कुंदन हुंडाईच्या ‘वेलफेयर’ मधून पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कुंदन हुंडाईचे मॅनेजिंग डायरेक्टर हितेश चड्डा, काळूशेठ चड्डा, पोलिस उपनिरीक्षक हरीष माने, प्रविण स्वामी, वरिष्ठ पत्रकार संतोष मिश्रा यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गेली दहा वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. या सोबत इतरही सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
- मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्स नेण्यास परवानगी देऊनही त्यास मल्टीप्लेक्समध्ये त्यास बंदी आहे. त्यांच्या निषेधार्थ चिंचवडमधील बिग सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी बिगसिनेमाच्या बाहेरील फलक फाडण्यात आला. तसेच खाद्य पदार्थ विक्री स्टॉलमधील पॉपकॉन फेकत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बिग सिनेमाच्या व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले.
या आंदोलनात राजू साळवे, हेमंत डांगे, अंकुश तापकीर, बाळा दानवले, दत्ता घुले, रूपेश पटेकर, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संजय यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मल्टीप्लेक्स बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच मल्टीप्लेक्सच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यास बंदी असेल तर मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांची विक्री का थांबवत नाही, असा सवाल करत खंडपीठाने थिएटर मालक तसेच राज्य सरकारला सुनावले होता. एवढेच नव्हे तर अवाचे सवा दराने विकले जाणारे हे पदार्थ सामान्य दरात विकले गेले पाहिजेत, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले आहे.
मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्यास परवानगी देऊनही त्यास मल्टीप्लेक्स प्रशासनाकडून सुरक्षेचे कारण देत टाळाटाळ करण्यात येते. त्याच्याच निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरात मनसेने आंदोलन केले. आंदोलनानंतर सचिन चिखले म्हणाले की, आज आम्ही शहरातील सर्वच चित्रपटगृहात जाऊन खाद्यपदार्थांची जादा दरातील विक्री बंद करण्याबाबत निवेदन दिले आहे. जर या मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, तर येत्या काळात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने कामे करु लागल्या आहेत. कायद्याने त्यांना समान अधिकार प्रदान केला आहे. त्यामुळे महिलांच्या सणात पुरुषांनी सहभागी होणे हा देखील समान हक्क आहे, असे मानत मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने अनोखी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. संस्थेच्या पुरुषांनी जन्मोजन्मी हीच बायको मिळण्यासाठी वडाच्या झाडाला फे-या मारत त्याची मनोभावे पूजा केली.
नवी सांगवी येथे मागील तीन वर्षांपासून ही अनोखी वटपौर्णिमा मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने साजरी करण्यात येते. पत्नीला वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे आणि हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी यासाठी वडाच्या झाडाला फे-या मारत त्याची पूजा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, संगीता जोगदंड, अॅड. सचिन काळे, सामाजिक कार्यकर्ते अरूण पवार, अरविंद मांगले, वसंतराव चकटे, पी. पी. पिल्ले, मुरलीधर दळवी, हनुमंत पंडित, दीपक शहाणे, गजानन धाराशिवकर, दत्तात्रय घोरपडे, अदिती निकम, शिवानंद तालकोटी, आप्पाजी चव्हाण, जीवन धवन, सतीश धावडे आदी उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी सर्व महिला आपल्या पतीसाठी वटवृक्षाला सात फे-या मारतात. त्याला सूत गुंडाळले जाते. पुराणातील कथेप्रमाणे सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणले होते. या कथेचे समरण करून वटवृक्षाची पूजा करून सौभाग्य मागण्याचा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे असे म्हटले जाते. परंतु ही संस्कृती अपवाद वगळता देशातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे पुरुषांनी देखील आपल्या पत्नीसाठी अशा प्रकारचे सण साजरे केले तर त्यात वावगे काहीही नाही, असे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या वतीने सहभागी सर्वांना प्लास्टिक न वापरण्याची व पर्यावरण जनजागृतीची शपथ देण्यात आली.
- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकालात सव्वा वर्षात तीस सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी एकवीस सभा तहकूब करण्याचा ‘राष्ट्रीय विक्रम’ करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणा-या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा अशीही मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.
