व्हीएस न्यूज - चिंचवड येथील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून एमबीए उत्तीर्ण झालेल्या दादासाहेब नरळे, अजय स्वामी, शाहरूख खान यांनी “स्टडी मंत्रा’ या“डिजिटल’ युगातील एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक “अॅप’ची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कमला एज्युकेशनचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी कौतुक केले आहे.
“स्टडी मंत्रा’चे तिन्ही विद्यार्थ्यांना आलेले अनुभव लक्षात घेऊन दास इन्फोटेक प्रा. लि. संस्था निर्माण केली आहे. त्याचे उद्घाटन डॉ. शहा यांच्या हस्ते करण्यात आले. तर, “स्टडी मंत्रा’चे उद्घाटन कॅम्प एज्युकेशनचे संचालक डॉ. भरत कसार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक ब्रिगेडियर डॉ. ए. के. लाल, आयआयएमएसचे प्राचार्य भाग्यश्री कुंटे, प्रा. पवन शर्मा, प्रा. गुरूराज डांगर आदी उपस्थित होते.
डॉ. दीपक शहा म्हणाले की, स्पर्धेच्या युगात दररोज नवनवीन आव्हाने आली तरी विद्यार्थी दशेतच त्यावर मात केली पाहिजे. तसेच, डिजीटल शिक्षण काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांच्या नवीन कल्पनांना संस्था प्रोत्साहन देत आहे. विद्यार्थ्यांनी एमबीए पुस्तकांचे “डिजिटल’ स्वरुप “स्टडी मंत्रा’वर उपलब्ध केले आहे. समाजातील शिक्षणापासून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना बाजारातील महागडी पुस्तके विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे मोबाईलवर पुस्तके सहज उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली आहे.
व्हीएस न्यूज – वृक्ष संवर्धन नियमांचे उल्लंघन करत परवानगी शिवाय 10 ते 15 वर्ष जुने फायकस प्रजातीचे वृक्ष महापालिका अधिकाऱ्यांनी बुडापासून तोडले आहे. या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
मडिगेरी यांनी अधिनियमानुसार आयुक्तांना नोटीस पाठविली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, झाड तोडण्यासाठी अर्ज करणारे अर्जदार विठ्ठल बबन माने, उद्यान विभाग अधिकारी यांनी संगनमताने घराची शोभा जात आहे. तसेच, झाडापासून धोका असल्याचा दावा करत 35 ते 40 फूटी उंच फायकस प्रजातीचे झाड दिनांक 4 ऑक्टोबरला तोडले आहे. जे महाराष्ट्र राज्य नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या झाडामुळे कोणासही नुकसान पोहचणार नव्हते.
महापालिकेच्या अधिकऱ्यांनीच नियम मोडीत काढले आहेत. झाड कापलेल्या जागेवर जाऊन त्याचा पंचनामाही झाला नाही. उलट त्यांच्याशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी इंद्रायणीनगर येथील अर्जदार व नामनिर्देशीत सदस्यांकडील वृक्ष छाटणीसाठी मागणी अर्ज आणून त्यावर छाटणीसाठी शिफारस अहवाल तयार करून उद्यान सहाय्यक संजय राक्षे, सुपरवायजर सावळेराम रावते, अधीक्षक पी. एम. गायकवाड यांच्याकडून अहवालावर सह्या घेतल्या व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, ही बाब मडिगेरी यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
