व्हीएस न्यूज - फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक, असा फतवा काढल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. विद्यापीठाने कीर्तनकार शेलारमामा नावाचे सूवर्णपदक तूर्त रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.शेलारमामा पुरस्कार 2006 पासून दिले जाते. या पुरस्कारासाठी घातलेल्या अटी शेलारमामा यांच्या कुटुंबियांनी घातलेली आहे. विद्यापीठाने नाही. विद्यापीठ आहारातील भेदभाव मानत नाही. विद्यापीठाकडून शेलारमामा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु असून त्यांना शाकाहाराची अट काढण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.तोपर्यंत शेलारमामा पुरस्कार तूर्त मागे घेण्यात आल्याची माहिती कुलगुरु नितीन करमळकर यांनी दिली आहे.शेलारमामा हे हयात नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु आहे. त्यांनी शाकाहाराची अट काढण्यास मान्यता दिल्यास पुरस्कार पुढे सुरु ठेवण्यात येईल. अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही कुलगुरुंनी यावेळी स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज - महापालिका सार्वत्रिक निवडणुक निकालानंतर 30 दिवसात 88 उमेदवारांनी निवडणुक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. त्या उमेदवारांना तीन वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिला आहे. याबाबत अपात्र ठरविलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी पालिका निवडणूक विभागास पाठविली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. 23 फेब्रुवारी 2017 रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसात उमेदवारांनी निवडणूक खर्चांचा हिशोब निवडणूक विभागास सादर करणे बंधनकारक आहे. त्यानूसार 25 मार्च 2017 पर्यंत विहित मुदत देण्यात आली होती. परंतू, निवडणूक लढविलेल्या 88 उमेदवारांनी निवडणूक खर्चांचा हिशोब सादर केलेला नव्हता. त्यानूसार 88 उमेदवारांची विहित कार्यपध्दतीनूसार नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आली. त्या सुनावणीस अनेक उमेदवार गैरहजर राहिले.
राज्य निवडणूक आयोगाने 5 जून 2010 आणि 10 ऑगस्ट 2015 आदेशान्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 10(1ई) नूसार अनर्ह करण्यात आलेल्या उमेदवारांचे आदेश राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी 88 उमेदवारांना रकाना क्रमांक 6 मध्ये नमूद आदेशानूसार तीन वर्षे कालावधीकरिता पालिका सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यास अपात्र करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये गेल्या महिन्याभरापासून, पाण्याची टंचाई जाणवत आहे. याबाबत फ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुन दखल घेतली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे शुक्रवारी (दि.10) हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास फ-प्रभाग कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी यावेळी दिली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग अध्यक्षा गंगा धेंडे, कविता खराडे, पुष्पा शेळके, रेश्मा पठाण, पल्लवी साखळे, शिला भोंडवे, पौर्णिमा पालेकर, आशा शिंदे, दिपाली देशमुख, रेश्मा पठाण, संजय धेंडे, नवनाथ कांबळे, शिरीष आवाळे, दत्ता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गंगा धेंडे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चो काढून फ क्षेत्रीय कार्यालय कामकाजाचा निषेध करण्यात आला. यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या की, अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये पाणी पुरवठा अनेक महिन्यांपासून सुरळीत होत नाही, तेथील रहिवासी कुंटूंबाची पाण्यावाचून वणवण सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही वारंवार होणारे दुर्लक्षामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चो काढून निषेध केला आहे. तसेच दोन दिवसात पाणी पुरवठा सुरु न केल्यास प्रभागाला टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.
व्हीएस न्यूज – सांगवी येथील मुळा व पवना नदीपात्रात मैलामिश्रित पाणी थेट सोडण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले असून चेंबर दुरुस्त करुन नदीपात्रात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज लाईन फुटली आहे. तेथील मैलापाणी थेट पवना नदीच्या पात्रात जात आहे. या मैला पाण्यामुळे संपूर्ण नदीपात्र दूषित होवून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. याशिवाय त्या भागात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नदीपात्रातील बहुतांश चेंबर तळाला फुटलेले असून संपुर्ण मैला मिश्रीत पाणी नदीपात्रात मिसळून पाणी दुषित होत आहे. दरम्यान, मैलायुक्त पाणी नदीपात्रात येऊनही स्थानिक नगरसेवक गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निकृष्ट कामामुळे ही लाईन फुटली असून त्यांचा फटका पिंपळे गुरव, सांगवीकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे नदीपात्रात मिसळणारे मैलापाणी थांबवावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - दुचाकीवरील चोरट्याने पादचारी नागरिकचा 5 हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना मंगळवार दि. 7 ला रात्री दहाच्या सुमारास हिंजवडीतील मेझा नाईक चौक ते लक्ष्मी चौक दरम्यान घडली.
या प्रकरणी मोहम्मद अन्सारी (वय 38, रा. मारुंजी रोज, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मोहम्मद हे मंगळवारी रात्री मेझा चौकाकडून लक्ष्मी चौकाकडे जात होते. यावेळी दुचाकीवरून येऊन चोरट्याने 5 हजार किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के स्वहिश्यापोटी एकूण 157 कोटी रुपये अदा करणार आहे. त्यापैकी मागील सहा महिन्यात महापालिकेने 78कोटी अदा केले आहेत. संचलन तूट, पासेस आणि बसखरेदीसाठी ही रक्कम पालिकेने दिली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक सेवा चालविण्यासाठी दोन्ही महापालिका निधी पुरवितात. त्यात पुण्याचा 60 टक्के, तर पिंपरीचा 40 टक्के हिस्सा आहे. चालू आर्थिक वर्षात संचलन तुट, बसपासेस आणि बसखरेदी या गोष्टींसाठी एकूण 156 कोटी रुपये इतका पिंपरी पालिकेचा हिस्सा दिला जाणार आहेत. त्यापैकी मागील सहा महिन्यात पिंपरी महापालिकेने एकूण 78 कोटी रुपये पीएमपीएमएलला अदा केले आहेत.
