व्हीएस न्यूज - हिंदू धर्मियांनी 2014 मध्ये मोठ्या आशेने भाजपकडे सत्ता सोपवली. मात्र, मोदी सरकार मुस्लिम धर्मियांचे लांगुलचालन करण्यात दंग आहे. 28 वर्षांपूर्वी आम्ही काश्मिरमधून विस्थापीत झालो. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काश्मिरमध्ये जाता येईल, असे वाटले होते. परंतु, ही आशा फोल ठरली. हुरियत सारख्या फुटीरतावाद्यांशी काश्मिर मधील पीडीपी-भाजप सरकार जवळीक साधत आहे. त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. मोदी सरकार राष्ट्रवादी नसून धृतराष्ट्रवादी आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काश्मिरी विचारवंत सुशिल पंडित यांनी केली. रहाटणी येथील हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिन आणि शिवजयंती महोत्सवाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंडित यांना 'हिंदू कुलभूषण पुरस्कार- 2018' प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पंडित यांनी काश्मिर प्रश्न आणि देशापुढील इतर अनेक प्रश्न यावर आपले सडेतोड विचार व्यक्त केले. कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयातील वकील ऍड. संजिव पुनाळेकर, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक पंडित धर्मवीर आर्य, कार्यक्रमाचे समन्वयक नगरसेवक कैलास बारणे, माजी नगरसेवक कुमार जाधव, प्रतिष्ठानचे सचिव उत्तम दंडिमे, जगदिश वासवानी, अतुल आचार्य, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभूवन, संस्थेचे विश्वस्त सुहास पोफळे आदी उपस्थित होते. पंडित पुढे म्हणाले की, काश्मिर ही शिवशंकराची भूमी असून हिंदू धर्मियांमध्ये या भूमीस अनन्य साधारण महत्त्व आहे. पतंजलिंनी योग विद्येविषयीचे शिक्षण येथेच लिहिले. काश्मिर हे ज्ञानाचे-आस्थेचे केंद्र आहे. आदी शंकराचार्य तपश्चर्यसाठी केरळमधून काश्मिरमध्ये आले होते. बौध्दांनी सहा महिने चिंतन-मनन केल्यानंतर महायानची स्थापना येथेच केली. असे हे काश्मिर सध्या धुमसते आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणाऱ्या अनेक हिंदू कुटुंबांवर अन्यायऱ्अत्याचार, महिलांवर बलात्कार केले. अशा घटनांमुळे येथील हिंदू कुटुंबांना विस्थापीत व्हावे लागले. केवळ दहा ते पंधरा टक्के हिंदू काश्मिरमध्ये वास्तव्यास आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर आम्हाला परत काश्मिरमध्ये जाता येईल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. हिंदुस्थानमध्ये असे होत असेल तर येथील माणूस सुरक्षित नाही, असेच म्हणाले लागेल, असे पंडित म्हणाले. मानपत्र वाचन ऍड. देविदास शिंदे, स्वागत पंडित धर्मवीर आर्य यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम दंडिमे यांनी तर आभार सुहास पोफळे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - कंपनीतील डिझेल फ्युअल इंजेक्टर चोरणाऱ्या एका कामगाराला अटक करण्यात आली आहे. किरण पांडुरंग शिंदे (वय 19, रा. केळगाव, आळंदी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सोन्नप्पा देशमुख (वय-58, रा. लोहगाव, पुणे) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण शिंदे टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी डिव्हिजन मध्ये काम करतो. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दुसरी शिफ्ट संपवून घरी जात होता. किरण पिशीवून काही घेवून जात असल्याच्या संशयावरून कंपनीतील सुरक्षारक्षक सोनप्पा देशमुख यांनी त्याला हटकले. व त्याची पिशवी तपासली असता त्यामध्ये कंपनीतील सुमारे 24 हजार रुपयांचे 12 डिझेल फ्युअल इंजेक्टर होते. फौजदार श्रीकांत शेंडगे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - बेपत्ता तरुणाचा मृतदेह ओटा स्किम येथे एका इंडिका मोटारीमध्ये आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. राहुल खुळे (रा. ओटा स्कीम, निगडी), असे मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा शनिवारपासून बेपत्ता होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील ओटा स्कीम येथे सोमवारी सकाळी एका इंडिका मोटारीत मृतदेह असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राहूल शनिवारपासून बेपत्ता होता. राहूलचा खून झाला आहे की आत्महत्या केली आहे याचा शोध घेण्यात येईल, असे पोलीसांनी सांगितले. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांना राष्ट्रशक्तीचा थेट प्रश्न !
