व्हीएस न्युज - कुलूप लावून बंद असलेल्या मोबाईल शॉपीच्या पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील विविध कंपन्याचे मोबाईलसह रोख रक्कम असा 1 लाख 86 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 31 मार्च मध्यरात्री हिंजवडीतील शिवाजी चौकात घडली. प्रविण जगताप (वय-36, रा. पवार नगर, थेरगांव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांची हिंजवडीतील शिवाजी चौकात न्यु टेक मोबाईल शॉपी आहे. 31 मार्च मध्यरात्री चोरट्यांनी शॉपीच्या पाठीमागील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. विविध कंपन्यांचे 13 मोबाईल व 19 हजारांची रोकड असा 1 लाख 86 हजार 143 रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार न्यायणे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - बसमधून उतरून मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्या एका तरूणाचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी आठ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता शाहुनगर नंदिनी हॉटेल चौकात घडली. शंतनू ठुबे (वय-23, रा. पुर्णानगर, चिंचवड) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंतनू रविवारी दुपारी बसमधून उतरून मोबाईलवर बोलत पायी जात होता. नंदिनी हॉटेल चौकात दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांपैकी एकाने शंतनूच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. फौजदार बांबळे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - लोखंडी कोयते आणि तलवारीचा धाक दाखवून सात जणांच्या टोळक्याने चिखली, म्हेत्रेवस्ती येथे दोन ठिकाणी लुटमार केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. भागीराम चौधरी (वय 21, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आक्या बॉण्ड (रा. घरकुल, चिखली), वसीम शेख (रा. ओटा स्कीम, निगडी), विशाल खरात (रा. ओटा स्कीम, निगडी), अजय चौधरी, राहुल दांडे आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भागीराम चौधरी म्हेत्रेवस्ती मधील सिद्दीविनायक सोसायटीमध्ये राहतात. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास सात जणांच्या टोळक्याने त्यांच्या सोसायटीमध्ये घुसून लोखंडी कोयते व तलवारीचा धाक दाखवून फिर्यादी भागीराम चौधरी यांचा एक मोबाईल, आर्या चौधरी यांचे पाकीट व रोख रक्कम, कन्हैया चौधरी यांच्याकडील रोख रक्कम असा एकूण सात हजार 50 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच आकाश भीम थापा, मौसम चौधरी या दोघांना मारहाण केली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. यानंतर याच टोळक्याने कुदळवाडी येथील कृष्णा इंजिनिअरिंग कंपनीमध्ये घुसून कंपनीतील कामगार सुबेंदू पात्रा आणि गौरीशंक गुरुलिंगय्या स्वामी यांना मारहाण केली. कंपनीतील कामगार हरिलाल रामूजागीर यांचा मोबाईल फोन चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी तरुणावर लोखंडी कोयता आणि तलवारीने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री तळवडे येथे घडली. नितीन महावीर चंदनशिवे (वय-20, रा. सिध्दनाथ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर तळवडे) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित सकट, हृतिक सकट, बबलू (तिघेही रा. दळवीनगर, निगडी), आक्या बॉण्ड (रा. घरकुल, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन चंदनशिवे रविवारी रात्री जेवण करून बाहेर फिरण्यासाठी गेला होता. आरोपी एका पानटपरीवर उभे होते. नितीनची आरोपींबरोबर दीड महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी लोखंडी कोयता आणि तलवारीने नितीनवर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. भांडणे सोडविण्यासाठी नितीन याचा भाऊ प्रवीण आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली. नितीनवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. फौजदार एस. वाय. होळकर अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - माजी कर्नल महिलेच्या आईच्या बॅक खात्यावरून एका नामांकित बॅकेतील कर्मचाऱ्याने सव्वासात लाख रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी ते 6 मार्च 2018 दरम्यान पिंपरीत घडला. माजी कर्नल तृप्ता किशन सूरी (वय 59, रा. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज स्टाफ क्वार्टर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पृथ्वीराज सावळे (वय-26) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार मधुसूदन घुगे यांनी माहिती दिली. तृप्ता सुरी या माजी कर्नल आहेत. त्या पिंपरीतील डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयात संचालक मंडळावर कार्यरत आहेत. जानेवारीमध्ये एका नामांकित बॅकेचे काही कर्मचारी कर्मचाऱ्यांची सॅलरी बॅक खाते काढण्यासाठी महाविद्यालयात आले होते. यावेळी फिर्यादी यांनी आरोपी पृथ्वीराजला आपल्या ज्येष्ठ आईचेही बॅकेत खाते काढण्याचे असल्याचे सांगितले. खाते काढल्यानंतर 51 हजार रूपयांचा धनादेश जमा केला. त्यानंतर साडेतेरा लाख रूपयांचा धनादेशही जमा करण्यास आरोपीला सांगितले. त्यानंतर आरोपीने धनादेशाचे पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर खात्यातून सात लाख 25 हजार 709 रुपये काढून घेतले. हा प्रकार सूरी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - मोशी येथील संजय गांधी नगर येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर गेल्या दहा वर्ष पासून अंधारात आहे. सदर ठिकाणी पाणी,आरोग्य आणि विद्युत व वृक्ष सुशोभीकरण नसून सदर विषयी महापालिकेला वेळोवेळी कळवण्यात आले होते. महापालिका प्रशासन या समस्या सोडविण्यास दुर्लक्ष करत असल्याचे आरोप संतोष कसबे ( भोसरी चारोली मंडळ भा.ज.पा. सरचिटणीस ) यांनी केले.
