व्हिएस न्यूज - व्यावसायिकाला कंपनीत येऊन जीवे मारण्याची धमकी देऊन पन्नास हजार रूपये हप्ता घेऊन आणखी पन्नास हजार देण्याची मागणी करणाऱ्या त्रिकुटावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत. विकास अंबादास ठोसर (वय-27, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मनोज विटकर, आकाश ओव्हाळ हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी व्यावसायिक व्यकंट राजू रमणामुर्ती (वय-41, रा. मोशी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार बांबळे यांनी माहिती दिली. फिर्यादी रमणामुर्ती यांचे एमआयडीसीत ज्योती इंजिनेअरिंग नावाची गाड्यांचे जॉब बनविण्याची कंपनी आहे. आरोपी विकासने रमणामुर्ती यांना वारंवार फोन करून हप्ता देण्याची मागणी केली. 9 फेब्रुवारी रोजी कंपनीत येऊन रमणामुर्ती यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन पन्नास हजार रूपये हप्ता म्हणून घेतला. त्यानंतरही आरोपीने हप्ता देण्याची मागणी सुरूच ठेवली. मंगळवारी आरोपी विकास व आकाशने रमणामुर्ती यांना कंपनीत येऊन आणखी पन्नास हजार रूपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या रमणामुर्ती यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. आरोपी विकास ठोसर याला पोलीसांनी अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - मोरवाडी न्यायालयात एका पक्षकाराने न्यायालयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप साबळे यांनी प्रसंगावधान दाखवत त्याला आत्महत्येपासून वाचविल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास घडला. अरविंद बबन कसबे (रा. निगडी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद कसबे या तरुणाचे 28 मे, 2013 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर कौटुंबिक वादातून त्याच्या पत्नीने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. मागील एक वर्षांपासून मोरवाडी न्यायालयात त्याचा खटला सुरु आहे. त्याला साडेतीन वर्षांची मुलगी असून मुलीला दर शनिवारी भेटण्यासाठी त्याने न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. मात्र पत्नी, सासू, सासरे त्याला मुलीला भेटू देत नाहीत. पत्नीला नांदण्यासाठी विनंती करूनही पाठवित नाहीत. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या बाहेर त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले. न्यायालयामध्ये आत पोर्चमध्ये येऊन थांबला. त्यानंतर त्याने खिशातून काडीपेटी काढत काडी ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका केससंदर्भात वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप साबळे तेथे उपस्थित होते. त्यांचे कसबे याच्याकडे लक्ष गेले. साबळे यांनी प्रसंगावधान दाखवत कसबे याला पाठीमागून पकडल्याने मोठा अनर्थ टळला. कसबेला पिंपरी पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तो गरीब असल्या मुळे वकील देऊ शकत नाही म्हणून अॅड.अतिश लांडगे (रिमांड वकील पिंपरी न्यायालय) व त्यांच्या सहकार्यांनी मोफत वकील पत्र दाखल केले आहे.
डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळा संपन्न
व्हिएस न्युज - मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची व जडणघडणीची जबाबदारी शाळा-कॉलेजबरोबरच पालकांची देखील आहे. कुटुंबात मुलांच्या जडणघडणीसाठी पोषक वातावरण आज कमी होत चालले आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील कॉलेज, पिंपरी यांच्यावतीने आयोजित ‘व्यक्तिमत्व विकास’ विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मलघे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रणजीत पाटील, संयोजक डॉ. श्याम गायकवाड, कुुुलसचिव डी.डी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मलघे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कुटुंब, शाळा- महाविद्यालय आणि समाज या तीन घटकांद्वारे होत असते. कुटुंबात पालकांचा मुलांसोबत सुसंवाद असणे गरजेचे असते. मुलांनी देखील मोबाईल, टी.व्ही.चा अतिरिक्त वापर टाळून आई-वडील-बहीण-भावाशी संवाद साधला पाहिजे. आज कुटुंबात संवाद अपुरा होत असल्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर होताना दिसतो आहे. शाळा-महाविद्यालात विद्यार्थ्यांना मित्रपरिवार लाभतो. ‘कॉलेज कट्टे’ दिसून येतात. यातून मुलांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन डॉ. मलघे यांनी केले. ते पुढे म्हणाले, की ज्यांना उत्तम भाषण व संभाषण करता येते, ते लोक आपल्या मनातील विचार व भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकतात. अशाच लोकांना समाजात मान्यता लाभू शकते. व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे त्याचे केवळ दिसणे किंवा रुप नव्हे; तर त्याच्याकडे किती तीव्र बुद्धीमत्ता, आचार विचार आणि समाजाशी किती नाळ जुळलेली आहे, यावर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची गणना होत असते. देशात-परदेशात ज्या ज्या व्यक्तींनी छाप पाडली, ते सर्व लोक विद्वान होते. