व्हीएस न्यूज – सोशल मिडीयावर महिलेसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी दोघांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली आहे. रवींद्र शिंदे (रा. पिंपरी) आणि दिगंबर पडवळ (रा. कार्ला, लोणावळा) असे आरोपींचे नाव असून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, आरोपी शिंदेला पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी माहिती दिली. संबंधित महिलेने कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली दिली होती. या महिलेविरोधात रवींद्र आणि दिगंबर यांनी रविवारी 28 मार्च रोजी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण तयार झाल्याने मंगळवारी आरोपींवर गुन्हा दाखल करून शिंदेला अटक केली आहे. तसेच पोस्ट टाकणारे तरुण कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत का ? याबाबत वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - वाल्हेकरवाडी चिंचवड येथे बेकायदेशीरपणे सिलेंडर विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न पुरवठा विभागाने बुधवारी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा आढळून आला असून अन्न पुरवठा विभागाने चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी परिसरात पवना नदीच्या किनारी एक पत्र्याचे शेड तयार केले आहे. त्यामध्ये नामांकित कंपनीच्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरला केला जात होता. याबाबत अन्न पुरवठा विभागाला माहिती मिळताच विभागाच्या सहा अधिकाऱ्यांनी बुधवारी या दुकानावर छापा मारला. यावेळी दुकानात सुमारे 250 गॅस सिलेंडर आढळून आले. त्यापैकी दोन सिलेंडर लिकेज सापडले. लिकेज असलेले सिलेंडर अग्निशमन विभागाचे विकास नाईक, विशाल बाणेकर, विठ्ठल तपकाळ आणि संजय महाडिक यांनी तात्काळ दुरुस्त केले. झोपडपट्टीतील मुलांच्या मार्फत ही बेकायदा सिलेंडर विक्री केली जाते. आरोपी नामांकित गॅस कंपन्यांच्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून लहान गॅसमध्ये भरून त्याची विक्री करीत होते. छापा मारल्या वेळी बेकायदा सिलेंडरचा मोठा साठा पकडण्यात आला आहे. अन्न पुरवठा विभागाने चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
व्हीएस न्यूज - भाजपच्या मुंबईतील स्थापना दिन मेळाव्यासाठी पिंपरीतून शुक्रवारी दि. 6 रोजी पक्षाचे 15 हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी जाणार आहेत. त्यासाठी शहरातील पक्षाचे एक खासदार आणि दोन आमदार यांना प्रत्येकी दहा बसेसचे टार्गेट देण्यात आले आहे. तर, पक्षाच्या प्रत्येक नगरसेवक आणि कोअर कमिटी सदस्याला एकेका बसचे लक्ष्य देण्यात आले आहे.
दरम्यान, मंत्रिपदासाठी शहरातील दोन्ही आमदारांचे नाव घेतले जात असल्याने त्यासाठी चालून आलेल्या या संधीचा ते उपयोग करून घेण्याच्या तयारीला लागले आहेत. मुंबईतील वांद्रे येथील "बीकेसी'वर सकाळी 11 वाजता हा मेळावा होत आहे. त्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संबोधित करणार आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने "एकला चलो रे'ची घोषणा नुकतीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा दसरा मेळावाही नुकताच नेहमीसारखा जोरदार झाला. त्यामुळे आपली ताकद दाखविण्यासाठी भाजपला स्थापना दिनाची संधी चालून आलेली आहे. त्यात लोकसभा निवडणूक सव्वावर्षावर आली आहे. मात्र, ती पाच महिने अगोदर म्हणजे या वर्षअखेरीसही होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील तयारी म्हणूनही या मेळाव्याकडे पाहिले जात आहे. या मेळाव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात शहराला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी आमदार महेश लांडगे यांची नावे त्यासाठी घेतली जात आहेत. त्यामुळे ते यानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन दाखवून देणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच हा पक्ष पालिकेत सत्तेत आला आहे. त्यामुळे या मेळाव्याकरिता जाण्याकरिता पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काल शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी एका मंगल कार्यालयात मेळाव्याच्या तयारीची बैठक घेतली. त्यात वरील टार्गेट देण्यात आले. सर्व बस सकाळीच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हे आदल्या दिवशीच जाणार आहेत. पक्षाचे 77 व सहयोगी अपक्ष पाच असे 82 नगरसेवक भाजपचे पिंपरीत आहेत. 21 कोअर कमिटी मेंबर आहेत. त्या प्रत्येकाने एकेक पन्नास सीटर बस करून त्यातून कार्यकर्त्यांना मुंबईला न्यायचे आहे. दोन्ही आमदारांच्या जोडीने पक्षाचे राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनासुद्धा दहा बस नेण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. पक्षाचा युवा मोर्चा या मेळाव्याला ज्योत घेऊन जाणार आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कचरा गोळा करण्याचे व वाहून नेण्याचे टेंडर वादात सापडले असून, याबाबत आता थेट "पीएमओ'कडेच तक्रार करण्यात आली आहे.
