व्हीएस न्यूज – हेल्पलाईन, संकेतस्थळ, मेल, मोबाईल ऍपनंतर आता व्हॉट्स ऍपवरूनही शहरातील नागरिक आता आपल्या तक्रारी पालिका दरबारी पोहचवू शकणार आहेत. समाजमाध्यमात सर्वाधिक वापर व्हॉट्स ऍपचा मानला जातो, त्यामुळे हे माध्यम प्रभावी ठरण्याची शक्यता पाहता पालिकेने तक्रारींसाठी 9922501450 हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला आहे. मात्र, आता तक्रारदारांना सुरुवातीला नोंदणीकामी आपले नाव व पूर्ण पत्ताही द्यावा लागणार आहे. पिंपरी महापालिकेने शहरातील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी, तसेच महापालिका कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. प्रामुख्याने सारथी हेल्पलाईनला पालिका व नागरिक यांच्यातील दुवा म्हटले जाते. तसेच, संकेतस्थळ, एसएमएस, मेल, लोकशाही दिन, मोबाईल ऍप, किऑक्स या माध्यमातून नागरिकांना तक्रारी करता येतात. त्यात आणखी भर पडली असून पालिकेने 9922501450 या क्रमांकावर व्हॉट्स ऍपद्वारे तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
व्हीएस न्यूज – अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या प्रक्रियेत शास्तीकर मोठा अडथळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळकतकर व शास्तीकर पूर्ण भरल्याशिवाय त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच,बांधकामधारकांना 31 डिसेंबर 2015 पूर्वीच बांधकामाच्या नोंदीचा पुरावा देखील सादर करावा लागणार आहे.
राज्यातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची अधिसूचना राज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2017 ला जाहीर केली. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांना अभय दिले जाणार आहे. परंतु नियमितीकरणाच्या अर्जासाठी थकीत शास्तीकरासह आतापर्यंतचा संपूर्ण मिळकतकर भरण्याची अट आहे. संपूर्ण कर भरल्यानंतर कर संकलन विभागाचा दाखला अर्जासोबत द्यावा लागणार आहे. अर्जदाराने 31 डिसेंबर 2015च्या पूर्वी मिळकत कर भरल्याची नोंद असणे सक्तीचे आहे. तशी नोंद नसलेली अनधिकृत बांधकामे शासन नियमानुसार नियमित केली जाणार नाही, असे पालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे सह शहर अभियंता अय्युबखान पठाण यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे शास्तीकर व बांधकामांची नोंद हा बांधकामे नियमितीकरणासाठी मोठा खोडा ठरू शकतात. त्याबरोबर सहा महिन्यांच्या कालावधीतील खरेदी खत, सातबारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे. अनधिकृत बांधकामाचे गुगल मॅपची रंगीत प्रत, स्टॅक्चरल स्टॅबिलीटी प्रमाणपत्र, बांधकामाचा नकाश, पाणीपुरवठा, जलनिसारण, डीपी यांचे ना हरकत प्रमाणपत्रही द्यावे लागणार आहे. इनामी, वतनाच्या वर्ग दोनमधील जमिनींसाठी जिल्हाधिका-यांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे. दरम्यान, अधिसूचनेनंतर पालिकेने महिनाभराचा कालावधी वाया घालवला असून अजूनही अर्ज प्रसिध्द झालेले नाहीत.
जास्तीत जास्त अनधिकृत बांधकामधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. आर्किटेक्टचा माध्यमातून सुटसुटीत आणि सोपा पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. शासन व पालिका प्रशासाने काही नियम व अटी सांगितल्या असल्या, तरी गरज पडल्यास त्यात बदल केला जाईल. शास्तीकरासह मिळकतकर भरल्यास सामान्यकरात 75 टक्के सूट देण्याची अभय योजना सुरू आहे. त्यास नागरिकांनी लाभ घेतल्यास त्याचा फायदा होईल.
– एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते…
व्हीएस न्यूज – स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होवून बराच कालावधी लोटला आहे, तरीही केंद्र व राज्य सरकारकडून अद्याप एक रुपयाचा ही निधी पालिकेला स्मार्ट सिटीसाठी मिळालेला नाही. यामुळे जोपर्यंत निधी येत नाही, तोपर्यंत प्रकल्पांचे काम सुरू करू नये, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नागरी हक्क सुरक्षा समितीने दिलेल्या निवेदनानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचा डिसेंबर 2016 मध्ये स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. शहराला केंद्राकडून 500 कोटी, राज्य सरकारकडून 250 कोटी एवढा निधी येणार होता. अद्याप एकही रुपया निधी महापालिकेला प्राप्त झालेला नाही. यामुळे 22 लाख नागरिकांची फसवणूक झाली आहे. मोठा गाजावाजा करीत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश स्मार्टसिटी योजनेत केला. त्याचा राजकीय फायदा घेऊन महापालिकेच्या 2017 मधील निवडणुका भाजपाने जिंकल्या, त्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेची उपेक्षा केली जात आहे, याबद्दल भाजप सरकारचा नागरी हक्क सुरक्षा समितीने निषेध व्यक्त केला आहे. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी महापालिकेचा स्वहिस्सा असलेला 250 कोटी रुपयांचा निधी वापरून स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयास आमचा आक्षेप आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महापालिका जकात व एलबीटी बंद झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात घट झालेली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर उत्पन्नाच्या बाबतीत पालिका राज्य व केंद्र सरकारवर अवलंबून आहे. अशातच स्मार्टसिटीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही. महापालिकेने स्वखर्चातून हे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केल्यास याचा परिणाम नागरिकांच्या मुलभूत सुविधांच्या कामावर होणार आहे. शहरात रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच वैद्यकीय सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची आवश्यकता आहे. दिखाऊ विकासावर अर्थात स्मार्टसिटी प्रकल्पांवर प्राधान्याने खर्च करणे हे निषेधार्ह आहे.
केंद्र व राज्य सरकारला खुश करण्यासाठी सामान्य करदात्या नागरिकांचा पैसा उधळणे योग्य नाही, असे त्यामुळे जोपर्यंत केंद्र व राज्य सरकारचा स्मार्टसिटी योजनेअंतर्गत निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत महापालिकेने स्वत:च्या निधीतून हे प्रकल्प सुरु करू नयेत. त्याऐवजी मुलभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली असून अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा ही नागरी हक्क सुरक्षा समितीने दिला आहे. मानव कांबळे, प्रदीप पवार, दिलीप काकडे, गिरीधारी लड्डा, प्रताप लोके, अशोक मोहिते, उमेश इनामदार यांनी हे निवेदन दिले आहे.
व्हीएस न्यूज - रिक्षा चालक-मालकांसाठी, कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, त्यांना वृद्धावस्थेत पेन्शन मिळावी, बेकायदेशीर वाहतूक बंद व्हावी, ओला, उबेर सारख्या भांडवलदार कंपन्यांवर, बोगस परवानाधारकांवर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांसाठी राज्यातील १५ लाख रिक्षा चालक मालकांच्या वतीने डिसेंबरमध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष आणि कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.
पिंपरी येथील, भक्ती कॉम्प्लेक्स येथे, रिक्षा संघटना पदाधिकारी यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बाबा म्हणाले की गेली अनेक वर्षांपासून रिक्षा चालक मालकांच्या मागण्यांचा पाठपुरावा केला जात आहे. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात पुणे रिक्षा फेडरेशन अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली तर दुसऱ्या सत्रात शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक सालेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
या वेळी कृती समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष विलास भालेकर (नागपूर), गफार नदाफ (कराड), मारुती कोंडे, विजय पाटील, सोमनाथ तळेकर, नामदेव जगताप (नवी मुंबई), मधुकर थोरात, बाळा जगदाळे, शरद पाटील, (पनवेल) तानाजी मसाळकर, महिपती पवार, राजू शीतगाने, (सोल्हापूर) दत्तात्रय अरडले, मधुकर जाधव, प्रभाकर कांबळे ,जनाधन दुमले, (लातूर), राजू मालवळीकर, (नांदेड) शिवाजी गोरे, गणेश जाधव (कल्याण डोंबवली), प्रफुल शुक्ला (सातारा ) बाबा शिंदे, अशोक सालेकर, आबा बाबर, आनंद, अंकुश, अजगर बेग, गणेश ढमाले, आनंद तांबे, विजय रवले, प्रदीप भालेराव, चंद्रकांत गोडबोले, फारूक बागवाले, नितीन शिंदे, दत्ता पाटील, प्रकाश झाडे (पुणे) ,आनंद सदावर्ते, कैलास दोरे (लोणावळा ), बाळासाहेब डुंबरे, सोमनाथ कलाटे, महेश कांबळे, जेकब म्यांतू, सुदाम बनसोडे, (पिंपरी चिंचवड ) जावेद शेख (नागपूर), आदी उपस्थित होते.
