व्हीएस न्यूज - गेल्या काही दिवसांपासून निगडी प्राधिकरणात भरदिवसा घरात घुसून एका चोरट्याने घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेतील सराईत चोराला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे.
मुकेश उर्फ मुन्ना ऊर्फ धन्या उर्फ धनंजय (वय-21 रा सुटरदरा, कोथरूड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 13 लाख 57 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचा तडीपार गुन्हेगार असून त्याच्यावर 32 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर औवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस पथकाने केली.
व्हीएस न्यूज - मंत्रालयात शिपायाची नोकरी लावतो असे सांगून एका इसमाने चिखलीच्या तरुणाला एक लाख रुपयांना गंडा घातला आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे.
हेमंत रासकर (वय-47 रा. विठ्ठलवाडी देहुगाव) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी याकुब देवाशीश पैलवान (वय-22 रा. घरकुल चिखली) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे वडील कस्टममध्ये ऑफीसर आहेत. त्यांच्या ओळखीने मंत्रालयात नोकरी लावतो असे आमिष दाखवून आरोपीने याकुब यांच्याकडून मे ते नोव्हेंबर या काळात एक लाख रुपये घेतले. मात्र सहा महिने झाले तरी नोकरी लावली नाही तसेच पैसे मागण्यसाठी गेले असता मारहाण करु अशी धमकीही आरोपीने दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - माहेराहून पैसे आणण्यासाठी मानसिक छळ केल्याची आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार एका विवाहितेने केली आहे. याप्रकरणी पतीसह सासू व नणंद यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत 23 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. तिचा विवाह ठाणे येथील तरुणाशी झाला आहे. जानेवारी 2016 पासून माहेरुन पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच पती वारंवार तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. या अत्याचाराला कंटाळून पीडित विवाहिता पिंपरी येथे माहेरी राहण्यास आल्या. छळ असह्य झाल्यानंतर विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा पती, सासू व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - तरूणाबरोबर झालेल्या पुर्वीच्या भांडणातून नऊ जणांच्या टोळक्याने दहशत माजवित तीन मोटारींची तोडफोड केली. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी भोसरीतील संभाजीनगर कॉलनीत रात्री आठ वाजता घडली.
गजानन पवार (वय-50, रा. संभाजीनगर भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश तानाजी साबळे (वय-20, रा. आदर्शनगर, दिघी), शुभम देविदास खंदारे (वय18, रा. सावंतनगर, दिघी) या दोघांना पोलीसांनी अटक केली होती. त्यांना जामीनही मंजुर झाला आहे. सनी रामदास भागरे (वय-27, रा. भोसरी) याच्यासह सहा जण फरार आहेत.
याबाबत फौजदार चामले यांनी माहिती दिली. संभाजीनगर येथील एका तरूणाबरोबर आरोपींची भांडणे झाली होती. या भांडणातून नऊ आरोपींनी 29 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता फिर्यादी व त्यांचे शेजारी संदिप दौंडकर, दत्तात्रय ठाकरे यांच्या मोटारींची लाकडी दांडक्याने तोडफोड केली. परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - दारू पिताना झालेल्या भांडणामधून तरूणाला जीवे मारण्याची धमकी देत तीन मित्रांनी तरूणाकडील चौदाशे रूपये काढून घेतले. हा प्रकार रविवारी पिंपरीतील नव महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागील झाडीमध्ये रात्री साडेअकरा वाजता घडला.
