व्हीएस न्यूज - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेली ‘मोदीमुक्त भारत’ची हाक भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने रोजगारमुक्त केलं, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. याआधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसतो असाही टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.
काय बोलले होते राज ठाकरे –
गुजरात दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी माझ्यासमोर चांगलं चित्र उभा केलं, मात्र, ते सगळं खोटं होत. आता मोदींचा खरा चेहरा माझ्या समोर आला आहे. भारताला 1947 साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं,दुसरं स्वातंत्र्य 1977 साली मिळालं आणि आता 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा, मोदी मुक्त भारत व्हायला हवा. मोदींच्या परदेश दौऱ्यातून एकही रुपया भारतात आला नाही. मोदी हे केवळ खोटे बोलणारे नेते आहेत. ते जर पुन्हा सत्तेत आले तर देशाची आणखी वाट लागेल. त्यामुळे आता मोदीमुक्त भारतासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त बोलत होते.
व्हीएस न्यूज - द्वारकापीठ शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी अयोध्येत कधी मशीद अस्तित्वातच नव्हती. १९९२ मध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून मंदीर पाडण्यात आले असा दावा केला आहे. त्यांनी हा दावा अयोध्येच्या वादावरुन माध्यमांशी बोलताना केला आहे.
न्यायालयाने सध्याच्या जमिनीवरची स्थगिती उठवल्यानंतर त्याजागी भव्य राम मंदीर उभारण्यात येईल, असे ते म्हणाले. सध्या सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीची सुनावणी सुरु आहे. तसेच भ्रष्टाचार हा देशातला सर्वांत मोठा प्रश्न असल्याचे शंकराचार्यांनी म्हटले आहे. मोठ्या प्रमाणावर गावातल्या पंचायत निवडणुकांसाठीसुद्धा खर्च केला जातो. एफआयआर दाखल करुन घेण्यासाठीसुद्धा पोलिसांना लाच दिली जात असल्याचे ते म्हणाले. मी नरेंद्र मोदी किंवा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात जेव्हा बोलतो तेव्हा लोक मला काँग्रेसचे समर्थक म्हणतात. मी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी काँग्रेस ब्रिटीशांविरोधात लढा देत होते. मी आज एक धर्मगुरु आहे. शंकराचार्य आहे. सनातन धर्माचे रक्षण करणे हे माझे काम असल्याचे शंकराचार्यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - तेलुगू देशम पक्षाने केंद्र सरकार आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देत नसल्याचे कारण पुढे करत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्र सरकारविरोधात त्यांनी व वायएसआर काँग्रेसने अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. लोकांचा सरकारवर अविश्वास व असंतोष खदखदत आहे. याचा स्फोट आगामी लोकसभा निवडणुकीत होईल. आता सरकार मजबूत स्थितीत असल्यामुळे हा अविश्वास ठराव आता नव्हे तर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मंजूर होईल, अशी भविष्यवाणी शिवसेनेने केली आहे. आपल्या बाजूने जनतेने मतदान करावे म्हणून मोदी हे आश्वासन देतात. पण प्रत्यक्षात काहीच करत नसल्याचा आरोप करत बिहारचे उदाहरण दिले. नेमके आंध्रच्या बाबतीत काय घडले? मोदी आणि चंद्राबाबूच ते सांगू शकतील. पंतप्रधानांचे मौन सुरू आहे व चंद्राबाबू संघर्ष करत आहेत असे म्हणत तेलुगू बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या सामना या मुखपत्रातून मोदींवर शिवसेनेने निशाणा साधला. सध्या राजकारणाचे डावपेच प्रत्येकजण आखत आहे. पण राष्ट्रासाठी किंवा जनतेच्या हितासाठी हे डावपेच असायला हवेत. एनडीएतून चंद्राबाबू बाहेर पडले. त्यांनी काही दिवसांपासून संसदेचे कामकाजही चालू दिले नाही. त्यांनी आता सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. तेलुगू देशमची यामागे वैयक्तिक राजकीय कारणे आहेत. तेलुगू देशम आणि वायएसआर काँग्रेस आंध्रात संतापले आहेत. अमरावती या नव्या राजधानीस केंद्राने मदत केली पण राज्याच्या विकासासाठी आर्थिक तजवीज केली नसल्याची भावना या राज्याची आहे.
