व्हीएस न्यूज – कुरिअर कंपनीत काम करणा-या एका नववी उत्तीर्ण युवकाने चक्क अॅमेझॉन ई-कंपनीला १.३ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. अॅमेझॉनकडून मिळालेल्या एका टॅबच्या सहाय्याने बिलांमध्ये हेराफेरी करून हा गैरव्यवहार केल्याचा आरोप या युवकावर आहे.
दर्शन इलियास ध्रुव (२५) असे या युवकाचे नाव आहे. त्याने आपल्या मित्रांनाही महागडय़ा उत्पादनांची ऑर्डर नोंदवायला सांगितली. पैसे ट्रान्स्फर न होताही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली. या प्रकरणी ४ तरुणांना २५ लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. यात २१ स्मार्टफोन, १ लॅपटॉप, एक आयपॉड, १ अॅपलच्या घडय़ाळाचा समावेश आहे. चार बाईकही पोलिसांनी सील केल्या आहेत. हे प्रकरण सप्टेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये समोर आले. या कालावधीत अॅमेझॉनला चिकमंगळुरू शहरातून ४,६०४ ऑर्डर्स मिळाल्या ही सर्व उत्पादने दर्शनमार्फत पोहोचवण्यात आली. दर्शन एकदंत कुरिअर कंपनीत काम करत होता. या कंपनीचा अॅमेझॉनशी करार झाला होता. आतापर्यंत या प्रकरणाची पुरेशी स्पष्ट माहिती पुढे आलेली नाही.
मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेमेंट आणि डिलिव्हरीशी संबंधित माहितीसाठी एक डिजीटल टॅब अॅमेझॉनने दर्शनला दिला होता. याद्वारे दर्शनने पेमेंट प्रक्रियेत गडबड केली. दर्शनने कार्ड स्वाइप करताना एक बनावट अलर्ट तयार केला होता. अॅमेझॉनच्या अधिका-यांना ऑडिटच्या वेळी ही बाब ध्यानात आली.
व्हीएस न्यूज – गावातीलच एका दूध संकलन केंद्राच्या चेअरमनला शेतकऱ्याने घरात असलेल्या गाईची परवड होऊ नये म्हणून गाय विकून टाकली. ४० हजारात सौदा ठरला. पण विकलेल्या गाईचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पैसे देण्याएवजी चक्क पेटवून देण्यात आले. पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली.
येवलवाडी येथील अश्रुबा दश्रथ नागरगोजे यांनी सततचा दुष्काळ आणि त्यातच होत असलेल्या नापिकीमुळे त्यांची गाय गावातीलच ओम दूध संकलन केंद्राचा चेअरमन भास्कर नागरगोजे याला ४ दिवसांपूर्वी विकली होती. खरेदीदारास व्यवहार ठरल्याप्रमाणे पैसे देणे बंधनकारक असल्यामुळे रविवारी सकाळी अश्रुबा नागरगोजे हे पैसे मागण्यास गेले असता एवढ्या सकाळीच पैसे का मागण्यास आलास? मी पैसे नाही देणार, असे चेअरमन म्हणाला. त्यावर आश्रुबा यांनी पैसे देणार नसाल तर मी गाई घेऊन जाईन, असे म्हटले. खरेदीदार आणि इतर तिघांनी यावरूनच अश्रुबा यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. यात आश्रुबा गंभीररित्या जखमी झाले होते. बीडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यात घटनेत तब्बल ८० टक्के भाजलेल्या अश्रुबा नागरगोजे यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
अश्रुबा यांना गाईचा खर्च झेपत नव्हता म्हणून त्यांनी भास्कर नागरगोजे याला गाय विकली होती. पण भास्कर याची नियती पैसे देताना फिरली आणि त्याने आपल्या अन्य ३ साथीदारांसह अश्रुबा यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. घटनेनंतर चारही आरोपी फरार झाले असून, पाटोदा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्यूज - क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढावे यासाठी खासदार श्रीरंग बारणे गेली तीन वर्ष प्रयत्न करीत होते. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना भेटून त्यांनी १८ एप्रिलला चापेकरांचा स्मृतिदिन असल्याने त्या दिवशी तिकीट प्रसिध्द करण्याची मागणी केली होती. आज पुन्हा त्यांची भेट घेऊन त्या मागणीचा पुनरुच्चार केला. १८ एप्रिल २०१८ रोजी क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट केंद्रीय संचार मंत्रालय विभागाकडुन प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या बरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते.
