व्हीएस न्यूज - अन्नधान्याचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर होऊन सुद्धा योग्य प्रणालीचा अभाव असल्याने तसेच सरकारकडून त्याची खरेदी योग्य भावात होत नसल्याने दिवसेंदिवस अन्नधान्याचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल शासनाने योग्य हमीभावाने खरेदी करून देशातील इतर भागांमध्ये उपलब्ध करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ होईल व अन्नधान्याचे उत्पन्न वाढेल अशा आशयाचे व भारतामध्ये क्रिकेट, टेनिस व बँडमिंटन यांसारख्या खेळांना व खेळाडूंना सुप्रसिद्ध व त्याचबरोबर चांगल्या सुविधा ही मिळतात परंतु देशामधी ऑलम्पिक खेळाडूंना मात्र कोणत्याही प्रकारच्या चांगली सुविधा मिळत नसल्याने ऑलम्पिक खेळाला तरुणांची पसंती कमी आहे. देशातील ऑलम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच नवनवीन खेळाडू तयार व्हावेत यासाठी त्यांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून देशाला उत्कृष्ट दर्जाचे ऑलम्पिक खेळाडू मिळतील अशा आशयाची दोन खाजगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सादर केले.
देशातील शेतकऱ्यांना शेतीसंबंधी माहिती देण्यासाठी सरकार आणि कृषी विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील काही भागातील शेतकरी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत. परंतु दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होते व हा शेतीमाल ज्यावेळी बाजारामध्ये विक्रीसाठी जातो तेव्हा त्याचा योग्य मोबदला मिळत नाही आणि शेतकऱ्यांची मिळकत दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शेतकरी हताश होऊन आत्महत्या करीत आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पेरणी होऊन तसेच शेतीसाठी अनुकूल वातावरण असूनसुद्धा भाजी व इतर धान्न्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपली उपजीविका भागविणे कठीण झाले आहे.
नागरिकांच्या हितासाठी विविध धोरणे उभी करून त्याची योग्य अंमलबजावणी करणे हे कल्याणकारी राज्यासाठी महत्वपूर्ण आहे परंतु शेतीशी संबंधित अशा धोरणांची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे देशाला स्वतंत्र मिळून ७० वर्षे होऊन सुद्धा देशातील शेतकऱ्यांच्या परस्थिती मध्ये कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशातील ८६ टक्के शेतकर्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे परिणामतः उत्पन्नही कमी होत असल्याने त्यांना आपली उपजीविका भागविणे कठीण होत आहे. तर दुसरीकडे मोठी शेती असलेले शेतकरी आयकरामध्ये करोडो रुपयांची सूट मिळवीत आहेत. ही तफावत कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या शेतीमालाला सरकाने योग्य हमीभावाने खरेदी करावीत.
तसेच देशातील बहुतांश नागरिक आपल्या मुलांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी मेडिकल किंवा इंजिनियरिंग सारख्या शाखांना पसंती देत आहेत. परंतु खेळामध्ये त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची प्रेरणा मिळत नाही. ऑलम्पिक मध्ये खेळण्यासाठी बहुतांशी खेळाडू हे ग्रामीण भागातच तयार होत असतात परंतु त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देशाचे नाव जागतिक स्थरावर उंचाविण्यासाठी ऑलम्पिक खेळाडू चिकाटीने परिश्रम घेत असतात परंतु त्यांना सरकारकडून चांगल्या सुविधा व प्रोत्साहन मिळत नसल्याने हळू हळू त्यांचा या खेळाकडे वळण्याचा कल कमी होत चालला आहे. क्रिकेटसारख्या इतर खेळामधील खेळाडूना सरकार कडून शासकीय व निमशासकीय नोकरी लवकर मिळू शकते पण दुसरीकडे जो ऑलम्पिक खेळाडू आहे त्या खेळाडूला सरकारकडून तुटपुंजी मदत मिळते. त्यामुळे सरकारने ऑलम्पिक सारख्या खेळासाठी बजेटमध्ये जास्तीत जास्त तरतूद करून ऑलम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी खाजगी विधेयकाद्वारे लोकसभेत केली असे बारणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - जीवन जगणे ही कला आहे. ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुखी, समृध्द व यशस्वी होणे शक्य नाही. व्यसनाधीन व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:च्या संसाराला आग लावून आपल्या बायका पोरांना दु:खाच्या घाईत लोटतात, हे प्रत्यक्ष पाहुण देखील अनेक युवक युवती व्यसनाकडे आकर्षित होत आहेत. त्यांना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवनविद्या मिशनच्या प्रबोधन चळवळीतून मिळावी व अवघा समाज सुखी व समृध्दी व्हावा. या उद्देशाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली ५१ वा पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रबोधनपर व्याख्यान भोसरीत आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१२ जानेवारी ते रविवार दि. १४ जानेवारी २०१८ पर्यंत ‘सुखी जीवनाचे गुपित’या विषयावर भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारील गाव जत्रा मैदानावर हा कार्यक्रम होईल. अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रण आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, राहुल जाधव, शिक्षणमंडळाचे माजी सभापती भाईजान काझी, जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष शैलेश जोशी, सचिन बबनराव लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, संतोष लोंढे, उत्तम केंदळे, वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, लक्ष्मण उंडे, विकास डोळस, राजेंद्र लांडगे, नगरसेविका भिमाबाई फुगे, सारीका लांडगे, यशोदा बोईनवाड, प्रा. सोनाली गव्हाणे, हिराबाई घुले, नम्रता लोंढे, सुवर्णा बुर्डे, योगिता नागरगोजे, सुजाता घोलप, साधना मळेकर, स्वीनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, माजी नगरसेवक महादेव गव्हाणे, तसेच बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे,प्रताप मोहिते, संतोष जाधव, सचिन तापकिर, अजित बुर्डे, गणेश तापकीर, नंदू दाभाडे, बबन बोराटे, बापू घोलप, सुहास ताम्हाणे, केतन झोरे, सागर हिंगणे, किसन बावकर, मनोज गायकवाड आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पोलिसात तक्रार दिली या रागातून शेजाऱ्यावरच कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना देहूरोड येथील आंबेडकरनगर येथे रविवारी रात्री आठ वाजता घडली. अविनाश ज्ञानदेव भोसले (वय 40 रा.आंबेडकरनगर) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. विजय राजू पिल्ले (रा. आंबेडकरनगर) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले व पिल्ले हे दोघे शेजारी राहतात. पिल्ले हा त्याच्या मित्रमंडळींना घेऊन रात्री दारातच गप्पा मारत बसतो. वेळोवेळी सांगूनही तो ऐकत नाही अशी तक्रार भोसले यांनी 2 जानेवारीला देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून 'तू माझ्या विरुद्ध अशी तक्रार पोलिसात का केली', असा जाब विचारात पिल्ले यांनी भोसलेच्या हातावर कोयत्याने वार केले. यामध्ये भोसले गंभीर जखमी झाले आहेत. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - विदेशी दारूची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. तळवडे येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांकडे नागरिकांनी यासंबंधी तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तळवडे येथील कृष्णाई हॉटेलवर कारवाई करून 1190 रुपयांची विदेशी दारू जप्त केली. हॉटेल मालक फरार झाला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - टेम्पो ट्रॅव्हलरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माणगाव, पारखी वस्ती येथे सोमवारी पहाटे घडली. मंगेश मुरलीधर कणसे (वय 25, मूळ रा, लिंबाचीवाडी सातारा) संभाजी बिराप्पा गराळे (वय 25, मूळ राहणार जत, सांगली) असे मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. याप्रकरणी वैभव कणे (वय-30, रा. जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश व संभाजी पिरंगुट येथे एका कंपनीत कामाला होते. सोमवारी पहाटे ते माणगावातून गोठवडे येथे दुचाकीवरून जात होते. पारखी वस्ती येथे एका टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. फौजदार महेश आबनावे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या दोन महिलांचे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दिड लाख रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. या घटना वाकड व हिंजवडीत रविवारी रात्री घडल्या.