अनेक वर्षांपासून बिहारचीही विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीवेळी तेथील लोकांना मोदींनी मोठमोठी आश्वासने दिली. तेथील जनता तरीही भुलली नाही. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या पारड्यात त्यांनी मते टाकली. मोदींनी अजूनही त्यांना निधी दिला नसल्याचा आरोप सेनेने केला. केंद्रात अविश्वास ठराव आणून काही उपयोग होणार नाही. चांगले बहुमत या सरकारकडे आहे. पण २०१४ ची लाट आता ओसरली असल्याचे म्हणत लोकसभा अध्यक्ष हा ठराव स्वीकारतील काय, असा सवालही उपस्थित केला. पीठासन अधिकारी हे सत्ताधारी पक्षाशी बांधील असल्यामुळे अविश्वास ठराव दाखल करून घ्यायचा की फेटाळायचा हे तेच ठरवणार असल्याचे त्यांनी म्हटले. २५ वर्षे सत्तेवर राहण्याचा दावा करणाऱ्या या सरकारला अवघ्या ५ वर्षांत अविश्वासाला सामोरे जावे लागणे हे चांगले लक्षण नाही.
व्हीएस न्यूज - टीम इंडियाचा कार्यवाहक कर्णधार रोहित शर्माने भारत आणि बांगलादेश यांच्यात निदाहास चषकात झळकावलेल्या अर्धशतकाच्या बळावर भारताने चषकावर नाव कोरले. कार्तिकने श्वास रोखून धरणाऱ्या अखरेच्या निर्णायक षटकांमध्ये भारताकडे विजय खेचून आणला. रोहित शर्माने काल झालेल्या सामन्यात ५६ धावांची निर्णायक खेळी केली. त्याने ४२ चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने आपले १६ व्यांदा ५० पेक्षा आधिक धावा केल्या आहेत. त्याने यावेळी गेल आणि मार्टिन गुप्टिलचा विक्रम मोडित काढला. त्याच्यापुढे आता फक्त विराट कोहली आहे. टी-२०मध्ये विराट कोहलीने १८ वेळा हा पराक्रम केला आहे. तसेच न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम आणि विंडीजचा गेल या यादीत तिसऱ्या स्थानी असून १५ वेळा अशी कामगिरी त्यांनी केली आहे.
काल झालेल्या सामन्यात टी-२०मध्ये रोहित शर्माने सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो जगातील एकूण दहावा तर भारताचा तिसराच खेळाडू ठरला. विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी याआधी भारताकडून सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रोहित शर्मा काल झालेल्या सामन्यात २६ वी धाव घेताच सात हजार धावा करणारा भारताचा तिसरा तर जगातील दहावा फलंदाज बनला आहे. वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल या यादीत प्रथम स्थानावर आहे.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरु असतानाच आता मुंबईतील एका कार्यक्रमानंतर शरद पवारांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांना बोलावून, त्यांच्याशी चर्चा केल्याचे फोटो समोर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनोहर जोशींच्या ‘अवघे पाऊणशे वयमान’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. हा कार्यक्रम दादरच्या शिवाजी मंदिरात झाला. हा कार्यक्रम संपल्यानंतर एक दृश्य सर्वांनी पाहिले आणि पुन्हा अनेक उलटसुलट चर्चा रंगायला सुरुवात झाल्या आहेत. शरद पवारांनी शिवाजी मंदिराच्या पार्किंगमध्ये शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना बोलवून घेतले आणि त्यांच्या कानात कुजबूज केल्यामुळे पवारांनी मिलिंद नार्वेकरांच्या कानात काय सांगितले असावे? याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, शरद पवारांनी या कार्यक्रमात बोलताना मनोहर जोशींची मुक्तकंठाने स्तुती केली. मनोहर जोशी यांचा छंद हा लोकलमधून प्रवास करताना, दुकानाच्या पाट्या वाचन होता. ते त्यामुळे बांधकाम क्षेत्रात येतील असे मला वाटे, अशा मिश्किल शब्दात त्यांनी जोशींच्या कामाचा गौरव केला. तसेच त्यांनी यावेळी मनोहर जोशी हे अतिशय काटकसरी व्यक्तीमत्त्व असल्याचेही सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळातील कामांना यावेळी उजाळा दिला.
व्हीएस न्यूज - आता १९७६ नंतर राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांची चौकशी होणार नाही. लोकसभेत कोणत्याही चर्चेविना या संदर्भातील दुरुस्तीचे विधेयक मंजूर करण्यात आले.
लोकसभेत वित्त विधेयक २०१८मधील २१ विधेयके मंजूर करण्यात आली. परदेशी देणगी नियमन कायदा २०१० याचा देखील त्यामध्ये समावेश होता. या कायद्यान्वये परदेशी कंपन्यांकडून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी भाजप सरकारने वित्त विधेयक २०१६ च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणे सोपे झाले होते. पण १९७६ पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.