राज्यातील इतर शहरांपेक्षा वाढीव खर्चाचे हे टेंडर आहे. त्यावर कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयातने (पीएमओ) महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, वादात सापडलेल्या या टेंडरविरुद्ध तक्रार आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच त्याला स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने याप्रकरणी न्यायालयातही धाव घेतली आहे. सत्ताधारी भाजपची दोन्ही बाजूंकडून कोंडी करण्याचे विरोधी पक्ष "राष्ट्रवादी'ने ठरविले आहे.
गेल्या वर्षी थकित बिल देण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी आपल्याकडे तीन टक्के कमिशन मागत असल्याची तक्रार एका ठेकेदाराने "पीएमओ'कडे केली होती. नंतर हे प्रकरण गुंडाळण्यात आले. त्यामुळे कचरा टेंडर तक्रारीवरील कारवाईचीही तशीच गत होण्याची भीती राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली आहे. इतर शहरांत घरोघरचा कचरा गोळा करून त्याची वाहतूक करण्यासाठी प्रतिटन दीड हजार रुपये दर आहे. मात्र, पिंपरी पालिकेने तो 1780 दिला आहे. यामुळे वर्षाला सात कोटीचा फटका पालिकेला बसणार असल्याचा विरोधी पक्ष राष्ट्रवादीचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. तसेच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली.
एवढेच नाही, तर "पीएमओ'कडेही राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी तक्रार दिली. त्यावरून "पीएमओ'ने राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधानसचीव मनीषा म्हैसकर, पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार विलास लांडे व शितोळे यांनी केला.मात्र,हा चौकशीचा आदेश नसून त्यावर कार्यवाही करण्यास सांगण्यात आले असल्याचे लोणकर यांनी स्पष्ट केले. तक्रारदारांनी पाठविलेले पत्रच आम्हाला परत पीएमओकडून पाठविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
यानिमित्ताने आयुक्तांना राष्ट्रवादीने पुन्हा लक्ष्य केले. पालिकेचे ठराविक पदाधिकारी कचऱ्यातून लूट करीत असताना आयुक्त व मुख्य लेखापरीक्षक हे पहारेकऱ्याचे काम करीत होते, तर आरोग्य कार्यकारी अधिकारी सहकार्य करीत होते, असा आरोप लांडे, शितोळे, योगेश बहल, संजोग वाघेरे पाटील, मंगला कदम आदी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या दरोडखोरीला योग्य दिशा देण्याचे काम आयुक्त करीत असल्याचा ठपकाही या पदाधिकाऱ्यांनी ठेवला. कचऱ्याची फेरनिविदा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - गेल्या आठवड्यात मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे राजकीय वाद चांगलाच पेटला असून शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. या वादात आता राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार विलास लांडे यांनी उडी घेतली आहे. कचरा प्रश्नी कुणालाच गांभिर्य नाही. केवळ निवडणुका आल्यात म्हणून युतीचे खासदार, आमदार नागरिकांसमोर नाटक करत असल्याचा ‘हल्लाबोल’ विलास लांडे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील हल्लाबोल आंदोलनाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते योगेश बहल, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जेष्ठ नेते हनुमंत गावडे,नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले की, मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीची पाहणी करणे म्हणजे युतीच्या खासदार, आमदारांनी नागरिकांसमोर केलेले नाटक म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुक जवळ आल्यामुळेच आढळराव फिरकू लागलेत. यापूर्वी १५ वर्षात कचरा डेपोला कधीच आग लागली नव्हती. भाजपची सत्ता येताच आग कशी लागली हा प्रश्नच आहे. महापालिकेतील सत्ताधार्यांनी योग्य उपाययोजना केल्या नसल्यामुळेच आगीची घटना घडली आहे. भाजपच्या सत्तेला सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्ष मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात पुरविल्या होत्या. आताच्या सत्ताधा-यांना मात्र मुलभूत सुविधा पुरविता येत नसल्याचा आरोप विलास लांडे यांनी केला.
