व्हीएस न्यूज - चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्यवाहपदी अॅड. सतीश नानासाहेब गोरडे तर सहकार्यवाहपदी रवींद्र धोंडिबा नामदे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे.
चापेकर स्मारक समितीच्या जुन्या कार्यकारिणीची नुकतीच मुदत संपली होती. त्यामुळे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यासाठी चापेकर वाड्यात कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत गिरीश प्रभुणे यांची एकमताने पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष शकुंतला विनोद बंसल, कोषाध्यक्ष संजय मनोहर कुलकर्णी, सदस्य मधुसुदन दत्तात्रय जाधव, अशोक माधव पारखी, गतिराम रघुनाथ भोईर, नितीन गजानन बारणे, लक्ष्मण बापू पवार, शरद सोपान जाधव, आसाराम एकनाथ कसबे, सुनीता श्रीकांत शिंदे, निता सुरेश मोहिते, विश्वस्त मुकुंद वासुदेव कुलकर्णी, विलास सुदाम लांडगे, व्यवस्थापक सिध्देश्वर धनराज इंगळे यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारिणीचा कार्यकाल पाच वर्षांचा असणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून रविकांत कळबंकर यांनी काम पाहिले.
यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे म्हणाले, ”क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या दुस-या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्मारकाचे काम केले जाणार आहे. या कामास प्रत्यक्षात लवकरच सुरुवात केली जाणार असून सहा मजली इमारत असणार आहे. स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीचे केले जाणार आहे. क्रांतिकारांचे दगडी कोरीव कामामध्ये शिल्प तयार केले जाणार आहे. क्रांतिकारांचे वेगवेगळ्या रुपातील २५ शिल्प साकारले जाणार आहेत. चापेकरांच्या आठवनींना उजाळा दिला जाणार आहे. देशाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने स्मारकाचे काम केले जाणार आहे. देशातील नागरिकांना प्रेरणा मिळेल, अभिमान वाटेल असा स्वरुपाचे स्मारक असणार आहे”.
व्हीएस न्यूज -नवी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून जोमाने काम सुरु होते. आपल्यावर असलेली जबाबदारी समर्थपणे पेलत होतीच. पण अनपेक्षितपणे एक मोठी जबाबदारी मी स्वीकारली. ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे यांच्या ‘बबन’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली. एक आव्हान म्हणून मी ती स्वीकारलीही. अभिनय ही माझी पॅशन आहे. मी 1981 पासून बँक क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला मी आकाशवाणी, मग दूरदर्शनवर छोटी-मोठी कामे केली आहेत. मात्र, चित्रपटात काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ. मी बँकिंग क्षेत्रातील करिअरमधून रिटायर होण्याच्या उंबरठ्यावर असताना भाऊरावांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांची आणि ‘बबन’ चित्रपटाच्या टीम’ची मी कायम ऋणी असणार आहे. कारण त्यांच्यातील सकारात्मक प्रोत्सहनामुळेच मला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली, असे बँक शाखा व्यवस्थापक सीमा समर्थ यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, आजपर्यंत मुंबईत बँकेत काम करीत होते. पण चित्रपटसृष्टीशी कधी संबंध आला नव्हता. अचानक माझी पुण्यात नवी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून बदली झाली. दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कर्हाडे यांना भेटण्याची इच्छा होती. बँकेचे एक खातेदार म्हणून मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. पण दुसर्या दिवशी ते स्वत: मला भेटायला आले. वारंवार बोलणे होत राहिले. एके दिवशी त्यांनी स्वत:च विचारले, की ‘मी एक मराठी सिनेमा करतोय, तुम्हाला काम करायला आवडेल का ? तर ऑडिशनला या.’ मी क्षणभर गोंधळून गेले. नंतर ऑडिशनला गेले. सिलेक्शनही झाले. भाऊरावांनी मला माझी चित्रपटातील भूमिका काय ते सांगितले. आणि तिथूनच बबन’ चित्रपटातील भूमिकेबाबत काम सुरु झाले.