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, मोरारजी देसाई, डॉ. राजेंद्रप्रसाद हे सारे लोक बुद्धीमान होते. त्यांनी नवा समाज घडवला. त्याचे कारण त्यांचे विचारशील व्यक्तिमत्व. अनेक उदाहरणे देत डॉ. मलघे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी केली. डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले, की विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असो, त्याला आज पुढे जाण्यासाठी चांगले बोलणे, चालणे, व्यासंग या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या खर्या गुणांची कदर म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व होय. डॉ. गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला
भाजपा सरकारचा पिंपरी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून निषेध
व्हीएस न्युज-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आमदार धनंजय मुडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनास विदर्भ-मराठवाड्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे; म्हणूनच या सरकारने धनंजय मुंडे विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी पैसे मागत असल्याची खोटी ध्वनीफित व्हायरल करून कारवाईचा बडगा उगारला आहे, असा आरोप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केला. पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 6 मार्च) पिंपरी (पुणे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाचे आनंदा यादव, गंगा धेंडे, रुपाली गायकवाड, संतोष वाघेरे, मयुर वाकडकर, सचिन मोरे, मंगेश बगबळकर, प्रतीक साळुंखे, आशिष निकाळजे, सारथी गायकवाड आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. वैशाली काळभोर म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांची क्लिप व्हायरल झाली आहे, त्याची सत्यता पडताळण्याची आवश्यकता आहे. चौकशी न करताच कारवाई करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. सरकारला जनसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाही. सरकार विरोधात नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी विरोधांना लक्ष्य करीत आहे, असा आरोप काळभोर यांनी केला. नाना काटे म्हणाले, विधीमंडळ सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न धनंजय मुंडे हिरीरिने मांडत असतात. त्यांनी सत्ताधा-यांना कोंडीत पकडल्याचे आपण अनेक वेळा पाहिले आहे. सर्वसामान्यांच्या नेत्याचा आवाज दाबण्यासाठीच मुंडे यांची खोटी क्लिप व्हायरल केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने हे आंदोलन केले आहे. भाजपा सरकारच्या तीन-साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्यांचे कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. उलट भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे रोज समोर येत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रवादीने सामान्य नागरिक, शेतकरी यांचे प्रश्न सरकार समोर आणण्यासाठीच हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. खोटे आरोप करून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करणा-या सरकारला जनता चांगला धडा शिकवेल, असे काटे म्हणाले. यावेळी विजय लोखंडे, आनंदा यादव आदींनी निषेधाचे भाषण केले.
व्हिएस न्यूज - ‘लेवाशक्ती सखी मंच’ आयोजित पाककला स्पर्धा निगडी प्राधिकरण परिसरामध्ये विनाशुल्क घेण्यात आली. यामध्ये मूग किंवा तांदळाचा वापर करत अनेक गोड व तिखट पदार्थ स्पर्धकांनी तयार केले. यात मूग कबाब,तांदळाची सांबर वडी, व्हेज बिर्याणी, तांदळाचा डोसा,भाताचे कटलेट, मूग व भाताचे थालीपीठ, मेथी चटणी, मूगाचे घावन, सुरळीची वडी, मोडाच्या मुगाचे पौष्टीक लाडू, तिरंगी उकडीचे मोदक, मूग डाळीचे लाडू, उकडीचे मोदक, तांदूळ व मूगडाळीचे गोड आप्पे, तांदळाचा गोड ढोकळा, इडिअप्पम,मूग डाळीचा पुरणाचा मोदक याचा समावेश होता. संत तुकाराम उद्यानात स्पर्धा झाली. गणेश चतुर्थी असल्यामुळे तांदळापासून गणपती डेकोरेशन बनवून त्यांना उकडीचे मोदक अर्पण केले. अनेक पदार्थ कला-कुसरीने मांडले होते.
