व्हिएस न्यूज - पुणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराची आत्ताची वास्तू पूर्णपणे पाडून नवीन वास्तू उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून काही रंगकर्मींना आत्ताची वास्तू नेस्तनाबूत करुन नवीन इमारत बांधण्याची खरच गरज आहे? असा सवाल उपस्थित करत या योजनेवर आक्षेप घेतले आहेत.
पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा सांगणारी वास्तू म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर. पण ५० वर्षानंतर ही वास्तू पाडून तिथे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर होणार आहे. पु. ल. देशपांडे यांच्या कल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिर हे साकारले असल्यामुळे ही वास्तू फक्त पुणेकरांसाठीच नाही तर समस्त नाट्यप्रेमींसाठी महत्त्वाची आहे. काही कलाकारांनी हे सांस्कृतिक केंद्र पुनर्विकसित करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. नाटककार अतुल पेठे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी या निर्णयावर नापसंती दर्शवली आहे. १९६२ साली बालगंधर्व रंगमंदिर संभाजी बागेच्या जागेत उभारण्यात आले आणि येथे १९६८ सालापासून नाटक नांदू लागले. ५० वर्षांनंतर आता या वास्तूची ‘एक्स्पायरी’ झाल्याने आता ‘अपडेटेड’ इमारत उभे राहणे गरजेचे असल्याची पालिकेची भूमिका असून कलाकारांच्या सल्ल्यानेच नवीन इमारतीचा आराखडा तयार केला जाईल अशी ग्वाही पालिकेकडून देण्यात आली आहे.
व्हिएस न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करताना सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाने ‘आदरणीय’ किंवा ‘श्री’असा न केल्यामुळे त्याला सीमा सुरक्षा दलाने शिक्षा सुनावली आहे. बीएसएफने हा पंतप्रधानांचा अनादर असल्याचे कारण देत त्याजवानाचे ७ दिवसांचे वेतन कापले आहे.
महतपूर, नादिया (पश्चिम बंगाल) येथे बीएसएफच्या १५ व्या बटालिअनच्या मुख्यालयात ही घटना घडली. कॉन्स्टेबल संजीव कुमार यांनी झीरो परेडमध्ये अहवाल सादर करताना “मोदी प्रोग्राम” असा उल्लेख केला. कुमार यांच्याविरोधात बटालियनचे कमांडिंग अधिकारी, कमांडंट अनुपम लाल भगत यांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बीएसएफ कायद्याच्या कलम ४० अन्वये संजीव कुमार दोषी आढळल्यामुळे कुमार यांचे ७ दिवसांचे वेतन कापण्यात आले.
व्हिएस न्यूज - त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर काही ठिकाणी किरकोळ हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे वृत्त येत आहे. याचदरम्यान तामिळनाडूतील भाजपा कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. ही घटना तामिळनाडूतील वेल्लूर येथे पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्यानंतर घडली. पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड आणि बॉम्ब फेकण्याच्या घटनेचा संबंध जोडला जात आहे.
तामिळनाडूतील कोईमतूर येथील भाजपाच्या कार्यालयावर मंगळवारी रात्री उशिरा अज्ञात युवकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना वेल्लूरमध्ये पेरियार आंदोलनाची सुरूवात करणाऱ्या इ.व्ही. रामास्वामी यांनी पेरियार यांचा पुतळ्याची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपा आणि एका सीपीआय कार्यकर्त्याच्या अटकेनंतर घडली. पुतळ्याच्या चेहऱ्याची तोडफोड केल्यानंतर वेल्लूर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
वेल्लूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री समाजसुधारक आणि द्रविड आंदोलनाचे संस्थापक इ व्ही रामासामी पेरियार यांच्या प्रतिमेचे नुकसान करण्यात आले. दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना राजकीयदृष्टया अत्यंत महत्वाची आहे. कारण भाजपाच्या एका नेत्याने पुढचा नंबर हा एका नास्तिक नेत्याच्या पुतळ्याचा असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी दोन व्यक्तींना आता अटक करण्यात आली आहे. मुथुरमन आणि फ्रान्सिस अशी त्यांची नावे आहेत. दोघांना अटक केली असून दारूच्या अंमलाखाली हे कृत्य झाल्याचे सांगण्यात येते. मुथुरमन हा भाजपाचा तर फ्रान्सिस हा सीपीआयचा कार्यकर्ता असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तत्पूर्वी भाजपाचे एक नेते एच राजा यांनी तामिळ भाषेत फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, लेनिन कोण आहे. लेनिन आणि भारतामध्ये काय संबंध आहेत. भारत आणि कम्युनिस्टांमध्ये काय संबंध आहे. आज त्रिपुरात पुतळा हटवण्यात आला. उद्या तामिळनाडूमधल इ व्ही रामास्वामी यांचा पुतळा असू शकतो. नंतर या नेत्याने आपली पोस्ट डिलिट केली होती. इ व्ही रामास्वामी उर्फ पेरियार (१८७९-१९७३) यांनी प्रसिद्ध पेरियार आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन नास्तिकतेच्या प्रसारासाठी ओळखले जाते. त्यानंतर द्रविड कडगम नावाने राजकीय पक्षही काढला होता. त्याच्या विविध शाखा आणि डीएमकेसारख्या द्रविडियन पक्षाच्या सदस्यांनी नास्तिकतेचा प्रसार केला होता. तत्पूर्वी, त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्यात आला होता.