व्हीएस न्यूज - सध्या राज्यभर गुंतवणूकदारांच्या आंदोलनामुळे गाजत असलेल्या पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या ४५०० कोटींच्या मालमत्ता जप्त केल्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दिनांक २८/२/२०१८ रोजी विधानपरिषदेत माहिती दिली. याविषयी आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडून प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सेबीने ३००० कोटींच्या तसेच आर्थिक गुन्हे शाखेने १५०० कोटींच्या, अशा मिळून ४५०० कोटींच्या मिळकती जप्त केल्या असून गुंतवणूकदारांना त्यातून त्यांचे पैसे मिळतील, असे निवेदन सभागृहात केले. या उत्तरावर पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या देशभरातील गुंतवणूकदारांसाठी लढणाऱ्या राष्ट्रशक्ती संघटनेच्या इन्व्हेस्टर्स फोरम ने आश्चर्य व्यक्त केले आहे.
“पॅनकार्ड च्या बाधित गुंतवणूकदारांची संख्या राज्यात ३० लाखापेक्षा अधिक असून राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी केवळ सभागृहापुढे कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरलेली आहे,” अशी टीका राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी पिंपरी येथे आयोजित गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात केली.. डिसेंबर २०१७ च्या अधिवेशना दरम्यान शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांना मुख्यमंत्र्यांनी, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून असे आश्वासन दिले होते. मात्र तसा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडून झालेला नाही. बुधवारी आमदार सतेज पाटील यांचे मार्फत राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीने उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही मुख्यमंत्र्यांनी काहीच उत्तर दिलेले नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे कडे राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने ज्या मागण्या केल्या होत्या त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांनी करावा हि अपेक्षा होती.
केंद्र शासनाच्या सेबी या यंत्रणेकडून पॅनकार्ड कंपनीच्या ज्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत, त्यांची यादी सेबीने तात्काळ जाहीर केली आहे व त्याबाबत लिलाव प्रक्रिया सुरु असल्याची माहिती राज्यातील व देशातील गुंतवणूकदारांना त्यांच्या वेबसाईटवर किंवा वृत्तपत्रातील जाहीर प्रकटनाद्वारे मिळत आहे. मात्र पॅनकार्ड क्लब्ज कंपनीची १५०० कोटींची मालमत्ता राज्यशासनाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्याची मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिलेली माहिती धक्कादायक आहे. याबाबत इतक्या मोठ्या रक्कमेच्या कोणत्या मिळकती, कधी जप्त झाल्या ? हि बाब आर्थिक गुन्हे शाखेने का झाकून ठेवली? असे प्रश्न निर्माण झाले असून, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीची सत्यता तपासावी लागेल असेही दारवटकर यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून गुंतवणूकदारांचे ७०३५ कोटी अडकल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र सेबीने एका लेखी उत्तरात देणे ८३४४ कोटी असल्याचे पत्र दिले आहे. हि तफावत कशामुळे झाली? मे २०१७ रोजी सॅट कोर्टाने संबंधित संचालकांवर फौजदारी कारवाईचे आदेश देऊनही संचालकांवर केवळ गुन्हे दाखल करण्यापलीकडे सरकारने काहीच केले नाही. अनेक फसव्या कंपन्यांचे संचालक गजाआड करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने ९ महिने पॅनकार्डच्या संचालकांना मोकाट का सोडले आहे? त्यांना कुणाचे संरक्षण मिळत आहे? पॅनकार्ड क्लब्ज कंपनीविरुद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले आहे. मात्र कंपनीच्या संचालकांच्या अटकेसाठी “पंचांग पाहून मुहूर्त काढला जाणार आहे का?” असा प्रश्न राष्ट्रशक्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांना विचारला असून या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रशक्ती इन्वेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीने केली आहे.
