व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत शहरातील कचरा संकलन आणि वहनाचे ठेके बी.व्ही.जी इंडिया प्रा.लि. व ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपन्यांना देण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बहुमताने मंजुरी दिली आहे.मात्र, या दोन्ही ठेकेदारांनी भरलेले निविदेचे दर पाहता या कामात रिंग झाली आहे असे दिसत असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करून दोन्ही ठेकेदारांना काळ्यायादीत टाकावे असा तक्रार अर्ज रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे गुरुवारी केला आहे. वाघेरे माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी महापालिकेत सलग 15 वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती या काळात राष्ट्रवादीने शहरातील कचरा संकलन आणि वहनाचे ठेके प्रभागवार छोट्या सहकारी संस्थांना देऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजप सत्तेवर आल्यानंतर स्थायीसमिती सभापती सीमा सावळे यांनी या संस्था त्यांच्याकडे काम करणाऱ्या मजुरांचा प्रॉव्हिडंड फंड आणि अन्य देय रक्कमा शासनाकडे भरणा करत नाहीत तसेच या मजुरांना किमानवेतन कायद्याप्रमाणे वेतनही देत नाहीत. त्यामुळे या सहकारी संस्थांना मुदतवाढ न देता नवीन निविदाप्रक्रिया राबवावी व शहराचे दोन भाग करून दोन मोठ्या कंपन्यांना हे काम द्यावे असे प्रशासनाला सुचविले होते. त्या प्रमाणे प्रशासनाने शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई महामार्गाच्या उत्तर व दक्षिण असे दोन भाग कल्पून या भागांसाठी दोन स्वतंत्र निविदा मागविल्या होत्या. यामध्ये उत्तर भागातील कामासाठी ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि., कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि., बी.व्ही.जी इंडिया लि. आणि पी. गोपिनाथ रेड्डी या चार ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या त्यापैकी बी.व्ही.जी इंडिया लि. या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची म्हणजेच 1850 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. आणि ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीची निविदा त्यापेक्षा जास्त दराची म्हणजेच 2380 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. त्यामुळे उत्तर भागासाठी बी.व्ही.जी इंडिया लि. या कंपनीला ठेका दिला जाणार आहे. दक्षिण भागासाठी ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि., कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि., बी.व्ही.जी इंडिया लि. आणि पी. गोपिनाथ रेड्डी या ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची म्हणजेच 1890 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. आणि मॅनेजमेंट लि., बी.व्ही.जी इंडिया लि. या कंपनीची निविदा त्यापेक्षा जास्त दराची म्हणजेच 2350 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. त्यामुळे सर्वात कमी दर असलेल्या ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीला दक्षिण भागासाठी ठेका दिला जाणार आहे. स्थायीसमितीने या प्रस्तावावर मान्यतेची मोहर उमटवली असल्याने लवकरच सर्वसाधारण सभेत या ठेक्यांना अंतीम मंजुरी दिली जाणार आहे. या दोन्ही निविदा प्रक्रियेत ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. आणि बी.व्ही.जी इंडिया लि. या दोनच ठेकेदार कंपन्यांमध्ये स्पर्धा झाल्याचे दिसत असून या दोन्ही कंपन्यांनी दोन्ही निविदांमध्ये भरलेले दर पाहता त्यांनी दोघांनीही एक एक ठेका मिळेल अशाप्रकारे निविदा भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामात दोन्ही ठेकेदार कंपन्यांनी संगनमत करून भरल्याचे दिसून येत असल्याने या दोन्ही निविदाप्रक्रिया रद्द करून या ठेकेदार कंपन्यांना काळ्यायादीत टाकावे अशी तक्रार वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. शिवाय हे दोन्ही ठेके 8 वर्षे एव्हढ्या दीर्घ कालवधीसाठी देण्याचा प्रस्ताव असल्याबद्दलही वाघेरे यांचा आक्षेप आहे. स्थायीसमितीच्या दबावाला बळी न पडता या दोन्ही निविदा रद्द कराव्यात. अन्यथा या विरोधात आपणाला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही वाघेरे यांनी तक्रारीच्या शेवटी दिला आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आगीच्या दोन घटना घडल्या. तळवडे येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहत्रक बनविण्याऱ्या कंपनीला आग लागली. तर, रहाटणीत गणेश बॅंकेला लागलेल्या आगीत कागदपत्रे जळून खाक झाली. या दोन्ही घटना शनिवारी सकाळी घडल्या. तळवडे येथे विद्युत रोहत्रक बनविण्याची कंपनी आहे. कंपनीत फॅब्रिकेशनचे काम सुरु होते. त्यावेळी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. पिंपरी, संत तुकारामनगर येथील दोन बंब, भोसरी आणि प्राधिकरणातील एक बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. यामध्ये आर्थिक नुकसान झाले आहे. दुसरी घटनी रहाटणी येथे घडली. रहाटणी येथील गणेश बॅंकेला शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत बॅंकेतील कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. रहाटणी अग्निशामक उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी अवघ्या काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत बॅंकेची चलन व इतर कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते.
