व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे. त्यांच्या निवडीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षाकडे शिफारस केली होती.
गेल्या चार वर्षांपासून राहुल कलाटे यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ते वाकड येथून नगरसेवकपदी निवडून आले होते. सध्या त्यांच्याकडे महापालिकेचे गटनेतेपद आहे. कलाटे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे त्यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शहरप्रमुख पदातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षाकडे केली होती.
योगेश बाबर हे पिंपरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख होते. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. बंडखोरी केल्यामुळे त्यांना पदच्युत करण्यात आले होते. माझ्यावरील अन्यायाविरोधात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असल्याचे सांगितले. खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी त्यांनी जुळवून घेतल्यामुळे बारणे यांनी शहरप्रमुख म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे त्यांना शहरप्रमुखपद बहाल करण्यात आले आहे.
बाबर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, वडील मधुकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी नगरसेवकपद भूषविले असून दुसरे चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिले आहेत.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय वाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.१७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
बुधवार दि.१७ रोजी इंद्रायणीनगर मिनी मार्केट येथे सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराचे उद्घाटन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते होणार आहे. ९.३० वाजता बिल्डींग नं.६०/४ से.नं.२ येथे माता पिता संघ कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर १० वाजता बालाजीनगर टेल्कोरोड येथे आरोग्य शिबीर, १०.१५ वाजता बालाजीनगर येथील अंगणवाडी-बालवाडी मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, तसेच १०.३० वाजता खंडेवस्ती येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, ११ वाजता इंद्रायणीनगर येथील अदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांना फळवाटप, दुपारी १२ वाजता भोसरी पांजरपोळ येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळा येथे अन्नदान तसेच १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा येथे अन्नदान करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजता इंद्रायणीनगर गणेशमंदीर येथे महिला बचत गटाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्काराचा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम इंद्रायणीनगर येथील से.नं.२ मिनी मार्केट येथे होईल. तसेच इंद्रायणीनगर येथील नगरसेवक संजय वाबळे यांचे कार्यालय येथे दि.१६ ते दि.२० जानेवारी दरम्यान मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याठिकाणी पुस्तकांच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आलीय. बहुजन हिताय सुखाय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती संजय वाबळे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज – पिंपळेगुरवमधील राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने पूररेषेतील जमिनींची अनधिकृत व्यवहाराद्वारे विक्री केली आहे. त्याच जागांवर आज मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून, त्यांना अभय मिळत आहे. ही अनधिकृत बांधकामे करण्यासाठी संबंधित नागरिकांकडून लाखो रुपयांचा हफ्ता गोळा केला गेला आहे. तसेच या माजी नगरसेवकाने महार वतनाच्या जमिनींचीही परस्पर विक्री केली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना भाजपकडून अभय मिळत असल्याचे या माजी नगरसेवकाने सांगणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखा प्रकार आहे. पूररेषेतील जमीन विक्रीतून नागरिकांच्या झालेली आर्थिक फसवणूक आणि महार वतनाच्या जमिनींची परस्पर विक्रीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी केली आहे.
यासंदर्भात स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “पिंपळेगुरवमधील एका माजी नगरसेवकाने आपल्या प्रभागात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या नागरिकांकडून सर्रासपणे हफ्ते गोळा केले आहेत. त्यांची प्रभागात दहशत असल्यामुळे नागरिकांनाही आपले बांधकाम करण्यासाठी हफ्ते देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे असंख्य गोरगरीब नागरिकांकडून अनधिकृत बांधकामांसाठी हफ्ते या माजी नगरसेवकाने लाखोंची माया गोळा केली आहे. या माजी नगरसेवकाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि चीड होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविलेल्या या माजी नगरसेवकाला मतदारांनी घरी बसविले.