सेबीकडून सध्या सुरु असलेली लिलाव प्रक्रिया संशयास्पद असून मिळकतींच्या किंमती तिसऱ्या लिलावात ६० - ७० टक्क्यांनी घटवण्यात आल्या आहेत. हि गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब आहे. या मेळाव्याचे आयोजन इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीच्या मावळ विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मुगुटराव मोरे, नंदकुमार गावडे, एस.एल.साळवी, देवानंद मुंज, साहेबराव तांबोळी, विजय पवार, सुहास जितकर, सतीश हंचाटे तसेच पिंपरी, चिंचवड, मावळ , मुळशी, पुणे शहर येथील गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काजुळकर व आभार नामदेव खाटपे यांनी केले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे व किरण मोटे यांनी आज मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थितीत होते.
जितेंद्र ननवरे १० वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणुन कार्यरत होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीला भाजपची उमेदवारी संत तुकाराम नगर – कासारवाडी या प्रभागातुन मिळाली होती. तसेच किरण मोटे हे कासारवाडी प्रभागातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणुन २०१२ च्या निवडणुकीत निवडुन आले होते. त्यांनी देखील आज खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
व्हीएस न्यूज - मागील वर्षी झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करु असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंगळवारी विखे पाटील यांना मुंबईत भेटले. या शिष्टमंडळात साठेंबरोबर काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर सरचिटणीस क्षितीज गायकवाड, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मनपामधील गैर कारभाराविषयी माहिती देणारे निवेदन साठे यांनी विखे पाटील यांना यावेळी दिले. या निवेदनात प्रस्तावित पाणीपट्टीवाढ, कचरा उचलण्याच्या निविदेतील भ्रष्टाचार,टीडीआर मधील भ्रष्टाचार, पंतप्रधान आवास योजना निविदेतील भ्रष्टाचार याबाबत माहिती देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रस्तावित केलेली पाणीपट्टीमधील दरवाढ म्हणजे महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकांना खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. निवेदनात म्हटले आहे की, रस्ते विकासासाठी तब्बल 425 कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या कामामध्ये सत्ताधारी भाजपने सुमारे 45 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा आहे. तसेच कचरा वाहतुक निविदेतही सुमारे 252 कोटी रुपयांचा जादा खर्च करून गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेने मागील आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 41 लाख 27 हजार चौरस फुटांचे टीडीआरचे वाटप केले असून त्याची किंमत 5300 कोटी रुपये आहे. यामध्ये ही आयुक्त आणि भाजप पदाधिका-यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान आवास योजनेतर्गत घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधा-यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार आणि प्रस्तावित केलेली पाणीपट्टी दरवाढ मागे घेण्याबाबत व इतर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा करु. असे आश्वासन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाला मंगळवारी मुंबई येथे दिले.
पीसीसीओईआर मध्ये जागतिक मराठी दिन उत्साहात साजरा
व्हीएस न्यूज - मराठी भाषा समृध्द होण्यामध्ये कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासह समकालीन लेखक-कवी-नाटककार यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नवकल्पना, नवे विचार, नवनवीन वाड.मय प्रकार वाचकांसमोर मांडून विचार मंथन घडवून आणले. यातूनच भाषा समृध्द होत गेली. आज सोशल मीडियाचा विचार केला तर यामध्येही मराठीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, असे आपल्या लक्षात येते. यापुढील काळात सर्वच स्तरांवर मराठी भाषेचा वापर वाढलेला आपल्याला दिसेल, असे मार्गदर्शन प्राचार्य हरिष तिवारी यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) चे रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्रात (पीसीसीओईआर) जागतिक मराठी दिन (कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालात मराठी भाषेच्या निरनिराळ्या रूपांचा, विचारांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी कविता, लेख तसेच रांगोळीच्या माध्यमातून मराठीचे महत्त्व सादर केले. 'लाभले आम्हास बोलतो मराठी' या मराठी अभिमान गीताचे समूह गायन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. सोनाली कणसे, प्रा. शाम मानकर, प्रा. प्रिया ओघे यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन, आभार समृद्धी देवकाते यांनी केले.
व्हीएस न्यूज - शहरातील नागकिांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हेसोयीस्कररीत्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु असलेल्या भाजपाच्या या पारदर्शक भ्रष्टाचाराचा जनतेवर अधिभार का? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला.
पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (1 मार्च) पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजपाने केलेल्या पाणीपट्टी दरवाढ विरोधात निदर्शने केली. या वेळी महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे,युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्प संख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैसवाल, एनएसयूआय शहराध्यक्ष विशाल कसबे, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंखे, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, मॅन्यूअल डिसुजा, क्षितिज गायकवाड,विश्वनाथ खंडाळे, सचिन नेटके, तानाजी काटे, गौरव चौधरी, तारीख रिझवी, विजय ओव्हाळ, सुरेश लिंगायत, सिद्धार्थ वानखेडे, फय्याज शेख, हुरबाणो शेख, कल्पना जाधव, वामण ऐनेले, अर्जून खंडागळे, विठ्ठल खलसे, भास्कर नारखेडे, अनिरूद्ध कांबळे, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले, मागील वर्षी सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने एक वर्षाच्या कार्यकालात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पाशवी बहुमतामुळे भाजपामध्ये मस्ती आलेली आहे. ही मस्ती कॉंग्रेसचे कार्यकर्ते उतरविल्याशिवाय राहणार नाहीत. पाशवी बहुमतापुढे निषप्रभ ठरलेल्या विरोधी पक्षामुळे पिंपरी चिंचवडच्या जनतेवर चौपट पाणीपट्टी दरवाढ भाजपाने लादली. दिशाभूल करणारी आकडेवारी सादर करून सहा हजार लिटर मासिक पाणीपुरवठा प्रत्येक कुटुंबाला मोफत देणारी देशातील पहिली महापालिका असे जाहिर करून प्रसिद्धी करून घेतली.
प्रत्यक्षात मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका आतापर्यंत देशात सर्वात कमी दराने पाणीपुरवठा करीत होती. प्रस्तावित दरवाढीमुळे देशात सर्वात महागडा पाणीपुरवठा पिंपरी चिंचवड मनपा नागरिकांवर लादत आहे. 5 हजार 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे. 405 कोटीच्या निविदा प्रक्रियेत 35 कोटींची बचत केल्याचा अजब दावा आयुक्तांनी केला आहे. वाचवलेली हि रक्कम पाणीपुरवठ्यावर खर्च करावी व नागरिकांना सुविधा द्यावेत. दरवर्षी पाणीपट्टीतून 70 कोटींहून जास्त रुपये महापालिकेत जमा होतात. तरीदेखील पाणीपट्टीची अन्यायकारक दरवाढ नागरिकांवर लादली आहे. ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा कॉंग्रेस रस्त्यावर उतरून याला तीव्र विरोध करील असा इशारा सचिन साठे यांनी दिला.
व्हीएस न्यूज - ऑटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप आणि वाघोली, पुणे येथील पार्वतीबाई मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय गो-कार्ट’ स्पर्धेत बावधन पुणे येथील पीव्हीपीआयटी महाविद्यालयाने चॅम्पियनशीपचा किताब व रोख 75 हजारांचे पारितोषिक पटकावले. मोशी, प्राधिकरण सेक्टर 6 येथील ट्राफिक थिम पार्क येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील36अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रासह ओडीसा, राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश येथून एकूण 900 विद्यार्थी सहभागी झाले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या हस्ते करण्यात आले. 125 सीसी क्षमतेचे इंजिन वापरून बनवलेल्या गो-कार्ट मध्ये स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ब्रेक टेस्ट, स्किड पॅड टेस्ट, ॲटो क्रॉस व इंडोरन्स रेसिंग अशा विविध कौशल्यपूर्ण चाचण्या पूर्ण केल्या. ॲटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप क्लब तर्फे प्रा. प्रतीक सातव, प्रा. मनोज भोजणे, प्रा. गणेश कदम,प्रा. मार्तंड पंडागळे यांनी संयोजनात सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजयी संघ खालीलप्रमाणे : प्रथम क्रमांक (75 हजार रोख व चॅम्पियनशीप ट्रॉफी) : पीव्हीपीआयटी (बावधन,पुणे); व्दितीय क्रमांक (50 हजार रोख) - डीकेटीईएस टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी), तृतीय क्रमांक (35 हजार रोख) - जेएससीओई (हडपसर, पुणे); चतुर्थ क्रमांक (20 हजार रोख) - आर्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयपूर राजस्थान); पाचवा क्रमांक ( रोख 12 हजार ) : सीओईपी (पुणे) या संघांना गौरविण्यात आले.
