व्हीएस न्यूज – अस्सल ग्रामीण मातीचा बाज असलेला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती. ग्रामीण भागातील पैलवान व राष्ट्रीय पदक विजेता प्रसाद सस्ते याने लढतीत इराणच्या सईद महम्मद याला सहाव्या मिनिटातच निकाल डाव टाकून आस्मान दाखविले. यावर प्रेक्षकांनी अक्षरश: मैदान डोक्यावर घेतले. मोशी गावच्या सुपूत्राने मिळविलेल्या या विजयाने आकाशाला गवसणी घातली. दिवाळीच्या सुरुवातीलाच हे यश मिळविल्याने मोशीकरांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इराणचे मल्ल सहभागी होणार असल्याने कुस्तीप्रेमींना अटीतटीच्या लढती पाहण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हिंद केसरी, भारत केसरी व कुस्तीप्रेमी मोशीत दाखल झाले होते. रविवारी सकाळी स्थानिक मल्लांच्या कुस्त्या झाल्या. त्यानंतर रात्री आठनंतर सुरु झालेल्या मुख्य लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातल्यात्यात इराणी मल्लांचे आकर्षण होते. आखाड्यात उतरण्यापुर्वी त्यांनी मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर या लढतींपैकी मोशीगावचा सुपूत्र असलेल्या प्रसाद सस्ते आणि इराणच्या सईद महम्मद यांच्यातील लढतीकडे लागले होते. ही लढत सुरु होताच मैदानात शांतता पसरली. सर्वांचे लक्ष या लढतीमधील दोन्ही मल्लांच्या डावांच्या हालचाली टिपण्यावर होते. पहिली पाच मिनिटे या दोन्ही मल्लांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. सहाव्या मिनिटाला प्रसादने निकाल डाव टाकत सईदला अस्मान दाखवले. त्याचक्षणी मोशीकरांबरोबर उपस्थित कुस्ती शौकीनांनी मैदानात धाव घेत, प्रसादला उचलुन घेतले. मैदानाला फेरी मारत त्याने प्रेक्षकांच्या अभिनंदनाचा स्विकार केला.
कुस्ती मैदान मारल्यानंतर प्रसादला घरी पोचण्यास साडे नउ दहा वाजले. त्यावेळी कुटुंबियांनी त्याला औक्षण करुन ओवाळले. होमग्राऊंवर आंतरराष्ट्रीय मल्लाला चितपट केल्याचा आनंद प्रसादच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. यापेक्षाही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेढ़ी प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली.
व्हीएस न्यूज - पावसामुळे फुलांची तोड होऊ न शकल्याने फुल बाजारात आवक कमी झाली. भाव मात्र गडगडले आहेत. मात्र, तरी देखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजा शेवंती व झेंडूला मागणी वाढली आहे.
येत्या दोन दिवसांत फुलांचे भाव वधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढील प्रमाणे – झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता) – 30 ते 40रुपये किलो, कापरी 40 ते 50 रुपये, गुलछडी – 80 ते 100 रुपये किलो, लिली बंडल – 8 ते 10 रुपये, जरबेरा बंडल – 50 ते 60 रुपये, गुलाब गड्डी (साधा) – 15 ते 20 रुपये,गुलाब गड्डी (डच) – 60 ते 80 रुपये, अष्टर गड्डी (चार नग) – 10 रुपये, किरकोळ बाजारात कागडा गजऱ्याचा भाव प्रति नग 10 रुपये असून, डझनचा भाव 100 रुपये आहे, अशी माहिती सप्तश्रुंगी पुष्प भांडारचे गणेश आहेर यांनी दिली.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालिका सेवेते कार्यरत असताना काही कर्मचारी कार्यालयात सकाळी हजेरी लावल्यानंतर आपले खासगी उद्योग चालविण्यासाठी निघून जात असल्याचे निदर्शनास येऊनही प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. अशा नियमबाह्य पध्दतीने नोकरी करून गलेलठ्ठ पगार लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा उद्योग प्रशासन करत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका वरीष्ठ लिपिकाची पोलीस चौकशी सुरू आहे. त्यांच्या बेकायदेशीर धंद्यांची माहिती गोळा करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे त्यांच्या मालमत्तेची माहिती मागितली आहे. पालिकेने दिलेले मासिक वेतन, भत्ते,बोनस, शासकीय कर्ज व त्याची परतफेड, जीपीएफ कर्ज व त्याची परतफेड याबाबतची माहिती मागितली आहे. परंतु, ही माहिती देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब लावत आहे. ही माहिती दडवून पालिका प्रशासन संबंधित लिपिकाला यांना पाठिशी घालत आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिखली येथील कर संकलन विभागात वरीष्ठ लिपीक पदावर कार्यरत असलेला हे कर्मचारी दररोज कार्यालयीन वेळेत हजेरी लावण्यासाठी कार्यालयात येतात. हजेरी लावल्यानंतर ते त्यांचे खासगी उद्योग पाहण्यासाठी निघून जातात. त्यांची दैनंदिनी अशीच निघून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हे प्रशासनाला माहिती असताना देखील वरीष्ठ अधिकारी त्यांना पाठिशी घालत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना काम न करता मासिक वेतन, भत्ते, शासकीय कर्ज आदी तत्सम फायदे दिले जातात. पालिकेच्या पैशावर मस्तवालपणा करणारे कर्मचारी नियमबाह्य पध्दतीचे कामकाज रेटत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर वेळीच कारवाई होण्याची गरज असताना प्रशासन त्यांना पाठिशी का घालत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर संशय निर्माण झाला आहे.