व्हीएस न्यूज - पैशाच्या वादातून त्रिकुटाने एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरील आंबी गावच्या हद्दीत घडली. विनोद सुरेश गायकवाड (रा.कामशेत) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अरविंद गौतम निकाळजे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात शशिकांत भरत शिंदे (रा. तळेगाव दाभाडे) व अनोळखी दोन इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद गायकवाड आणि फिर्यादी अरविंद निकाळजे हे दोघे शुक्रवारी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान आंबी गावच्या हद्दीत वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी शशिकांत भरत शिंदे याने मागून दुचाकीवरून येऊन विनोद गायकवाड यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांना खाली पडले. त्यानंतर पैशाच्या देवाण घेवाणीवरून चिडून आपली मोटारसायकल चार ते पाच वेळा विनोदच्या अंगावर घातली. त्यानंतर तेथे पडलेला दगड विनोदच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. आरोपी शशिकांत शिंदे हा फिर्यादी अरविंद निकाळजे यांचा आत्येभाऊ आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
व्हीएस न्यूज - इसमाचे लायसन त्वरीत काढून देण्याची मागणी करत एका एजंटने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मी कोण आहे, तुला माहित आहे ना, तुझ्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मोशी येथील आरटीओ कार्यालयात घडला. गौतम सुराडकर असे आरोपी एजंटचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर (वय-55, रा. सेनापती बापट रोड, पुणे) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार ईश्वर जगदाळे यांनी माहिती दिली. फिर्यादी हे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गुरूवारी सायंकाळी आरोपी व इतर एक जण त्यांच्या केबीनमध्ये आले. माझ्या माणसाचे लायसन त्वरीत काढून देण्याची मागणी आरोपीने केली. फिर्यादी यांनी आरोपीला केबीनच्या बाहेर जाण्यास सांगितले. यावरून चिडलेल्या आरोपी एजंटने फिर्यादी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मी कोण आहे, तुला माहित आहे ना, तुझ्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - महापालिकेच्या वायसीएममधील एका डॉक्टर महिलेसह देशभरात अनेक महिलांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या एका नायजेरियनच्या भोसरी पोलिस व सायबर सेलने मुसक्या अवळल्या आहेत. तसेच आरोपीच्या पासपोर्टची 12 मार्च 2017 रोजी मुदत संपली होती. तो भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत होता. अरिरिका हेंन्री अजुबुके (वय-38) असे अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. प्रतिभा शामकुवर यांना फेसबुकच्या माध्यमातून अजुबुके याने तब्बल 41 लाख 82 हजार रुपयांचा गंडा घातला होता. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याच्या फिर्यादीवरून पुणे सायबर सेल व भोसरी पोलीसांच्या पथकाने कसून तपास केला. अखेर आरोपी अजुबुकेला दिल्लीतून अटक केली. त्याने फेसबुकच्या माध्यमातून अनेक महिलांना गंडा घातल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. अजुबुके याने बंगळुरु येथील एका महिलेला 60 लाख, कुलू मनाली येथील महिलेला 30 लाख, वसई येथील महिलेला 8 लाख, निगडी येथील एका महिलेला 5 लाख तर तक्रार करणाऱ्या डॉक्टर महिलेला 42 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आले आहे. भोसरी पोलीस व सायबर सेल अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - येथील जयवंत इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मसी कॉलेजचा प्रथम पदविका प्रदान सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा रंगला. यावेळी जेएसपीएम ताथवडे शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ पी.