व्हीएस न्यूज - मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने खडकी बोपोडी व दापोडी परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर अखेर महिनाभरापासुन झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आली असून जलपर्णी काढण्याच्या कामास अखेर प्रारंभ झाला आहे.
खडकी कॅंन्टोन्मेंट हद्दीतील महादेव वाडी येथिल मुळा नदीपात्रात तसेच साप्रस जुना होळकर पुला खालील नदीपात्रात व बोपोडी हॅंरीश पुलाखालील तसेच औंधरोड, शांता आपटे घाटा शेजारील नदीपात्रात आणि दापोडी बॉंम्बे कॉंलनी आणि स्मशानभुमी शेजारील नदीपात्रात मागिल अनेक महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात जलपर्णीत वाढ झाली आहे. नदी किनारील व आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत असून दुपारच्या वेळेसही डास प्रतिबंधक अगरबत्ती किंवा फवारणीचा वापर करण्याची वेळ येथिल नागरिकांवर आली आहे. डासांमुळे मलेरीया, हिवताप यासारख्या आजारांची लागण वाढली आहे. नागरीकांनी या प्रकरणी स्थानिक प्रशासन व संबधीत विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र याप्रकरणी दखल घेतली गेली नाही. महिनाभराच्या कालावधीनंतर झोपी गेलेले हे प्रशासन खडबडुन जागे झाले. नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामास प्रारंभ केला. यावेळी नगरसेविका सुनिता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोर, विजय शेवाळे, पिंपरीचे नगरसेवक रोहित काटे आदी उपस्थित होते.
कॅंटोन्मेंट बोर्डातील आरोग्य अधिक्षक बी. एस. नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलपर्णी दुर करण्याचे काम सुरु केले आहे. सर्व परिसरात डास प्रतिबंधक औषध फवारणीही करण्यात येत आहे. बोपोडी हॅंरीश पुला खालील तसेच औंधरोड शांता आपटे घाट येथिल नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामासही प्रारंभ करण्यात आला आहे. औंध क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य प्रमुख गोविंद सातपुते, मुकादम बाळु भागे, सुरेश कोकाटे, नामदेव जोशी, कैलास कंदारे, दामु दामसे, सुरेश जाधव आदी पथकाच्यावतीने जलपर्णी काढण्याची काम केले जात आहे.
व्हीएस न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून दुचाकीवरून आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने एका तरूणाला दुचाकीवरून धक्का देत कोयत्याने वार केले. सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास सांगवी फाटा उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. सुनिल मोनाप्पा सुतार (वय-24, रा. वैदवस्ती, पिंपळे-गुरव) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ आलोक सुतार (वय-27) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोन्या क्षिरसागर याच्यासह त्याच्या 7 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुनील व आरोपी यांच्यात पुर्वी भांडणे झाली होती. सुनिल सोमवारी पावणे बारा वाजता त्याच्या भावाची हातगाडी बंद करून दुचाकीवरून घराकडे जात होता. सांगवी फाटा येथे रक्षक चौकाच्या विरूध्द दिशेने आलेल्या चार मोटारीवरील आठ जणांनी सुनिलच्या दुचाकीला धक्का मारून खाली पाडले. शिवीगाळ करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री ताथवडे परिसरात घडला. याबाबत पोलीस शिपाई एम. पी. जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका दुचाकीस्वारासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई जाधव ताथवडे गावात रात्री आठच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. संबंधित दुचाकीवरील तरुणावर संशय आल्याने जाधव यांनी दुचाकीस्वारांकडे कागदपत्रे मागितली. आम्ही गाववाले आहोत, आम्हाला कागदपत्रे मागायची नाहीत, असे म्हणत त्यांनी जाधव यांच्या अंगावर धावून जात कॉलर पकडली. जोरात मागे ढकलून देत हात-पाय तोडण्याची धमकी दिली. तर गोंधळ पाहून जमा झालेल्या एका टपरी चालकाने व अन्य एक जण जाधव यांच्या अंगावर धावून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - सासरची मंडळी पत्नीला नांदायला पाठवित नसल्याच्या नैराश्यातून जावयाने सासू, सासरा आणि बायकोचे फोटो अंगाला चिकटवून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मोशीतील खंडेवस्तीत घडली. रुपेश उत्तम जाधव (वय- 26, रा. खंडेवस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने आपल्या मृत्यूला पत्नी व सासरचे मंडळी जबाबदार असल्याची चित्रफीत मोबाईलमध्ये तयार केली आहे.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे यांनी माहिती दिली. रुपेश हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील आहे. त्याचे आई-वडील गावी असतात. तीन वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले. पाच महिन्यांपूर्वी त्याची पत्नी एका कार्यक्रमानिमित्त माहेरी गेली होती. ती परत आली नाही. रुपेश पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला होता. सासरच्या मंडळींनी पत्नीला रुपेश सोबत पाठवले नाही. त्यातून आलेल्या नैराश्यातून सोमवारी रात्री स्वतःच्या अंगाला सासू-सासरे आणि बायकोचा फोटो चिकटवून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी रुपेशचा मोबाईल सापडला. त्यामध्ये 'माझ्या मृत्यूस पत्नी, सासू-सासरे जबाबदार असल्याचे' त्याने एका चित्रफितीतून म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - सतत संघर्ष, तिरस्कार, कटूता असेल तर पक्षाची वाढ होत नाही. झालेल्या चुका पोटात घालून पक्ष वाढीसाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांनी केले आहे. दि. ११ रोजी कामशेत येथे होणाऱ्या हल्लाबोल सभेच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी कॉंगेस पक्ष मावळ तालुका व तळेगाव शहराची पूर्व नियोजन बैठक येथील योगीराज हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बाफना बोलत होते.