व्हीएस न्यूज– अवैध बांधकामे नियमित करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जाहीर केली असली तरी यातील कोणती बांधकामे नियमित होणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. नियमितीकरणाच्या नियमांनुसार शहरातील 65 हजार 320 अवैध बांधकामांपैकी मोजकीच बांधकामे नियमित होणार आहेत. त्यासाठी शासनाने किचकट अटी-शर्ती लावल्याने त्याची पुर्तता करताना बांधकाम मालकांना नकी नऊ येणार आहे. हा निर्णय शासनाने नांदेड महापालिका निवडणूक आणि ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत एकूण 65 हजार 320 अवैध बांधकामे आहेत. त्यातील 1 हजार 608 बांधकामे डीपी रस्त्यात बाधीत आहेत. डीपी रस्त्याव्यतिरिक्त रस्त्यात बाधीत झालेली बांधकामे 122 आहेत. 1 हजार 122 बांधकामे इतर आरक्षणात आहेत. तर, हरित पट्ट्यातील बांधकामांची संख्या648 आहे. नदी व निळ्या पूर रेषेत 583 बांधकामे आहेत. नदीच्या निळ्या व लाल पूर रेषेत 85 बांधकामे आहेत. 10 हजार 762 बांधकामे रेडझोनमध्ये आहेत. कचरा डेपो आणि बफर झोनमध्ये 425 बांधकामे आहेत. विकास नियंत्रण नियमानुसार बेकायदेशीर बांधकामे जसे की वाढीव चटई निर्देशांक, सामासिक अंतर, ओपन स्पेस, वाहनतळ, पोहोच रस्त्यात येणारी एकूण 46 हजार 243 बांधकामे आहेत. शासनाच्या अधिसूचनेनुसार यातील कोणती बांधकामे नियमित होणार आहेत, याबाबत शासनाने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे अवैध बांधकाम नियमितीकरणाच्या कायद्यात बदल करण्याची मागणी भापकर यांनी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
गावठाण क्षेत्रातील 3 मीटर व इतर भागातील 6 मीटर किमान रुंदीच्या रस्त्यावरील अवैध बांधकामे नियमित करावीत. 0.75 मीटर किंवा 2.5 फुटापेक्षा कमी मार्जिनची बांधकामे नियमित करताना समाईक अंतराचे बंधन ठेवू नये. दोन पेक्षा जास्त चटई निर्देशांकहून वाढीव एफएसआयची बांधकामे नियमित करण्यासाठी टीडीआर ऐवजी नाममात्र दंड आकारण्यात यावा. 7 मजली पेक्षा अधिक मोठी बांधकामे अग्निशामक नाहरकत नियमांत बसत नाहीत. ग्रीन झोनमधील अशी बांधकामे नियमित करावीत. पूररेषा,ग्रीनझोन, नदीपात्र, डोंगरभाग, गार्डन, ओपन स्पेस खेळाचे मैदान, रेडझोनमधील बांधकामे नियमित होणार नाहीत. परंतु, रस्ते व आरक्षणातील बांधकामे विकास आराखडा मंजूर होण्यापूर्वीची असल्यास ती नियमित करावीत. जर, रस्त्याच्या आरक्षणातील बांधकाम मालकांनी रस्त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध केल्यास संबंधित बांधकामे नियमित होण्याची शक्यता कमी वाटते. मात्र, मालकी हक्कासाठी मुळ मालकांसोबत झालेला करारनामा ग्राह्य धरण्यात यावा. वर्ग 2 च्या जमिनी (इनामी) मूळ मालकाने शासकीय पुर्तता केल्यास विचाराधीन ठेवाव्यात, अशी मागणीही भापकर यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज– व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या अध्यापकांनी उद्योगजगताच्या बदलत्या गरजा, झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान या बाबी स्वतः प्रत्यक्ष समजून त्यानुसार आपापल्या अध्यापन शैलीत बदल करणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएमच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. करमाळकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, “मनुष्यबळ व्यवस्थापनाचे अध्यापन करताना क्रमिक अभ्यासक्रमासोबतच प्रत्यक्ष उद्योगजगतात मनुष्यबळ व्यवस्थापन विभाग कशाप्रकारे कार्यरत असतो,त्यांच्यापुढील आव्हाने काय असतात हे समजून घेण्यासाठी अध्यापकांनी उद्योगजगताला प्रत्यक्ष संपर्क साधून समजून घेतल्यास व त्यानुसार अध्यापनात बदल केल्यास निश्चितच उद्योगजगताला नेमके ज्या प्रकारच्या व्यवस्थापकांची गरज आहे, असे व्यवस्थापक विद्यार्थ्यामधून पुढे येतील यात शंका नाही.
