व्हीएस न्यूज - महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूंबियांसाठी राबविण्यात येणारी धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करण्यात येणार आहे. आता अधिकारी,कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा खासगी विमा कंपनीमार्फत काढला जाणार आहे. त्यासाठी खासगी विमा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटूंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटूंबिय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना 1 सप्टेंबर2015 पासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कुटूंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्याची आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्तींचा समावेश कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांमध्ये करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत 7400 कर्मचारी असून कर्मचारी आणि अवलंबितांची संख्या सुमारे 35 ते 40 हजार एवढी आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही योजना ऐच्छिक असून एकूण 3 हजार 400 सेवानिवृत्तांपैकी 1हजार 175 सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांची संख्या 2 हजार 350 एवढी आहे. या योजनेवर महापालिकेचा सुमारे 30 कोटी रूपये खर्च होतो.
महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी 12 जून 2017 रोजी विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत सुमारे 10 कंपन्यांनी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विमा लागु करण्यासाठी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आयुक्तांच्या सुचनेनुसार क्रिसील संस्थेकडे विनंती प्रस्ताव (रिक्वेस्ट टू प्रपोजल) तयार करण्यासाठी पाठविण्यात आला. क्रिसीलकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याला आयुक्तांनी 9 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. त्यानुसार, इच्छूक विमा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
व्हीएस न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार थरमॅक्स लि. चिंचवड येथे थरमॅक्स कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक मतदानाद्वारे संपन्न झाली. या निवडणुकीकडे जिल्ह्यातील दिग्गजांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये केशवराव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल एकमताने निवडून आला.
यावेळी बोलताना केशवराव घोळवे म्हणाले की, सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं. हा विजय सत्याचा असत्यावर झालेला विजय आहे. हा विजय कारखान्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विजय आहे. ही कमिटी यापुढे कंपनी हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामगारांच्या हिताचे संवर्धन करणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याबद्दल त्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून थरमॅक्सचे प्रवीण खेसे तर निवडणूक कमिटी म्हणून प्रकाश जोध, शत्रुघ्न गोडगे, एम. एस. राखुंडे, बी. जे. सपकाळ यांनी काम पाहिले. केशवराव घोळवे यांनी कंपनी हित जोपासत कामगारांप्रती दिलेले योगदान, अहोरात्र कष्ट करून कामगारांच्या कल्याणासाठी झटत असताना कुटील कटकारस्थान करून अशा चांगल्या कामगार नेत्यांना कंपनीतून बडतर्फ करण्यात आले होते. कामगारांना मागील तीन वर्षे सतत दहशतीमध्ये ठेवण्यात आलेले होते. याचीच चीड कामगारांच्या मनात खदखदत होती. त्याचे परिणाम म्हणून कामगारांनी केशवराव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पॅनल निवडून देत पुन्हा एकदा केशवरावांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, अशा भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केल्या. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी शिवशंभो फाउंडेशन शाहूनगर येथे फटाक्यांचा आतषबाजीमध्ये गुलाल उधळून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कामगारांनी सर्व उमेदवारांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे यांनी केले. श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, मारुती जगदाळे, संतोष कणसे यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
केशवराव घोळवे यांच्या पॅनल मधील विजयी उमेदवार व त्यांना मिळलेले मतदान –
महेंद्र पासलकर (224), मिलिंद बायस्कर (224), प्रदीप तरटे (223), संदीप ठाकूर (221), सुशील मिरगल (220), विश्वास पोळ (218), किशोर सोमवंशी (215), संजय देशमुख (215), एकनाथ उगले (215), राजेंद्र पाटील (214), भीमराव धस (208).
व्हीएस न्यूज - अण्णासाहेब मगर बँक व्यवस्थापन व सेवक यांच्यामध्ये वेतनकरार संपन्न झाला. या वेतनकरारामध्ये सेवकांना भरघोस वेतनवाढ झाल्याचे बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी जाहीर केले. त्यामुळे बँकेच्या सेवकांचा गुढी पाडवा गोड झाला आहे.