क्रांतीवीर चापेकर बंधुचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे. क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांनी १८९७ मध्ये वाल्टर चार्ल्स रॅण्डचा वध केला होता. एकाच परिवारातील तीन भावंडे स्वातंत्र्य संग्रामासाठी शहीद झाले होते. क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी गेली तीन वर्ष पाठपुरावा केला. चापेकरांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले. चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी याबाबत सर्व मदत बारणे यांना केली. १८ एप्रिल २०१८ रोजी चापेकरांच्या जन्मगावी चिंचवड येथे अथवा दिल्ली येथे क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले जाणार असल्याचे बारणे यांनी सांगितले. क्रांतिवीर चापेकरांचे पोस्टाचे तिकीट म्हणजे क्रांतिवीर चापेकरांच्या स्मृतीस अभिवादन ठरेल असे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - भारतीय महिलांना तेच काम करणाऱ्या पुरुषांपेक्षा 20 टक्के कमी पगार मिळतो आणि यातून वेतनामधील लिंगभेद समोर येतो, असे एका ताज्या पाहणीच्या अहवालात म्हटले आहे.
मॉन्स्टरइंडिया या नोकरीविषयक संकेतस्थळाने जारी केलेल्या ताज्या मॉन्स्टर सॅलरी निर्देशांकानुसार (एमएसआय) पुरुषांना ढोबळ मानाने तासाला सरासरी 231 रुपये पगार मिळतो, तर महिलांना केवळ तासाला सरासरी 184.80 रुपये मिळतात. पेचेक.इन आणि आयआयएम-अहमदाबाद यांच्या सहयोगाने ही पाहणी करण्यात आली आहे. “एकंदरीत वेतनामध्ये लिंगभेदाचे प्रमाण 20 टक्क्यांएवढे असून हा आकडा मोठा आहे,” असे मॉन्स्टर.कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत मुखर्जी यांनी सांगितले.
वार्षिक तुलना केली तर स्त्री-पुरुषांच्या वेतनामधील ही तफावत कमी होत आहे. वर्ष 2016 मध्ये ती 24.8 टक्के एवढी होती. मात्र कामातील अनुभव जसजसा वाढत जातो तसतसे ही तफावत वाढत जाते,असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, 0 ते 2 वर्षांचा अनुभव असलेल्या पुरुषांना सरासरी 7.8 टक्के जास्त वेतन मिळते, तर 6 ते 10 वर्षांचा अनुभव असलेल्या पुरुषांना सरासरी 15.3 टक्के जास्त वेतन मिळते आणि 11 पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या पुरुषांना सरासरी 25 टक्के जास्त वेतन मिळते.
व्हीएस न्यूज – विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आपल्या गाडीवर ट्रक चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केला आहे. प्रवीण तोगडिया संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी आरोप केला आहे.
कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला पण आपण त्यातून सुखरूप बचावलो. ही संघाची जागा असल्यामुळे आपण येथे बोलणार नसल्याचेही तोगडिया म्हणाले. बुधवारी तोगडिया यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अपघात झाला होता. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. एका ट्रकने त्यांच्या बुलेटप्रुफ गाडीला मागच्या बाजूने धडक दिली. प्रविण तोगडिया यांना झेड प्लस सुरक्षा आहे. पण अपघात झाला तेव्हा तोगडिया यांच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक गाडीपासून फार मागे होते. अपघातानंतर प्रविण तोगडिया अहमदाबादला गेले.
व्हीएस न्यूज - अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरुषी-हेमराज हत्येप्रकरणी डॉक्टर राजेश तलवार आणि नूपूर तलवार यांना मुक्त केल्याच्या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायदेशीरपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
हेमराज यांची पत्नी खुमकला यांनीही यापूर्वी गेल्या १६ डिसेंबर २०१७ रोजी याचिका दाखल केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा असून या प्रकरणाचा नव्याने तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नोएडामध्ये डॉ. तलवार यांच्या घराच्या छतावर हेमराजचा मृतदेह आढळून आला होता. एवढेच नाही तर तेथे रक्त आणि झटापट झाल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याची गरज आहे.
आरुषी-हेमराज हत्येप्रकरणातील राजेश आणि नूपूर तलवार हे मुख्य संशयित आहेत. २०१३ मध्ये सीबीआय न्यायालयाने या दोघांनाही हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते आणि आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर या दोघांनीही या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यात पुराव्याआभावी या दोघांनाही मुक्त करण्यात आले होते.
व्हीएस न्यूज – तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा मिळण्याबाबत होत असलेली चालढकल पाहून ‘एनडीए’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अवघ्या वर्षभरावर २०१९ च्या लोकसभा निवडणुका आलेल्या असताना एनडीएला चंद्राबाबूंनी रामराम करणे ही मोठी घडामोड मानली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच राजकीय घडामोडीचा आधार घेत पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून शिवसेनेला टीकेचे लक्ष्य बनवले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या, ‘सत्तेतून बाहेर पडू’ या घोषणेची खिल्ली उडवली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात चंद्राबाबू नायडू यांना हातात बॅग आणि दुसऱ्या हातात एक गाठोड घेऊन घराबाहेर पडताना दाखवले असून दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमकीची खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंनी यात कसला आला आहे ‘मर्द’पणा? त्यांना म्हणावे हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून, अपमान गिळून वर सरकारला धमक्या देऊन पहा, असा मार्मिक संदेश देत पुन्हा एकदा शिवसेनेवर कुरघोडी केली आहे.