एनआयपीएम सारख्या उद्योगक्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या देशव्यापी संघटनेने यासाठी पुढाकार घेऊन अध्यापक आणि उद्योगक्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापक यांच्यातील प्रत्यक्ष व थेट संवाद वाढावा यासाठी आयोजित केलेली ‘एकदिवसीय कार्यशाळा’ हा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम आहे. कार्यशाळेत उद्योगक्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थपाकांची अनुभवी व मार्गदर्शनपर व्याख्याने तसेच प्रत्यक्ष औद्योगिक कंपन्यांना भेट हे नियोजन अनुकरणीय असून व्यवस्थापनशास्त्र शाखेसोबतच अन्य विद्याशाखांसाठी सुद्धा असा कार्यक्रम राबविता येईल का, याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करू, असेही डॉ. करमाळकर यांनी सांगितले.
यावेळी केहिन फाय लिमिटेडचे कार्यकारी संचालक सुधीर गोगटे, मनुष्यबळ व्यवस्थापक सल्लागार कुलदीप जोशी, भारत फोर्ज कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही. भावे, थरमॅक्स इंडिया लिमिटेडच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष शरद गांगल, लिअर कॉर्पोरेशन कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे संचालक समीर कुकडे आदी उपस्थित होते. भारत फोर्ज कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही. भावे यांनी एनआयपीएमच्या वतीने कार्यशाळेची भूमिका विषद केली. एनआयपीएम पुणेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पवन शर्मा, अमला करंदीकर, आशा महाजन, मुक्ता केसकर, निसार खान, सचिन कुंभारकर,अभिजित चव्हाण यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन मीनल राव यांनी तर आभार एनआयपीएमचे उपाध्यक्ष कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - बचत खातेदारांच्या बॅंक खात्यात किमान रक्कम नसल्यामुळे दंड आकारला जातो. खातेदारांवर होणारा हा अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी ह्यूमन राईटस् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जावेद शिकलगार यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खातेदारांच्या बॅंक खात्यावर जमा असणाऱ्या रकमेवर व्याज देण्याऐवजी खात्यावर किमान रक्कम नसल्यामुळे दंड आकारला जातो. मजुरी काम करणाऱ्या गोर-गरिबांकडे खात्यावर निर्धारित रक्कम ठेवण्याइतका पैसा नसतो. अशा स्थितीत दंड आकारणे चुकीचे आहे. यावेळी ह्यूमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरिक्षक रामराव नवघन, खंडुदेव कठारे, नागेश भाले, तानाजी मांडवे, एम.डी. चौधरी, रामदास खोत, भरत वाल्हेकर, सुभाष कोठारी, दिलीप टेकाळे, मुनीर शेख, अविनाश रानवडे, ओमकार शेरे, वैभव कावबाणे, मुकेश जैन, मोहन आगासे, सोहनलाल राठोड, कैलासचंद राठोड, उत्तमचंद्र मेहता, महेश कोठारी, रमेश सर्वेज्ञ उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - विश्वाला मैत्री, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा सामाजिक समता तसेच न्यायाचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे देऊन धम्मचक्र परिवर्तन केले. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याचे मार्गदर्शन संविधान करते. भारतीयांचे कल्याण संविधानाव्दारेच शक्य आहे. संविधान हाच खरा मानवतेचा आदर्श धर्मग्रंथ आहे. हा मानवतावादी विचार सर्व भारतीयांनी स्विकारला पाहिजे. असे मार्गदर्शन प्रबोधनकार, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले.
