व्हीएस न्यूज - अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हा कायदा कमकुवत करण्याचा केंद्राचा डाव असल्याच्या टीकेला नव्याने धार येणार आहे. अर्थात दलितांच्या हक्कांबाबत तसेच त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करण्याबाबत आम्ही शंभर टक्के अनुकूल आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने २० मार्चला दिलेल्या निकालामुळे अनेक राज्यांत हिंसाचार उफाळून मोठी जीवितहानी झाली, हा केंद्राचा युक्तिवादही न्यायालयाने धुडकावला. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार करताच अटक करण्याच्या तरतुदीवर र्निबध लावणारी जी मार्गदर्शक तत्त्वे न्यायालयाने २० मार्चच्या निकालाद्वारे ठरवून दिली होती, ती संसदेने केलेल्या कायद्याच्या विपरीत आहेत. त्यामुळे त्यांना स्थगिती द्यावी आणि हा मुद्दा मोठय़ा खंडपीठाकडे सोपवावा, अशी केंद्राची मागणी होती.
मात्र न्या. आदर्श गोयल व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठाने आपल्या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिला. आम्ही या मुद्दय़ाचा प्रत्येक पैलू आणि पूर्वीचे न्यायालयीन निवाडे निकालाआधी विचारात घेतले होते, असे त्यांनी सांगितले.
या निकालाने गुन्हा नोंदवण्यास आडकाठी आणलेली नाही. तसेच आरोपीला अटक करता येणार नाही असेही आम्ही म्हटलेले नाही. मात्र अॅट्रॉसिटी कायद्यात अटकपूर्व जामिनाची तरतूदच नसल्याने या कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी आम्ही ती मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. गुन्ह्य़ाची भीषणता लक्षात घेऊन अटकपूर्व जामीन अमान्य करता येईलच, असेही न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणी १६ मे रोजी सुनावणी सुरू राहील.
व्हीएस न्यूज - व्हॉट्सअॅप या अग्रगण्य मेसेजिंग अॅपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी भारतीय तरुणाचे नाव आघाडीवर आहे. मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा यांची व्हॉट्स अॅपच्या सीईओपदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नीरज अरोरा हे गेल्या सात वर्षांपासून व्हॉट्स अॅपमध्ये कार्यरत आहेत.
व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांनी चार दिवसांपूर्वी कंपनीला रामराम ठोकला होता. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. व्हॉट्स अॅपच्या सीईओपदी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत नीरज अरोरा यांचे नाव आघाडीवर आहे. मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा हे गेल्या सात वर्षांपासून व्हॉट्स अॅपमध्ये कार्यरत आहेत. ते व्हॉट्स अॅपमध्ये सध्या बिझनेस एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत. टेकक्रंच या वेबसाईटच्या वृत्तानुसार सध्या ते व्हॉट्स अॅप चौथ्या क्रमांकावर आहेत. व्हॉट्स अॅपमधील ‘ऑल थिंग्स बिझनेस’ या विभागाचे ते प्रमुख आहेत.
नीरज अरोरा हे दिल्ली आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. पदवी घेतल्यानंतर २००६ साली त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए इन फायनान्स अँड स्ट्रॅटेजी केले. दिल्ली आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर ते २००० साली अॅसिलिओन या कंपनीत नोकरीला लागले. यानंतर त्यांनी टाइम्स इंटरनेट लिमिटेडमध्येही काम केले. जवळपास १८ महिने ते तिथे कार्यरत होते. याशिवाय ते पेटीमच्या संचालक मंडळातही होते. यानंतर विविध कंपन्यांमध्ये काम केल्यावर २००७ मध्ये ते गुगलमध्ये गेले. डिसेंबर २००७ ते नोव्हेंबर २०११ या कालावधीत ते गुगलमध्ये कार्यरत होते. गुगलमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंट मॅनेजर यापदावरुन ते प्रिन्सिपल कॉर्पोरेट डेव्हलपमेंट या पदावर पोहोचले. गुगलनंतर ते व्हॉट्स अॅपमध्ये रूजू झाले.