संजोग वाघेरे पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड पालिकेत भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकाळात सव्वा वर्षात तीस सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी एकवीस सभा तहकूब करण्याचा ‘राष्ट्रीय विक्रम’ करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणा-या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा. सर्वसाधारण सभा तहकूब करणे आणि उपसूचना देण्याला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नेहमी विरोधच होता. अगदीच अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीच्या काळात सभा तहकूब केली जायची. परंतू शहरातील भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिका-यांना ‘टक्केवारीच्या’ राजकारणातच जास्त रस असल्यामुळे सभा तहकूबीचा राष्ट्रीय विक्रम करणे शक्य झाले आहे.
स्मार्ट सिटी व नदी सुधार प्रकल्पासाठी किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणा-या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरीकांना मिळाली पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा वर्षात केंद्र व राज्य सरकारकडून शहरात अत्यावश्यक विकासप्रकल्प राबविण्यासाठी हजारों कोटींचा निधी देण्यात आला. त्यानिधीतूनच मागील काळात झालेल्या पुणे – मुंबई महामार्गावर व औंध – रावेत रस्त्यावरील उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटरची कामे करण्यात आली. यापैकी काही प्रकल्प राष्ट्रवादीच्या काळात नव्वद टक्के पूर्ण करण्यात आली होती. उर्वरित दहा टक्के काम करुन त्यांची उद्घाटने श्रेयवादावरुन थांबवून नागरिकांना वेठीस धरण्याचे व पाणी प्रश्नाचे गलिच्छ राजकारण या शहरातील नागरीकांनी कधी पाहिले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकालात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता भाजपच्या काळात त्रेचाळीसाव्या क्रमांकावर गच्छंती झाली आहे. अशीही टिका वाघेरे पाटील यांनी केली आहे.
- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातील वर्गीकरणाच्या सुमारे २५८ कोटी रुपयांच्या विषयाला उपसूचनांसह बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. या वर्गीकरणास राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने विरोध नोंदविला. त्यावरून विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन गोंधळ घातला. दरम्यान, वर्गीकरणाचे विषय मागे घेण्यात यावेत, असे पत्र आयुक्तांनी शुक्रवारी (दि.२२) दिले होते.
जून महिन्याच्या तहकूब सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या सभेत आयत्यावेळी तब्बल २६४ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे विषय मंजूर केले होते. त्या विषयाची सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली होती. बुधवारी (दि.२०) झालेल्या सर्वसाधारण सभेत ‘वन-के’ खाली वर्गीकरणाचे ५ विषय आयत्यावेळी दाखल करून घेतले होते. त्या विषयावर शुक्रवारीच्या (दि.२२) सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री आयुक्तांनी वर्गीकरणाचे पाचही विषय मागे घेण्याचे पत्र महापौरांना दिले होते. या ५ पैकी क्रमांक १९ चा इंद्रायणीनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाचा विषय मागील सभेने तहकूब केल्याने त्यावर निर्णय घेता येणार नसल्याचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी स्पष्ट केले. विषय क्रमांक २० ला सीमा सावळे यांनी उपसूचना देऊन इंद्रायणीनगरातील ३ रस्त्यांचे कामांची वर्गीकरण शून्य करण्याचा उपसूचना दिली. त्यास आशा शेंडगे यांनी अनुमोदन दिले. उर्वरित चार विषय विरोधकांचा विरोध डावलून मंजूर केले.
दरम्यान, विषय क्रमांक २० वर मतदान घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. त्यानुसार झालेल्या मतदानात उपसूचनेसह मंजूरीच्या बाजूने ६६ तर विरोधात ३७ मते मिळाले.
महापौरांनी हा विषय मंजूर केला. त्यानंतर लगेच २१ क्रमांकाचा विषय देखील मंजूर केला. त्याला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोरील हौद्यात धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. या गोंधळातच महापौरांनी विषय क्रमांक २२ व २३ मंजूर करून टाकले आणि सभा संपल्याचे घोषित केले. त्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
व्हीएस न्यूज - राहत्या घरात वायरने गळफास घेऊन एका दांम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या हत्या केली. ही घटना गुरूवारी दुपारी सव्वा तीन वाजता चऱ्होली येथे उघडकीस आली. विशेष म्हणजे हे दांम्पत्य पंधरा दिवसापुर्वीच चऱ्होली येथे राहण्यास आले होते.