पिंपळे गुरव येथे 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कॅंम्प, दापोडी परिसरातील संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि नागविदर्भ असोसिएशन तसेच सेहेचाळीस बुध्द विहारांच्या वतीने पिंपळे गुरव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात रविवारी (दि. 8 ऑक्टोबर) आयोजित कार्यक्रमात माजी आमदार आण्णा बनसोडे, परराष्ट्र मंत्रालयाचे संचालक अतुल गोतसुर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, ओबीसी परिषदेचे राज्य संघटक उल्हास राठोड, राहूल काकडे, ॲड. राजेश नितनवरे, ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे, संदीप नितनवरे, चंद्रकांत वाकोडे, प्रा. रवींद्र इंगोले, नयन अहिरे, सुनील निकम, दिपक म्हस्के, पारधे सर उपस्थित होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गोतसुर्वे म्हणाले की, मृत्यूनंतर पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर शोधत बसण्यापेक्षा वर्तमानात चांगल्या गोष्टींचे आचरण करा, अशी शिकवण देणारा धर्म म्हणजे बौध्द धर्म होय. समाजात समतेने जगण्याचा मार्ग बुध्दांनी दिला. बुध्दांची पंचशील तत्व आचरणात आणल्यास दु:ख कमी होण्यास मदत होईल. डॉ. बाबासाहेब सुध्दा सुखकारक आयुष्य जगले असते. मात्र, त्यांनी बहुजनांसाठी त्याग केला. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी आधी स्वयंप्रकाशित व्हा. असेही गोतसुर्वे म्हणाले. स्वागत अमरसिंह आदियाल, सुत्रसंचालन दीपक म्हस्के आणि आभार नयन अहिरे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणा-या भिमसृष्टीचे कामकाजास गती देण्यात येवून भिमसृष्टीचे काम मार्च 2018 पूर्वी पूर्ण करण्यात यावे अशा सुचना महापौर नितिन काळजे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी दिल्या. तसेच भिमसृष्टी मध्ये माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पिंपरी चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भिमसृष्टी उभारणे कामी गठीत केलेल्या समितीच्याबैठकीत ते बोलत होते.
महापौर नितिन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकिस उपमहापौर शैलजा मोरे, आयुक्त श्रावण हार्डीकर, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य शैलेश मोरे, बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्या कमल घोलप, अनुराधा गोरखे, आशा धायगुडे-शेंडगे, माजी नगरसदस्य ॲड गोरक्ष लोखंडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, निवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, उपअभियंता एन.एन.मोरे, व्हि.के.जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष जोगदंड, अशोक शिलवंत, वास्तु विशारद शिरिष चिद्दरवार, शिल्पकार महेंद्र थोपटे, चित्र शिल्पकार डॉ.जी.एन.आंबे आदी उपस्थित होते.
भीमसृष्टि अंतर्गत उभारण्यात येणा-या म्युरल्सचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. महापौर नितिन काळजे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी भीमसृष्टी उभारण्यात येणा-या म्युरल्सला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात माता रमाई यांचा पुतळा उभारण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी पुतळ्याभोवती पोष्टर, फ्लेक्स, बॅनर्स लावण्यास प्रतिबंध करण्यात येवून परिसर संरक्षित करण्यात यावा असे स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी सागितले. बैठकिचे सुत्रसंचालन कार्यकारी अभियंता संजय कांबळे यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - अंत्योदय योजना लाभार्थींकरिता शिधापत्रिकेवर वाटप केली जाणाऱ्या साखरेचे अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे. त्यामुळे या महिन्यानंतर अंत्योदय लाभार्थींना शिधापत्रिकेवर मिळणारी साखर बंद होणार आहे. याचा शहरातील तीन हजार लाभार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. यापूर्वीच दारिद्य्र रेषेखालील आठ हजार लाभार्थ्यांना गेली चार महिन्यांपासून साखर वाटप करणे बंद करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अ आणि ज या दोन परिमंडळ कार्यालयांतर्गत एकूण 197 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दोन्ही कार्यालयांतर्गत स्वस्तधान्य दुकानदारांमार्फत शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदळाचा पुरवठा केला जातो. अंत्योदय योजनेअंतर्गत अ कार्यालयाकडे 412 शिधापत्रिकाधारकांची नोंद असून नव्याने 36 नागरिकांचे अर्ज नुकतेच कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. तर ज कार्यालयाकडे 1,989 शिधापत्रिकाधारकांची नोंद आहे. याशिवाय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अ कार्यालयाकडे 1 लाख, 46 हजार 552 तर ज कार्यालयाकडे 1 लाख, 53 हजार 59 शिधापत्रिकाधारकांची नोंद आहे. या दोन्ही कार्यालयांतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या सुमारे तीन हजार आहे. तर दारिद्य्र रेषेखालील लाभार्थी सुमारे आठ हजार आहेत.