यावेळी नवीन कार्यकारिणी तयार करण्यासाठी अध्यक्ष शशांक राव यांच्या आदेशानुसार सरचिटणीस बाबा कांबळे आणि कार्याध्यक्ष विलास भालेकर यांना अधिकार देण्यात आले. याशिवाय बरेच ठराव ही मंजूर करण्यात आले. हिवाळी अधिवेशनात होणाऱ्या मोर्चात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील रिक्षा चालक मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आव्हान कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी केले.
व्हीएस न्यूज - विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची विधानसभेत तरी परिस्थिती सुधारणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. खासकरून चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कोणाला उतरवणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा खरं तर आमदार लक्ष्मण जगताप यांचा, पर्यायाने आता भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडे तेवढा सक्षम उमेदवार नाही, ही वस्तुस्तिथी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे चिंचवडच्या उमेदवारीचे मोठे आव्हान असणार आहे. जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून जी नावे पुढे येतात त्यात नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पण नाना काटे यांचे पिंपळे सौदागर आणि परिसर वगळता इतर भागात म्हणावे तसे वजन दिसून येत नाही. किंबहुना संपूर्ण मतदार संघाचा चेहरा म्हणून ते ओळखले जात नाहीत. राष्ट्रवादीकडून चिंचवडसाठी येणारे दुसरे नाव म्हणजे भाऊसाहेब भोईर यांचे आहे. शहरातील ज्येष्ठ नेते म्हणून ते नक्कीच परिचित आहेत. परंतू महापालिका निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना किती यश येऊ शकते हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे.
राष्ट्रवादीकडून इतर येणारी नावे जगताप यांच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहेत. जगताप यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची क्षमता चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यात नाही हे उघड सत्य आहे. परंतू लक्ष्मण जगताप यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर मात्र भाजपाकडेही जगताप यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नाही ही वस्तुस्थिती आहे. चिंचवडमध्ये जगताप हे स्वतः विधानसभेचे उमेदवार असले तरच भाजपासाठी चिंचवडचा मार्ग सुकर ठरणार आहे. पण जगताप उमेदवार नसतील तर भाजपाला ही उमेदवारीचा प्रश्न पडू शकतो. पण किमान त्या उमेदवाराला जगताप यांचा पाठिंबा मिळणार असल्याने त्याचे पारडे थोडे जडच असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी चिंचवड विधानसभा उमेदवारी आणि निवडणूक दोन्ही ही सोपी नसल्याने डोकेदुखी वाढणार आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकांच्या समस्यांबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये महिनाभरात बैठक आयोजित केली जाईल, अशी घोषणा खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
शहरातील उद्योजकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार बारणे यांनी उद्योजकांच्या विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी बारणे यांनी वरील घोषणा केली. या बैठकीत पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरचे संस्थापक अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बाबर, उद्योजक प्रमोद राणे, सुरेश म्हेत्रे, रंगनाथ गोडगे पाटील, जयंत कड यांनी सरकारकडून उद्योजकांना असलेल्या अपेक्षा मांडल्या. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया या योजना, जीएसटी करप्रणाली, शासनाची उद्योग व कामगारविषयक धोरणे यावपर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
खासदार बारणे म्हणाले की, शहराच्या विकासात उद्योगांचा सर्वांत मोठा वाटा आहे. त्यामुळे समन्वयातून उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. राज्य शासन व केंद्र शासनाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना महिनाभरात शहरात बोलवून त्यांच्याबरोबर उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात येईल. आवश्यकता असल्यास मुख्यमंत्र्यांबरोबरही उद्योजकांची बैठक आयोजित केली जाईल. जीएसटी अंमलबजावणीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर शहरातील उद्योजकांची बैठक घडवून आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.
उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर आपण यापूर्वीत संसदेतही आवाज उठवला आहे, असे सांगून बारणे म्हणाले की, शासन, प्रशासन व उद्योजक यांच्या समन्वयातून आपल्याला मतदारसंघाचा विकास घडवायचा आहे. उद्योगांचे प्रश्न केंद्र सारकारच्या विविध मंत्रालयांशी संबंधित आहे. त्या मंत्रालयांकडे आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. नवी मुंबई येथील नियोजित विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहचता येईल, अशा रस्त्याचे नियोजन सुरू असल्याने उद्योजकांनी काळजी करू नये, असा दिलासा ही बारणे यांनी दिला. राष्ट्रीयीकृत बँकांकडून वित्तपुरवठ्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक तो समन्वय साधून देण्यात येईल. उद्योजकांच्या प्रश्नांसदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्याची सूचनाही बारणे यांनी केली. औद्योगिक प्रगती करत असतानाच उद्योजकांनी रोजगारनिर्मिती करून शहराच्या व देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहनही बारणे यांनी यावेळी केले.
संदीप बेलसरे म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजकांना सर्वाधिक कर भरावा लागतो. महाराष्ट्रात विजेचे दर प्रचंड आहेत. शासकीय धोरणे, अनास्था आणि भ्रष्टाचार यामुळे उद्योग चालविणे कठीण होऊन बसले आहे. एमआयडीसीच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प होण्यास उद्योग संघटनेचा विरोध आहे. प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी वसुलीचे प्रकार,चोऱ्या यांना पायबंद बसला पाहिजे. रेडझोनचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र पिंपरी-चिंचवड होण्यासाठी प्रयत्न करावेत आदी सूचनाही त्यांनी केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवडसाठी लवकरात लवकर स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी अपेक्षा प्रमोद राणे यांनी व्यक्त केली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी शासनाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करून त्यांची विद्यार्थी क्षमता वाढवावी. पुण्यात आयआयटी, आयआयएम सारख्या शैक्षणिक संस्था सुरू कराव्यात, अशी सूचना योगेश बाबर यांनी केली. आजारी असलेल्या लघु-मध्यम उद्योगांच्या पुनर्वसनासाठी बीआयएफआर सारखे मंडळ स्थापन करण्यात यावे. ईएसआय हॉस्पिटलच्या व्यवस्थापन समितीवर उद्योजकांचे प्रतिनिधी घ्यावेत, अशी मागणी रंगनाथ गोडगे पाटील यांनी केली. उद्योगांकडून मिळणाऱ्या महसूलाच्या प्रमाणात केंद्राने देखील उद्योगांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सुरेश म्हेत्रे यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन उद्योजक प्रवीण भालेसेन यांनी केले.
व्हीएस न्यूज - भोसरी पोलिस ठाण्याच्या प्रभारी प्रमुखपदी (वरिष्ठ निरीक्षक) संपतराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोसरीचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी भोसरी पोलिस ठाण्यात नियुक्त असणा-या सहाय्यक निरीक्षकास व शिपाईला ५० हजारांची लाच घेताना अटक करण्यात होती. तसेच मागील अनेक महिन्यांपासून भोसरीच्या तपास पथकाकडून कोणताही मोठा गुन्हा उघडकीस आणलेला नाही. तसेच चो-या रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे भोसले यांना भोसरीच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्त केल्याचे समजते. तर कुलकर्णी यांनी वैद्यकीय कारणामुळे स्वत:हून बदली मागून घेतल्याचे सांगितले जात आहे.
व्हीएस न्यूज - आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ आज सकाळी नऊच्या सुमारास एका डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.
आशिष दीपक पावसकर (वय, २१ शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे मयत तरुणाचे नाव असून तो सिम्बायोसिस महाविद्यालयात इंजिनिअरिंगला शिकत होता. तर त्याचे वडील मुंबईला राहतात. आई शिक्षिका असून आई व मुलगा दोघेही आकुर्डीत राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष त्याच्या मित्रासोबत (एम एच १४ एआय ८७४८) या अॅक्टिव्हा गाडीवरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकात जात होता. यावेळी त्याला नवीन चासी असणाऱ्या डंपरने धडक दिली. यात आशिषच्या डाव्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मरण पावला तर त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. जखमी मित्र व आशिषला वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले असून डंपर चालकाला निगडी पोलिसांच्या ताब्यात आहे.