व्हीएस न्यूज– भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील गोदावरी हिंदी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यामध्ये संवाद वाचन, नाट्यीकरण, अभिनय व परिच्छेदाचे प्रात्यक्षिक वाचन करुन दाखवण्यात आले. ग्रंथालयाव्दारे पुस्तके देवून सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी सलग एक तास वाचन केले. विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. संस्थेचे अध्यक्ष एस. एस. तिवारी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. प्राचार्य आर. आर. मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचनाचे महत्त्व त्यांनी भाषणातून विषद केले. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती देत त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
व्हीएस न्यूज - महापालिका व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि निळू फुले कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथील निळू फुले रंगमंदिर येथे नटसम्राट निळू फुले कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “आठवणी निळूभाऊंच्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निळू फुले यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी त्यांच्या विविध आठवणी जाग्या केल्या.
कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, चेतन दळवी, ज्योती सुभाष, शांता तांबे, विलास रकटे, सिंधू काटे, लीला पवार, वसंत इंगळे, तसेच निळू फुलेंचे बंधू अशोक फुले यांनी देखील सहभाग घेतला. या सर्व कलाकारांनी अष्टपैलू निळूभाऊ उलगडून सांगितले. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रवीण तुपे, राजेंद्र राजापुरे आदी उपस्थित होते.
भालचंद्र कुलकर्णी म्हणाले की, “निळू फुलेंचा ध्यास, श्वास आणि विश्वास हा अभिनय होता. त्यांनी आकाशाला गवसणी घातली तरी देखील ते मातीला कधी विसरले नाहीत. कोल्हापूर शहरातील निळू फुलेंचा पहिला मित्र मी होतो असे म्हणत भालचंद्र कुलकर्णी यांनी जगदीश खेबुडकरांनी एक शिक्षक एक विदूषकसाठी लिहिलेला मुक्तछंद सादर केला.
आठवणी निळूभाऊंच्या या कार्यक्रमात निळू भाऊंचे वाचन प्रेम सर्वांनी उजागरीत केले. त्यांनी आपल्या अगाध वाचनातून माणसे ओळखली. इस्लामपूरमध्ये एका नाटकाच्या प्रयोगावेळी झालेला प्रेक्षकांचा दंगा पन्नास पोलिसांना आवरता आला नाही, तो दंगा निळू फुले यांनी केवळ एका शब्दात शांत केला. आटपाडीसारख्या दुष्काळी तालुक्यात त्यांनी यशस्वी पाणी चळवळ सुरू केली.
कोणत्याही चित्रपटात काम केल्यानंतर पैशांसाठी कधीही त्यांनी तगादा लावला नाही, अशी आठवण वसंत इंगळे यांनी सांगितली. कुठल्याही स्तरात फिट होणारा माणूस म्हणजे निळू फुले. सहकलाकारांसाठी तळमळ वाटणारा माणूस. समाजासाठी समर्पणभाव त्यांच्याकडे होता. ै”मी’पणा त्यांनी कधीच दाखविला नाही, अशा आठवणी अभिनेता चेतन दळवी यांनी सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज काझी यांनी केले. कार्यक्रमानंतर नेरुळ, कुडाळ येथील श्री देव कालेश्वर दशावतार नाट्य मंडळाने दशावतार नाटक सादर केले. संपूर्ण दिवसभर प्रेक्षक नाट्यगृहात खिळून राहिला.