माधुरी पाटील, भारती पाटील, आशालता महाजन, छाया पाटील, हेमलता पाटील, शुभांगी बेंडाळे, रेखा चौधरी, उषा भोळे, पुष्पा भोळे, कल्पना पाटील, शिल्पा पाटील, माधुरी सरवदे, दिपाली टोके, हेमलता पाटील, अमृता बेंडाळे,शालिनी पाटील, दिपाली महाजन, रेखा चौधरी, नैना पाटील,नम्रता पाटील या महिलांनी भाग घेतला होता. प्रा. तुलसी नारायण फिरके व सुनिता इंगळे यांनी परीक्षण केले.
रेखा भोळे, किरण पाचपांडे, गौरी सरोदे, रजनी बोंडे,विभावरी इंगळे, चारुलता चौधरी, शितल नारखेडे यांनी केले होते. पण प्राधिकरण व निगडी या भागातून स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेण्यासाठी महिलांना प्रेरणा देण्याचे महत्वाचे काम बहिणाबाई मंडळाच्या अध्यक्षा विजया जंगले, जोत्स्ना चौधरी, शुभांगी व सुनिता या सर्व भगिनींनी केले.
व्हिएस न्यूज – रस्ते, वाहतुक व्यवस्था या शहराच्या रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे ही व्यवस्था सक्षम ठेवणे गरजेचे आहे. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्यक सुविधा देण्याचा आमचा भर आहे, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे बिजलीनगर येथे उभारण्यात येणारा भुयारी मार्ग (अंडरपास), केशवनगर –काळेवाडी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा दुसरा टप्पा, चिंचवड– काळेवाडी पुलापासून भाटनगर मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत प्रस्तावित १८ मीटर विकास आराखड्यातील रस्ता आदी प्रमुख कामांचे भूमिपूजन जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, मावळत्या स्थायी समिती सभापती सीमाताई सावळे, नगरसेवक नामदेवराव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, करुणाताई चिंचवडे,माधुरी कुलकर्णी, संगिता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर, सारंग कामतेकर, ॲड. मोरेश्वर शेडगे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, शंकर पाटील आदी उपस्थित होते. नगरसेवक ढाके म्हणाले, बिजलीनगर येथील चौकात छोटे – मोठे अपघात होत होते. अनेक वर्षांपासून येथे भुयारी मार्ग करण्याची मागणी होती. ती पूर्ण होणार आहे. तसेच, प्रभाग १७ मधील विविध विकास कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ब प्रभागातंर्गत होणाऱ्या विकास कामांमधून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. येथील प्रस्थापित भुयारी मार्गाने नागरिकांचा मार्ग सुखकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणुक गुप्त मतदानाने व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुक येत्या ७ तारखेला होणार आहे. भाजपकडून राहुल जाधव आणि शितल शिंदे यांना डावलून आमदार लक्ष्मण जगताप समर्थक ममता गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या सदस्यामध्ये अस्वस्थता पसरली अाहे. त्याचाच फायदा घेत राष्ट्रवादीकडून मोरेश्वर भोंडवे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भोंडवे यांना शिवसेनेने पाठींबा दर्शविला आहे. तसेच भाजपातील नाराज सदस्यांची मते मिळू शकतात असा विश्वास भोंडवे यांना आहे. त्यामुळेच स्थायीच्या अध्यक्षपदाची निवडणुक गुप्त मतदानाने व्हावे अशी मागणी मोरेश्वर भोंडवे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान ही निवडणुक गुप्त मतदानाने झाल्यास चांगलाच घोडेबाजार होणार असल्याची चर्चा आहे.