भाजपची लाट असतानाही मतदारांनी या माजी नगरसेवकाला नाकारले. या माजी नगरसेवकाने पिंपळेगुरव आणि सांगवी भागातील पूररेषेतील अनेक जमिनींची बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. त्यातून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. नागरिकांनी जमिनी खरेदी केल्यानंतर संबंधित जागा ही पूररेषेत असल्याचे लक्षात आले. परंतु, या माजी नगरसेवकाची प्रभागात दहशत असल्यामुळे एकाही नागरिकाने त्याबाबत कोणाकडे तक्रार केलेली नाही. परंतु, निवडणुकीत पराभव करून नागरिकांनी या माजी नगरसेवकावर असलेला रोष व्यक्त केला.
या माजी नगरसेवकाने बेकायदेशीरपणे विकलेल्या पूररेषेतील जागांवरच शेकडो अनधिकृत बांधकामे झाली आहेत आणि आजही काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांना आता अभय मिळत आहे. असे असताना या माजी नगरसेवकाने अनधिकृत बांधकामांवर बोलणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखा प्रकार आहे. पूररेषेतील बांधकामांवर महापालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे. याच महाशयाने महार वतनांच्या जमिनींची परस्पर विक्री करून मागासवर्गातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सांगवी व पिंपळेगुरवर भागातील पूररेषेतील जमिनींची विक्री, नागरिकांची झालेली आर्थिक फसवणूक तसेच महार वतनांच्या जमिनींची परस्पर झालेल्या विक्रीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”
व्हीएस न्यूज - परमार्थात श्रवण व सद्गुरु यांना फार महत्व आहे. सद्गुरुशिवाय गती नाही तर श्रवण हा परमार्थाचा पायाच आहे. कोणाकडून तरी माळ किंवा मंत्र घेतला म्हणजे आपल्याला सद्गुरु मिळाला असे समजू नये. वास्तविक, गुरु-शिष्य संबंध जोडण्याची ही केवळ एक सांप्रदायिक रीत आहे. इतकेच याने परमार्थ-मार्गात पहिले पाऊल टाकले एवढेच घडले. श्रवणाची वाट चोखाळली शुध्द। गेले भेदाभेद निवारोनी।। असे मार्गदर्शन प्रल्हाद वामनराव पै यांनी रविवारी भोसरी येथे केले. आमदार महेश लांडगे आणि मित्र परिवाराने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याच्या समारोप प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे,उपमहापौर शैलजा मोरे, जीवनविद्या मिशनचे माजी विश्वस्त शैलेश मोरे, पै. किसनराव लांडगे, पै. सचिन बबनराव लांडगे, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.
खा. श्रीरंग बारणे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटक सुखाच्या मागे धावत आहे. सुख कुठे मिळेल याचा शोध माणूस अव्याहतपणे घेत असतो. काही वेळा तो आपल्या मार्गावरुन भरकटण्याचा सुध्दा धोका असतो. परंतू जीवनविद्या मिशन समाजाला सुखाचा मार्ग दाखविण्याचे काम करीत आहे. सद्गुरु वामनराव पै यांचे हे कार्य प्रल्हाद पै पुढे नेत आहेत. प्रारंभी खा. बारणे, आ. महेश लांडगे यांचा मिशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर उद्योजक कार्तिक लांडगे, नितीन लांडगे, युवराज लांडगे, नितीन लांडगे, सागर लांडगे, प्रज्ञा कार्तिक लांडगे यांनी प्रल्हाद पै यांचा सत्कार केला.
या तीन दिवसीय सोहळ्यात राज्यभरातून सुमारे एक लाखांहून जास्त साधकांनी पै यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचा लाभ घेतला. 450 हून जास्त व्यक्तींनी अवयव व देहदानाचे अर्ज भरले. जीवनविद्या मिशनच्या वतीने चालविण्यात येणा-या संस्कार शिक्षण अभियान, गर्भ संस्कार, विद्यार्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन, कौटूंबिक सौख्य, स्वानंदयोग, जीवन जगण्याची कला, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या मार्गदर्शन शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. यासाठी महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाऊंडेशन आणि मित्र परिवार प्रयत्नशील राहिल असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
जीवनविद्या मिशन आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या वतीने तीन दिवस अवयव प्रत्यारोपण, प्रतिरोपण आणि अवयव आणि देह दानाविषयी जगजागृती करण्यात आली. अवयव दान करण्यास इच्छुक असणा-या व्यक्तींचे अर्ज भरुन घेण्यात आले. यामध्ये राजू हरिभाऊ भगत या अंध व्यक्तीसह 450 व्यक्तींनी अवयव दानाचे अर्ज भरले. अशी माहिती समन्वयक विवेक पालव यांनी दिली.