दिनांक- ०२/०४/२०१८ रोजी मा.आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांना संतोष कसबे यांनी निवेदन दिले आहे . ४८ तासात जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात आणि परिसरात पाणी ,आरोग्य आणि विद्युत या वृक्ष सुशोभीकरण झाले नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा संतोष कसबे यांनी निवेदना द्वारे दिला आहे.
व्हीएस न्यूज - मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक आरक्षण मिळावे म्हणून 1982 सालापासुन पाठपुरावा सुरु आहे. मागील कालावधीत सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत राज्यभर लाखोंच्या संख्येने 58 मुक मोर्चा आणि 18 डिसेंबर 17 रोजी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडाळाशी चर्चा केली. लवकरच मराठा समाजाबरोबरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी त्यावेळी आश्वासन दिले होते. परंतू मुख्यमंत्र्यांना अद्यापपर्यंत बैठकीला वेळ नाही. सरकारच्या डोळ्यावरचे झापड उघडण्यासाठी व मराठा आरक्षण संघर्ष समितीची पुढची दिशा ठरविण्यासाठी शनिवार दि. 7 एप्रिल 2018 रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापुरमध्ये रेसिडेंन्सी क्लब येथे राज्यातील मराठा समाजाच्या सर्व संघटना, संस्था, मुख्य माध्यम प्रतिनिधी, इतिहास संशोधक, मार्गदर्शक यांची ‘गोलमेज परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी पिंपरी (पुणे) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. मधूकरराव पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष आबा पाटील, कोकण विभाग अध्यक्ष विलास सांवत, मराठा युवा अध्यक्ष रविंद्र खोत, ठाणे विभाग अध्यक्ष अविनाश पवार, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट सर, मराठा युवा संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, मराठवाडा युवा अध्यक्ष दत्ता मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी सुरेशदादा पाटील यांनी सांगितले की, यापुर्वी काढलेल्या मोर्चातून समाजाने प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे राज्यभर मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच 9 ऑगस्ट मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील सर्व मराठा आमदारांच्या माध्यमातून निवेदन दिले होते. या सर्व निवेदनामध्ये मराठा सामाजाच्या मागण्यांचा उल्लेख केलेला आहे. सदर सर्व मागण्यांवर उद्यापर्यत कोणतेही ठोस निर्णय झालेले नाहीत. मराठा समाजाची दिशाभूल करीत मुख्य मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन सरकारने त्यांच्या सोयीनुसार फसवे जीआर काढून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मागणी 50/ 45/ 5 अशी असताना सरकारने गरजूंना बँकेकडून कर्ज देण्यासाठी जीआर काढला. मात्र, या कर्जासाठी एकही टक्का अनुदान दिले नाही. उलट हे कर्ज मिळविण्यासाठी आर्थिक मागास प्रवर्गाच्या अनेक अटी लादल्या. 605 कोर्स जाहीर केले. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेल्या मुलांना सवलती न देता 1 लाख, 2.5 लाख उत्पन्न मर्यादेच्या अटी घातल्या आहेत. मात्र, त्याचा समाजासाठी काही उपयोग नाही. शैक्षणिक इबीसी सवलत 60 टक्क्यांवरुन 50 टक्यांवर आणली. तसेच पंजाबराव देशमुख वसतीगृहात प्रवेश घेणा-या विद्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट खालून इबीसी सवलतीची शिष्यवृत्ती 8 हजारापर्यंत केली आहे. मराठा समाजाला पुढे करुन काढलेल्या सर्व जीआरमध्ये एकाही ठिकाणी ‘मराठा समाज’ अशी नोंद नाही हे सर्व जीआर आर्थिक दृष्टया मागास प्रवर्गांसाठी आहे. प्रत्येक योजनेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावांचा वापर करुन बोगस फसव्या योजना पुढे करुन सरकारने छत्रपतींचा व सकल मराठा समाजाचा अवमान केला आहे. प्रत्येक जीआरमध्ये सरकारने व त्यांच्या अधिका-यांनी अनावश्यक अटी टाकून या जीआरचा व महामंडळांच्या सवलतीचा लाभ मराठा समाजाच्या युवकांना कसा घेता येणार नाही याची मात्र काटेकोरपणे दक्षता घेतली आहे. अशी टिका सुरेशदादा पाटील यांनी यावेळी केली.