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकत्ता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका हद्दीतील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मंगळवार, दि.०६ मार्च २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत करण्यात आले असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या मेळाव्याचे उद्दघाटन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हा पालक मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती तर शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, आमदार गौतम चाबुकस्वार यांची प्रमुख उपस्थिती तसेच उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रिडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष अघाडी गटनेते कैलास बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम,नगरसदस्य तुषार हिंगे, बाबु नायर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्यासह सर्व सन्माननिय नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांचे कंपनीत असलेल्या रिक्त पदाबाबत मुलाखती घेणेसाठी उपस्थित राहणार आहेत. या रोजगार मेळाव्यास मुलाखतीसाठी येणा-या इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता व वैयक्तिक माहितीच्या प्रतीसह सकाळी ९ वाजता नोंदणीकामी ऑटो क्लस्टर हॉल – A सायन्स पार्कजवळ, चिंचवड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या खर्चाला आळा घालून वाचलेल्या रक्कमेतून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करण्याचा स्तुत्य उपक्रम पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी येथील शिवसेनाप्रणित काळूबाई प्रतिष्ठानने राबविला आहे. शिवसेनेचे काळेवाडी विभागप्रमुख व काळूबाई प्रतिष्ठानचे मार्गदर्शन सुधाकर नलावडे व सुनिता संधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह प्रतिष्ठान या गरीब विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी युवाअधिकारी संजय संधू, गौरव केरकर, प्रशांत तरवटे, किशोर भंगाळे, देवेन मोटवाणी, शुभम उनवणे, अखिल सबॉस्टीएन, अनिरुद्ध पालांडे, संस्थेचे प्रकल्प समनव्यक रवींद्र अंबोरे, सीईओ श्रद्धा देव, श्रुती जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी काळूबाई प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व भेट वस्तू संस्थेला देण्यात आल्या. तसेच या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारीही प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आली.
याप्रसंगी बोलताना विभागप्रमुख सुधाकर नलावडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्वप्रथम गोरगरीब रयतेचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य केले. त्यांच्या ‘रयत सुखी तर राज्य सुखी’ या धोरणाचे पालन आम्ही करत आहोत. मागील काही वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा खर्च टाळून आम्ही समाजातील अशाच शोषित, पीडित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. यामाध्यमातून महाराजांनी आम्हाला दिलेल्या शिकवणीचे आम्ही पालन करत असून यापुढेही अशाच प्रकारे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्याचा मानस नलावडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे संयोजन संजय संधू यांनी केले होते. काळूबाई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व नागरिकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आहे. मात्र, लोकनेते शरद पवार यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याबाबत कार्यकर्ते कमी पडले. विरोधकांच्या खोट्या भूलथापा व आश्वासनांना मतदार भुलले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. पुढील काळात खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसह जास्तीत जास्त नागरिकांना सोशल मिडीया वापरण्याबाबत जनजागृती शिबीरे आयोजित करण्यात येतील. त्याचा लाभ घ्यावा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार सोशल मिडीयासारख्या प्रभावी व जलद माध्यमातून घरोघरी पोहचवावेत असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कमिटीच्या वतीने सोशल मिडीया बाबत जागृती करण्यासाठी खराळवाडीतील राष्ट्रवादी शहर कार्यालयात अहमदनगर येथील संगणक तज्ञ योगेश फुंदे यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, शहर प्रवक्ता फजल शेख, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, प्रदेश युवक सरचिटणीस संदिप चिंचवडे,प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, संघटक विजय लोखंडे, आनंदा यादव, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, युवक उपाध्यक्ष संतोष वाघेरे, आलोक गायकवाड, निलेश निकाळजे, शेखर काटे, मंगेश बजबळकर, लाला चिंचवडे, अमोल पाटील, मयुर जाधव, अमित बच्छाव, संघटक सचिव कविता खराडे, पुष्पा शेळके, ब्लॉक अध्यक्ष रशिद सय्यद, दिपक साकोरे, युवक उपाध्यक्ष चैतन्य चोरडिया, जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष यतिम पारेख, कार्यालयीन सचिव रामदास मोरे उपस्थित होते.
वाघेरे पाटील म्हणाले की, मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष व आजीमाजी मंत्र्यांवर विरोधी पक्षांनी बिनबूडाचे आरोप सोशल मिडीयातून केले. त्याला समर्पकपणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तर देऊ शकले नाहीत. निवडणुक निकालानंतर सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतला. त्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मिडीयाचा वापर कमी करतात असे आढळले. त्यामुळे अशी सोशल मिडीया जनजागृती शिबीरे युवक प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर घेण्यात येणार आहेत.