करण तुलसाणी (वय-18, रा. साई चौक, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जतिन बिपीन टाक (वय-22), लक्ष्मण मसरू गुंजाळ (वय-23), संतोष जमादार (वय-23, सर्व रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार अंतरकर यांनी माहिती दिली. करण व आरोपी मित्र आहेत. रविवारी रात्री साडे अकरा वाजता चौघेही पिंपरीतील नव महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागील झाडीत दारू पित बसले होते. त्यांच्यामध्ये पैशांवरून वाद झाला. करणला जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी त्याच्या खिशातील चौदाशे रूपये जबरदस्तीने काढून घेतले. पिंपरी पोलीस अधिक तुपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास के. एस. बी. चौकात घडला. संतोष मारूती मुंडे (वय-28, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुंडे हा शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास चिंचवड येथील के. एस. बी. चौकातून दुचाकीवरून जात होता. समोरून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला जोरात धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. फौजदार एस. के. गायकवाड अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - 'क्लीक इन पोर्टल'वरून कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दोन भामट्यांनी अभियंता तरूणीला ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून एक लाख 30 हजार रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार थेरगांव येथे नुकताच उघडकीस आला. रेखा अर्जुन (वय-25, रा. थेरगांव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजेद्र मोक्र व राजन मोक्र (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार घोळवे यांनी माहिती दिली. फिर्यादी तरूणी बी.ई अभियंता आहे. ती गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होती.'क्लीक इन पोर्टलवरून' आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधला. कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून एक लाख 30 हजार रूपये भरण्यास सांगितले. नोकरी न मिळाल्याने घाबरलेल्या तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या परवानगी महत्वाच्या आहेत. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. मात्र त्यासाठी आवश्यक परवानगी आणि निधी हे दोन्हीही नसल्याचे सांगत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे तुर्तासतरी मेट्रो निगडीपर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’ झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या महामेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेट्रोचे काम हे सध्या नाशिकफाटा ते खराळवाडी आणि सीएमई ते मेगामार्ट या दोन ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत संपूर्णपणे ४ खांब उभारण्यात आले आहेत. याबरोबर पीअर कँप शिवाय ११ खांब उभारले गेले आहेत. तर ४८ खांबांचा पाया रचण्यात आला आहे. हँरिस ब्रिज येथील काम हे ७ डिसेंबर पासून सुरू होणार असून पावसाळ्यापूर्वी ३० जून २०१८ पर्यंत तेथील सबस्ट्रक्चरल पूर्ण होईल. याशिवाय मेट्रोसाठी आवश्यक ४१ सेगमेंट देखील तयार असून व्हायाडक्टचा पहिला स्पँन हा अंदाजे २६ डिसेंबर पर्यंत तयार असेल अशी माहिती डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी यावेळी दिली.
आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रयत्नांना यश
व्हीएस न्यूज - अल्पसंख्यांक अकादमीच्या धर्तीवर बामु विद्यापीठात 'पाली अकादमी'ची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी त्याबाबतची घोषणा केली.
पाली ही भारतीय उपखंडामधील एक प्राकृत भाषा होती. हा सांस्कृतीक ठेवा जतन करण्यासाठी अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी पाली अकादमी स्थापन करण्याची मागणी केली होती.
पाली अकादमी स्थापन करण्याबाबत राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी बडोले म्हणाले की, पाली भाषेत विपुल प्रमाणात साहित्य आहे. पाली साहित्याची माहिती नागरिकांना व्हावी व ही पाली भाषा शिकता यावी याबाबत अकादमी कार्य करणार आहे. तसेच पालीमधील ग्रंथांचे भाषांतर करण्यात येणार आहे. पाली भाषेच्या विकासासाठी विविध कार्यक्रम आखण्यासाठी पाली अकादमीबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बडोले यांनी केल्या. पाली भाषेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. पाली भाषा सुरू करणाऱ्या शाळांना पाली अकादमीच्या माध्यमातुन अनुदान देण्याबाबतही विचार होणे आवश्यक आहे. पाली भाषेच्या प्रसारामुळे जुन्या संस्कृतीची ओळख होणार असल्याने पर्यटनालाही चालना मिळेल, असे मत आमदार व पाली भाषेचे प्राध्यापक चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव एस. एस. तागडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पाली आणि बुद्धिझम विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पगारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागाचे डॉ. महेश देवकर, के. जी. सोमय्या फॉर बुद्धिस्ट स्टडीजच्या प्रभारी संचालक डॉ. सुप्रिया राय आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - 'रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी' यांनी सुरू केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या 'उगम ते संगम' या उपक्रमाला खासदार अमर साबळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रोटरीच्या उपक्रमाचे कौतुक केले. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून तब्बल ५ ट्रक जलपर्णी गोळा करण्यात आली.
रोटरी क्लबच्या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवीत केलेले ७० वर्षांचे चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्यासह वाल्हेकरवाडीतील तरुण आणि ग्रामस्थ सहकुटुंब या अभियानामध्ये सहभागी झाले होते. उगम ते संगम अभियानाचा हा तिसरा आठवडा आहे.
यावेळी बोलताना खासदार अमर साबळे यांनी, पिंपरी चिंचवड महापालिका नदी सुधार योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व सुविधा आपण या उपक्रमाला मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. तसेच रोटरीच्या उपक्रमाला ११ हजार रुपयांची देणगीही खासदार अमर साबळे यांनी दिली. उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या वतीने ठेवलेल्या देणगी कलशामध्ये एकूण ५१ हजार १२० रुपयांची रक्कम जमा झाली.
