याने ते वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, आरएमओ डॉक्टरांसाठी 1200 रुपयांचा भत्ता 194 पासून वाढविलेला नसल्याने तो वाढवावा. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयासाठी कर्मचारी वर्ग नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – नांदेड महापालिकेत कॉंग्रेस पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापर आणि भाजपच्या परतीच्या प्रवासाचे संकेत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केली.
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने घवघवीत यश मिळविले. त्या निमित्ताने सचिन साठे आणि महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्या हस्ते संत तुकारामनगर पिंपरी येथे नागरीकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी सचिन साठे बोलत होते.
यावेळी सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, चिंचवड युवक अध्यक्ष मयुर जैयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, तारीक रिझवी, भाऊसाहेब मुगूटमल, हिरा जाधव, नंदा तुळसे,अर्जुन खंडागळे, विठ्ठल कळसे, सागर धावडे, इर्शाद शेख आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. अनिल रॉय यांच्या ऐवजी शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणारे डॉ. पवन साळवे यांची नेमणूक करण्याचा ठराव विधी समितीने नुकताच पारित केला. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेऊन साडेचार वर्षानंतर पदोन्नती योग्य नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याचा आरोप डॉ. रॉय यांनी केला. या आरोपाने पालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. रॉय यांना प्रशासकीय नोटीस बजावली आहे. यासंदर्भात24 तासाच्या आत समाधानकारक खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सक्त सूचना हर्डीकर यांनी दिली आहेत. त्यामुळे डॉ. रॉय यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी या महत्त्वाच्या पदावर तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने या पदावर सेवा ज्येष्ठता कार्यकाळाचा विचार करून डॉ. अनिल रॉय यांना पदोन्नती दिली. शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणारे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना डावलण्यात आले. मात्र, फेब्रुवारी 2017 रोजी पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर ही पदोन्नती योग्य नसल्याचे सांगून सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने पदोन्नतीचा फेरप्रस्ताव विधी समितीसमोर आणला. त्याला विधीने मंजुरीही दिली. त्यामुळे डॉ. रॉय यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर आक्षेप घेऊन साडेचार वर्षानंतर पदोन्नती योग्य नसल्याचा प्रशासनाला साक्षात्कार कसा काय झाला?. प्रशासन राजकीय दबावाला बळी पडले असून यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचाही आरोप रॉय यांनी केला आहे. त्यांच्या आक्षेपार्ह आरोपामुळे पालिकेची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका ठेवून आयुक्त हर्डीकर यांनी त्यांन नोटीस बजावली आहे.
साळवे यांच्या पदोन्नतीचा ठराव विधीने मंजूर केल्यानंतर रॉय यांनी आयुक्त हर्डीकर यांना स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केला आहे. त्यामध्ये आयुक्तांसह प्रशासनावर आरोप केले आहेत. आरोपाच्या बातम्याही वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेची बदनामी झाली असून रॉय यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात नागरिकांनी निवेदने दिली आहेत. त्यामुळे रॉय यांच्यावर बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवला आहे. कार्यालयीन शिस्तभंगाचा ठपका ठेवून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 56 (2) मधील तरतुदींनुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? असे आयुक्त हर्डीकर यांनी नोटिसीत नमूद केले आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून 24 तासाच्या आत याबाबत खुलासा करण्याचे आदेशही दिले आहेत. असमाधानकारक खुलासा केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे डॉ. रॉय यांच्या अडचणींत दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेला ग्रामपंचायत ते महापालिका असा 35 वर्षाचा इतिहास आहे. महापालिकेच्या विकासामध्ये स्व.यशवंतराव चव्हाण व अण्णासाहेब मगर यांचा मोलाचा वाटा आहे. शहराच्या विकासात कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा, उद्योजकांचा, गुणवंत कामगारांचा तसेच महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्य कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) सत्कार करण्यात आले. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार अमर साबळे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य शैलेश मोरे, विलास मडिगेरी, उत्तम केंदळे, आरती चोंधे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, मनपाच्या विकासासाठी महापौर, पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व शहरवासियांनी योगदान दिले पाहिजे. आपला प्रामाणिकपणा आपल्या कर्तव्यातून दाखवून दिला पाहिजे. पिंपरी-चिंचवड महापालिका कामगारांची नगरी आहे. सर्वांचा समन्वय साधून वातावरण चांगले राहण्यासाठी तसेच पुढील 30-40 वर्षांचा विचार करुन महापालिकेचा विकास होण्यासाठी पदाधिकारी, नगरसदस्य व अधिकारी यांनी काम केले पाहिजे. शहरातील खेळाडूंना व उल्लेखनीय काम करणाऱ्यांना न्याय देण्याचे काम महापालिकेने करावे. पिंपरी-चिंचवडची ओळख अण्णासाहेब मगर यांच्यामुळे आशिया खंडात झाली आहे, पुढेही ती अशीच रहावी. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते यावेळी म्हणाले.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, अण्णासाहेब मगर यांनी शहराला दिशा दिली, पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी त्यांच्या स्वप्नातून साकार झाली. आज महापालिकेच्या विकासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. महापालिका विकासामध्ये आपण योगदान दिले पाहिजे, असे ध्येय सर्वांनी निश्चित केले पाहिजे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी काम करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी आभार मानले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002