व्हीएस न्यूज - गुरुपौर्णिमेनिमित्त पायल नृत्यालयाच्या वतीने ‘’अभिव्यक्ती’’ हा कथक नृत्याचा कार्यक्रम शनिवार ४ नोव्हेंबर रोजी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी १२ ते ३ या वेळेत होणार आहे. जगप्रसिद्ध नृत्यांगना पंडीता मनिषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या पायल गोखले आणि त्यांच्या विद्यार्थिनी कार्यक्रम सादर करतील.
या कार्यक्रमाला गुरु पंडिता मनिषा साठे, गुरु पं. नंदकिशोर कपोते, प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत निगुडकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमात वैविध्यपूर्ण कथकाविष्कारांचा आनंद उपस्थितांना घेता येईल. कथक नृत्याविष्काराने परिपूर्ण अशा या कार्यक्रमात कथकचे विविध रंग पाहायला मिळतील. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने होणार असून सरस्वतीवंदना, झपताल, खंडिता गुरु पायल गोखले सादर करतील. तर, अभंग, तराणा, तालप्रस्तुती, होरी, शिवस्तुती, ठुमरी, सतारवर कथकनृत्य हे प्रकार विद्यार्थीनी सादर करतील. गेली १० ते ११ वर्षे पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या पायल नृत्यालयाने आजवर कथकच्या विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांनी दिली आहे. अभिव्यक्तीतूनही सुरेख कथकचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पायल नृत्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शिवाजीनगर शासकीय गोदामाच्या जागेचा आगाऊ ताबा महामेट्रोला मिळाला आहे. सदर जागा मेट्रोला सुपूर्द करण्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने नुकताच अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे 2.67 हेक्टरची जागा महामेट्रोच्या ताब्यात मिळेल, असे महामेट्रोच्या वतीने कळविण्यात आले आहे.
याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गिकां दरम्यान शिवाजीनगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी शिवाजीनगर ते हिंजवडी ही मेट्रो लाईन देखील एकत्र येणार आहे. त्यामुळे हे ठिकाण पुणेकरांसाठी महत्त्वाचे असेल. याच बरोबरच या जागेचा आगाऊ ताबा मिळाल्याने प्रकल्पाला आणखी वेग येणार आहे. ही जागा मेट्रोला आगाऊ ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नाबद्ल शासनाचे महामेट्रोच्या वतीने आभार मानले आहेत.
व्हीएस न्यूज - औंध येथील जिल्हा रुग्णालयात अनेक समस्या आहेत. या समस्यांचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. 30) रुग्णालयाला भेट दिली. या वेळी रुग्णालयाच्या कामकाजावर नाराजी दर्शवत काम सुधारण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांना त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार जगताप यांनी रुग्णालयाच्या ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग), केसपेपर विभाग, महिला विभाग, डोळ्यांचा विभाग, लॅब व लहान मुलांच्या लसीकरण विभागाला भेट दिली. प्रत्येक विभागाच्या अडचणी विचारून घेतल्या. या अडचणी त्वरित सोडविण्याची सूचना डॉ. आर. के. शेळके यांना दिली. जिल्हा रुग्णालयात प्रतीक्षालय लाखो रुपये खर्च करून बांधले आहे. तरी अद्याप ते बंद अवस्थेतच आहे. सार्वजनिक बाधकाम विभागाकडून काही काम अपूर्ण असल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले; तसेच त्यांनी महिला प्रतीक्षालयाला भेट दिली. सदर प्रतीक्षालय गेले वर्षभर बंद असल्याचे दिसून आले. या वेळी सदर प्रतीक्षालयात लिफ्टचे सामान असल्याचे डॉ. आर. के शेळके यांनी सांगितले. आ. जगताप यांनी हे प्रतीक्षालय त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा प्रमुख कदम यांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना दिल्या;
तसेच त्यांनी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. प्रशासकीय कार्यालयात भेट दिली असता, मोजकेच कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. प्रशासकीय अधिकारी संजय राठोड व कार्यालयाच्या अधीक्षक या ठिकाणी उपस्थित नव्हते. पुणे जिल्हा रुग्णालयाचा एकूण कारभार सुधारण्यासाठी डॉ. आर. के. शेळके यांना सूचना व कडक शब्दांत समज त्यांनी दिली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002