व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड महानगरपालिका समाजातील सर्व अपंग व दुर्बल घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून या घटकांच्या कल्याणाचे काम निरंतर चालू ठेवण्यासाठी तसेच नवीन व अभिनव योजना हाती घेणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन व विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या अपंग व्यक्तींचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, नगरसदस्य नामदेव ढाके, शैलेश उर्फ शैलेंद्र मोरे, विलास मडीगेरी,नगरसदस्या प्रियांका बारसे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, अपंग कल्याण समिती सदस्य प्रहार अपंग क्रांती आंदोलन अध्यक्ष दत्तात्रय भोसले, पिंपरी चिंचवड कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्ष परशुराम बसवा, अपंग जागृत संघटना अध्यक्ष मानव कांबळे, पिंपरी चिंचवड अपंग मित्र मंडळाचे संस्थापक विश्वनाथ वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते राजू वाघचौरे, काशिनाथ नखाते आदी उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अपंग व दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या पूर्वीच्या योजनांमधील उणीवा दूर करून त्या योजना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महापालिकेच्या वतीने शहरातील अंध अपंग व्यक्तींना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. अपंगाना पेन्शन देणारी पिंपरी चिंचवड ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे. अपंग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती रकमेत भरीव वाढ करण्यात आली असून अपंग व्यक्तींसाठी सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे अपंग भवनही बांधण्यात येणार आहे. तसेच मतीमंद व कृष्ठ्पिडीत अपंग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या दरमहा अर्थसहाय्य रकमेत भरीव वाढ करण्यात आली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अपंग व्यक्तींना आत्मसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका प्रयत्नशील असून विविध योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा या घटकापर्यंत पोहचविण्याचा सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
महापालिका हद्दीतील सर्व शासकीय व महापालिका मालकीच्या इमारतींना अपंगांसाठी रॅम्पची सोय करण्याचा प्रयत्न केला जाईल. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, अपंगाना विविध सवलती देणारी व पेन्शन योजना सुरु करणारी पिंपरी चिंचवड ही एकमेव महापालिका आहे. यापुढेही अशा योजना राबविण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. अपंग जागृत संघटना अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले, महापालिका परिसरातील अपंगांसाठी कुठल्याही जाचक अटी न लादता दरमहा २ हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्याचा महापालिकेने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. अपंगांच्या बाबतीत संवेदनशील कृती महापालिका करीत आहे ही विशेष बाब आहे. अपंग कल्याण समिती स्थापन केली आहे. महापालिका हद्दीत राहणाऱ्या ३५ ते ४० हजार अपंग कुटुंबांच्या सदस्यांना प्रशिक्षित करण्यासाठी मनपाने प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे. स्वतःमध्ये क्षमता असेल तर ध्येय आपल्याला प्रामाणिकपणे साध्य करता येते. अपंगांनी नेहमी स्वाभिमान बाळगावा, याचना करणारा कधीही स्वाभिमानी होऊ शकत नाही. अपंगाना मदत केली तर पुण्य मिळते ही भावना चुकीची आहे. अपंगाना दयेची नव्हे तर मदतीची साथ हवी आहे. कष्ट करताना कोणाकडे लाचार न होता क्षमता ओळखून निर्धाराने काम केल्यास यश हमखास मिळते. जे अनुदान सहकार्य लाभ मिळेल त्यावर व्यवसाय धंदा करून जीवन जगले तर, हा जागतिक अपंग दिन साजरा झाला असे म्हणता येईल असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी विजय काणेकर म्हणाले, अपंग कायदा- २०१६ हा कायदा- डिसेंबर २०१६ मध्ये अंमलात येताच यापूर्वीचा १९९५ चा कायदा संपुष्टात आला. सर्व अपंग व्यक्तींनी अपंग कायदा- २०१६ वाचला पाहिजे. या कायद्याद्वारे अपंगाना बहाल केलेले हक्क व अधिकार अपंग व्यक्ती आपल्या विकासासाठी वापरू शकतात. यामध्ये अपंगांसाठी नोकरीतील आरक्षण ३ वरून ४ टक्क्यावर करण्यात आले आहे. महिला व बालकांना या कायद्यामध्ये सन्मानाचे स्थान दिले असून त्यांचे हक्क अबाधित ठेवले आहे. आपली स्वंयसिद्धता सादर करण्यासाठी या कायद्याने अपंगांना अभय दिले आहे. केंद्र व राज्य सरकारने तालुका व जिल्हा पातळीवर अपंगांचे हक्क अबाधित राहण्यासाठी समिती स्थापन करून या समितीद्वारे अपंगांना संरक्षण द्यावे. या कायद्याद्वारे अपंगाना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा अपंगांनी लाभ घ्यावा. राज्य शासनाने अपंगांसाठी स्वतंत्र्य रोजगार व स्वंयरोजगार कक्ष स्थापन करावा. तसेच जनजागृती व प्रशिक्षणाची व्यवस्था करावी असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या अपंग व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मुरलीकांत पेटकर, संकल्प बोत्रे,जगन्नाथ मैत्राणी, भाऊसाहेब बोत्रे, प्रकाश मोरे, निलेश बागुल, विवेक मालशे, सतीश नायर, गिरीष मोरे, जसविरसिंह यांचा समावेश आहे. यावेळी नगरसदस्य प्रियांका बारसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ऐवले यांनी तर सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002