वेतनकरार २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीसाठी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने हा वेतनकरार बँकेने एकूण पाच वर्षासाठी केला आहे. या वेतन करारामुळे सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वेतनकरारामध्ये सर्व सेवकांना समान न्याय देण्याचा बँकेने प्रयत्न केला आहे. करारानुसार सेवकांना पद व सेवा ज्येष्ठतेनुसार किमान चार हजार तर कमाल सोळा हजार रुपयांपर्यंतची वेतनवाढ मिळणार आहे. त्याचा लाभ ७७ सेवकांना होणार आहे. हा सर्वसमावेशक करार असल्याचे नंदु लांडे यांनी नमूद केले.
या करारावर व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष नंदकुमार लांडे, उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर, संचालक अँड. घनशाम खलाटे, शंकर मेटकरी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली. तसेच सेवकांचे प्रतिनिधी म्हणून संध्या द्विवेदी, तुषार मखामले, आदिनाथ देवकर, सरिता लुंकड, जयेश फुगे यांनी स्वाक्षरी केली. यावेळी संचालक मनोज बोरसे, गणेश पवळे, राजेश सस्ते, विजय गवारे, दीपक डोळस, लालचंद राठोड, सुलोचना भोवरे, सविता मोहरुत, सोनल लांडगे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे रस्त्यावर गाडी पुढे मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एका गुन्हेगारावर टोळक्याने गोळीबार केला आहे. यामध्ये जखमीला दोन गोळ्या लागल्या असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जयवंत चितळकर हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चितळकर हा त्याच्या मित्रांसोबत वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात बसला होता. त्यावेळी एक कार तेथून जात होती. मात्र रस्त्यावर दुचाकी असल्याने कारला अडचण होत असल्याने कार चालकाने दुचाकी काढण्यास सांगितल्याने त्यांच्यात वादावादी झाली. कार चालक निघून गेला आणि त्याच्या इतर साथीदाराना घेऊन आला. त्यावेळी मारामारी झाली आणि एकाने चितळकर याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याला दोन गोळ्या लागल्याची शक्यता आहे. त्याच्यावर बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत.
व्हीएस न्यूज – गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विश्व श्रीराम सेना या सामाजिक संस्थेच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डी येथील मनपाच्या उर्दू माध्यमिक हायस्कूलमध्ये नोकरी महोत्सव पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या.
पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतील अनेक मान्यवर कंपन्या, आयलेटल ग्लोबल सर्व्हिस, जेनियम कन्सस्टंट लि., यशस्वी ग्रुप, चिंचवड, ऍबसोर्स बायोलॉजिक, रिलायन्स एच आर सर्व्हिस, युवा शक्ती फाऊंडेशन, युरेका फोर्ब्स, फ्लॉश विंग मायक्रोनिक्स इंडिया, टीम प्लेस सर्व्हिस, ऐक्य ह्युमन कॅपिटल, एएसपी ऑल सर्व्हिस, ऍडिको इंडिया, अर्स मॅनेजमेंट यासारख्या कंपन्यांचे अधिकारी यावेळी उमेदवारांच्या मुलाखतींसाठी उपस्थित होते. पात्रतेच्या निकषांवर बेरोजगार तरूण तरूणींच्या मुलाखती घेण्यात आल्या. बऱ्याच तरुणांना नोकरी मिळल्याने गुढी पाडव्याचा दिवस सोन्याचा दिवस ठरला. विश्व श्रीराम सेनेने सामाजिक बांधिलकी जोपासत तरूणांसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्याबद्यल समाधान व्यक्त केले. यावेळी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना श्रीरामाची फोटो फ्रेम भेट म्हणून देण्यात आली. यावेळी विश्व श्रीराम सेनेचे प्रवक्ते प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, दिलीप गोसावी, तुकाराम बिराजदार व विश्व श्रीराम सेनचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. सतोष पाचपुते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
व्हीएस न्यूज – पदवी ही शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे फलित असून पदवीधारकांनी व्यापक नीतीमूल्यांच्या भानाने सतत जागरुक राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उत्तमराव जाधव, शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल साळुंखे, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलासकुमार पगारिया, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख प्रा. पांडुरंग भास्कर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.हनुमंत शिंदे, डॉ. ललितकुमार धोका, डॉ.प्रशांत गदिया, कल्पेश पगारिया आदी उपस्थित होते.
राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत, डॉ. अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम यांनी ध्वजसंचलन केले. प्रा. प्रवीण म्हस्के यांनी सूत्रसंचलन केले, डॉ. स्वाती वाघ यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी ‘घर चलो अभियान’ राबविणार आहे. या कालावधीत घरोघरी जाऊन केंद्र, राज्य व मनपा यांच्या विकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत.
याकरिता प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांचे गट तयार केले जाणार आहेत. असे गट घरोघरी जाऊनविकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. अभियना दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पक्ष कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. तसेच सप्ताहातून एका दिवशी स्वच्छता कार्यक्रम अभिनव पध्द्तीने राबवून जाहिर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. घर चलो अभियनाचे माध्यमातून शहरामधील १३०० बूथचे मजबूतीकरण करण्याचा निर्धार शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. त्याप्रकारची जबाबदारी सर्व पक्ष पदाधिकारी व नगरसेवक यांना दिली आहे.
चलो अभियनाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख समन्वक म्हणून जबाबदारी अमोल थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच मंडलाध्यक्ष अमोल थोरात – प्राधिकरण चिंचवड, संजय मंगोडेकर – चिंचवड स्टे. दापोडी, बाबू नायर – किवळे थेरगाव, माऊली थोरात – सांगवी काळेवाडी, प्रमोद निसळ – निगडी चिखली, सारंग कामतेकर – भोसरी चर्होली, राजेश पिल्ले – युवा मोर्चा, उमा खापरे – महिला मोर्चा, सदाशिव खाडे – अनूसूचित, अल्पसंख्याक, व्यापार व कामगार, सचिन पटवर्धन – उर्वरित आघाड्या अशाप्रकारे विभागांचे समन्वक असणार आहेत. घर चलो घर अभियनामध्ये खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, उमा खापरे, महेश कुलकर्णी, वसंत वाणी, अमर मुलचंदानी,यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी व नगरसेवक सामिल होणार आहेत.
भाजपचा येत्या ६ एप्रिलला वर्धापनदिन होणार आहे. तसेच भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन ६ एप्रिल रोजी मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स (बीकेसी) येथे होणार आहे. पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्याचे शहर पदाधिका-यांना उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती भाजप पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात उद्योगधंदा, नोकरी, शिक्षणानिमित्त मराठवाड्यातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. तथापि, लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा चिंचवड स्टेशनला करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांच्यामार्फत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदनाव्दारे केली आहे. दाखले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणुन ओळखले जाते. या शहरात उद्योग, नोकरी, शिक्षण, रोजगारासाठी मराठवाड्यातील उदगीर, लातुर, नांदेड, बिदर, अमरावती, धाराशिव येथील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. हे नागरिक लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या रेल्वेने आल्यानंतर त्यांना पुणे रेल्वे स्टेशन अथवा लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी या दोन्हीही सुपर एक्सप्रेस गाड्यांना चिंचवड स्टेशन येथे थांबा करण्यात यावा अशी मागणी दाखले यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - जमिनीच्या वादातून शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटकाला चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत सिमेंटचा गट्टू फेकून मारला. ही घटना बोपखेल येथे घडली. मंगला सदाशिव घुले (वय 43, रा. मारूती मंदीराजवळ, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषभ ज्ञानेश्वर घुले (वय 20), सविता पांडुरंग घुले (वय 41), पांडुरंग घुले (वय 45), मंदार ज्ञानेश्वर घुले (वय 19, सर्व रा. बोपखेल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला घुले या शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटक आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून मंगला घुले यांनी 2008 साली न्यायालयात दावा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घुले या घरासमोर थांबल्या होत्या. यावेळी आरोपींनी मंगला घुले यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. ऋषभ याने त्यांना 'तु केस मागे घे, अन्यथा तुला खलास करून टाकू', अशी धमकी दिली. तसेच सिमेंटचा गट्टू मंगला घुले यांना फेकून मारला. फौजदार प्रमोद कठोरे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याचा ध्यास आणि हितचिंतकांसह विरोधकांनाही मदत करण्यात कायम पुढे असणारा नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम होय. त्यांच्या आकस्मित निधनाने राज्यातील राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहिली. माजी मंत्री कै.पंतगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गुरुवारी पिंपरीतील कामगार भवन, नारायण मेघाजी लोखंडे सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस शहरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, एमआयएम, मनसे आदी पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापुर, सांगली भागातील नागरिक उपस्थित होते. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, नगरसेवक बाबू नायर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, एमआयएमचे शहराध्यक्ष अकिल मुजावर, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजाभाऊ गोलांडे, अख्तर चौधरी, गिरीजा कुदळे, विद्या नवले, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फझल शेख, शाम आगरवाल, लक्ष्मण रुपनर, प्रदिप गायकवाड, तसेच राजेंद्रसिंह वालिया, बिंदू तिवारी, बाबा कांबळे, संग्राम तावडे, रामदास मोरे, नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, शहाबुद्दीन शेख, विशाल कसबे, सज्जी वर्की, संभाजी मुळीक आदी उपस्थित होते. सचिन साठे म्हणाले की, तरुण पणात पिंपरीत शिक्षकाची नोकरी करताना विद्यापीठाचे स्वप्न पाहुण ते पुर्णत्वाला नेऊण त्यांनी अविरत लोकसेवा केली. भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात लाखों नागरिकांना वैद्यकीय सेवा सुविधा व हजारों युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. मला निवडणुकीत अपयश आल्यानंतर सर्वप्रथम फोन करुन समाजसेवा सुरु ठेवण्यासाठी मानसिक पाठबळ डॉ. कदम यांनी दिली. श्रध्दांजली वाहताना बाबू नायर म्हणाले की, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात शैक्षणिक सुविधा व विस्तार वाढविण्यासाठी डॉ. पतंगराव कदम आणि डॉ. डी.वाय. पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. डॉ. कदम हे राजकारणात सक्रीय असताना देखील मंत्री पदावर असताना समाजकारणाला महत्व देणारे नेते होते. मारुती भापकर म्हणाले की, सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शिष्टमंडळासह डॉ. कदम यांना भेटण्याचा योग आला. त्वेषाने बैठकीला जाणारे शिष्टमंडळ डॉ. कदम यांची ते प्रश्न सोडविण्याबाबतची भुमिका पाहुण हसत खेळत आनंदाने बाहेर पडत असत.
व्हीएस न्यूज - येथील एसटी कॉलनी शेजारील मुख्य बस स्थानकात सुरु करण्यात असलेल्या पाणपोईचे उद्घाटन नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. उन्हाच्या झळा वाढल्या असून बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरातील संतोष कांबळे, राकेश कांबळे यांच्या प्रयत्नातून पाणपोई उभारण्यात आली. बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे वाहक-चालक, प्रवासी व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यावेळी रामभाऊ देशपांडे, प्रकाश दिवार, आप्पा कांबळे, राकेश कांबळे, देवराम माकर, विलास वाघ, मुरली देवरे, बाळू कांबळे, शिवलिंग सरोदे, मुकुंद शिनगारी, गणेश गायकवाड, असलम शेख आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - दापोडी येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मुर्ती स्थापनेचा 94 वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तीन दिवस विविध कार्यक्रम झाले. यावेळी दिपक कुदळे यांच्या हस्ते महापुजा झाली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. सोपान भाडळे, भंडारी, सुभाष बोधे, सुधाकर कणसे आदी उपस्थित होते. यामध्ये दैनंदिन कार्यक्रम काकड आरती, महिला भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर तसेच ह.भ. प. राजेंद्र जोशी यांच्या हस्ते कलशपुजन, डॉ. धनंजय पाटील, ह. भ. प. सुरेश महाराज किंडरे यांच्या हस्ते विणापुजन आदी कार्यक्रम पार पडले. ह. भ. प. गणेश महाराज कार्ले यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद झाला. या सर्व कार्यक्रमासाठी विजय काटे, ह. भ. प. बाळासाहेब शितोळे यांचे सहकार्य लाभले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002