व्हॉट्स अॅपच्या सीईओपदी अरोरा यांची नियुक्ती झाल्यास ते सुंदर पिचाई (गुगल), सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट) यांच्या रांगेत जाऊन बसतील. मात्र, व्हॉट्स अॅपच्या सीईओपदावर नियुक्ती झाल्यास अरोरा यांच्यासमोर काही आव्हाने असतील. व्हॉट्स अॅप विकत घेणाऱ्या फेसबुकवर डेटा चोरीच्या आरोपांमुळे टीका होत आहे. व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांचे बिझनेस मॉडलवरुनच कंपनीशी मतभेद झाले आणि त्यांनी राजीनामा दिला, अशी चर्चा आहे.
व्हीएस न्यूज - महिलेचे शरीर हे पुरुषांसाठी खेळणं नाही, असे मत नोंदवत मध्य प्रदेश हायकोर्टाने गुरुवारी एका तरुणावरील बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली. लग्न करणार नाही हे माहित असूनही त्या तरुणाने पीडित तरुणीशी शरीरसंबंध ठेवले. ही एक प्रकारची फसवणूक आहे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.
भोपाळमध्ये राहणाऱ्या राजीव शर्मा या तरुणावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले होते. शर्माची भोपाळमध्ये राहणाऱ्या डान्स टिचरशी फेसबुकवरुन ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले आणि त्यानंतर शर्माने तिला लग्नाची मागणी घातली. दोघांचे लग्न देखील ठरले होते. मात्र, शर्माच्या आईचा लग्नास विरोध होता. लग्न ठरल्यावर शर्माने तरुणीशी शरीरसंबंध ठेवले. सुरुवातीला तरुणीने नकार दिला होता. मात्र, आता लग्न होणारच आहे, असे सांगत त्याने तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र, काही दिवसांनी त्याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी मार्च २०१७ मध्ये राजीवविरोधात गुन्हा दाखल झाला होता. राजीवने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. बलात्काराचा गुन्हा रद्द करावा, अशी त्याची मागणी होती.
न्या. सुशीलकुमार पालो यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. लग्नाचे आश्वासन देऊन राजीवने पीडितेची शरीरसंबंधांसाठी संमती मिळवली, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. हायकोर्टाने निर्णय देताना सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला देताना सांगितले की, ‘महिलेचे शरीर हे पुरुषांसाठीचे खेळणे नाही. तो स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी महिलेच्या शरीराचा फायदा घेऊ शकत नाही. या प्रकरणातील तरुणाने हीन कृत्य केले असून तो शिक्षेसाठी पात्र असल्याचे हायकोर्टाने नमूद केले. लग्न करणार नाही हे माहित असूनही त्या तरुणाने पीडित तरुणीशी शरीरसंबंध ठेवले. ही एक प्रकारची फसवणूक आहे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज - हिमाचल प्रदेशात कसौली येथे बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या सरकारी महिला अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणातील आरोपी विजय ठाकूर याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे ती महिला अधिकारी लाच घेत नव्हती, म्हणून मी तिला ठार केले, अशी अजब कबुली त्याने पोलिसांपुढे दिली आहे.
कसौलीत बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी ५१ वर्षीय सहाय्यक नगर नियोजक शैला बाला गेल्या होत्या. त्यावेळी या महिला अधिकाऱ्याची पाठलाग करत गोळी घालून हत्या करण्यात आली होती आणि मारेकरी हॉटेल व्यवसायिक विजय ठाकूर फरार झाला होता. अखेर पोलिसांनी मथुरा येथून त्याला अटक केली.
अटक केल्यावर त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्या महिला अधिकारी कारवाई करण्यासाठी आल्या होत्या. मी त्यांना लाच देण्यास तयार होतो. पण त्यांनी सरळ सर्वोच्च न्यायालयाची नोटीस दाखवत कारवाई करणार असल्याचे सांगितले. मी लाच देत असूनही त्यांनी लाच घेतली नाही, मग मी त्यांना ठार मारले, असा कबुलीजबाब विजय ठाकूरने दिला.
विजय, त्याची आई नारायणी देवी आणि शैला बाला यांच्यात नारायणी गेस्ट हाऊसमध्ये वाद झाले. प्रकरण दाबण्यासाठी त्याने शैला बाला यांना लाच देऊ केली. पण त्यांनी लाच घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना गोळ्या घालून विजय पळून गेला.