या दोन्ही घटकांना केंद्र सरकारकडून रेशनिंगवर गहू व तांदूळ दिले जाते. याशिवाय साखरेचे वाटप केले जात आहे. मात्र, साखरेला दिले जाणारे अनुदान केंद्र सरकारने बंद केल्याने गेली चार महिन्यांपासून दारिद्य्र रेषेखालील लाभार्थी साखरेपासून वंचित आहेत. दरम्यानच्या काळात अंत्योदय लाभार्थीना प्रति माणसी 500 ग्रॅम अनुदानित साखर वाटप केली जात असायची. त्यानंतर यामध्ये प्रत्येक शिधापत्रिकेला 500 ग्रॅम वाटपाचे आदेश निघाले. त्यात पुन्हा बदल करुन प्रत्येक शिधापत्रिकेला एक किलो साखर वाटपाचा बदल करण्यात आला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखरेला दिले जाणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यापासून या सर्वच लाभार्थींना साखर वाटप होणार नाही.
अंत्योदय व दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींना पुरेसे धान्य वाटप करणे दोन्ही शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, सणासुदीच्या काळात धान्य वाटपावर मर्यादा लादणे चुकीचे आहे. हळुहळू वितरण व्यवस्था बंद करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अन्नधान्य वितरण व्यवस्था क्षीण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
- गजानन बाबर, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन.
व्हीएस न्यूज – दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाल्याच्या निषेधार्थ भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी निदर्शने करण्यात आली. भाजप सरकारच्या नावाने “शिमगा’ करत निषेध व्यक्त करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष मारुती कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे आंदोलन झाले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. रंजना पेडणेकर म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस अशा जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहे. व्यापाऱ्यांवर लादलेली जीएसटी चूकीची असल्याचे लक्षात आल्यानंतर आता “जीएसटी’मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हे सरकारचे अपयश आहे. गो हत्या बचावच्या नावाखाली निरपराध नागरिकांचे खून सत्र सुरु आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतरही केंद्र सरकार या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहत नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
प्रदेशाध्यक्ष मारुती कदम यांनी राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयावर टीका केली. शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी दिवास्वप्नच ठरली आहे. अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीसाठी जेलभरो आंदोलन करावे लागले. याशिवाय पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना, स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न सोडविण्यात चालढकल केली जात आहे. शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने ही बाब योग्य नाही. त्यामुळे शहराच्या पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे.
या निदर्शनामध्ये अमित कांबळे, कल्याण अडागळे, संतोष खाडे, रवींद्र आडागळे, चंद्रकांत मुळे, आमीर शेख, दशरथ वाघमारे, रितेश देशमुख, पार्वती कांबळे, वंदना अडागळे, विजया बेंदळे, रेश्मा डोगरा, रंजना भोसले, नसीम कांबळे, सुषमा सोनवणे, मंजुषा वाघमारे, सतिश कदम आदी सहभागी झाले होते.
व्हीएस न्यूज – नवीन संशोधनासाठी भारताला आजही पाश्चात्य देशांवर अवलंबून रहावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या नगरसचिव चित्रा बाविस्कर यांनी चिंचवड येथे केले.
अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगरसचिव चित्रा बाविस्कर बोलत होत्या. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मिलिंद वाणी, सुरेश बागड, प्रबोधन संस्थेचे राष्ट्रीय संघटक दीपक येवले, प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मालपुरे, संस्थेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा प्रतिभा पाखले, युवा अध्यक्ष प्रशांत ब्राम्हणकर यावेळी उपस्थित होते. दहावीतील नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले.
