व्हीएस न्यूज - सरकार एकही काम वेळेवर करत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागत आहे. शेतकरी कर्जमाफी, अनधिकृत बांधकामे, शास्ती कर असे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यव्यापी प्रलंबित प्रश्न घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निगडी ते आकुर्डीतील तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. या मोर्चात शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील,माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर आदी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांचा सरकारच्या विरोधात उद्रेक दिसून आला.
अजित पवार म्हणाले की, सरकार जबाबदारपणे वागत आहे. त्यामुळे अशा प्रकारची आंदोलने करावी लागत आहेत. सरकारच्या विरोधात यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची आंदोलने करणार असून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा मुख्य मुद्दा असणार आहे. मुंबई सारख्या विद्यापीठामध्ये पेपर तपासले न गेल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले. राष्ट्रवादीच्या राज्यात वीज कपात बंद होती. यांनी कोळसा घ्यायला पैसे नाहीत म्हणून वीज कपात केली. आज राज्याचे पोलिस जनतेला मारत आहेत. सांगली जिल्ह्यात जिवंत माणसाला मारुन जाळण्याचा प्रकार घडला. असं जिवंत माणसाला मारणार हे सरकार आहे, अशा शब्दात पवार यांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविली.
जीएसटी लावताना सामान्यांचा विचार केला नाही. आमची सत्ता असताना शहराला स्वच्छतेचा मान मिळवून दिला. आत्ताचे शहर बघितले तर सगळीकडे कचऱ्याचे ढिग साचले आहेत. शास्ती कर रद्द करणार होते, पण तो रद्द झाला नाही. त्याचप्रमाणे रेड झोनचा प्रश्नही सोडविला नाही. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देणार होते. परंतु, एकाच्याही हातावर दमडीही ठेवली नाही. कोपर्डी प्रकरणात दिरंगाई केल्याने हे हल्लबोल आंदोलन करावे लागत आहे,असेही पवार यांनी सांगितले.
कौशल्यानुसार टक्केवारीवर गुण, शिक्षण विभागाचा निर्णय
व्हीएस न्यूज – दहावीच्या बोर्ड परीक्षेत कला आणि क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने देण्यात येणा-या अतिरिक्त गुणांच्या खैरातीला आता आळा घालण्यात येणार आहे. यामुळे या अतिरिक्त गुणांमुळे निर्माण होणारा गुणांचा फुगवटा अखेर फुटणार आहे. या परीक्षेत बसणा-या विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याऐवजी, त्यांच्या कौशल्यानुसार टक्केवारीच्या आधारावर हे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शुक्रवारी जीआरच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षण विभागातर्फे कला, क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातात. त्यामुळे या निर्णयाच्या मदतीने मुंबईसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले होते. दरम्यान निकालाचा टक्का वाढविण्यासाठी या निर्णयाचा उपयोग करून घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शिक्षण विभागाने या अतिरिक्त देण्यात येणा-या गुणांच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी जाहीर झालेल्या नव्या निर्णयानुसार, शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादनात तिसरी आणि पाचवी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातील. सांस्कृतिक कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधूनच परीक्षा देणे बंधनकारक आहे. चित्रपटासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणा-या बालकलाकाराला दहा गुण, तर राज्य पातळीवर पुरस्कार मिळवणा-या विद्यार्थ्यांला पाच गुण अतिरिक्त दिले जाणार आहेत. प्रयोगात्मक लोककलेसाठी अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना शिक्षण विभागाने सांस्कृतिक विभागाला केली आहे. या अभ्यासक्रमानुसार गुणदान ठरवले जाणार आहे.
इंजरमिजिएट चित्रकला परीक्षेत अ श्रेणी मिळाल्यास सात गुण, ब श्रेणीसाठी पाच गुण, क श्रेणीसाठी तीन गुण दिले जातील. लोककलेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगांच्या संख्येनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार २५ ते ४९ प्रयोग केलेल्या विद्यार्थ्यांना पाच गुण, पन्नासपेक्षा जास्त प्रयोग करणा-या विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जाणार आहेत.
वाहतूक विभागाची नवी नियमावली जारी
व्हीएस न्यूज – वाहतूक विभागाकडून टोईंगबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये अनेक नव्या नियमांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
नुकतीच मुंबईतील मालाड परिसरात महिला आणि तिचा लहान मुलगा कारमध्ये असताना वाहतूक पोलिसांकडून त्यांची गाडी उचलून नेण्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. सुरुवातीला ही गोष्ट समोर आल्यानंतर वाहतूक पोलिसांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, काही दिवसांतच या घटनेची दुसरी बाजू दाखवणारा व्हिडिओ समोर आला. यामध्ये संबंधित महिलेची चूक असल्याचेही स्पष्ट झाले.
त्यामुळे भविष्यात असा कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी वाहतूक विभागाकडून टोईंगबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नव्या नियमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. एखादे वाहन उचलत असताना त्या वाहनाचा मालक तेथे आल्यास दंडाची रक्कम आणि टोईंग शुल्क आकारून ते वाहन सोडण्यात यावे. तसेच गाडी टो करण्यापूर्वी ध्वनिक्षेपकावरून गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येणार आहे.