शहरातील कचरा व्यवस्थापनातून करदात्यांच्या पैशांची लूट – प्रशांत शितोळे
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या घरोघरचा कचरा गोळा करून “मोशी कचरा डेपो” येथे नेण्यासाठी मे.एजी एनव्हायरो व मे.बी.व्ही.जी.इ.लि. यांना कामे दिली आहेत. यातुन शहरातील करदात्यांच्या पैशांच्या लुटमारीचा प्रकार सुरु आहे. नाशिक शहरात मात्र हेच काम साधारण १५०० रुपये प्रतिटन या दराने पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात याच कामासाठी १७८० रुपये दर देण्यात आला असून प्रतिवर्षी साधारण ७ कोटी रुपयांची लूट होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी दिली.
व्हीएस न्यूज - चऱ्होली येथील महापालिकेच्या शाळेसाठी सी.एस.आर.च्या माध्यमातून खाजगी कंपन्याचे सहकार्य या उद्देशांतर्गत पंडित जवाहरलाल नेहरु प्राथमिक शाळा, चऱ्होली येथे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग साहित्य तसेच खेळाच्या साहित्यांचे गुरूवारी वाटप करण्यात आले.
याबरोबरच जानकीदेवी बजाज एज्युकेशनल इनिसिएटिव्ह या संस्थेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी (सी.एस.आर.) च्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना एल.ई.डी.टी.व्ही., ई. लर्निंग साहित्य, क्रीडा साहित्याचे वाटपही महापौर काळजे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता तापकीर, शाळेचे मुख्याध्यापक नामदेव उथळे, जानकीदेवी बजाज संस्थेचे के. बी. वाळके, हेमांगी ठोनावाला, शाळा समन्वय समिती अध्यक्ष पांडूरंग पठारे, उपाध्यक्ष सुनिल तापकीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पाच जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या कॅमल चित्रकला स्पर्धेत चिंचवड येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. फ गटामध्ये नयन भालेराव याने द्वितीय पटकाविला. त्याच्या चित्राची राज्यस्तरावर निवड झाली आहे. याबद्दल संस्थेचे ऍड. राजेंद्र मुथा, अनिल कांकरिया, प्रकाश चोपडा, प्राचार्य के.सी. अनेचा यांनी नयनचे अभिनंदन केले. नयनला चित्रकला शिक्षक जी. डी. हरिदास यांनी मार्गदर्शन केले.
व्हीएस न्यूज - रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 सीसी या बुलेटसाठी चिखली, पुर्णानगर येथील सब डिलर असणाऱ्या आधार इंडिया मोटर्स सर्व्हिसेसने पिंपरीतील एका ग्राहकाची 58हजार रूपये घेवून बुलेट न देता फसवणूक केली आहे.
याप्रकरणी शामलाल लालचंद भोजवाणी (रा. पिंपरी) यांनी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, भोजवाणी यांनी चिखली, पुर्णानगर येथील सब डिलर आधार इंडिया मोटर्स सर्व्हिसेसनेमध्ये 14 ऑक्टोबर 2017 रोजी रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 सीसी ही बुलेट बुकिंग केली. त्यावेळी त्यांनी 58 हजार 427 रूपये रोख दिले. तर 99 हजारांचे एल ऍण्ड टी फायनान्सकडून कर्ज घेतले. परंतू, सब डिलर आधार इंडिया मोटर्सने येरवडा येथील नामाकिंत मुख्य डिलरला बुलेटसाठी रोख पैसे न देता धनादेश दिला. तो धनादेश बाऊन्स झाल्याने भोजवानी यांना बुलेट मिळाली नाही. भोजवाणी यांच्या खात्यावरून एल ॲण्ड टी फायनान्सला 10हजार 974 रूपयांचे तीन हप्तेही भरले. यातून भोजवानी यांची एकूण 69 हजार 401 रूपयांची फसवणूक झाली आहे. आधार इंडिया मोटर्स सर्व्हिसेसचा मालक विक्रमकुमार सिंग हा फरार झाला आहे. यासंदर्भात भोजवाणी कुदळवाडी पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेले होते. तेथील पोलीसांनी भोजवाणी यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, विक्रमकुमार सिंग यांचा भोजवाणी यांनी मोबाईलवर मॅसेज आला असून 17 एप्रिल रोजी शिवाजीनगर न्यायालयात पैसे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
विविध संस्था संघटनांतर्फे श्रद्धांजली
व्हीएस न्यूज - राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांचे नेतृत्व हरपले, त्यांचा आधारवड गेला या शब्दात भाईंना श्रद्धांजली वाहण्यात आली .