बाविस्कर म्हणाल्या की, पालकांनी लहानपणापासून मुलांच्या सर्जनशीलतेला आणि जिज्ञासू प्रवृत्तीला खतपाणी घातले तरच अधिकाधिक तरुण संशोधन क्षेत्राकडे वळतील. जे संशोधक होणार नाहीत, ते आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये निश्चितच सरस कामगिरी करून दाखवतील. धकाधकीच्या जीवनात आजचा भारतीय तरुण फक्त पैसा, प्रमोशन ह्याच्याच मागे धावत आहे. मात्र, देशाला संशोधकांची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी संशोधन क्षेत्रात उतरायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे म्हणाले की, समाजाचे संघटन होण्यासाठी प्रबोधन संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम प्रबोधन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अशावेळी समाजातील संघटनामुळे गरजू घटकापर्यंत पोहचता येणे सहज शक्य आहे. मात्र, त्यासाठी संघटन मजबूत असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्षपदी किरण अमृतकर, महिला अध्यक्षपदी भारती दशपुते, युवक अध्यक्षपदी स्वप्निल पाचपुते तसेच सामुदायिक विवाह सोहळा समन्वयकपदी रविंद्र मालपुरे यांची निवड जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे यांनी ही निवड केली. मिलिंद वाणी, सुरेश बागड, दीपक येवले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ऋतुजा अमृतकर यांनी केले. प्रा. उदय पाटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
व्हीएस न्यूज - आज ज्या ठिकाणी मी आहे तिथून मागे वळून पाहिले तर दुसरे तिसरे कोणी नसून मीच आहे. इतकी मी आता पुढे गेलीय. ना दुःख ना आनंद यात खचले असते तर कधीच मरून गेले असते. जगतेय ती फक्त माझ्या लेकरांसाठी, असे मत अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
इनरव्हील क्लब पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी इनर व्हील निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, पिंपरीच्या अध्यक्षा संगीता देशपांडे, पिंपरी स्टारच्या अध्यक्षा राधिका माकन, निगडी झेनेक्स संजुश्री मुनोत, क्लबचे सभासद व रोटरीयन आदी उपस्थित होते. यावेळी इनरव्हील क्लबच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेस 51 हजाराची देणगी स्वरूपात चेक देण्यात आला.
त्या पुढे म्हणल्या की, जगा, ठामपणे स्वाभिमानाने जगा. तुम्हीच जगू व जगवू शकता. माझी लेकरच माझी उर्मी आहेत. संकटांनी मला उभे केले. मी संसारात रमले असते तर एक दोन मुलांचा सांभाळ करू शकले असते. मी माझ्या लेकरांची माय बनले, त्यांना सक्षम करू शकले, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक सविता राजापूरकर यांनी केले. सूत्रसंचालन सुमन शिरूर यांनी केले. आभार प्रिती पाटील यांनी मानले.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या आरक्षित जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे थेरगाव येथील विकासाला खीळ बसली आहे. इच्छाशक्ती असताना देखील विकास साधता येत नसल्याची खंत नगरसेवकांनी व्यक्त केल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी थेरगाव येथे जाऊन विविध आरक्षित जागांची पाहणी केली. अतिक्रमणे हटविण्याचे आदेश ग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले आहेत. सर्व आरक्षणे ताब्यात घेऊन तातडीने विकसित केली जातील, असेही आश्वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले.
थेरगाव परिसर प्राधिकरणाच्या हद्दीत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून या भागातील विकास दुर्लक्षीत राहिली आहे. सर्व्हे क्रमांक 33 मधील बस डेपोचे80 गुंठे जागा, सर्व्हे क्रमांक 36, 37 मधील खेळाच्या मैदानाची सुमारे तीन एकर जागा, सर्व्हे क्रमांक 32 आणि 33 पैकी या जागेतील प्रस्तावित उद्यानासाठी अडीच एकर जागा आरक्षित आहे. त्याचबरोबर कुणाल रेसिडन्सी ते थेरगाव स्मशानभूमी 12 मीटरचे दोन रस्ते प्रस्तावित आहेत. संबंधित जागा मालकांचा ताबा देण्यास विरोध असल्यामुळे आरक्षणे विकसित करण्यात अडथळे येत आहेत. या जागेची पाहणी करून आरक्षणे ताब्यात घेण्याकरिता जागा मालकांना विश्वासात घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना स्थानिक अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांनी पत्र दिले होते.
त्यावर आयुक्त हर्डिकर यांनी थेरगाव परिसरात जाऊन आरक्षित जागांची पाहणी केली. त्यातील काही जागांवर पत्राशेडचे अतिक्रमण हटवण्याचे आयुक्तांनी ग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर आरक्षीत जागा ताब्यात घेण्यासाठी लवकरच जागा मालकांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवला जाईल. लवकरात लवकर आरक्षणे विकसित केली जातील, असे हर्डीकर यांनी सांगितले. तर, जागा मालकांना योग्य मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असे नगरसेवक कैलास बारणे यांनी सांगितले. यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेडी, सव्हेअर सुहास शिंदे, उपअभियंता सुनील बागवानी, कनिष्ठ अभियंता राजेंद्र जगताप, नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002