व्हीएस न्यूज - हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त विश्व श्रीराम सेना पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवार, दि. 18 मार्च रोजी आकुर्डी येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आकुर्डी फोर्स मोटर्स कंपनीसमोरील मनपा उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर सकाळी 9 वाजता इच्छुक बेरोजगारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यात 8वी, 10वी पास नापास, पदवीधर, पदव्युत्तर आपला बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. तसेच उत्पादन, फार्मसी,फायनान्स, बीपीओ, कॉलसेंटर, आयटी, रिटेल, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, बॅकिंग, ॲग्रीकल्चर, सिक्युरीटी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
व्हीएस न्यूज - प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याचा ध्यास आणि हितचिंतकांसह विरोधकांनाही मदत करण्यात कायम पुढे असणारा नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम होय. त्यांच्या आकस्मित निधनाने राज्यातील राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहिली.
माजी मंत्री कै.पंतगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गुरुवारी (दि. 15 मार्च) पिंपरीतील कामगार भवन, नारायण मेघाजी लोखंडे सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस शहरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, एमआयएम, मनसे आदी पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापुर, सांगली भागातील नागरिक उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, नगरसेवक बाबू नायर,मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, एमआयएमचे शहराध्यक्ष अकिल मुजावर, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजाभाऊ गोलांडे, अख्तर चौधरी, गिरीजा कुदळे, विद्या नवले, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फझल शेख, शाम आगरवाल, लक्ष्मण रुपनर, प्रदिप गायकवाड, तसेच राजेंद्रसिंह वालिया, बिंदू तिवारी, बाबा कांबळे, संग्राम तावडे, रामदास मोरे, सुनिल राऊत, प्रा. तात्या कुलकर्णी, धम्मराज साळवे, विष्णुपंत नेवाळे, अभिमन्यू दहितुले, नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, शहाबुद्दीन शेख, विशाल कसबे, परशूराम गुंजाळ, क्षितिज गायकवाड, सज्जी वर्की, संभाजी मुळीक,माडगुळकर सर, आकाराम देशमुख, चिंतामणी सोंडकर, हिरामण खवळे, सतिश भोसले, सलिम शिकलगार, विणा सोनवलकर, नंदा तुळसे, कल्पना जाधव उपस्थित होते.
सचिन साठे म्हणाले की, तरुण पणात पिंपरीत शिक्षकाची नोकरी करताना विद्यापीठाचे स्वप्न पाहुण ते पुर्णत्वाला नेऊण त्यांनी अविरत लोकसेवा केली. भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात लाखों नागरिकांना वैद्यकीय सेवा सुविधा व हजारों युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. मला निवडणुकीत अपयश आल्यानंतर सर्वप्रथम फोन करुन समाजसेवा सुरु ठेवण्यासाठी मानसिक पाठबळ डॉ. कदम यांनी दिली.
श्रध्दांजली वाहताना बाबू नायर म्हणाले की, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात शैक्षणिक सुविधा व विस्तार वाढविण्यासाठी डॉ. पतंगराव कदम आणि डॉ. डी.वाय. पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. डॉ. कदम हे राजकारणात सक्रीय असताना देखील मंत्री पदावर असताना समाजकारणाला महत्व देणारे नेते होते. मारुती भापकर म्हणाले की,सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शिष्टमंडळासह डॉ. कदम यांना भेटण्याचा योग आला. त्वेषाने बैठकीला जाणारे शिष्टमंडळ डॉ. कदम यांची ते प्रश्न सोडविण्याबाबतची भुमिका पाहुण हसत खेळत आनंदाने बाहेर पडत असत. सचिन चिखले यांनी सांगितले की, भारती विद्यापीठात गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वेळप्रसंगी डॉ. कदम यांनी स्वत: आर्थिक छळ सोसली. मंत्री पदाच्या कार्यकालात अनेक वर्षात न सुटणारे प्रश्न त्यांनी अवघ्या तासाभरात सचिवांना आदेश देऊन सोडविले आहेत.
कविचंद भाट, शामला सोनवणे, विजय लोखंडे, फझल शेख, प्रा. तात्या कुलकर्णी, माडगुळकर सर, संभाजी मुळीक, बाबा कांबळे, धम्मराज साळवे आदींनीही डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणी सांगून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
व्हीएस न्यूज - भाजपच्या उमेदवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्यसभा निवडणुकीतून आपला अर्ज मागे घेतला असल्यामुळे राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. आता ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा मार्ग आता मोकळा झाला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज्यसभा निवडणुकीनिमित्त होणाऱ्या आकड्यांच्या खेळात कोंडी करण्यासाठी भाजपने नवी खेळी खेळली होती. पण ऐनवेळी राज्यसभेसाठी भाजपने चौथा उमेदवार म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना संधी दिली होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची डोकेदुखी विजया रहाटकर आखाड्यात उतरल्यामुळे वाढली होती. राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला ४८ मते मिळवणे आवश्यक आहे. पण पक्षाच्या संख्याबळानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे अपुरी मते होती. त्यामुळे विजया रहाटकर यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला असता.
अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आज होती आणि विजया रहाटकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. रहाटकरांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जीव भांड्यात पडला आहे. आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. एकाप्रकारे कुमार केतकर यांच्या राज्यसभेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
भाजपाकडून प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, नारायण राणे तर शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीकडून वंदना देसाई यांनी अर्ज भरला आहे.
व्हीएस न्यूज - पुणे सत्र न्यायालयाने हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काल मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेंना या अहवालावरुन जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्यात आली होती.
व्हीएस न्यूज – सफाई कामगारांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत दहावी पास अशी शिक्षणाची अट असलेल्या उमेदवारांना विचारलेले अत्यंत कठीण प्रश्न उच्च शिक्षितांनाही सोडवता येणार नाहीत असे होते. भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. यासंबंधी गिरकरांनी विधानपरिषदेत प्रश्न विचारला होता. अनेकांच्या भुवया मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांमुळे उंचावल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी विधानपरिषदेत निर्देश दिले आहेत.
१३८८ सफाई कामगारांच्या जागांसाठी मुंबई महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी सफाई कामगार पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली होती की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
सफाई कामगार भरती या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेत १) भारताचे ४४ वे सरन्यायाधीश कोण? २) ८८ नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते? ३) फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील परागकणांच्या होणाऱ्या परागसिंचनास काय म्हणतात? ४) गायनेशियम म्हणजे काय? ५) लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगर मध्ये काय असते? ६) सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे ? ७) निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे २००० आणि २७५० गुंतवणूक करुन एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला. त्यांच्या परिणामी १२ महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये १२:११ या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती. ८) ७२ कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी ६ सेकंदात १ पोल ओलांडते. ही आगगाडी ४८० मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
व्हीएस न्यूज - दारूल उलूम देवबंदने मदरसा व्यवस्थापनात कोणत्याही पद्धतीच्या हस्तक्षेपापासून वाचण्यासाठी मदरसांना सरकारी अनुदान घेऊ नये असा आदेश दिला आहे. देशभरातील ३ हजार मदरसांना हा आदेश उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील मुस्लीम समुदायाची प्रसिद्ध शिक्षण संस्था असलेल्या दारूल उलूम देवबंदने पाठवला आहे.
समाजाने देणगी दिलेल्या रूपयांवर देशातील मदरशांचा बहुतांश खर्च चालतो. फक्त शिक्षकांचे वेतन सरकारी अनुदानातून दिले जाते. आता समाजाने दिलेल्या देणगीतूनच वेतन दिले जाणार आहे. राबता-ए-मदरिसच्या बैठकीत ८ मोठे निर्णय घेण्यात आले. मदरसा व्यवस्थापनाला सांगण्यात आले आहे की, त्यांच्या संपत्तीच्या नोंदी अद्ययावत ठेवा. दारूल उलूमने पत्र पाठवून मदरसांमध्ये आयोजित होणाऱ्या समारोह आणि सण साजरा करताना दुसऱ्या धर्मातील, समाजातील लोकांनाही बोलवावे आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यास सांगितले आहे.
५१ सदस्यांना कार्यकारी समितीत ठेवण्यात आले आहे. यामध्ये दारूल उलूमचे १० शुरा, १० वरिष्ठ उस्ताद आणि ३१ संबंधित मदरसांच्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत दारूल उलूमचे अब्दूल कासिम नोमानी म्हणाले की, बैठकीत कोणत्याही प्रकारची सरकारी मदत न घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून एकदा जर सरकारी अनुदान मिळू लागले तर दुसऱ्या सरकारी शाळांप्रमाणे सरकारच्या सूचना आणि आदेशांचे पालन करावे लागते. येथील अनुशासन, नियम, गणवेष आणि पाठ्यपुस्तके वेगळी आहेत. यामध्ये त्यांना (मदरसा) सरकारी हस्तक्षेप नकोय. शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदी सरकारकडून मागितले जातात, ते त्याला नकोय. त्यामुळे ३ हजार मदरसांनी स्पष्ट केले आहे की, ते सरकारी अनुदान घेणार नाहीत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002