‘बबन’ चित्रपटात खेडे गावातील एका ‘आजी’ची भूमिका करायची असल्याने तिथली मराठी भाषा आत्मसात करणे खूप कठीण काम होते. मात्र, भाऊरावांनी माझी भाषा सुधारण्यासाठी खूप कष्ट घेतले. वेगवेगळी पुस्तके वाचायला सांगितली. ग्रामीण भाषा, वावरण्यातला ग्रामीण ढंग येण्यासाठी शिरुरमध्ये एका कुटुंबाच्या घरी महिनाभर राहावे लागले. तिथल्या बायकांचे उठणे, बसणे, वागणे, साडी नेसणे, डोक्यावरचा पदर सांभाळण्याचे पद्धत, जेवण्याची पद्धत, सहज येणार्या शिव्या शिकण्याबरोबरच शेतात जाऊन कांद्याची पात कापणे, खुरपणी, जनावरांच्या गोठ्यातील कष्टाची कामे करावी लागली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत चित्रपटात आजीची भूमिका सर्वोत्तम वठवायचीच, असा ठाम निर्धार केला होता. तत्पूर्वी भाऊरावांचा ख्वाडा चित्रपट मला खूप भावला होता.
दिग्दर्शक भाऊरावांची काम करून घेण्याची पद्धतच वेगळी आहे. सेटवरच सीनविषयी माहिती ते देत. त्यांचे म्हणणे असे की सीनची माहिती अगोदर सांगितली, की कलाकार त्यांच्या भूमिकेची एक प्रतिमा मनात तयार करतात. आणि तसेच सेटवर प्रेझेंट होतात. मला काय हवे आहे, ते मला कलाकाराचे डोके रिकामे असताना भरणे सोपे जाते. भाऊराव भूमिका समजावून सांगताना आवर्जून सांगत, की तुला आहे तशीच भूमिका करायची आहे. फक्त भाषेचा लहेजा आत्मसात कर.
मला असे वाटते की बबन हा सिनेमा भाऊराव कर्हाडे या तरुण लेखक आणि दिग्दर्शकाने त्याच्या स्वत:च्या अनुभवाच्या मक्तेदारी बरोबरच तरुणांना जगण्याची एक वेगळी दिशा दाखविणारा, वास्तविक, सांगीतिक, यशासाठी धडपडणार्या, मनापासून प्रेम करणार्या, आयुष्यातले चढ-उतार अनुभवणार्या तरुणाची रंजक कथा आहे. सेटवर सगळे मला म्हातारीच म्हणत असत. ते अजूनही तसेच बोलतात. माझ्या आयुष्यात आलेला हा सरळ, साध्या दिग्दर्शकाबरोबरचा प्रवास खूपच आनंददायी होता. पुढील आठवड्यात प्रदर्शित होत असलेला ‘बबन’ हा चित्रपट सर्वांनी सिनेमागृहात जाऊन आवर्जून पाहावा, असे आवाहन मी करते.
व्हीएस न्यूज - आपल्या प्रियसीला फिरायला घेऊन गेल्याचा राग मनात धरून एका महाविद्यालयीन युवकाला जीवे मारून त्याचा मृतदेह पाण्यात टाकून दिल्याची घटना लोणावळा शहरातील तुंगार्ली धरणावर घडली. मृत झालेल्या युवकाचे नाव किसन शिवा परदेशी (वय २०, रा.भैरवनाथ नगर, कुसगाव, ता.मावळ) असे असून मंगळवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या पूर्वी सदर घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी मृत युवकाचा चुलता भरत मिठाईलाल परदेशी (वय ५३, रा.भैरवनाथ नगर, कुसगाव, ता.मावळ) याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे मंगळवारी ४ वाजण्याच्या सुमारास किसन परदेशी हा एका मुलीला घेऊन तुंगार्ली धरणावर फिरायला गेला होता. ही माहिती समजल्यावर या प्रकरणातील आरोपी प्रशांत विठ्ठल धरफळे (रा.डोंगरगाव वाडी, ता.मावळ) हा मनात राग धरून घटनास्थळी पोचला. त्याने त्याठिकाणी किसन परदेशी याला हाताने आणि दगडाने मारहाण करीत त्याचा खून केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात टाकला. किसन याचा मृतदेह बुधवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या बचाव पथकाने पाण्यातून बाहेर काढला.