माजी आमदार कृष्णराव भेगडे, पुणे पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, शोभा कदम, देहूरोड राष्ट्रवादीचे अध्यक्ष कृष्णा दाभोळे, तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, पुणे जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, माया भेगडे, राजाराम राक्षे, दत्तात्रय पडवळ, देहूचे माजी सरपंच अशोक मोरे, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, कैलास गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, अरुण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, तानाजी दाभाडे, शबनम खान, मंगल मुऱ्हे, रमेश घोजागे, सुनील दाभाडे, संतोष मुऱ्हे, तुकाराम आसवले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
प्रसंगी, तानाजी दाभाडे, दत्तात्रय पडवळ, सुरेश चौधरी, अशोक मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबुराव वायकर म्हणाले की, भाजपकडून कोणतीही विकास कामे होत नाही. यासाठी हल्लाबोल आवश्यक आहे. अर्चना घारे यांनी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी हल्लाबोल कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. बापूसाहेब भेगडे यांनी माणसाची उंची त्याने केलेल्या कामातून होते. सध्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील कामाबाबत तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा यावर शासनाकडून होत असलेला अन्याय याबाबत आवाज उठविला पाहिजे. कृष्णराव भेगडे म्हणाले की, कार्यकर्त्याच्या मनातील संभ्रम दूर केला पाहिजे. कामगार, शेतकरी, आर्थिक दृष्ट्या मागास यांचे प्रश्न कार्यकर्त्यांनी दूत होऊन सोडविले पाहिजे.
बाफना म्हणाले, पुणे शहर हि शरद पवार साहेबांची कर्मभूमी आहे. मावळातून हल्लाबोल कार्यक्रमाच्याव्दारे सर्व घटकांना एकत्र करून तालुक्याची ताकत दाखवू. सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी स्वतः पार पडतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भेगडे, रामभाऊ मराठे यांनी केले.
व्हीएस न्यूज – सोशल मिडीयावर महिलेसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी दोघांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली आहे. रवींद्र शिंदे (रा. पिंपरी) आणि दिगंबर पडवळ (रा. कार्ला, लोणावळा) असे आरोपींचे नाव असून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, आरोपी शिंदेला पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी माहिती दिली. संबंधित महिलेने कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली दिली होती. या महिलेविरोधात रवींद्र आणि दिगंबर यांनी रविवारी 28 मार्च रोजी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण तयार झाल्याने मंगळवारी आरोपींवर गुन्हा दाखल करून शिंदेला अटक केली आहे. तसेच पोस्ट टाकणारे तरुण कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत का ? याबाबत वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - वाल्हेकरवाडी चिंचवड येथे बेकायदेशीरपणे सिलेंडर विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न पुरवठा विभागाने बुधवारी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा आढळून आला असून अन्न पुरवठा विभागाने चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी परिसरात पवना नदीच्या किनारी एक पत्र्याचे शेड तयार केले आहे. त्यामध्ये नामांकित कंपनीच्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरला केला जात होता. याबाबत अन्न पुरवठा विभागाला माहिती मिळताच विभागाच्या सहा अधिकाऱ्यांनी बुधवारी या दुकानावर छापा मारला. यावेळी दुकानात सुमारे 250 गॅस सिलेंडर आढळून आले. त्यापैकी दोन सिलेंडर लिकेज सापडले. लिकेज असलेले सिलेंडर अग्निशमन विभागाचे विकास नाईक, विशाल बाणेकर, विठ्ठल तपकाळ आणि संजय महाडिक यांनी तात्काळ दुरुस्त केले. झोपडपट्टीतील मुलांच्या मार्फत ही बेकायदा सिलेंडर विक्री केली जाते. आरोपी नामांकित गॅस कंपन्यांच्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून लहान गॅसमध्ये भरून त्याची विक्री करीत होते. छापा मारल्या वेळी बेकायदा सिलेंडरचा मोठा साठा पकडण्यात आला आहे. अन्न पुरवठा विभागाने चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
व्हीएस न्यूज - भाजपच्या मुंबईतील स्थापना दिन मेळाव्यासाठी पिंपरीतून शुक्रवारी दि. 6 रोजी पक्षाचे 15 हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी जाणार आहेत. त्यासाठी शहरातील पक्षाचे एक खासदार आणि दोन आमदार यांना प्रत्येकी दहा बसेसचे टार्गेट देण्यात आले आहे. तर, पक्षाच्या प्रत्येक नगरसेवक आणि कोअर कमिटी सदस्याला एकेका बसचे लक्ष्य देण्यात आले आहे.