उत्तम तुकाराम सुर्यवंशी (वय-37) व मुक्त सुर्यवंशी (वय-31, रा. भोसले वस्ती, चऱ्होली, मुळ. परभणी) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. सुर्यवंशी दांम्पत्याला 1 सात वर्षांची मुलगी व 6 वर्षांचा एक मुलगा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्यवंशी दांम्पत्य मुळचे परभणीचे असून 15 दिवसापुर्वीच चऱ्होली येथे राहण्यास आले होते. उत्तम सुर्यवंशी हे इलेक्ट्रेशियनची काम करत होते. गुरूवारी घरात कोणी नसताना सुर्यवंशी दांम्पत्याने वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना शेजाऱ्यांनी त्वरीत पालिकेच्या वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज ः पिंपरी-चिंचवडमधील एका आमदाराच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करत त्रिकुटाने त्याच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची चैन जबरदस्तीने तोडून नेली. हा प्रकार नुकताच पिंपळे-गुरव येथील काशिद पार्क येथे घडला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिsसच सुरक्षित नसलीत, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याप्रकरणी शैलेश काळभोर (वय-36, रा. पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळभोर हे पोलिस शिपाई असून शहरातील एका मातब्बर आमदाराचे ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
याबाबत फौजदार अ. बी. शेटे यांनी माहिती दिली. फिर्यादी काळभोर गुरूवारी त्यांच्या गावी लोणी काळभोरला गेले होते. गावावरून परत येताना पिंपळे-गुरव येथील काशिद पार्क येथे पाठीमागून आलेल्या एका स्कॉर्पिओ मधील त्रिकुटाने त्यांचा स्वीफ्ट डिझायर मोटारीला स्कॅार्पिओ अडवी लावून त्यांना अडविले. स्कॉर्पिओमधील त्रिकुटाने काळभोर यांना विनाकारण मारहाण करत त्यांच्या गळ्यातील 1 लाख 20 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारून जबरदस्तीने तोडून नेली. तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडून नुकसान केले. सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - ज्येष्ठ नागरिक संघ मेट्रोपॉलीटन, चिंचवड यांच्या वतीने इयत्ता 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
चिंचवडगाव येथे झालेल्या या सत्कार कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र कांकरीया, मोटार वाहन निरीक्षक शितल पवार, विठ्ठल भोईर, अनंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना फाईल फोल्डर, पेन, कॅलक्युटर, वही, मार्गदर्शन पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश जैन, मनद प्रसाद, श्रीकांत आंबेकर, संभाजी वाळके, प्रदिप पवार, कांतीलाल भंडारी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन खुशाल दुसाणे यांनी तर आभार शरद लुणावत यांनी मानले.
व्हीएस न्यूज - टॅंकरला एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात देहूरोड येथील सेंट्रल चौकात गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास एक टॅंकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. देहूरोड मधील सेंट्रल चौकाजवळ टॅंकर आला असता अचानक चौकात दुसरा ट्रक घुसला. अचानक समोर आलेल्या ट्रकमुळे टॅंकर चालकाचा टॅंकरवरील ताबा सुटला आणि टॅंकर समोरच्या ट्रकला मागच्या बाजूने धडकला. यामध्ये टॅंकरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक आणि क्लीनर दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अचानक आडवा आलेल्या ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला.
व्हीएस न्यूज - हॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्याने ट्रॅफिक वॉर्डनच्या मोटारीचा पाठलाग करून त्यांना शिवीगाळ करत मोटारीची तोडफोड केली. हा प्रकार थेरगाव मधील बापूजी बुवा कॉर्नरवर गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास झाला.
बालाजी किसन सगर (वय 38, रा. इंद्रायणी नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर उर्फ विनोद सातपुते (रा. गणराज कॉलनी, थेरगाव) याच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगर ट्राफिक वॉर्डन म्हणून वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते आपल्या मोटारीने घरी जात होते. त्यावेळी बापुजी बुवा कॉर्नरला रस्त्याच्या मधोमध सातपुते हा त्याच्या तीन मित्रांसोबत बोलत थांबला होता. रस्त्यावरून जाण्यासाठी सगर यांनी हॉर्न वाजविला. त्यावरून सातपुते आणि सगर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. सातपुते याने त्याच्या तीन मित्रांना घेऊन सगर यांच्या मोटारीचा पाठलाग केला. मोटारीवर दगडफेक करून मोटारीचे नुकसान केले. मोटारीवर दगडफेक झाल्याने सगर यांनी मोटारीतून पळ काढला. त्यामुळे ते बचावले. पोलिस हवालदार एस. एस. रासकर अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज ः कचरा डेपोवर कचरा वेचण्यासाठी गेलेली दोन मुले डेपोवर असलेल्या 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात पाय घसरून पडून दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपो येथे गुरूवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
इम्रान उर्फ सोनू रफिक शेख (वय 14) आणि अस्लम इस्माईल मुजावर (वय-16, दोघेही रा. वाकसई, मुळ गाव उदगीर) असे बुडालेल्या मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले एकमेकांची मावसभाऊ आहेत. सोनू याचे वडील रफिक शेख हे कचरा डेपोमध्ये कचरा उचलण्याच्या ठेक्यामध्ये काम करतात आणि डेपोच्या बाजूलाच असलेल्या वाकसई चाळ येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या मेव्हणीचा मुलगा असलेला अस्लम हा त्यांच्यासोबत लोणावळ्यात आला होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सोनू हा अस्लम याच्या सोबत कचरा डेपोमध्ये गेला होता. खड्याच्या जवळ गेल्याने दोघेही पास घसरून पाण्यात पडून त्यांचा बुडून मृत्यू झाला.