व्हिएस न्यूज – सरकारने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याच्या पाश्वभूमीवर कर्जासंदर्भातील काही नियम कठोर करण्याचे ठरवले असून अर्थमंत्रालयाने यासंदर्भात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ५० कोटींहून अधिक कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्या पासपोर्टचा ४५ दिवसांच्या आत आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. नीरव मोदी आणि विजय माल्ल्यासारख्या देश सोडून पळून जाणाऱ्या घोटाळेबाजांना लगाम घालण्याच्या दृष्टीने हे निर्देश देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
कर्जदाराकडे जर पासपोर्ट नसेल तर त्याच्याकडून पासपोर्ट नसल्याचे लेखी प्रमाणपत्र बँकांना घ्यावे लागणार आहे. असे,अर्थमंत्रालयाचा हवाला देत सूत्रांनी सांगितले. लोन अॅप्लिकेशनमंध्ये बँकांनी थोडा बदल करून त्यात पासपोर्ट संदर्भातील माहितीचा समावेश करायला हवा. संबंधित व्यक्तीची पासपोर्ट माहिती यामुळे बँकांकडे येईल. याचा फायदा बँकांना संबंधितांवर वेळेत कारवाई करण्यासाठी होईल. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याला माहिती देऊन, देश सोडून जाण्याचा विचार करणाऱ्या घोटाळेबाजांनाही लगाम घालण्यासाठीही याचा उपयोग होईल, असा सल्लाही अर्थमंत्रालयाने दिल्याचे,सूत्रांनी सांगितले.
जर पासपोर्टची माहिती बँकांकडे नसेल, तर देश सोडून जाण्यास सक्षम असलेल्या कर्जदारांवर बँका वेळेत कारवाई करून शकत नाहीत. नीरव मोदी, मेहूल चोक्सी, विजय माल्ल्या आणि जतीन मेहता यांच्यासारखे काही मोठे कर्जदार देश सोडून गेल्यामुळे बँकेची वसुली यंत्रणा पेचात पडली आहे. मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात फेजेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स बिलाला मंजुरी दिली आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेची १२,७०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यानंतर ही पावले उचलली जात आहेत.
व्हिएस न्यूज - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना संरक्षणासाठी एक नवीन बस मिळणार असून या बुलेटप्रूफ बसची किंमत सात कोटी रुपये एवढी अवाढव्य असणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर चंद्रशेखर राव हे राज्याच्या विविध भागांमध्ये जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यावेळी नक्षलवादग्रस्त भागांचा ते दौरा करणार आहेत. त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन या बसची व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात तेलंगणा छत्तीसगढ सीमेवर 10नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते त्यानंतर माओवाद्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाच्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तेलंगणा रस्ते व इमारत विभाग ही बस विकत घेणार असून तिची अंदाजे किंमत सात कोटी रुपये आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.
यापूर्वी चंद्रशेखर राव यांच्यासाठी बुलेटप्रूफ मर्सिडिज-बेंझ बस विकत घेण्यात आली होती. तिची किंमत चार कोटी रुपये आहे. ती बस तीन वर्षांपूर्वी घेण्यात आली होती. चंद्रशेखर राव यांना सध्या झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असून त्यात 24 तास वैयक्तिक सुरक्षेची तरतूद आहे. त्यांचे निवासस्थान असलेल्या प्रगती भवन येथे ही बुलेट प्रूफ खिडक्या आहेत.
व्हिएस न्यूज - भारतात अल्पवयीन मुलींचे विवाह करण्याचे प्रमाण एका दशकामध्ये आल्याने खाली आले आहे त्यामुळे जगातही बालविवाहांची संख्या घटली आहे, असे बालकांसाठी काम करणारी राष्ट्रसंघाची संस्था युनिसेफने म्हटले आहे.