कष्टकरी कामगार पंचायततर्फे पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा येथे गुरूवारी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्या वर्षा गुप्ते, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, समाजवादी कार्यकर्ते बी. आर. माडगूळकर, कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे आदींनी श्रद्धांजली वाहिली.
बाबा कांबळे म्हणाले की, सत्याग्रहाचे बाळकडू भाई वैद्य यांच्याकडून मिळाले घरकुलधारक, कष्टकरी, पथारीवाले, रिक्षाचालक यांच्या चळवळीस मार्गदर्शन करणारा नेता आपल्यातून गेला आहे.
नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, पत्रकार संघातर्फे 33 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते. या आयोजनात भाईंनी महत्वाची भूमिका बजावली तेव्हापासून भाईंशी स्नेह जुळला तो अखेरपर्यंत कायम राहिला असे सांगत भाईंच्या जाण्याने कष्टकऱ्यांच्या पाठीशी ताकद उभी करणारा, कार्यकर्त्यांना बळ देणारा, आयुष्यभर साधेपणा जपलेला लढवय्या नेता गमावल्याची भावना व्यक्त केली. सचिन साठे म्हणाले की, भाईंचा जीवनप्रवास एक आदर्श आहे. राजकारण्यांची ढासळलेली नीतिमत्ता पाहता आज भाईंसारख्या नेत्यांची समाजाला गरज आहे. माडगूळकर म्हणाले की, समाजवाद कृतीत यावा, यासाठी भाई आयुष्यभर चंदनासारखे झिजले उभे जीवन कष्टकऱ्यांसाठी वेचले. यावेळी बळीराम काकडे, रमेश शिंदे, धर्मराज जगताप, मल्हार काळे, संभाजी गोरे, विजय ओव्हाळ, आशा कांबळे, नरेंद्र बनसोडे, शोभा शिंदे, हिरा जादव, रवी शेलार आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - सध्या श्यामची आई दिसत नाही, त्यामुळे श्यामही दिसत नाही. पुर्वीची आई भोळी भाबडी, अशिक्षित होती. पण ती प्रेमाचा सागर होती. सध्याची आई स्मार्ट, सुशिक्षित आणि पगारदार आहे. तिचा पोषाख पूर्णपणे आधुनिक असल्याचे मत भाऊसाहेब कोकाटे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. मोरवाडी म्हाडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. महात्मा गांधीच्या प्रतिमेस माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बी.आर. माडगूळकर, तात्यासाहेब सपकाळ आदी उपस्थित होते.
माणसाच्या जीवनात आईचे महत्व अपूर्व आहे. ईश्वराला सर्व घरात पोहचता येणार नाही म्हणून त्याने घरा-घरात आई निर्माण केली आहे. आई ही ईश्वराचे स्वरूप आहे, असे मत माडगूळकर यांनी व्यक्त केले. यावेळी थोर समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पंडीत भोसले यांनी सुत्रसंचालन केले. उल्हास झिरपे यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 19 भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शितल शिंदे यांच्या वतीने 'घर चलो' अभियान राबविण्यात आले. प्रभागातील नागरिकांचा या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शितल शिंदे, शहर कार्यकारणी सदस्य बिभीषण चौधरी, प्रमोद ननावरे, हेमंत ननावरे, संतोष शिंदे, चैत्यन्य आहेर, अभिजित डागलीया, अनिरुद्ध संकपाळ, निलेश देवधरे, विशाल कुलकर्णी, श्रीनिवास रेड्डी, संजय अरबूज, विलास वैद्य, भाई राऊत, अशोक ब्यानर्जी, विकास पिल्ले, किशोर शिंदे आदी कार्यकर्तेउपस्थित होते.
नगरसेवक शिंदे म्हणाले की, शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांचे गट तयार करून नागरिकांना जस्तीत जास्त लाभ कसा मिळेल, याची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच अभियानाच्या दरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहोत. भाजप घर चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचे तसेच सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे
व्हीएस न्यूज – पुनावळेत उघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून साडेचार लाखांचे दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कुदळे फार्म येथे घडली. याबाबत, सत्यवान कुदळे (वय-31, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुदळे यांचे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घर उघडे होते. उघड्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून 4 लाख 50 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
फौजदार एच. व्ही माने अधिक तपास करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002