कर्नाटकमध्ये भाजपाचा जाहिरनामा
व्हीएस न्यूज - कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आदी नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपाचा जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला.कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने शुक्रवारी जाहिरनामा प्रकाशित केला. शेतकऱ्यांना एक लाखांपर्यंतचे कर्जमाफ, द्रारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिलांना मोफत स्मार्टफोन, महाविदयालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्यात आले आहे.
कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आदी नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपाचा जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला. जाहिरनाम्यात शेतकरी, महिला व तरुण यांच्यावर भर देण्यात आल्याचे येडीयुरप्पा यांनी सांगितले. याशिवाय गोवंश हत्या बंदी कायदाही राज्यात मंजूर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी आगामी अर्थसंकल्पात कृषी खात्याचे स्वतंत्र अर्थसंकल्प असेल. तसेच शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येईल. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत असेल. राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
भाजपाने कर्नाटकमध्ये महिलांसाठी स्त्री उन्नती फंड या योजनेअंतर्गत १० हजार कोटींची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय दारिद्य्र रेषेखालील महिलांना व मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स तसेच राज्यभरात स्त्री सुविधा योजनेअंतर्गत महिलांना एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले जातील. यात १ हजार महिला पोलिसांची नियुक्ती केली जाईल. याशिवाय दारिद्य्र रेषेखालील मुलींच्या लग्नासाठी विवाह मंगल योजना सुरु केली जाणार आहे. याअंतर्गत त्यांना ३ ग्रॅम सोने आणि २५ हजार रुपयांची मदत केली जाईल. तसेच याच वर्गातील महिलांना मोफत स्मार्टफोनही दिले जाणार आहे.
भाजपाने राज्यात मुख्यमंत्री लॅपटॉप योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेअंतर्गत महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप दिला जाईल.
व्हीएस न्युज - संत रोहिदास नगर , गोरेगांव (पूर्व )मुंबई येथे आर. पी.आय चे उत्तर -पश्चिम ज़िल्हा कार्याध्यक्ष जे . एम .शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आर.पी.आय राष्ट्रीय अध्यक्ष व ,सामाजिक न्याय मंत्री मा. रामदास आठवले यांच्या हस्ते २७ एप्रिल रोजी करण्यात आले . या वेळी प्रमुख उपस्तिथी मध्ये ज़िल्हा अध्यक्ष मा . प्रकाश जाधव ,मुंबई शहर अध्यक्ष मा. गौतम सोनवणे ,मा. प्रवीण मोरे ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवा आघाडी मा .अॅड. अन्वरअली अन्सारी ,मुंबई प्रदेश सचिव मा . गणपतदादा भोईर . मुंबई प्रदेश कार्याध्यक्षां महिला आघाडी सौ .उषाताई रामलू ,जिल्हा अध्यक्ष मायनॉरिटी मा . बाबू इस्तेकार ,गोरेगावं तालुका अध्यक्ष मा. रमेश पाईकराव ,सरचिटणीस गोरेगांव मा.रमेश पाळंदे आदि मान्यवर उपस्थिती होते . आर.पी.आय चे उत्तर -पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष मा. जे.एम शेख यांच्याशी आमचे व्हि. एस न्यूजचे प्रतिनिधी भानुदास गायकवाड यांनी संवाद साधला असता मा. जे.एम शेख म्हणाले की जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्याचा हेतू स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविणे व सामाजिक ऐक्य निर्माण करून पक्षाची ताकद वाढविणे हाच आहे .
https://www.youtube.com/watch?v=fPT6va144pc
व्हीएस न्यूज – देशातील दिग्गज बँकांना आयकर विभागाने नोटीस पाठविल्या असून बँकेने खात्यात किमान रक्कम न ठेवल्याबद्दल खातेधारकांकडून वसूल केलेल्या दंडावर बँकाना कर भरण्यास या नोटीसमध्ये सांगितले आहे. अशाच प्रकारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि अन्य सेवांसाठी बँकाकडून आकारण्यात येत असलेली रक्कमही कराचा वर्तृळात मोडू शकतो.