दरम्यान, मंत्रिपदासाठी शहरातील दोन्ही आमदारांचे नाव घेतले जात असल्याने त्यासाठी चालून आलेल्या या संधीचा ते उपयोग करून घेण्याच्या तयारीला लागले आहेत. मुंबईतील वांद्रे येथील "बीकेसी'वर सकाळी 11 वाजता हा मेळावा होत आहे. त्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संबोधित करणार आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने "एकला चलो रे'ची घोषणा नुकतीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा दसरा मेळावाही नुकताच नेहमीसारखा जोरदार झाला. त्यामुळे आपली ताकद दाखविण्यासाठी भाजपला स्थापना दिनाची संधी चालून आलेली आहे. त्यात लोकसभा निवडणूक सव्वावर्षावर आली आहे. मात्र, ती पाच महिने अगोदर म्हणजे या वर्षअखेरीसही होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील तयारी म्हणूनही या मेळाव्याकडे पाहिले जात आहे. या मेळाव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात शहराला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी आमदार महेश लांडगे यांची नावे त्यासाठी घेतली जात आहेत. त्यामुळे ते यानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन दाखवून देणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच हा पक्ष पालिकेत सत्तेत आला आहे. त्यामुळे या मेळाव्याकरिता जाण्याकरिता पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काल शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी एका मंगल कार्यालयात मेळाव्याच्या तयारीची बैठक घेतली. त्यात वरील टार्गेट देण्यात आले. सर्व बस सकाळीच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हे आदल्या दिवशीच जाणार आहेत. पक्षाचे 77 व सहयोगी अपक्ष पाच असे 82 नगरसेवक भाजपचे पिंपरीत आहेत. 21 कोअर कमिटी मेंबर आहेत. त्या प्रत्येकाने एकेक पन्नास सीटर बस करून त्यातून कार्यकर्त्यांना मुंबईला न्यायचे आहे. दोन्ही आमदारांच्या जोडीने पक्षाचे राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनासुद्धा दहा बस नेण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. पक्षाचा युवा मोर्चा या मेळाव्याला ज्योत घेऊन जाणार आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कचरा गोळा करण्याचे व वाहून नेण्याचे टेंडर वादात सापडले असून, याबाबत आता थेट "पीएमओ'कडेच तक्रार करण्यात आली आहे.
राज्यातील इतर शहरांपेक्षा वाढीव खर्चाचे हे टेंडर आहे. त्यावर कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयातने (पीएमओ) महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, वादात सापडलेल्या या टेंडरविरुद्ध तक्रार आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच त्याला स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने याप्रकरणी न्यायालयातही धाव घेतली आहे. सत्ताधारी भाजपची दोन्ही बाजूंकडून कोंडी करण्याचे विरोधी पक्ष "राष्ट्रवादी'ने ठरविले आहे.
गेल्या वर्षी थकित बिल देण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी आपल्याकडे तीन टक्के कमिशन मागत असल्याची तक्रार एका ठेकेदाराने "पीएमओ'कडे केली होती. नंतर हे प्रकरण गुंडाळण्यात आले. त्यामुळे कचरा टेंडर तक्रारीवरील कारवाईचीही तशीच गत होण्याची भीती राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली आहे. इतर शहरांत घरोघरचा कचरा गोळा करून त्याची वाहतूक करण्यासाठी प्रतिटन दीड हजार रुपये दर आहे. मात्र, पिंपरी पालिकेने तो 1780 दिला आहे. यामुळे वर्षाला सात कोटीचा फटका पालिकेला बसणार असल्याचा विरोधी पक्ष राष्ट्रवादीचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. तसेच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली.