यावेळी योगेश फुंदे यांनी शिबीरात सहभाग झालेल्या सर्वांना व्टिटरचे अकाऊंट ओपन करुन दिले व ते कसे वापरायचे याचे मार्गदर्शन दिले. व्टिटरच्या माध्यमातून आपले स्वत:चे विचार, तक्रार अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्री व उच्च अधिकारी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध संस्था यांच्यापर्यंत कमी शब्दात क्षणार्धात पोहचविता येतात. तसेच फेसबुक, इंन्स्टाग्राम सभ्य पणाने कमी शब्दात, उच्च वैचारिक पातळीचे भान ठेवून आपले मत योग्य पध्दतीने कसे मांडावे याची माहिती दिली. सोशल मिडीयाबाबत कोणालाही कोणावरही दबावतंत्र वापरता येत नाही. संविधानाने दिलेला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना पुरेपूर वापरता येतो. मात्र, विकृत विचारांचे लोक ट्रोलींग करतात. तरी देखिल विचारांची लढाई विचारांनी लढायची याचे भान सर्वांनी ठेवावे. असेही फुंदे यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष वाघेरे पाटील यांच्या हस्ते फुंदे यांचा सत्कार करण्यात आला.
व्हीएस न्यूज - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाचा १२१ वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट कल्ब येथे पार पडला. शिवजयंतीचे औचित्य साधून नदी घाटावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभियानाला सुरवात करण्यात आली. अभियानात २०० लोक सहभागी झाले होते. यावेळी नदीघाटावर समर्थ क्रिएटीव्ह एनलाईटर्स ग्रुप चे २५ स्वयंसेवक सागर दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली घाटावर श्रमदानासाठी सहभागी झाले. आर्मी रिटायर्ड सचिन घाडगे तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच बी यु भंडारी ऑटो मोबाईल्स व ट्रम्प बाईक्सचे संचालक शैलेश जयकुमार भंडारी हे देखील अभियानासाठी उपस्थित होते. राजयोग पेट्रोलियम टीम तर्फे १० हजार रुपयांची देणगी व संजय शंकरराव कलाटे यांच्या तर्फे २१०० रुपयांची देणगी या अभियानातील संचयन कक्षामध्ये जमा झाली. तसेच चिंचवडच्या प्रभुणे डायमंडचे श्रीनिवास प्रभुणे बोट क्लब येथे दररोज फिरायला येतात. त्यावेळी त्यांनी अभियानाची माहिती घेऊन सर्व सहभागी व्यक्तींच्या आरोग्यासाठी २ बॉक्स मास्क आणून दिले. मागील १२१ दिवसात जलपर्णीमुक्त पवनामाईसाठी केलेले वेगवेगळे उपाय, प्रयत्न, उगम ते संगम पवित्र पवनामाई संकल्पना याबाबतची माहिती रोटरीचे अध्यक्ष रो प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ आबा मुसुडगे यांनी नवीन सहभागी सदस्यांना सांगितली. भविष्यात केल्या जाणा-या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कामाची व योजनांची माहिती दिली.
या उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभियंता प्रविण लडकत, रानजाई प्रकल्पाचे आबा मुसुगडे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे रो सोमनाथ हरपुडे, रो सुनील कवडे, रो शेखर चिंचवडे, रो राजेंद्र चिंचवडे, रो गणेश बोरा, रो जगन्नाथ फडतरे, रो वसंत ढवळे, रो सुभाष वाल्हेकर, रो सचिन काळभोर, रो संदिप वाल्हेकर, रो स्वाती प्र वाल्हेकर, रो स्वाती सुनील वाल्हेकर, प्रणाली हरपुडे, वैशाली खराडे, स्वाती पाटील, संगीता घोडके, अनंता पानसे व कुटुंबीय रविकांत व धनंजयव बालवडकर, ज्ञानेश्वर आबा वाल्हेकर, एस पी वायर्स टिम, राजयोग पेट्रोलियम टिम, पी.सी.सी.एफ., सावरकर मित्र मंडळ, भावसार व्हिजन, पोलीस नागरीक मित्र मंडळ, हरिष मोरे व गार्डन ग्रुप थेरगाव एस. के .एफ व टेल्को कामगार ग्रूप, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अॅड. हर्षद नढे, अॅड. महेश टेमगिरे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, संजय कलाटे आणि आय .सी. सी .सायकल क्लबचे पाच सदस्य सायकल वर येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देत या अभियानात सहभागी झाले. अनेक महिलाबचत गट, अनेक निसर्गप्रेमी व संस्थांचे कार्यकर्ते श्रमदानासाठी सहभागी झाले होते.