पै पुढे म्हणाले की, मनावर ताबा मिळविण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. साधनेमुळे हळूहळू माणसाच्या मानसिकेतेत बदल होतो. माणसातील कृतघ्नपणा संपून कृतज्ञपणा जागृत होतो. माणसाची आसक्तीची ओढ कमी होऊन विरक्तीकडे प्रवास सुरु होतो. एखादे कर्म करताना कुठे थांबायचे हे कळले की मनुष्य प्रगतीकडे वाटचाल करतो. कर्म करत असताना आपण दैववादी होतो. देवावर अवलंबून राहतो. परंतू देवाने मनुष्याला प्रारब्ध दिले आहे. ते कर्म करण्यासाठी, म्हणजेच कर्म करण्यासाठीच प्रारब्ध भोगताना एका बाजूने कर्म दुस-या बाजूने प्रारब्ध आणि या दोन्हीच्या माध्यमातून क्रियमान व्हावे. कर्माचे फळ मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती यावी लागते. संगत आणि संस्कार यातून अनुकूल परिस्थिती निर्माण होते. चांगल्या संगतीने गुण तर कुसंगतीने दोष वर येतात. सध्या युवा पिढीमध्ये नैराश्यमुळे व कुसंगतीमुळे व्यसनाचे व आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अंत:र्मन शांत असेल तर अशा परिस्थितीवर सहज मात करता येते. अंत:र्मन शांत राहण्यासाठी जीवनविद्येची प्रार्थना म्हणा, मन शांत होईल. अंत:र्मन तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाईल, असे पै यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - सामाजिक व क्रिडा सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल अमित राजेंद्र बच्छाव यांना राज्यस्तरीय विश्वरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एफ. पाटील व विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय हवामान व कृषी तज्ञ शास्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे, प्रमुख पाहुणे नंदकुमार वाळंज, सुरेश कोते, शिवाजीराव कोते, शिवाजी घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन “राज्यस्तरीय विश्वरत्न गौरव २०१७” पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथील सभागृहात करण्यात आले होते.
काळ, विषय बदलले तसे सामाजिक जीवनातील समस्यांमध्ये देखील बदल झाले आहेत. बदलत्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील, परंतु आपण एकत्र येऊन काम करून देश विकसित करुया. भविष्यकाळात समृद्ध जीवनाबरोबर खिलाडूवृत्तीने समाजासाठी कार्य करणा-यांची गरज आहे असे मत अमित बच्छाव यांनी सत्कारानंतर व्यक्त केले. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
पिंपरी – माथाडी कामगार दिवसभर घाम गाळून कष्टाचे काम करतात. परंतु, त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या बाजूने घेतलेल्या कायद्याची माथाडी मंडळाकडून अंमलबजावणी केली जात नाही, हे मोठे दुदैव आहे. माथाडी मंडळाने सुधारीत अध्यादेशाची त्वरित प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे. कायद्याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
तसेच, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना साकडे घातले असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरीत बुधवार दि.१० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेते ते बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, ज्ञानोबा मुजुमले, राजू तापकीर, भिवाजी वाटेकर, समर्थ नाईकवडे, ओमकार माने, नागेश व्हनवटे, पांडूरंग काळोखे, संदीप मधुरे, गोरक्षनाथ दुबले, संतोष जाधव, मारुती कौदरे आदी उपस्थित होते.