व्हीएस न्यूज - चिंचवड वृत्तपत्र विक्रेत्या मंडळीचा कौटुंबिक दिवाळी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. वाचन संस्कृती वाढीस लागावी, या हेतूने या कार्यक्रमात उपस्थितांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून या विक्रेत्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
मोहननगर येथील महादेव मंदिर सभागृहात शनिवारी (दि. 14) सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ विक्रेते सदाशिव जंगम, भालचंद्र देशपांडे, प्रशांत काळे, भानुदास हिवराळे, मनोज काकडे, सीमा टेपाळे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अभिमान वीटकर, श्रुती दळवी, संस्कृती सस्ते, विलास जंगम, कुणाल भराटे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमाला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मातांकडून वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. सरोजकुमार ढमाले, महावीर भराटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला कामगार नेते इरफान सय्यद, प्रवीण जाधव, राहुल कोल्हटकर, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, दत्ता पिसे, अरूण निवंगुणे, यतीन चौधरी, प्रवीण माने, कृष्णकांत कांबळी, शंकर हारपुडे, विनय भावसार, नंदकुमार नंदगावे, अशोक झांजले हे पदाधिकारी तसेच सर्व वृत्तपत्रांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत शिनकर, गणेश जाधव, शंकर नामदे, किरण नामदे, अनिल नामदे, प्रकाश कासट, नितीन ठाकूर, अजित रोहकले, मनोज काकडे,बाळू गोरे, शब्बीर आत्तार यांच्यासह चिंचवड विभागातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दळवी यांनी केले. तर मनोज काकडे यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज – गेली पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील कचरा काही दिवसांपासून नियमितपणे उचलला जात नसल्याच्च्या निषेधार्थ मनसेने पालिका मुख्यालयासमोर“कचरा फेको’ आंदोलन केले.
याप्रकरणी महापालिका कर्मचारी विलास बाबासाहेब वाबळे (वय 55, रा चऱ्होली) यांनी फिर्याद दिली असून, मनसेचे नगरसेवक व शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 13) महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कचरा टाकण्यात आला. या आंदोलनात रुपेश पटेकर, राजु भालेराव, अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, मयूर चिंचवडे व इतर 25 कार्यकर्ते सहभागी झाले होते. सार्वजनिक रस्ता अडवून, मोठमोठ्याने घोषणा देत कचरा टाकून सार्वजनिक ठिकाणी संसर्ग निर्माण होईल, या हेतूने दोन पोती कचरा आणून टाकत सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - बारा वर्षापूर्वी अंमलात आलेला माहिती कायदा 2005 अद्यापपर्यंत बारा टक्के लोकांपर्यंत देखील पोहचला नाही. वस्तूतः कलम 26 नुसार हा कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ते मागच्या सरकारने केले नाहीत आणि नवीन पारदर्शक सरकार देखील करत नाही. कोणत्याही सरकारला पारदर्शक कारभार नको असतो, अशी टिका माहिती कायदा अभ्यासक व ज्येष्ठ व्याख्याते विवेक वेलणकर यांनी केली.
माहिती कायदा दिनानिमित्त स्वराज्य बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या वतीने भोसरीतील विरंगुळा केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात वेलणकर बोलत होते. यावेळी प्रशिक्षक सुनील पाटील यांचा माहिती कायदा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप 5 हजार 555 रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे होते. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय सायकर, ज्येष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष पंढरीनाथ कामथे, सूर्यकांत मुथीयान, एस. एन. महाजन, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
वेलणकर म्हणाले की, 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात 110 रुपये प्रती बॅरल प्रमाणे कच्चे तेल मिळत होते. सन 2015 ते 17 दरम्यान हाच दर 40 रुपये प्रती बॅरल झाला. या दोन वर्षांत केंद्र सरकारची 5 लाख कोटी रुपयांची आयातीची बचत झाली. यातून केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोलचे दर कमी करणे अपेक्षित असताना उलट चौपट करवाढ करुन देशातील नागरीकांना महागाईच्या खाईत लोटले. विजय मल्ल्याने बुडविलेले नऊ हजार कोटी रुपये एसबीआय बॅंकेने सामान्य खातेदारांच्या खात्यातून बेकायदेशीररित्या वसूल केले. बचत खात्यात किमान 5 हजार रुपये शिल्लक ठेवण्याचा बेकायदेशीर नियम आणला. त्यातून एप्रिल ते जून या तीन महिन्यात भारतातील 46 मेट्रो सिटी मधून 3.5 कोटी रुपये अन्यायकारपणे दंड वसूल केला आहे. याचा सर्वांत जास्त आर्थिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. तसेच पीएमपीएलने जिल्हा वाहतूक समितीच्या परवानगी शिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या पासमध्ये दुप्पट वाढ केली. ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2017 पासून पुणे आणि पिंपरी मध्ये सह्यांची मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वेलणकर यांनी दिली.
सुनील पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, सार्वजनिक शिस्तीचा अभाव, अस्तित्वात असणा-या कायद्यांविषयी जनतेत व अधिकाऱ्यांमध्ये आदर, भिती नसल्यामुळे माहिती कायद्याची गरज निर्माण झाली. हा कायदा खूप प्रबळ व सशक्त आहे. शासकीय अधिकारी या माहितीचे विश्वस्त आहे. परंतु, सामान्य जनतेला माहिती न देण्यासाठी अधिकारी मालकासारखे वागतात. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जनतेनेच पुढे यावे, असे आवाहन सुनील पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात पंकज खटाणे, सुमित लगस, रोहन सोनाळे, कल्पना थोरात, प्रमोद चोबे, किरण सावंत यांनी सहभाग घेतला. स्वागत दत्तात्रय सायकर, सूत्रसंचालन प्रा. एस.आर. शिंदे यांनी केले. तर आभार रोहन सोनाळे यांनी मानले.