या मोहिमेत तीन ट्रक जलपर्णी नदीपात्राबाहेर काढण्यात आली. या अभियानामध्ये आजवर ६९८ ट्रक जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात आली आहे. दररोज चालणारे हे अभियान निसर्ग प्रेमींसाठी पुढील रविवारी (दि.८ मार्च) केजुबाई बंधारा, रावेत येथे होणार आहे, असे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी सांगितले.
अरविंद एज्युकेशन सोसायटीत आग सुरक्षिततेवर विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन
व्हीएस न्यूज -आज मोबाईल बोलत किंवा टीव्हीवरील मालिका बघत बघत स्वयंपाक करण्याचे महिलांमधील प्रमाण खूप वाढले आहे. मात्र, महिलांची ही सवय संपूर्ण घरासाठीच धोकादायक ठरू शकते. कारण मोबाईल किंवा टीव्ही पाहत स्वयंपाक करत असताना दुर्लक्ष होऊन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी मोबाईल आणि टीव्ही या दोन गोष्टी स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन सेफ किड्स फाऊंडेशनच्या अधिकार्यांनी दिला.
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडियम स्कूलमध्ये सेफ किड्स फाऊंडेशनच्या सहयोगाने ‘सेफ किड्स अॅट होम’ या उपक्रमांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
सेफ किड्स फाऊंडेशनच्या अधिकार्यांनी सांगितले, की महिला स्वयंपाक करताना सैल, घोळसर कपडे घालून स्वयंपाक करताना दिसतात. साडीचा पदरही नीट खोचलेला नसतो. एका बाजूला लहान मुलांना कडेवर घेत स्वयंपाक सुरु असतो. दुसरीकडे गॅसची शेगडी सुरु असताना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईलवरील रेसिपी पाहून भाजी करणे सुरु असते. तसेच टीव्हीवरील मालिकेकडेही लक्ष असते. यामुळे दुर्लक्ष होऊन घरात आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी स्वयंपाकघरात मोबाईल व टीव्हीपासून दूर राहावे. किचन कट्ट्यावर मोबाईल, चाकू, आगपेटी, तेलकट कापड ठेवणेही जोखमीचे आहे. मुलांचा हात पोहोचणार नाही, अशा ठिकाणी काडीपेटी आणि लायटर ठेवावा. पाणी तापवायचा रॉड घातलेल्या बादलीपासून लहान मुलांना दूर ठेवावे. जळणार्या मेणबत्त्या, डासांच्या उदबत्त्या, तेलाचे दिवे मुलांचा हात पोहोचणार नाही आणि ज्वलनशील पदार्थापासून दूर ठेवावेत. याबरोबरच घराला आग लागल्यास काय खबरदारी घ्यावी, याबाबतही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
फटाके उडवतानाही सुती कपडे परिधान करावीत. स्वतःला आग लागल्यास जिथे आहात तिथे थांबा, खाली पडा आणि लोळा. कपड्यांची पेटलेली बाजू भूमीलगत राहील, याची दक्षता घ्यावी. कपड्यांना आग लागल्यास घाबरून पळू नये. पळाल्यामुळे आग भडकू शकते. आपल्या साथीदाराला आग लागल्यास कोणतेही जाड कापड घेऊन जळणार्याभोवती गुंडाळावे. तसेच त्वरित प्रथमोपचार द्यावेत. जखम किरकोळ असेल, तर कोणतीही क्रिम किंवा टुथपेस्ट लावण्याऐवजी भाजलेला भाग 5 ते 10 मिनिटे पाण्याखाली धरावा, म्हणजे जखम चिघळणार नाही. विजेची उपकरणे हाताळतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. काम झाल्यावर विजेच्या उपकरणांचे बटन बंद करून प्लग काढून ठेवावा. विजेची उपकरणे / बटणे यांच्याजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. कोणत्याही उपकरणावर किंवा विजेच्या बटणावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्युतभार टाकू नये. ओल्या हातांनी विजेच्या उपकरणांना स्पर्श करू नये, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002