एवढेच नाही, तर "पीएमओ'कडेही राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी तक्रार दिली. त्यावरून "पीएमओ'ने राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधानसचीव मनीषा म्हैसकर, पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार विलास लांडे व शितोळे यांनी केला.मात्र,हा चौकशीचा आदेश नसून त्यावर कार्यवाही करण्यास सांगण्यात आले असल्याचे लोणकर यांनी स्पष्ट केले. तक्रारदारांनी पाठविलेले पत्रच आम्हाला परत पीएमओकडून पाठविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
यानिमित्ताने आयुक्तांना राष्ट्रवादीने पुन्हा लक्ष्य केले. पालिकेचे ठराविक पदाधिकारी कचऱ्यातून लूट करीत असताना आयुक्त व मुख्य लेखापरीक्षक हे पहारेकऱ्याचे काम करीत होते, तर आरोग्य कार्यकारी अधिकारी सहकार्य करीत होते, असा आरोप लांडे, शितोळे, योगेश बहल, संजोग वाघेरे पाटील, मंगला कदम आदी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या दरोडखोरीला योग्य दिशा देण्याचे काम आयुक्त करीत असल्याचा ठपकाही या पदाधिकाऱ्यांनी ठेवला. कचऱ्याची फेरनिविदा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - गेल्या आठवड्यात मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे राजकीय वाद चांगलाच पेटला असून शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. या वादात आता राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार विलास लांडे यांनी उडी घेतली आहे. कचरा प्रश्नी कुणालाच गांभिर्य नाही. केवळ निवडणुका आल्यात म्हणून युतीचे खासदार, आमदार नागरिकांसमोर नाटक करत असल्याचा ‘हल्लाबोल’ विलास लांडे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील हल्लाबोल आंदोलनाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते योगेश बहल, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जेष्ठ नेते हनुमंत गावडे,नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले की, मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीची पाहणी करणे म्हणजे युतीच्या खासदार, आमदारांनी नागरिकांसमोर केलेले नाटक म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुक जवळ आल्यामुळेच आढळराव फिरकू लागलेत. यापूर्वी १५ वर्षात कचरा डेपोला कधीच आग लागली नव्हती. भाजपची सत्ता येताच आग कशी लागली हा प्रश्नच आहे. महापालिकेतील सत्ताधार्यांनी योग्य उपाययोजना केल्या नसल्यामुळेच आगीची घटना घडली आहे. भाजपच्या सत्तेला सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्ष मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात पुरविल्या होत्या. आताच्या सत्ताधा-यांना मात्र मुलभूत सुविधा पुरविता येत नसल्याचा आरोप विलास लांडे यांनी केला.
शहरातील कचरा व्यवस्थापनातून करदात्यांच्या पैशांची लूट – प्रशांत शितोळे
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या घरोघरचा कचरा गोळा करून “मोशी कचरा डेपो” येथे नेण्यासाठी मे.एजी एनव्हायरो व मे.बी.व्ही.जी.इ.लि. यांना कामे दिली आहेत. यातुन शहरातील करदात्यांच्या पैशांच्या लुटमारीचा प्रकार सुरु आहे. नाशिक शहरात मात्र हेच काम साधारण १५०० रुपये प्रतिटन या दराने पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात याच कामासाठी १७८० रुपये दर देण्यात आला असून प्रतिवर्षी साधारण ७ कोटी रुपयांची लूट होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी दिली.
व्हीएस न्यूज - चऱ्होली येथील महापालिकेच्या शाळेसाठी सी.एस.आर.च्या माध्यमातून खाजगी कंपन्याचे सहकार्य या उद्देशांतर्गत पंडित जवाहरलाल नेहरु प्राथमिक शाळा, चऱ्होली येथे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग साहित्य तसेच खेळाच्या साहित्यांचे गुरूवारी वाटप करण्यात आले.
याबरोबरच जानकीदेवी बजाज एज्युकेशनल इनिसिएटिव्ह या संस्थेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी (सी.एस.आर.) च्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना एल.ई.डी.टी.व्ही., ई. लर्निंग साहित्य, क्रीडा साहित्याचे वाटपही महापौर काळजे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता तापकीर, शाळेचे मुख्याध्यापक नामदेव उथळे, जानकीदेवी बजाज संस्थेचे के. बी. वाळके, हेमांगी ठोनावाला, शाळा समन्वय समिती अध्यक्ष पांडूरंग पठारे, उपाध्यक्ष सुनिल तापकीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पाच जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या कॅमल चित्रकला स्पर्धेत चिंचवड येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. फ गटामध्ये नयन भालेराव याने द्वितीय पटकाविला. त्याच्या चित्राची राज्यस्तरावर निवड झाली आहे. याबद्दल संस्थेचे ऍड. राजेंद्र मुथा, अनिल कांकरिया, प्रकाश चोपडा, प्राचार्य के.सी. अनेचा यांनी नयनचे अभिनंदन केले. नयनला चित्रकला शिक्षक जी. डी. हरिदास यांनी मार्गदर्शन केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002