याशिवाय, एखादी गाडी नो-पार्किंग क्षेत्रात उभी असेल, पण गाडीचा चालक आतमध्ये बसला असेल तर ती गाडी उचलू नये. तसेच या गाडय़ा उचलण्यासाठी पोलिसांना मदत करणा-या कर्मचा-यांनी संबंधित वाहनाच्या मालकाशी गैरवर्तन किंवा उद्धटपणे वागू नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात शाहीद झालेल्या जवानांना मेणबत्त्या लाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चिंचवड येथे पोलीस स्टेशन मध्ये श्रद्धांजली च्या कार्यक्रमात चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विठ्ठल कुबडे यांनी शहिद जवानांना मेणबत्ती लावून,पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली त्यांच्या बरोबर तेथील पोलीस निरीक्षक व्ही. एस. साळुंखे,सौ.एस.ए.देवतळे,एस.एस.कांबळे, पोलीस ऊप निरीक्षक पी.डी. महाले,आर.बी.सोडनवार,आर.जे.ढेरे,एच.आर.केदार,एस.के.जाधव, धोंडिभाऊ बोरकर तसेच सर्व पोलीस कर्मचारी वर्ग त्याच प्रमाणे स्वायत्र श्रमिक महिला प्रतिष्ठान चे सभासद,संस्कार प्रतिष्ठान चे सर्व पदाधीकरी ,पोलीस मित्र संघटनेचे सर्व सभासद त्यात गोपाळ बिरारी,गजानन चिंचवडे, रमेश होतारी, मोहन गायकवाड,निर्मला जगताप, स्मिता दुसाने,निलेश सायकर,सुभाष मालुसरे,धनंजय कुलकर्णी,मदन जोशी आदी मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत, नजर चुकवून हात चलाखीने दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने चोरुन नेले. ही घटना तळवडे येथील भवानी ज्वेलर्स या सराफी पेढीत 18 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. अनिल बिले (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल बिले यांची तळवडेत तुळजा भवानी ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. याठिकाणी त्यांची आई असताना, दागिने पाहण्याच्या बहाण्याने एक जण आला. त्यांच्या आईला बोलण्यात गुंतवून नजर चुकवत प्लास्टिकच्या डब्यातील दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. निगडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – काळेवाडी येथे शासकीय नोकरीचे अमिष दाखवून तरुणांची अकरा लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. एका कोचिंग क्लास चालकाने ही फसवणूक केली.
संजय लोखंडे (वय 46, रा. थेरगाव यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रवींद्र विक्रम जाधव (वय 45, रा.बीड) असे आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे. प्रमोद मधुकर पाटकुले (वय 26 रा. थेरगाव) 3 लाख 60 हजार, प्रमोद भाऊसाहेब जोंधळे (वय 27 रा.कोकण गाव जि. अहमदनगर) 3 लाख 30 हजार, रोहिदास शेळके (वय 35 राहटणी) याने 2 लाख 80 हजार, सुजाता वसंत गागरे (वय 23 कानड गाव, जि, अहमदनगर), 1 लाख 30 हजार रुपये,शांताराम सुभाष गायकवाड (काळेवाडी) आणि प्रियांका गायकवाड प्रत्येकी 30 हजार रुपये रवींद्रला दिले आहेत.
गेली काही महिन्यांपासून जाधव हा काळेवाडी येथे आदर्श क्लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. या क्लासला सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यात सुजाता वसंत गागरे आणि प्रियांका गायकवाड या दोन मुलींसह चार तरुणांचा समावेश होता. समाज कल्याण विभाग, माहिती बालकल्याण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क येथे क्लार्क पदासाठी जागा निघाल्या आहेत. 16 सप्टेंबरला शिवाजीनगर येथे ऑफलाईन परीक्षा होईल. 30 सप्टेंबरला नोकरीवर रुजू व्हाल, असे सांगत रवींद्रने या विद्यार्थ्यांकडून 11 लाख 60 हजार रुपये घेतले. त्यानंतर तो पसार झाला. वाकड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश माने तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – यंदाचा श्रीमन श्रीमहासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. समाधी महोत्सवाचे हे 456वे वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन 27 नोव्हेंबर रोजी परमपूज्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8 ते 9 दरम्यान श्रीमोरया गोसावी चरित्रपठण सतीश कुलकर्णींद्वारे होणार आहे तर चरित्रपठणाचे संयोजक किसनराव पाटील आहेत.