लोणावळा शहर पोलिसांनी याप्रकरणी भादवी कलम ३०२, २०१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रशांत धरफळे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास स.पो.नि. एन.बी.रानगट हे करीत आहे
व्हीएस न्यूज - एका महाविद्यालयीन तरुणाला दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने धमकी देत लुटले. हा प्रकार रावेत येथे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. कुणाल लक्ष्मण मलवाडे (वय 19, रा. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, बॉईज हॉस्टेल, रावेत, मूळ रा. लातूर) या विद्यार्थ्याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल रावेत येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड रिसर्चमध्ये अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कुणाल जेवण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या बाहेर रस्त्यावर शतपावली करीत होता. दुचाकीवरून (एम एच 14, डीपी 7459) या क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने कुणालला धमकी देत तुझ्याकडे असलेला मोबाईल व पैशांचे पाकीट देण्याची मागणी केली. कुणालने याला विरोध करताच तिघांनी त्याला हाताने मारहाण करत मोबाईल व पैशांचे पाकीट असा आठ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने नेला. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - घरासमोर लावलेली दुचाकी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना जुनी सांगवीत दि.10 मार्च रोजी मध्यरात्री घडली. वैशाली रामकिशोर सिंग (वय 30, रा. बडगुजर बिल्डिंग, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जुनी सांगवी येथील बडगुजर कॉलनी येथे राहतात. दि. 10 मार्च रोजी रात्री घरासमोर लावलेली बजाज पल्सर अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - डीजे वर मोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवत असताना आवाज कमी करण्यास सांगितल्याने तरुणाने एकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडला. याबाबत इंद्रजित कौर बग्गा (वय-48, रा. नवले रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बग्गा व आरोपी जाधव नवले रेसिडेन्सी पिंपळे सौदागर येथे शेजारी-शेजारी राहतात. जाधव याच्या घरात लाईट दुरुस्तीचे काम सुरु आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास जाधव याने मोठ्या आवाजात डीजे वर अश्लील गाणी लावली. डीजेचा आवाज कमी कर, असे सांगण्यासाठी बग्गा यांचा मुलगा जसमित व त्याची आई गेले असता आरोपी जाधवने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि नगररचना उपसंचालक यांनी अवघ्या दहा महिन्यात पाच हजार 300 कोटी रुपयांचे टीडीआर वाटप केले आहे. त्यातच नगररचना उपसंचालकाची बदली होऊन एक महिना उलटला तरी त्यांनी पदभार सोडला नाही. आयुक्तांनी देखील त्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे संशय वाढला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यासंदर्भात भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील दहा महिन्यात तब्बल 41 लाख27 हजार चौरस फुटांचे हस्तांतरणीय विकास हक्काचे (टीडीआर) वाटप केले आहे. त्याची किंमत 5 हजार 300 कोटी असून यामध्ये आयुक्त व भाजपचे आमदार, पदाधिकारी,नगरसेवक यांचा सहभाग आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन आपण पत्राद्वारे दिले आहे.
महापालिकेचे नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची नगरविकास विभागाने 14 फेब्रुवारी 2018 रोजी तडकाफडकी मुंबईतील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन (एसआरए) विभागाच्या उपसंचालकपदी बदली केली. बदलीचा आदेश 14 फेब्रुवारीला पारित करण्यात आला. बदली होऊन एक महिना होत आला. तरी देखील ठाकूर यांनी पदभार सोडला नाही. त्यांचा फाईल क्लिअर करण्याचा सपाटा सुरुच आहे. तसेच, आयुक्त हर्डीकर यांनी देखील त्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे संशय वाढला आहे. ठाकूर यांनी 14 फेब्रुवारी ते 13 मार्च2018 दरम्यानच्या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांची, मंजूर केलेल्या फाईल्सची सखोल चौकशी करावी. तसेच, राज्य शासनाच्या आदेशाचे उलंघन केल्या प्रकरणी आयुक्त हर्डीकर व नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज – त्रिपुरा, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालॅंड, सिक्कीम या पूर्वोत्तर सात राज्यातील कलाकारांनी अप्रतिम सौंदर्यपूर्ण नृत्ये सादर करुन रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निगडीतील नंदकिशोर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सात राज्यातील अडीचशे कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी सीआरपीएफचे उपकमांडंट सचिन गायकवाड, राज्य निदेशक संध्या देवताळे,मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलजा मोरे, प्रसिध्द कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका अश्विनी बोबडे,माजी नगरसेविका सुलभा उबाळे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, सामाजिक कार्यकर्ते दीपक मोढवे पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी गणेश वंदना, कथक रंगमंच प्रणाम, तराना, नादी आदी विविध नृत्य प्रकार सादर केले. यानंतर बाहेरील राज्यातून आलेल्या कलाकारांचे सादरीकरण सुरु झाले. प्रथम त्रिपुरा राज्यातील कलाकारांचे सुंदर लोकनृत्य झाले. आसाम येथील कलाकारांनी पारंपारीक बिहू नृत्य सादर करत दाद मिळवली. मिझोराम राज्यातील कलाकारांनी सरलाम काई व तलंगलाम ही आकर्षक नृत्य सादर केली. अरुणाचर प्रदेशातील कलाकारांनी भुरी नाईझिर नृत्य पेश केले. मणिपूर राज्यातील कलाकारांनी अभिसार, खांबा थोईबी, मार्शल आर्टसह मिटी जागोई अशी विविध नृत्ये सादर करुन उपस्थित रसिकांची मने जिंकली. नागालॅंड राज्यातील कलाकारांनी नृत्याव्दारे स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवले. सिक्कीम राज्यातील कलाकारांनी नेपाली व लेपचा नृत्य सादर करुन रसिकांना डोलायला लावले.