गेल्या दशकभरात जगभरात दोन कोटी 50 लाख बाल विवाह रोखण्यात आले. त्यातील सर्वाधिक विवाह दक्षिण आशिया भागात रोखण्यात आले आणि त्यातही भारतात ही संख्या सर्वांत जास्त होती, असे युनिसेफने म्हटले आहे. “जगातील किशोरवयीन मुलांपैकी 20 टक्के मुले भारतात राहतात आणि सर्वाधिक बालविवाह होतात. भारताचा आकार आणि लोकसंख्या विचारात घेता ते साहजिक आहे, असे युनिसेफचे बाल संरक्षण विभाग प्रमुख जेवियर अॅग्विलर म्हणाले. सध्याच्या स्थितीत भारतात 27 टक्के किंवा एक हजार मुलींचा वयाची अठरा वर्षे पूर्ण करण्याआधीच विवाह करण्यात येतो. एका दशकापूर्वीच्या संख्येपेक्षा ही संख्या 47 टक्क्यांनी कमी आहे. जगभरात एकूण बालविवाहांचे प्रमाण 15 टक्क्यांनी कमी झाले आहे, असे जेवियर यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले. मुलींमध्ये वाढलेले शिक्षणाचे प्रमाण तसेच समाजात झालेली जनजागृती यामुळे ही घट झाली असल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे.
व्हिएस न्यूज – सरकारी तपास यंत्रणा पंजाब नॅशनल बँकेला ११,४०० कोटींचा चुना लावून विदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीविरोधात वेगाने कामाला लागल्या असून नीरव मोदीच्या विविध ठिकाणी असलेल्या संपत्ती, फार्म हाऊस, महागड्या कार जप्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी आयकर विभागानेही छापे टाकले. पण आता त्याबाबत एक नवीनच माहिती समोर येत आहे. आयकर विभागाने जप्त केलेल्या २९ संपत्तीपैकी ५ संपत्ती अशा आहेत ज्या नीरव मोदीच्या नाहीत.
आयकर विभागाने हा घोटाळा समोर आल्यानंतर सर्वांत प्रथम २९ संपत्ती आणि मोदी आणि त्याच्या नातेवाईक, मित्रांची १०५ बँक खाती गोठवली आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नीरव मोदी किंवा त्याच्या कंपनीशी मुंबई आणि दिल्लीतील किमान तीन संपत्ती संबंधित नाहीत. मोदींचे दक्षिण मुंबईतील काला घोडा परिसरातील आयटीटीएस हाऊस येथे शोरूम दिसून येते. ते शो रूम आयकर विभागाने जप्त केले आहे. पण मुंबईतील एका सेठी नावाच्या उद्योगपतीचे आणि त्याच्या कुटुंबीयाच्या याच्या मालकीचे असल्याचे समजते. सेठी हे मोदींच्या निकटवर्तीय असून काला घोडा येथील जागा त्यांनी तीन वर्षांसाठी लिव्ह अँड लायसन्सवर घेतली होती. आता याप्रकरणी सेठी यांनी आयकर विभागाकडे धाव घेतली आहे. ही संपत्ती वृज सेठी,इंदिरा सेठी आणि ज्योती सेठी यांच्या मालकीची आहे.
नीरव मोदींनी याच्या लिव्ह अँड लायसन्स करारावर सही केली आहे. हा करार तीन वर्षांसाठी होता जो डिसेंबर २०१७ मध्ये संपला. दरम्यान, नव्या रिदम हाऊस येथे हे स्थलांतर करायचे असल्यामुळे मोदींनी हा करार तीन महिन्यांसाठी वाढवला. जो मार्च २०१८ मध्ये संपणार आहे. आता सेठी कुटुंबीयांनी आयकर विभागासमोर सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. आयकर विभागानेही ही संपत्ती मुक्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
व्हिएस न्यूज - त्रिपुरामध्ये भाजपाचा विजय झाल्यानंतर अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे पक्ष अडचणीत आला आहे. रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांच्या त्रिपुरातील पुतळ्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी बुलडोझर फिरवला. पुतळा तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून पुतळा पाडताना भाजपा कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचे दिसते. तर राज्याच्या अन्य भागांमध्येही हिंसाचाराच्या घटना सुरु झाल्याने सत्तास्थापनेपूर्वीच पक्षासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
२०१३ मध्ये त्रिपुरात डाव्या पक्षांच्या विजयानंतर कृष्ण देवनाथ या स्थानिक कलाकाराने ३ लाख रुपये खर्च करुन लेनिन यांचा पुतळा तयार केला. या पुतळ्याची उंची ११.५ फुट इतकी होती. बेलोनिया येथे हा पुतळा होता. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास भाजपा कार्यकर्ते आणि समर्थक‘भारत माता की जय’ असा जयघोष करत तिथे आले. त्यांनी जेसीबी देखील आणला होता. कार्यकर्त्यांनी लेनिन यांचा पुतळा पाडला. माकपचे स्थानिक नेते तापस दत्ता म्हणाले,प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लेनिन यांचा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे शीर धडापासून वेगळे केले आणि त्याच्याशी फुटबॉल खेळू लागले. भाजपाचा डाव्या पक्षांवर असलेला राग यातून दिसतो, असा आरोप त्यांनी केला.