27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान रोज सायंकाळी पाच ते सात वाजे दरम्यान चारुदत्त आफळेबुवा यांचे दत्त संप्रदाय व गुरुशिष्य परंपरा या विषयावर प्रवचन होणार आहे. 5 आणि 6 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सात वाजे दरम्यान प्रसिद्ध व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर यांचे नाती जपुया या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवार 5 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता जितेंद्र अभ्यंकर आणि राधा मंगेशकर यांच्या गायनाचा मोगरा फुलला हा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी 6 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता प्रख्यात गायक आनंद भाटे (आनंद गंधर्व) यांचा आनंदरंग हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सात दरम्यान संभाजी भिडे गुरुजी यांचे श्रीशिवछत्रपती आणि आपण या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच याच दिवशी सायंकाळी साडे सात वाजता श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात माननीय संभाजी भिडे (गुरुजी) यांना परमपूज्य जगात गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. गुरुवारी सायंकाळी आठ वाजता विश्वविख्यात कलाकार तौफिक कुरेशी यांचे जेम्बे वादन होणार आहे.
शुक्रवार 8 डिसेंबर रोजी मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज,विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी,तसेच श्रीमोरया गोसावी समाधीची महापूजा, दिंडी सोहळा,हभप प्रकाशमहाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन आणि दुपारी १२ वाजले पासून महाप्रसाद वितरण होणार आहे. या कार्यक्रमांद्वारे सोहळ्याची सांगता होणार आहे.
व्हीएस न्यूज - केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभरात आंदोलने सुरु केली आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस येत्या रविवारी (दि. 26) “हल्लाबोल’आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: सहभागी होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, माजी महापौर व नगरसेविका संगिता ताम्हाणे, संजय वाबळे, सरचिटणीस फजल शेख, आनंदा यादव, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, अरूण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रदीप गायकवाड, विशाल काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, संतोष वाघेरे, रशिद सय्यद आदी उपस्थित होते.
रविवारी दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. हनुमान मंदीर, आकुर्डी गावठाण ते तहसील कार्यालय प्राधिकरण येथे धडकणार असून मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकार सर्वंच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. फसलेली नोटबंदी, पूर्णतः फसलेली कर्जमाफी, वाढती महागाई, बिघडलेली कायदा-सुव्यस्था, लोडशेडिंग, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, शिष्यवृत्तीचे प्रश्न,वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण असे विविध प्रश्न सरकाराला सोडविता आले नाहीत. निवृत्त शिक्षक, शिक्षक यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, सरसकट शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले?, स्मार्ट सिटीचे पुढे काय झाले. रिंग रोड रद्द करावा, रेडझोनची हद्द कमी करण्यात यावी. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. शहरातील अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा याचा जाब विचारण्यासाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याचे, संजोग वाघेरे यांनी सांगितले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे माजी आमदार, माजी महापौर, आजी-माजी नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले आहे.
मनसेचा १५ दिवसांची अल्टीमेटम, शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती
व्हीएस न्यूज – शहरातील राष्ट्रीयकृत बॅंकांमधील मराठी कामकाज कालबाह्य होत चालले असल्याचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा खळ्ळखट्याक करणार आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांनी आर्थिक कामकाजात मराठी भाषेचा वापर सुरू करावा, अन्यथा “मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी (दि. 23) दिला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॅंकांमधील मराठीच्या वापरासाठी आंदोलन छेडण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढून सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांना ग्राहकांच्या सोयीसाठी कामकाजामध्ये प्रादेशिक भाषेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, रिझर्व्ह बॅंकेचे आदेश धाब्यावर बसवून सर्वच राष्ट्रीयकृत बॅंका मराठीचा वापर करण्यास उदासिन आहेत. त्याचा त्रास शहरातील मराठी भाषिक नागरिकांना होत आहे. त्यासाठी शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांनी कामकाज मराठीत करावे, असे चिखले यांनी सांगितले.
बॅंकांचे विविध प्रकारचे फॉर्म, माहितीपत्रके, सूचना फलक, बॅंकेच्या नावाचा फलक हा मराठी भाषेत असावा. बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी मराठीतून संवाद साधावा, अशा प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांचे पत्र मनसेतर्फे सर्व राष्ट्रीयकृत बॅंकामधील व्यवस्थापनाला देण्यात येणार आहे. त्यांना पंधरा दिवसांची मुदत देखील दिली जाणार आहे. तरीही, कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यास उदासिनता दिसून आल्यास संबंधित बॅंकांमध्ये मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक आंदोलन केले जाईल, असे चिखले यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला मनसचे शहर सचिव राजू सावळे, हेमंत डांगे, राजेश अवसरे, रुपेश पाटेकर, संजय यादव, विशाल मानकरी, सुशांत साळवी, अक्षय नाळे, सुरेश सकट, संगिता देशमुख, विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा (एनएमव्हीपीएम) दुबई येथील मोगरासिस या प्रथितयश आयटी कंपनीसोबत औद्योगिक शैक्षणिक सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. मोगरासिसचे संचालक विपुल टापरे आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.
या करारांतर्गत कॅम्पस प्लेसमेंट, विद्यार्थी प्रशिक्षण, संशोधन कार्य आदी महत्वपूर्ण बाबींवर एकत्रितपणे काम सुरु होणार असल्याची माहिती प्रा. विजय नवले यांनी दिली. यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष आमदार संजय तथा बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस.डी.गराडे,विश्वस्त भाईजान काझी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पद्माकर विसपुते, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी या कराराविषयी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002