बँक एटीएम, चेकबुक, डेबिट कार्ड सारख्या सुविधा देताना ग्राहकांना अमुक किमान रक्कम खात्यात राखा, असे सांगते. ही किमान सरकारनुसार रक्कम बँकांकडून आकारण्यात येणारे सर्व्हिस चार्ज असल्यामुळे यावर सेवा कर आकारण्यात येऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे.
भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एक्सिस, कोटक महिंद्रा या बँकाना आयकर विभागाने खात्यात किमान रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या फ्रि सर्व्हिसच्या मोबदल्यात कर भरण्यास सांगितले आहे. आपल्या खात्यात किमान रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना बँक एका मर्यादेपर्यंत मोफत एटीएम व्यवहार, चेकबुक आणि डेबिट कार्ड सारख्या सुविधा देते. जर बँकांकडून सरकार या मोफत सुविधांसाठी कर आकारेल तर बँकांनाही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि अन्य सेवा पुरविण्यासाठी शुल्क आकारावा लागेल. डेबिट-क्रेडिट कार्डचा उपयोग परिणामस्वरुप महागू शकतो.
याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटीला अनुसरून बँकांना सरकारने नोटीस पाठविल्या आहेत. जर ही कर आकारणी लागू करण्यात आली तर ग्राहकांच्या खात्यात कितीही रक्कम असली तरीही एटीएम, चेकबुक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या सारख्या सुविधांच्या मोबदल्यात बँकांना शुल्क आकारावा लागेल.
व्हीएस न्यूज - खासगी प्रवासी वाहने सणासुदी, सुट्यांच्या काळात राज्यातील तिकीट दर वाढवून प्रवाशांची सर्रास लूट करतात. अव्वाच्यासव्वा प्रवास भाडे प्रवाशांची अडवणूक करून आकारणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांना आता चाप लावला जाणार आहे. राज्य शासनाने मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येईल असा निर्णय घेतला आहे,पण यापेक्षा जास्त भाड आकारुन प्रवाशांची अडवणूक करणा-यांविरोधात आता प्रवाशांना थेट तक्रार करता येणार आहे. प्रवाशांना आपली तक्रार मोटार वाहन विभागाच्या ०२२-६२४२६६६६ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवता येणार आहे.
तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार तातडीने योग्य चौकशी करण्यात येईल. जास्त भाडे संबंधित खासगी वाहनांनी आकारल्याचे स्पष्ट झाल्यास, कंत्राटी बस परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. १८००२२०११० या निशुल्क टोल फ्री क्रमांकावरही मुंबईकर तक्रारी नोंदवू शकतात. ऑनलाइन तक्रारदेखील नोंदविता येणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.
व्हीएस न्यूज – मोठे राजकीय फेरबदल जम्मू-काश्मीर सरकारमध्ये घडले असून निर्मल सिंह यांनी जम्मू-काश्मीर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता कविंद्र गुप्ता हे निर्मल सिंह यांच्या जागी जम्मू-काश्मीरचे नवे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सध्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे कविंद्र गुप्ता हे अध्यक्ष आहेत. दरम्यान, सोमवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून, अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप यांचे संयुक्त सरकार आहे.
भाजपच्या काही मंत्र्यांनी कथुआ बलात्कार प्रकरणामध्ये आरोपींचे समर्थन करण्याची भूमिका घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर सुरुवातीला दोन आणि त्यानंतर उर्वरित ९ अशा राज्य मंत्रिमंडळातील भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. दरम्यान, रविवारी रात्री उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनीही पदावरून पायऊतार होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राजकीय फेरबदलासंदर्भात कविंद्र गुप्ता म्हणाले की, माझ्यावर पक्षाने विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू. यावेळी पीडीपीसोबतच्या संबंधांसोबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी सांगितले की,पीडीपीसोबत चांगले संबंध स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. शिवाय, युतीच्या सरकारमध्ये सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचाही आमचा प्रयत्न असेल.