पोलिसांनी या प्रकरणी जेसीबी चालकाला अटक केली आहे. जेसीबी देखील जप्त करण्यात आला आहे. तर भाजपाचे जिल्हासचिव राजू नाथ यांनी या घटनेमागे भाजपा कार्यकर्त्यांचा हात नसल्याचे स्पष्ट केले. जनतेने रागापोटी हे कृत्य केले, असे त्यांनी सांगितले.
व्हिएस न्यूज - छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावर अक्षरश : धुमाकूळ घातला. माओवाद्यांनी जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणाऱ्या तेलंगण परिवहन मंडळाच्या तीन बसेस जाळल्या असून या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचीही माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
छत्तीसगडमध्ये दोरनापाल गावाजवळ सोमवारी मध्यरात्री जवळपास १०० माओवादी सुकमा- हैदराबाद महामार्गावर आले. त्यांनी महामार्गावर तीन बसेस आणि तीन ट्रक जाळले. यातील एका बसमध्ये पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी प्रवास करत होता. माओवाद्यांनी त्याची हत्या केली. जवळपास दोन तास माओवाद्यांचा हा धुमाकूळ सुरु होता,असे समजते. शुक्रवारी तेलंगण सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांवर कारवाई केली होती. या चकमकीत १० माओवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला होता. माओवाद्यांच्या कॅम्पवर त्यांचे मोठे नेते असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी पुजारीकंकर जंगलात घुसून कारवाई करत माओवाद्यांना दणका दिला होता. या कारवाईचा बदला घेण्यासाठी हा हिंसाचार घडवण्यात आल्याचे सांगितले जाते.
व्हिएस न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी केली.
भारतरत्न पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना जाहिर करावा अशी मागणी संसदेत केली. देशाच्या सामाजिक अभिसरणात या दांम्पत्याने मोलाचे योगदान दिले असून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल.
फुले दांम्पत्याने स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच सामाजिक अभिसरणाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांना भारतरत्न जाहीर झाल्यास पुरस्काराचा सन्मान ठरेल असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली.
व्हिएस न्यूज - महाराष्ट्राचे माजी मंत्री व कॉंग्रेसचे नेते पतंगराव कदम याची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवले गेले आहे. कदम यांची मूत्रपिंडे निकामी झाली असल्याचे समजते. गेले काही दिवस कदम आजारी आहेत. त्याच्या प्रकृती संबंधात सोशल मिडीयावर गेले काही दिवस पोस्ट प्रसिद्ध केल्या जात आहेत. कदम यांचे चिरंजीव विश्वनाथ यांनी पतंगरावांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले होते. तरीही त्याचे हितचिंतक काळजीत होते. काल भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लीलावतीत जाऊन पतंगरावांची भेट घेतल्याचे समजते.
व्हिएस न्यूज – दिल्ली उच्च न्यायालयाने अनैतिक संबंधांचे पतीवर खोटे आरोप करणे हे त्याच्यासाठी मानसिक त्रास आणि वेदनादायक असून वारंवार आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत राहणे धोकादायकच असल्याचे मत नोंदवले आहे.
जुलै २००८ मध्ये दिल्लीत राहणाऱ्या तरुणाचे लग्न झाले होते. त्या दाम्पत्याला मार्च २०१० मध्ये मुलगा देखील झाला. पण पत्नीने यानंतर माझा व माझ्या कुटुंबीयांचा छळ केला व वारंवार आम्हाला आत्महत्येची धमकी दिल्याचा आरोप करत त्या तरुणाने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याला कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटासाठी परवानगी दिली होती. त्याच्या पत्नीने याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच या याचिकेवर निकाल दिला.
पतीसाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप करणे हे मानसिक त्रास आणि वेदनेचे कारण ठरतात असे नमूद करत उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. हा निर्णय न्या. सिद्धार्थ मृदूल व न्या. दीपा शर्मा यांच्या खंडपीठाने दिला. अशा स्वरुपाचे आरोप गंभीर असल्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. तसेच व्यक्तीवर हा एक मानसिक आघातच असतो. आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत राहणे धोकादायक असल्याची भावना मनात येते,असेही उच्च न्यायालयाने आदेश देताना सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002