याबरोबरच बेस्ट डिझाईन गटात सीओईपी पुणे यांना प्रथम क्रमांक, तर व्दितीय क्रमांक जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कुरण, पुणे) यांना देण्यात आला. एक्स्लिरेशन गटात प्रथम - आर्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयपूर राजस्थान); व्दितीय - एमएमआयटी, (लोहगाव, पुणे). स्किड पॅड - प्रथम सीओईपी (अवसरी,पुणे); व्दितीय - पीव्हीपीआयटी (बावधन, पुणे); ॲटो क्रॉस - प्रथम क्रमांक एमएमआयटी, (लोहगाव, पुणे); व्दितीय क्रमांक डीकेटीईएस टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी). इनोव्हेशन - प्रथम युपीईएस (डेहराडून) व्दितीय - बीव्हीआरआयटी (नौरपूर हैद्राबाद), ॲस्थिटीक - प्रथम - सिंहगड इन्स्टिट्यूट (लोणावळा,पुणे); व्दितीय - सीओईपी (अवसरी, पुणे). बेस्ट कॅप्टन - प्रथम - मानस जयस्वाल, (युपीईएस, डेहराडून); व्दितीय शुभम गारडे (आरएससीओई, पुणे); बेस्ट ड्रायव्हर - प्रथम - तेजवीर सिंग, व्दितीय - अजिंक्य शिंदे, द्रोणाचार्य ॲवॉर्ड - प्रथम - बी. श्याम बाबू, व्दितीय - शिवलिक दुबे, तृतीय - सुनील तपासे. यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
व्हीएस न्यूज - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असे भाकित वर्तवले आहे. पण भाजप २५० जागा मिळवून केंद्रात सत्तेत येईल, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला आठवलेंनी भाजपच्या जागा कमी होण्याला दिला.
आठवलेंना यावेळी मिलिंद एकबोटेंच्या अटकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, मी सत्तेत असलो तरी माझ्या गृहखाते माझ्याकडे नाही. पण यातील दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच, शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेची आठवलेंनी खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरे बोलतात. त्यामुळे आज जरी ते स्वतंत्र लढू म्हणाले असतील, तरी उद्या ते विचार बदलतील, असे आठवले म्हणाले.
व्हीएस न्यूज - तापकीरनगर चौकातील वडेवाले जोशी समोरील बीआरटी रोडवरील खोदाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची मागणी रहाटणी- काळेवाडी विभागाचे शिवसेना प्रभागप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी केली आहे. याबाबत महापालिकेच्या ग प्रभागाचे मुख्य अधिकारी दांगट यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तापकीरनगर चौकात जीओ कंपनीच्या वतीने केबल टाकण्याचे काम चालू आहे. परंतु, संबंधीत ठेकेदाराकडून कामाकडे गांभिर्याने पाहिले जात नसून यामुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वास्तविक पाहता खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ काम पूर्ण करून डांबरीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या वर्दळीच्या ठिकाणी लहान गाड्या स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाणात वाढले आहे. तरी, याबाबत प्रशासन म्हणून लक्ष देण्यात यावे, असेही दाखले यांनी निवदेनात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - आचार्य अत्रे रंगमंदिराचे काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदाराकडून सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची साधन सामुग्री पुरविली गेली नसल्याने सोमवारी एका 65 वर्षीय वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन ठेकेदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश फाळके (वय 40, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) आणि चंद्रकांत जाधव (वय 32, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदारांची नावे आहेत. याबाबत सतीश डोंगरे (वय 28, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु होते. हे काम शैलेश फाळके व चंद्रकांत जाधव या दोन ठेकेदारांनी घेतले आहे. सभागृहात पाण्याच्या टाकीचे काम करून घेत असताना कामगारांना ठेकेदाराकडून सुरक्षेबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. फिर्यादी यांचे वडील कचरू डोंगरे यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होता. तरीही त्यांना सुरक्षेची कोणतीही साधने न देता पाण्याच्या टाकीमध्ये काम करायला लावले. अखेर कचरू डोंगरे यांचा जीव गुदमरल्याने मृत्यू झाला. पुढील तपास फौजदार घुगे करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002