कलाकारांची महापालिकेला भेट…
मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा व नागालॅंड या पूर्वोत्तर राज्यातील कलाकारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. उपमहापौर शैलजा मोरे,आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या अनुराधा गोरखे, डॉ. नंदकिशोर कपोते, संध्या देवतळे, यशवंत मानखेडकर, व्ही. डी. काळे, कुसूम ससाणे, कार्यालयीन अधिक्षक हरी ठाकरे, संजय कुरणे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी प्रवीण निकम, दहा वर्षांचा बाल शास्त्रज्ञ हेमांग येलोरे आदी उपस्थित होते. श्रावण हर्डीकर व एकनाथ पवार यांनी कलाकारांशी संवाद साधला. सूत्रसंचालन यशवंत मानखेडकर यांनी केले. रमेश भोसले यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज – येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स ऍण्ड रिसर्च आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये “जैवपदार्थांचा प्रतियौगी औषधांमध्ये करण्यात येणारा वापर आणि जैवपदार्थामधील विविध संशोधनात्मक संधी’ यावर माहिती देण्यात आली.
परिषदेचे उद्घाटनाच्या वेळी राष्ट्रीय रसायनिक प्रयोगशाळा पुणेचे वरिष्ठ संशोधक डॉ. पंकज पोतदार, प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे, समन्वयक डॉ. आशा थॉमस आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. पोतदार यांनी “मल्टिफंक्शनल प्लाटफोर्मास फॉर मल्टिमोडेल एमेजिंग, बायोसेन्सर डिटेशन, ड्रग डिलेव्हरी आणि रिव्हर्सल ऑफ न्युरोडिजनरेशन’ या विषयाखाली मार्गदर्शन केले.
यानंतर आगरकर इन्स्टिट्यूट ऑफ पुणेच्या डॉ. रिंकू उमराणी यांनी “नॅनोमटेरिअल फॉर पॅनक्रियाटिक बिटा सेल रिजरेशन – थेरपी फॉर डायबेटीस’ यावर ओर्थोक्राफ्ट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. पियुष जोशी यांनी “पोलिमेरिक बायोमटेरियल आणि सायन्स इंटरप्रेनरशिप’ या विषयावर मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये संशोधक पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थी गटातून शाहरूख खान (प्रथम), निखिल लोहे (द्वितीय), रूपाली हंडाल, पूनम पेटकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. शेजल गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रितेश भोळे यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील रेडझोनची हद्द कमी करणे, मावळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मिसाईल प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांची खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेत चर्चा केली.
या शिष्टमंडळात आमदार बाळा भेगडे, देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाअध्यक्ष विशाल खंडेलवाल, सुदाम तरस, कैलास पानसरे, मदन सोनिगरा, निवृत्त ब्रिगेडियर एस. के. मोहन उपस्थित होते. मावळ, पिंपरी चिंचवड भागातील रेड झोनची हद्द कमी करण्यासंदर्भात तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बरोबर 17 मार्च 2014, 16 मार्च 2016 व एप्रिल2016 रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीच्या दरम्यान ऑगस्ट 2017 पर्यंत रेड झोनबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पर्रीकर यांनी दिले होते. परंतू पर्रीकर यांना गोव्यात परत जावे लागले. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या बरोबरही या अगोदर दोन बैठका झाल्या आहेत. सबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून या प्रश्नाबाबत त्या माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा खासदार बारणे यांनी शिष्टमंडळासमवेत संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.
या बैठकीत रेड झोनची हद्द कमी करण्याबरोबरच मावळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मिसाईल प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा या मागणीवर चर्चा झाली. याबाबत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रश्नासंदर्भात आजून काही काळ लागणार असल्याचे सांगितले. या दोन्ही प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून रेड झोनची हद्द कमी करणे हा देश पातळीवरील निर्णय असल्यामुळे यासाठी काही काळ जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच मिसाईल प्रकल्पाच्यासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्याचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने त्यामध्ये महाराष्ट्र सरकार जर सकारात्मक भूमिका घेणार असल्यास तोही विषय मार्गी लावण्यास मदत करणार असल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारताच्या इतर भागांमध्ये भारतीय चलनाच्या बनावट नोटा पुरवणा-या एका इसमाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या साथीदाराला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) नुकतीच केली.