पालिकेने संचलन तुटीपोटी 42 कोटी, पासेस पोटी 16 कोटी लाख आणि बस खरेदीसाठी 20 कोटी रुपये असे एकूण 78 कोटी रुपये दिले आहेत. तर, उर्वरित सहा महिन्यात आणखी 78 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, दरवर्षी पालिका तिजोरीतून कोट्यवधी रुपये देऊनही शहरातील बससेवेमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. शहरातील पीएमपीएमएलच्या तक्रारी सोडविल्या जात नसून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या जात नाही. त्यामुळे पीएमपीएमएलच्या कारभाराबाबत सातत्याने नाराजीचा सूर आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी घेत असताना शहरामध्ये चांगली बससेवा पुरविली जावी, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.
व्हीएस न्यूज - टाटा मोटर्सच्या पिंपरी उत्पादन प्रकल्पातील नैसर्गिक वायूचा वापर करुन “प्री ट्रिटमेंट’ प्रकल्पाचे उद्घाटन कमर्शिअल व्हेईकल प्लांटचे प्रमुख अलोक सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पात लाईट,डिझेल ऑईल (एलडीओ) या पारंपारिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायूच्या वापरामुळे प्रदूषण कमी होऊन, पर्यावरणाची हानी कमी झाल्याने कंपनीला फायदा होणार आहे.
या प्रकल्पामुळे यापूर्वी एलडीओवर चालणारे तीन ओव्हन्स् नैसर्गिक वायूच्या वापरवर कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे पूर्वीची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. या बदलामुळे लॉंग मेंबरच्या रंगविण्याच्या दर्जामध्ये सुधारणा झाली असून त्याबरोबर वाहनांच्या फ्रेमच्या किंमतीमध्ये सुध्दा कपात झाली आहे.
यावेळी अलोक सिंग म्हणाले की, या सुधारित प्रकल्पामुळे पर्यावरणाच समतोल राखण्यास हातभार लागणार आहे. तसेच, नवनवीन संशोधनाद्वारे हरित पर्यावरण राहण्याच्या दृष्टीने काम असेच पुढे चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
व्हीएस न्यूज – चिखलीतील घरकुलमधील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.9) सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. रोहीत सुभाष कांबळे (वय 23 रा. योगायोग बिल्डींग,घरकूल चिखली) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीतचे पिंपरीतील मैत्रिणीसोबत भांडण झाले होते. त्यावेळी रोहितने तिला मारहाण केली होती. याप्रकरणी मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. रोहीतला त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली होती.
या गुन्ह्यामध्ये आपल्याला पोलीस अटक करतील या भितीने रोहीत ने आज सकाळी घऱात कोणी नसताना साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. त्याने दरवाजा ठोठावला परंतु आतून काही प्रतीसाद मिळू शकला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. रोहीत हा पिंपळे गुरव येथे एका खासगी कार्यालयात काम करत होता. चिखली येथील घरकूलमध्ये तो कुटुंबियांसोबत राहत होता. निगडी पोलिस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती आणि सासू यांच्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा पती निहाल विजय वेलानी (रा. आझाद हिंद कॉलनी, पाचपीर चौक, काळेवाडी) आणि त्याची आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर स्वाती निहाल वेलाणी (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पंडित पाटील (वय 58, रा. देशमुख गल्ली, अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती ही पुण्यात स्वारगेट येथे एका कंपनीत नोकरी करत होती. बुधवारी (दि. 1) ती नेहमीप्रमाणे नोकरीवर जाण्यास घराबाहेर पडली. मात्र, पिंपरी रेल्वे स्थानकावर येताच तिने जयपूर एक्स्प्रेस खाली आत्महत्या केली. स्वातीचे निहाल यांच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच पती आणि सासुने फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घेवून ये, असा स्वातीकडे तगादा लावला होता. त्यामुळे तिला नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. रोजच्या या त्रासाला कंटाळून ती कामाला निघाल्यावर पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सकाळी अकराच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेस खाली उडी घेवून तिने आत्महत्या केली.
व्हीएस न्यूज - पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तुषार कामठे यांच्यावर खोटी कागदपत्रे दाखल करुन निवडणूक लढवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कामठे यांनी बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथील कामठे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवताना बनावट कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणी 27 ऑक्टोबरला त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे कामठे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
कॉंग्रेसचे सचिन साठे यांच्या तक्रारीवरुन कामठे यांचे बारावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. कामठे यांनी डेक्कन येथील एम. एम. विद्यालयात शिकत असताना अकरावीच्या वर्गात ते अनुतीर्ण झाले होते. मात्र, बारावी उत्तीर्ण असल्याच्या दाखला सादर करुन सांगवी येथील घोलप महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. हेच प्रमाणपत्र त्यांनी निवडणुकीच्या काळात सादर केले होते. कामठे हे पिंपळेनिलख येथील प्रभाग क्रमांक 26 (ब) येथून निवडून आले आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002