यातील इम्रान उर्फ सोनू याचा मृतदेह हा लगेच मिळून आला पण अस्लम याचा मृतदेह बराच वेळ सापडत नव्हता. अखेर अस्लम याला शोधण्यासाठी स्थानिक शिवदुर्ग मित्र या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी 3.40 वाजता अस्लम याचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गला यश आले. या मोहिमेत शिवदुर्गचे प्रविण देशमुख, अजय शेलार, सागर कुंभार, राजेंद्र कडु, आनंद गावडे, रोहित वर्तक, सागर पडवळ, दिनेश पवार, सुनिल गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
व्हीएस न्यूज - , ः ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळ्या जवळ आला आहे. या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांनी दिले.
आळंदी येथील प्रस्थान सोहळ्याचे आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रभारी तहसीलदार रवींद्र सबनीस, पालखी सोहळा समन्वयक उदयसिंह भोसले, समन्वयक तहसीलदार रुपाली सरनौबत, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त अजित कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वीज अभियंता सुभाष ढापसे, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका स्मिता रायकर, प्रतिभा गोगावले, सुनीता रंधवे, नगरसेवक सचिन गिलबिले, विभाग प्रमुख संघपाल गायकवाड, दत्तात्रय सोनटक्के, राजेश पवार, मंडलाधिकारी चेतन चासकर, शासकीय खात्याचे विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी समीर भूमकर या बैठकीस अनुपस्थित असल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. माउली मंदिरातून 6 जुलै रोजी दुपारी चारचे सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. या सोहळ्यात सुविधा उपलब्द करून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रांत प्रसाद यांनी विविध विभाग प्रमुख आणि शासकीय खात्याचे अधिकाऱ्यांना दिले. दिलेल्या नियोजनाचे प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे सूचना त्यांनी केल्या.
सोहळ्यात नागरी सुविधा, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षा यंत्रणा, दर्शन बारी, पोलीस बंदोबस्त, भाविक आणि नागरिक तसेच परिसराची सुरक्षा यावर लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितले. पाण्याचे टॅंकर, वाहन प्रवेश, पार्किंग, अतिक्रमण कारवाई, पादचारी मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पास शिवाय वाहनांना प्रवेश देऊ नये असे प्रांत प्रसाद यांनी सांगितले.
भाविकांसाठी केरोसीन आणि इंधन, गॅस पुरवठा पुरेशा प्रमाणात मिळेल याची दक्षता महसूल प्रशासनाने घेण्याचे आदेश देण्यात आले. मध्यवर्ती नियंत्रण कक्षात सर्व प्रकारची माहिती विभाग निहाय देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या 2 तारखेपर्यंत सर्व प्रकारची तयारी पूर्ण करून अंतिम आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पाणी नमुने आणि उघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच हॉटेल तपासणी करून दोषींवर कारवाईसाठी प्रस्ताव देण्याचे सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. रस्ते भाविक आणि नागरिकांना खुले राहतील याची दक्षता परिषदेने घेण्यास यावेळी त्यांनी आदेश दिले. यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. वीज पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता महावितरणने घेण्याचे आदेश देत संपर्क यंत्रणा सुरु राहील यासाठी त्यांनी सुनावले. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांच्यासह विविध अधिकारी, प्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांनी चर्चेत भाग घेतला. स्वच्छता गृहांची स्वच्छता, शहराची स्वच्छता, जंतुनाशके फवारणी, धुरीकरण यावर स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्य विभागाचे प्रमुख उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002