दलाम मिया (रा. देवनापूर, मालदा, पश्चिम बंगला), अशोक महादेव कुंभार (रा. चिक्कोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एनआयए मुंबई शाखेला एक विश्वसनीय माहिती मिळाली होती की, दलाम मिया हा बनावट नोटा चलनात आणणा-या टोळीत काम करत आहे. त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारताच्या इतर भागांतील विविध ठिकाणी भारतीय चलनाच्या बनावट नोटा पुरविल्या आहेत. त्यानुसार त्याचा शोध घेत असताना तो पुण्यामध्ये असल्याचे समजले. एनआयएच्या अधिका-यांनी दलाम मियाला पुण्यातून अटक केली.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा एक साथीदार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दलाम मिया याचा साथीदार अशोक कुंभार याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. अशोक कुंभार याच्याकडून ८२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटा या हुबेहुब ख-या नोटां सारख्या दिसतात. सामान्य माणसाला खरी आणि खोटी नोट ओळताही येणार नाही अशा पद्धतीने या नोटांची छापाई करण्यात आली आहे. या नोटांची छापाई सीमेपलीकडे करुन त्या भारतात आणून चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय अधिका-यांनी केला आहे.
भाजप नगरसेवकांचे महापालिका आयुक्तांना निवेदन…
व्हीएस न्यूज - प्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचे आणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून तसेच द्वेष आणि मत्सरापोटी स्मशानभूमी तसेच रस्त्यांची कामे अडविली आहेत. स्मशानभूमी सारख्या भावनिक मुद्द्यावर शितोळे राजकारण करत आहेत. त्याला भीक न घालता प्रशासनाने सांगवी भागातील रस्त्यांची कामे तसेच स्मशानभूमीचे काम पूर्ण करून या भागातील नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या प्रभागाच्या ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक ढोरे, कांबळे व नगरसेविका सोनवणे यांनी आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेने गेल्या पंचवार्षिकला प्रभाग क्रमांक ३२ मध्ये स्मशानभूमी उभारली आहे. या प्रभागातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन स्मशानभूमीची आवश्यकता होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करून नागरिकांसाठी स्मशानभूमी बांधली. परंतु, त्यासाठी बसविण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीत मयताच्या टाळूवरचे लोणे खाण्याचा प्रकार झाल्यामुळे या प्रभागाची प्रचंड बदनामी झाली. या भ्रष्टाचाराचे पाप संबंधितांना फेडावे लागले. ही स्मशानभूमी बांधताना त्याला कोणीही आडकाठी आणली नाही. परंतु, महापालिका निवडणुकीतील जय-पराजयानंतर स्मशानभूमीवरून नागरिकांना वेठीस धरण्याचेकाम सुरू आहे. पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून शितोळे याभागात होणाऱ्या रस्त्यांच्या कामांनाही आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी या स्मशानभूमीचे काम अडविले आहे. सार्वजनिक असलेल्या रस्त्यांचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी रस्त्यांची कामे त्यांनी अडविली आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मत्सर आणि द्वेषापोटी नागरिकांना नाहक त्रास देण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. या सर्व अडवाअडवीच्या राजकारणामुळे याभागातील नागरिक आगामी काळात त्यांचे जिरवण्याचे काम निश्चित करतील. परंतु, या राजकारणाला महापालिका प्रशासनाने बळी न पडता प्रभाग क्रमांक ३२ मधील कामे गतीने मार्गी लावावीत.
या भागातील सर्वच कामांसाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. लोकहिताच्या कामासाठी कोणाच्या दबावाला बळी पडण्याची अधिकाऱ्यांना गरज नाही. त्यामुळे या बाबीची आपण स्वतः गंभीर दखल घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांना कामे मार्गी लावण्यासाठी आपण आदेश द्यावेत. प्रभागातील नागरिकांची तातडीची गरज लक्षात घेऊन स्मशानभूमी उभारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. रस्त्यांची कामे अडविण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशासनाने संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई करावी. यापुढे विकासकामे अडविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला रस्त्यावर उतरून उत्तर देण्याचा इशारा या चारही नगरसेवकांनी दिला आहे.”
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002