इरफान सय्यद म्हणाले, राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यात कार्यरत असणाऱ्या माथाडी, हमाल, कष्टकरी, असंघटीत हमाल या सारख्या श्रमजिवी कामगारांच्या नोकरीचे नियमन करणे, त्यांच्या कामाच्या बाबतीत अटी, शर्ती तसेच श्रमाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत अधिक चांगल्या तरतुदी करण्यासाठी माथाडी कामगार कायद्यात योग्य त्या सुधारणा केल्या आहेत. त्या संबंधीचा सुधारित अध्यादेव देखील काढला आहे. या सुधारित कायद्यात माथाडी मंडळाच्या योजनांच्या माध्यमातून असुरक्षित कष्टकरी माथाडी कामगारांच्या तसेच त्यांच्या मालकांच्या नोंदण्या करण्याबरोबर या असुरक्षित घटकांसाठी स्वतंत्र्य भविष्यनिर्वाह निधी, उपदान, बोनस, भरपगारी रजा, आरोग्य सुविधा, कामाच्या निश्चित वेळा, कामगारांना नोकरीविषयक संरक्षण अशा विविध कामगारांना सुविधा दिल्या आहेत. तसेच, मुंबई, ठाणे परिसरातील कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून आरोग्यसुविधा दिल्या जातात. परंतु, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड सारख्या औद्योगिक परिसरातील माथाडी कामगारांसाठी अशा सुविधा दिल्या जात नाहीत. जीवन विमा निगम या संस्थेच्या सुविधा मिळत नाहीत. सरकारचा हा कायदा व त्यातील योजना अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत.
प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. या सुधारित अद्यादेशाची माथाडी मंडळाकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे माथाडी कामगार विविध सोयी-सुविधांपासून वंचित राहत आहे. हाल अपेष्टात माथाडी कामगार विविध सोयी-सुविधांपासून वंचित रहात आहे. हाल अपेष्टात जीवन जगतात. त्यामुळे माथाडी कामगार मंडळाने सुधारित अद्यादेशाची त्वरित अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर माथाडी मंडळात करोडे रुपयांचा भरणा होत असतानादेखील मंडळातील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी हजारो कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. याकडेही सय्यद यांनी लक्ष वेधले आहे. हे प्रश्न लवकरात- लवकर मार्गी लागावेत, अन्यथा आगामी काळात महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने हजारो कामागारांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपण स्वतः कामगार मंत्री संभाजीराज निलंगेकर पाटील यांना निवदेन दिले आहे. मंत्री पाटील यांनी कष्टकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा देखील सय्यद यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चित्रपट सृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री येणे काही नवीन नाही. आपल्या कार्यक्रमानुसार ते येतात आणि जातात देखील. मात्र, सिनेसृष्टीमधील आघाडीचा अभिनेता सलमान खान पिंपरी-चिंचवड शहरात आला, अन् नागरिकांचे हाल करून गेला. असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. निमीत्त होते ते पिंपरी- चिंचवड शहरात नव्याने सुरु होणाऱ्या पी.एन.गाडगीळ या सोने विक्रीच्या नव्या दालनाचे.
पिंपरी – चिंचवड परिसरात पी.एन.जी च्या नव्या दालनाच्या शुभारंभासाठी सलमान खान येणार म्हणून संपूर्ण दिवसभर शहरात जोरदार चर्चा सुरु होती. तशी बातमी देखील शहरभर फिरत होती. मात्र, सायंकाळी ५ वाजण्याचा कार्यक्रम असताना देखील दुपारी १ वाजल्यापासून मोरवाडी चौकातील काही रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यांवरून दैनंदिन ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुरवरील पल्ल्यांच्या मार्गांनी तसेच गल्ली बोळातून मार्ग काढावे लागले. याचा परिणाम म्हणजे ज्या रस्त्यांवर रोजची शांतता पाहावयास मिळायची, त्याठिकाणी वाहतुक कोंडी निर्माण झाली.
इतके नव्हे तर, सलमान खान येणार म्हणून नागरिकांनी वेळेच्या आधी येवून कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. यामुळे त्याठिकाणाहून जाणाऱ्या वाहन धारकांमध्ये वाद निर्माण झाला होता. सलमान खान येणार म्हणून परिसरातील रस्ते बंद केले. त्यामुळे लांबून वळसा घालून नागरिकांना जावे लागले. सलमान खानला बघण्यासाठी नागरिकांची झालेली झुंबड, त्यात काही नागरिक बाजूला असलेल्या पुलावरून खाली पडले व जखमी झाले, पुलाचे कठडे हि तुटले ,काही नागरिक झाडावरून खाली पडले त्या वेळी झालेल्या गर्दीत नागरिक जखमी झाले याला जबाबदार पि.एन.जी राहणार का ?