व्हीएस न्युज - राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात या दोघांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरातील वातावरण तणावग्रस्त असून, मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजकीय फलक लावण्यावरून गेल्या वर्षी झालेल्या वादातून या हत्या झाल्याची तक्रार योगेश राळेभातचा भाऊ कृष्णा राळेभात यांनी दिली आहे. या प्रकरणी गोविंद दत्ता गायकवाड (रा.तेलंगशी) याच्यासह इतर ४ ते ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील एका हॉटेलमध्ये योगेश आणि राकेश राळेभात हे मित्रांसोबत बसले होते. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोर आले. यातील एक जण मोटरसायकलवरून उतरला आणि त्याने योगेश राळेभातवर गोळ्या झाडल्या, तर त्याचा मित्र राकेश राळेभात हा मदतीसाठी धावला असता त्याच्यावरही एक गोळी झाडली. त्यानंतर हल्लेखोर मोटरसायकलवर बसून बीड रोडच्या दिशेने पळून गेले. घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांनी योगेश आणि राकेशला तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने नगर येथे हलवण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
पालकमंत्र्यांसमोर नातेवाईकांचा संताप
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचा जामखेड हा मतदार संघ आहे. पालकमंत्री शिंदे हे घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना नातेवाइकांच्या संतापाचा सामना करावा लागला. पालकमंत्री रुग्णालयामध्ये थांबले असताना नातेवाईकांनी रुग्णालयाच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांवर गर्दी केली. त्यामुळे पालकमंत्री शिंदे हे रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूला असणाऱ्या दाराने बाहेर पडून खासगी वाहनाने रवाना झाले.
व्हीएस न्यूज - अखेर भाजपला माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी सोडचिट्ठी दिली असून सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात आघाडी उघडली होती. सिन्हा यांनी यावेळी सर्व प्रकारच्या पक्षीय राजकारणापासून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. ‘राष्ट्र मंच’ची बैठक पाटण्यात आयोजित करण्यात आली होती. भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, तेजस्वी यादव, शरद यादव यांच्यासह जेडीयूमधील अल्पसंतुष्ट नेते या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत भाजपविरोधी रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर व्यापक आघाडी उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
व्हीएस न्यूज - पोटच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर गुन्हेगाराला अद्दल घडवण्याऐवजी आरोपीकडून पैसे घेऊन तडजोड करणाऱ्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने स्वत:हा पुढे येऊन हिम्मत दाखवल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. मागच्यावर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये दिल्लीच्या अमन विहारमध्ये या मुलीवर बलात्कार झाला होता. पीडित मुलीचे दोन अज्ञात व्यक्तिंनी अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील एक आरोपी जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला. कोर्टात साक्ष फिरवण्यासाठी त्याने पीडित मुलीच्या आई-वडिलांना २० लाखाची ऑफर दिली. तुम्ही मुलीची समजूत घालून कोर्टामध्ये साक्ष फिरवण्यासाठी तिला राजी केले तर २० लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. या प्रकरणातील जामिनावर बाहेर आलेला आरोपी सुनील शाहीने ८ एप्रिलला मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला. आपल्या आई-वडिलांनी एकदाही ऑफर धुडकावून लावली नाही. उलट त्यांनी अॅडव्हान्स रक्कम मागितली. शाही जेव्हा या मुलीच्या आई-वडिलांना भेटला तेव्हा ती तिच्या रुममध्ये होती. तिने हे सर्व बोलणे ऐकले. शाही तिथून निघून गेल्यानंतर ती बाहेर आली व तिने आई-वडिलांना जाब विचारला. त्यावर ते साक्ष फिरवण्यासाठी मुलीची मनधरणी करु लागले. मी तक्रार मागे घेण्यास नकार दिला पण माझे आई-वडिल माझी समजूत काढत होते. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याने त्यांनी मला मारहाण सुद्धा केली. त्यानंतर गरीबीचे कारण देऊन मला भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एका व्यक्तिने आमच्या घरी पाच लाख रुपये आणून दिले. माझ्या आई-वडिलांनी ते पैस घरात ठेवले व ते कोर्टात जाण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर या मुलीने पैशांची ती बॅग उचलली व थेट अमन विहार पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली असून वडिल फरार झाले आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002