व्हीएस न्यूज – ब्लॅकबेरीने टेक्नोलॉजी चोरल्याचा आरोप लोकप्रिय मेसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर केला असल्यामुळे जगभरात वापरण्यात येणारे व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे मेसेंजर अॅप धोक्यात आहे. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपचा वापर इंटरनेटचा विस्तार झाल्यापासून बेसुमार वाढला आहे.
याबाबत रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकवर मॅसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसाठी आपली टेक्नोलॉजी चोरल्याचा आरोप ब्लॅकबेरीने केला आहे. या अॅपवर सध्या सुरु असेलेले फिचर आमची पेटेंट टेक्नोलॉजी असल्याचा दावा ब्लॅकबेरीने केला आहे. ब्लॅकबेरीने केलेल्या दाव्यानुसार, ब्लॅकबेरीच्या टेक्निकचा प्रयोग फेसबुक इंस्टन्ट मॅसेजिंग अॅप, व्हॉट्सअॅपमध्ये करत असल्यामुळे लॉस इंजेलिसमधील न्यायालयात ब्लॅकबेरीने फेसबुकवर टेक्नोलॉजी चोरी केल्याचा खटला दाखल केला आहे.
ब्लॅकबेरी १५ वर्षापूर्वी मॅसेंजर युजर्समध्ये लोकांच्या पहिल्या पसंतीचे होते. आपल्या युजर्ससाठी नवनवे प्रयोग करणाऱ्या फेसबुक, व्हॉट्सअॅपवर ब्लॅकबेरीने चोरीचा आरोप केला असल्यामुळे आता यांच्याच कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे आम्ही डेव्हलप करण्यात आलेल्या टेक्निकचा वापर करत आहे असा ब्लॅकबेरीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हिएस न्यूज - इंदोरी येथील इंद्रायणी अंध, अनाथ कल्याण केंद्रातील विद्यार्थ्यांना महेश आल्हाट सोशल फाऊंडेशनच्या वतीने तांदूळ, गहू यासह खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी महेश आल्हाट, जयसिंग हिरे, कमलेश कांडगे, वैभव वाघ, अभिजीत टाकळकर, दिपक पवार, अक्षय मांडेकर, अविनाश कारले, संकेत जाधव, दिपक पिंजण आदी उपस्थित होते.
व्हिएस न्यूज - राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयत डुडूळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला पदवीगृहण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार विलास लांडे, प्राचार्य डॉ. गौतम भोंग, विश्वस्त मारूती वाघमोडे, प्रताप खिरीड, डॉ. अशोक पाटील, प्रा. किरण चौधऱी, प्रा. डॉ. रमेश काटेदेशमुख, अश्विनी भोसले-चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ऋतिका जगताप व प्रा. अशिष फुगे यांनी केले. प्रा. मारूती शिंदे यांनी आभार मानले.
व्हिएस न्यूज - चॉकलेटचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलाला निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास कुदळवाडी येथे घडला.
इर्शाद शहा (रा. फाईन काट्याजवळ, कुदळवाडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुळशी रोड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याला कुदळवाडी येथील रिव्हर रेसिडेन्सीच्या जवळ नदीजवळ नेले. त्याला धमकावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलाने घरी आल्यानंतर वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने भारतात परतण्याची तयारी दर्शवली असून खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत आर्थर रोड तुरुंगात ठेवावे अशी अट त्याने सरकारसमोर ठेवली होती, असा दावा मंगळवारी ठाण्यातील न्यायालयात करण्यात आला. मात्र, सरकारने दाऊदचा प्रस्ताव अमान्य केला आणि अजूनही दाऊदला अटक झाली नाही, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली.
दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला मंगळवारी ठाण्यातील जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मिरा रोडमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दाऊद, त्याचा भाऊ इकबाल कासकर आणि अनीस हे तिघे आरोपी आहेत. कासकरच्या कोठडीत वाढ करावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली. यादरम्यान, कासकरची बाजू मांडणारे वकील श्याम केसवानी यांनी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली. दाऊदला भारतात परतायचे आहे. राम जेठमलानी यांनी सरकारला याबाबत माहिती देखील दिली. दाऊदने सरकारसमोर काही अटी ठेवल्या होत्या. मात्र सरकारने दाऊदची मागणी फेटाळून लावली आणि त्याला अजूनही अटक होऊ शकली नाही, असे त्यांनी कोर्टात सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002