वाकड येथील घटनेप्रकरणी 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी महिला वाकड येथील पलाश सोसायटी समोरून जात होती. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 38 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. हिंजवडी येथील घटनेप्रकरणी 57 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला बावधन येथील भगवती माईल्स्ट्रो इमारत येथून पायी जात होती. त्यांच्या गळ्यातील 1 लाख 12 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणी व मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेले. वाकड, हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - सद्य परिस्थितीत देशात शांतता,सहिष्णुता वाढीस लागण्यासाठी रक्त पिपासूंपेक्षा रक्तदात्यांची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी येथे केले.
विश्व विवेक फाऊंडेशन आणि नावंदर कुटुंबियांच्या वतीने प्राधिकरण निगडी येथील संत तुकाराम उद्यानात आज रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खा. साबळे बोलत होते यावेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी महापौर आर. एस. कुमार, संयोजक नगरसेवक बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर, भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सचिन नावंदर, विजय सिनकर, संजय मंगोडेकर,सुभाष नावंदर, सुरेश नावंदर, सचिन नावंदर, आधार ब्लड बँकेचे मकरंद शहापुरकर आदी उपस्थित होते.
साबळे म्हणाले, गेली एकवीस वर्षे कै. अशोक नावंदर यांनी सुरु केलाला रक्तदान शिबीराचा यज्ञकुंड असाच पुढे सुरु रहावा. निस्पृहपणे त्यांनी सुरु केलेले समाजकार्य त्यांची पुढची पिढी करीत आहे. नावंदर परिवाराने सुरु केलेली मोफत स्वर्गरथ रुग्ण वाहिका सेवा समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे. राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी देखील शुभेच्छा दिल्या. स्वागत बाबू नायर, सूत्र संचालन सलीम शिकलगार, राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - उत्तम वक्ता निर्माण होण्यासाठी अभ्यासूवृत्ती, वाचन, भाषेची जाण, वक्तशीरपणा, समयसूचकता या गुणांची आवश्यकता आहे. आपले मत मार्मिक पद्धतीने मांडल्यास समोरच्या व्यक्तींना पटते. वक्ता व श्रोता या दोन्हीही बाबी उत्तम वक्तृत्वासाठी आवश्यक असल्याचे मत ॲड. रविंद्र यादव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिचंवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 'स्पिकर्स फोरम' या विद्यार्थी केंद्रबिंदू असलेल्या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कलेची जोपासना करून त्यामार्फत विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करावी हा स्पिकर्स फोरमचा मुख्य हेतू आहे. यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, प्रा. विजय नवले, प्रा. नितीन धवस आदी उपस्थित होते.
ॲड. यादव म्हणाले की, सकस विचार करणारे प्रभावी वक्ते समाजासाठी गरजेचे असतात. सचिव संतोष खांडगे म्हणाले की, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पिकर्स फोरमचे असणारे महत्व व उत्तम वक्ता निर्माण होण्यासाठी विद्यार्थी दशेतूनच आवश्यक असणारे प्रयत्न संस्था करीत आहे. विद्यार्थ्यांसाठी असा अभिनव उपक्रम चालू केल्याबद्दल त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थी विकसन विभागाचे कौतुक केले. येथे वक्तृत्व प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल. प्रास्ताविक प्रा. विजय नवले, सूत्रसंचालन प्रा. अर्चना भसे, आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची (पीसीसीओईआर) अंजली टेके या विद्यार्थिनीला जपान (टोकिओ) मधील आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी कंपनीत सतरा लाखांचे घवघवीत‘पॅकेज’मिळाले असल्याची माहिती पीसीईटीचे सेंट्रल प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी दिली. अंजली ही पीसीसीओईआर मध्ये संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. तिने जपानी भाषेत पारंगतता मिळविली असल्यामुळे ही संधी तिला मिळाली. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे अंजलीचा सत्कार करताना म्हणाले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅम्पस प्लेसमेंटची सुरुवात झाली आहे. यापूर्वीही अनामिका कुमारी हीला अकरा लाख तर व्यंकटेश अय्यर ह्यास बत्तीस लाखांचे पॅकेज मिळाले होते. परंतु अंजलीची ही नियुक्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर झाल्याने पीसीईटीच्या नावलौकिकात भर पडली आहे. यावेळी संस्थेचे सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस. डी. गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी तिचे कौतुक केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002