व्हीएस न्यूज – यमुनानगर व परिसरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवत आहे, अनेक घरांना उंचवटा असल्याने एक तासही पाणी जात नाही, त्यामुळे महापालिकेतर्फे यमुनानगरमध्ये चोविस तास पाणी पुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले की, नवनगर विकास प्राधिकरणाने विना टाकीचे गृहप्रकल्प यमुनानगर याठिकाणी बांधलेले आहेत. तसेच अनेक घरे उंचावर आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांनी 24 बाय 7 पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी यमुनानगरची प्रायोगिक तत्वावर निवड केली होती. यामुळे यमुनानगरच्या नागरिकांना पाणी मिळू लागले होते. आता तो प्रकल्प बंद केला असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. संपुर्ण शहरात 24 बाय 7 पाण्याचा प्रकल्प राबविण्याचे महापालिका नियोजन करित आहे. मात्र, त्यातून यमुनानगरचे प्रकल्प बंद करणे योग्य नाही. त्यामुळे 24 बाय 7 पाण्याचा प्रकल्प यमुनानगरमध्ये तातडीने सुरु करावा, अशीही मागणी उबाळे यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज– राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णायल व संशोधन केंद्राच्या वतीने मंगळवारी (दि. 17) सकाळी साडेनऊ वाजता महाविद्यालयात शल्यतंत्र, पंचकर्म व रचना शरीर विभागातर्फे व्याधीतील वेदनांचे आयुर्वेदीय व्यवस्थापन या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात अर्थो रुग्णालयाचे संचालक डॉ. मंगेश देशपांडे, निरामय रुग्णालयाचे संचालक डॉ. यशवंत नांदकर, शल्यचिकित्सक विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय डॉ सुभाष वार्ष्णेय मार्गदर्शन करणार आहेत. तसेच व्याधीत वेदनांचे आयुर्वेदीय व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शन व संशोधनाचे सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. पांडे यांनी दिली.
व्हीएस न्यूज – रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत मागासवर्गीय अल्पसंख्यांकांना राहत्या घराची डागडुजी करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव पालिकेने तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणी सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेने केली आहे.
यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात संघटनेचे प्रा. बी. बी. शिंदे यांनी म्हटले आहे की, रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत मागासवर्गीयांना तसेच अल्पसंख्यांकांना राहत्या घराची डागडुजी करण्यासाठी किंवा ते घर पुन्हा बांधण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यावेळी राज्य शासनाकडून रमाई गरकूल आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या माहितीचा जीआर दाखविण्यात आला. त्यानुसार अनुदान देण्याचा ठराव पालिकेने मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविल्याची तरतूद आहे. यासाठी पालिका प्रशासनाने नागरिकांची घरे दुरूस्त करणे किंवा बांधण्यासाठी अनुदान द्यावे, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि.15) महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत इराणच्या आंतरराष्ट्रीय मल्लांसह अनेक राष्ट्रीय मल्लांच्या सहभागाने ही स्पर्धा चर्चेत आली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला चांदीची गदा देऊन सन्मानित केले जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत अटीतटीचे सामने सुरु होते.
या स्पर्धेवर पावसाचे सावट होते. त्याकरिता लाखो रुपये खर्चुन तयार केलेचे मैदान भिजण्यपासून वाचविण्यासाठी प्लास्टिकच्या आच्छादनाचा वापर करण्यात आला. दुपारी मोशी गावातून मानाच्या चांदीच्या गदेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक स्पर्धेच्याठिकाणी आल्यानंतर मैदानाला फेरी मारण्यात आली. त्यानंतर हनुमानाच्या मुर्तीची पूजा झाल्यानंतर मैदानातील मल्लांचे डावपेच सुरु झाले. यावेळी पाऊस थांबल्याने संयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ओघावत्या सूत्रसंचालनामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढत होती. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने अनेक निकष कटाक्षाने पाळले जात होते. यासाठी आंतरराष्ट्रीय पंचांचे सहकार्य लाभत होते.
छोट्या मल्लांच्या कुस्तीने या स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेसह चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला राज्यातील अनेक नामवंत वस्तादांनी हजेरी लावली. यावेळी आमदार लक्षमण जगताप, आमदार महेश लांडगे, क्रीडा समिती सभापती लक्षमण सस्ते, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी हनुमंत गावडे,आप्पा खुटवड, ऑलम्पिक खेळाडू मारुती आडकर, आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड आदी उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002