तसेच, या परिसरातील निदान केंद्र आणि हॉस्पिटलकडे जाणारे रस्ते बंद केल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. सर्व रस्ते बंद केले असल्याने रुग्ण दवाखान्यात पोहचू शकले नाहीत, याला जबाबदार कोण ? असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यावेळी निदान केंद्र आणि हॉस्पिटल जवळ स्पीकर लावण्यात आले. मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाले, रुग्णांना झालेल्या या त्रासाला जबाबदार कोण ? हे सर्व प्रकार घडत असताना पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शैलजा मोरे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते औदुंबर बागडे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले, आकाश चव्हाण, भरत गायकवाड, जोपा पवार, सुखदेव जाधव, रामदास कटके आदी उपस्थित होते.
दरम्यान, पुनावळे येथील श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नगरसेविका रेखा दर्शले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
व्हीएस न्यूज - काळेवाडी सिग्नल जवळ मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एक महिला ही तरुणाला दोरी बांधून ओढत नेत असून त्याला भीक मागायला लावत असल्याचे स्माईल प्लस संस्थेचे योगेश मालखरे यांनी पाहिले. त्यांनी संशय येताच तरुणाकडे धाव घेतली असता संबंधित महिला पळून गेली. पिडीत तरुणाने त्याच्यावरील अन्यायाला वाचा फोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, अनुप सिंग (वय अंदाजे 30, रा. जॉनपूर,उत्तरप्रदेश) या पीडित तरुणाला दुणुकाबाई युवराज काळे (वय 70, रा. अहमदनगर) हिने केवळ हजार रुपयांना विकत घेतले होते. त्याला दिवसाला दीड हजार रुपयांचे टार्गेट देखील या बाईंनी दिले होते. ते पूर्ण झाले नाही तर त्याला रात्री उपाशी ठेवणे, सिगारेटचे चटके देणे असे अत्याचार केले जात. दुणुकाबाई ही अनुपला दोरी बांधून ओढत नेत असून त्याला भीक मागायला लावत होती. यावेळी मालखरे यांनी अनुपला विचारणा केली असता दुणुकाबाई हिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच अनुपही मला वाचवा असे ओरडू लागला. तिला पकडून विचारणा केली असता तिने अनुपला चक्क एक हजार रुपये देऊन भाड्याने आणल्याचे सांगितले. त्यानंतर मालखरे यांनी दोघांना वाकड पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी अनुपचा जबाब नोंदवून महिलेवर मुंबई भिक्षा प्रतिबंधक नियम कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची म्हणजे दुणुकाबाई हिचा पेहराव व अवतार भिक्षुक महिलेचा होता. मात्र तिची झडती घेतली असता हजारो रुपये आणि चक्क व्होल्वो बसच्या स्लीपर कोचचे तिकीट मिळाले. इतकेच नाही तर तिने पोलिसांना एका वकिलाचे व्हिजिटिंग कार्ड देत हा आमचा वैयक्तिक वकील असून याला फोन करा असे सांगितले. या प्रकारामुळे भीक मागणाऱ्यांचे एक मोठे रॅकेट शहरात कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
व्हीएस न्यूज - जुन्या भांडणातून मोकळ्या मैदानात उभा केलेला ट्रक जाळण्यात आला. ही घटना गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हिंजवडीतील पॉवर हाऊस येथे घडली. याप्रकरणी रामनारायण ज्ञानोबा पारखी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंजीर (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी माहिती दिली. पारखी आणि कुंजीर यांची यापूर्वी भांडणे झाली आहेत. त्यातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले आहे. पारखी यांचा ट्रक हिंजवडी येथील पॉवर हाऊस शेजारील वीटभट्टी जवळील मोकळ्या जागेत गेल्या सहा महिन्यापासून उभा आहे. कुंजीर यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन गुरूवारी सकाळी पहाटे पाच वाजता पारखी याचा ट्रक पेटवून दिला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002