मराठा आरक्षण संघर्ष समितीची प्रमुख मागणी अशी आहे की, चालू शैक्षणिक (2017-18) वर्षापासूनच मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच सरकारी नोकरीमध्ये इएसबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची अद्यापर्यंत नेमणुक झालेली नाही ती ताबडतोब करावी. तसेच खाली नमुद केलेल्या मागण्या मान्य कराव्यात.
मागण्या: - कोपर्डी प्रकारणाबाबत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या मार्फत पुढील योग्य ती कारवाई करुन आरोपींना फाशी देईपर्यंत शासनाकडून पाठपुरावा करण्यात यावा. मराठा आरक्षण शैक्षणिक वर्ष 2018 सुरु होण्यापुर्वीच लागू करण्यात यावे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाचा गैरवापर रोखण्यासाठी तालुका व जिल्हावार कमीट्या स्थापन करण्यासदर्भात शासन परिपत्रक काढण्यात यावे. शेतक-यांच्या शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालास हमी भाव देण्यात यावा. शाहु महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) हि स्वायत्त संस्था त्वरित कार्यन्वीत करण्यात यावी व मराठा समाजासाठीच असावी. छत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणी त्वरीत सुरु करण्यात यावी. आण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळ पुर्ण क्षमतेने मराठा समाजातील लोकांसाठी कार्यान्वीत करावे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना MPSC / UPSC स्पर्धा परिक्षा यासाठी खासगी शिकवण्या (कोचींग क्लासेस) शिक्षण प्रशिक्षण व अभ्यासिका यासाठी रोख स्वरुपात अनुदान लागू करण्यात यावे. मराठा विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी भरीव अनुदान तसेच व्हीसा पासपोर्ट यासाठी सवलती देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संपुर्ण खर्च शासना मार्फत करण्यात यावा. मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज सुलभ विनातारण उपलब्ध करुन देण्यात यावे. सदर कर्जाचे व्याज शासनाने भरावे. शासनाने जाहिर केलेल्या 605 कोर्सेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांचा समावेश करुन अध्यादेश लागू करावा. सदर सवलत सर्व शासकीय व अशासकीय महाविद्यालयांना लागू करावी. शासनाने जाहिर केलेल्या मराठा वसतीगृहाचे बांधकाम शासनाकडून करण्यात यावे व वसतीगृह भाडे तत्वावर चालू न करता विद्यार्थ्यांना वसतीगृह निर्वाह भत्ता संबंधीत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीला पिंपरी-चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरमने विरोध दर्शविला असून या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. प्लास्टिक पिशव्यांना सक्षम पर्याय मिळेपर्यंत बंदी मागे घ्यावी. पर्यावरण व प्रर्दूषणाला आळा घालण्यात शासन अपयशी ठरत असल्यामुळे याचे खापर शासन उद्योजकांवर फोडत असल्याचा आरोपही फोरमने केला आहे. तसेच या निर्णया विरोधात फोरम न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना याबाबत फोरमच्या वतीने निवेदन पाठविले आहेत. त्यात म्हटले आहे की, प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन आणि वापरावर शासन निर्णयाने बंदी घातली आहे. परंतू,या निर्णयाने पर्यावरणास मदत होणार असे वाटत असले तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यापुर्वी शासनाने राज्यातील प्लास्टिक उत्पादकांच्या संघटना, उद्योजक, तज्ञ यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. पावसाळा दोन महिन्यावर आला असताना 2018-19 या आर्थिक वर्षासाठी प्लास्टिक देशभरातील वितरकांपर्यंत पोहचले आहे. तेव्हा हा निर्णय जाचक आणि अव्यवहार्य असून तो मागे घ्यावा. राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे. त्याचा फटका सुमारे 20 लाखाहून उत्पादक, व्यापारी, कामगार वर्गाला बसला आहे. आजची बाजारपेठ प्लाटिकच्या वस्तुंवर अवलंबून आहे. मात्र बंदीमुळे अनंत अडचणींचा सामना प्लास्टिक उद्योगाला करावा लागत आहे. प्लास्टिक ठराविक उत्पादनांवर बंदी हा पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रर्दुषण थांबविण्याचा एकमेव मार्ग नाही, शासनाने यापुर्वी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली होती. मात्र, योग्य नियंत्रण यंत्रणा नसल्याने अंमलबजावणी अयशस्वी ठरली असताना आताही एकतर्फे निर्णय घेवू नये. अन्यथा या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे फोरमचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, सरचिटणीस ऍड. आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.
व्हीएस न्यूज - शहरातील प्रभाग क्रमांक 13 प्राधिकरण सेक्टर क्र. 22 मध्ये स्थलांतरीय झोपडपट्यांचा भाग नव्याने पुनर्वसन करण्यात आला आहे. या भागात अनेक नागरिक बेकायदेशीरपणे अथवा चोरून वीज वापरतात. त्यामुळे मागेल त्याला वीज मीटर द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मार्चाचे चिटणीस राहूल शिंदे यांनी केली आहे. याबाबत शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सेक्टर 22 मध्ये पुनर्वसन झालेल्या अनेक नागरिकांकडे वीज जोड नाही. त्यामुळे ते बेकायदेशी किंवा वीज चोरून वापरत आहेत. त्यामुळे मागेल त्याला वीज मीटर द्या, तुटलेले डीपी त्वरीत दुरूस्त करा, अंदाजे बीले न देता मीटर रिंडींग घेवून बिले द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी धनगर समाज जोडो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडेनगर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत या भागात सकाळी दहा वजात अभियानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यावेळी आघाडीचे अध्यक्ष दिपक भोजने, महावीर काळे, सुनिल बनसोडे, बंडू मारकड, राम दुधभाते, तानाजी कोपनर, नागनाथ वायकुळे, तानाजी गाडे, दादासाहेब कोपनार, शिवाजी आवारे, श्रीकांत धनगर आदी उपस्थित राहणार आहेत
व्हीएस न्यूज - गाडीचा धक्का लागला म्हणून एका त्रिकुटाने एकाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालत लाथा-बुक्यांनी जबर मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भोसरी येथील संजय गांधी नगर येथे घडला. विकास सर्जेराव इंगळे (वय 35, रा. संजय गांधी नगर, भोसरी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष ठोकळ (वय25), विशाल कांबळे (वय26), शुभम खरात (वय22) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास इंगळे भोसरीतून संजय गांधी नगर येथे घराकडे दुचाकीवरून जात होते. जाताना त्यांच्या दुचाकीचा धक्का आरोपींना लागला. यावरून तिघा आरोपींनी फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांना घरी जाऊन मारहाण केली. आरोपी संतोष ठोकळ याने बाजूला पडलेला सिमेंट ब्लॉक इंगळे यांच्या डोक्यात मारला. दोघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये इंगळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या एका दारूड्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. याबाबत भाऊसाहेब पाटील (वय 35, रा. भोसरी, पुणे) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौसुद्दीन रजाक अत्तार (वय 20, रा. बालाजी नगर झोपडपट्टी, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौसुद्दीन रजाक अत्तार गुरुवारी सायंकाळी हॉटेल थर्माईस जवळ दारू पिऊन गोंधळ घालत होता. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना तो विनाकारण त्रास देत होता. तसेच मोठ्या आवाजात अश्लील भाषेचा वापर करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत होता. याबाबत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गौसुद्दीन याला अटक केली आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002