पी विटकर, इंडोफिल कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ जयंत चांदोरकर, प्राचार्य प्रा प्रशांत हंबर, कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा वर्षा कटारे आदी उपस्थित होते. डॉ चांदोरकर म्हणाले कि, पूर्वीपेक्षा हल्ली फार्मसी क्षेत्रात मोठे बदल झाले. मुलांचा कल वाढला आहे. या क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. यावेळी ज्योती चौधरी संपादित कॉलेज कट्टा या ई मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले. सहभागी झालेल्या 350 माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत मार्गदर्शन केले. नृत्य, नकला असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. दिवसभराच्या कार्यक्रमात निकिता कुंभार, ममता चौधरी, कोमल महाडिक, गीता चौधरी, दिव्या चौधरी, निशा सोनवणे यांनी सुत्रसंचालक केले. प्रा. सुधा पुरी यांनी आभार मानले. माजी विद्यार्थी संघटनेचे धवल घुगे यांनी अहवाल सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा सविता देवकर, प्रा देविका टिळेकर, प्रा संगीता गवळी, महेश खुडे, जयकुमार गोपाळे, कांचन सोनी, दीपाली भांडवलकर, दिपाली घाडगे, कोमल टेकाळे, वंदना पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व्यावसायीक सामाजिक बांधिलकीचे माध्यमातुन मे. एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे वतीने विदयार्थीनींकरिता सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या 9 माध्यमिक शाळांमध्ये वेडींग मशीन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सीनरेशन मशिन बसविण्यात आले. या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे, नगरसेवक सागर आंघोळकर, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मुख्य अधिकारी के. अनिरुध्द, एस. श्रीधरन, डेप्युटी मॅनेजर निमा गिध, सह आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, शाळेचे मुख्याध्यापक वडगणे एस.डी, सहा. आरोग्याधिकारी व्हि. के. बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई उपस्थित होते. यापुर्वी आकुर्डी, काळभोरनगर, रूपीनगर, श्रमीकनगर निगडी येथील माध्यमिक शाळेमध्ये हे मशीन बसविण्यात आले आहे. पिंपळेगुरव, थेरगांव, क्रिडाप्रबोधिनी, केशवनगर व पिंपळे सौदागर येथे या वर्षात कंपनीच्या वतीने सीएसआर अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन वेंडींग व इन्सीनरेशन मशीन बसविण्यात आले आहे. एक्साईड इंडस्ट्रीज लि. यांनी पिंपळेगुरव माध्यमिक विदयालयामध्ये बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन वेंडीग व इन्सीनरेशन मशीनचे महानगरपालिकेस प्रातिनिधीक स्वरुपात हस्तांतरण आज करण्यात आले. व्हेन्डींग मशीनमध्ये 5 रु चे नाणे टाकलेनंतर एक सॅनीटरी नॅपकिन मिळते. तसेच वापर केलेले सॅनिटरी नॅपकिन इन्सीनरेशन मशीनमध्ये टाकलेनंतर ते साधारण 15 मिनिटामध्ये शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट होऊन त्याची राख ऍश ट्रे मध्ये राहते. मशिनला असुन धुर जाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आले आहे. मशीनसाठी तीन लाख 21 हजार पाचशे रूपयांचा खर्च सीएसआर तत्वावर प्रायोजक कंपनीमार्फत करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी सी.एस.आर अंतर्गत उदयोजक, व्यापारी, कार्पोरेट कंपनी, सेवाभावी संस्था यांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
व्हीएस न्यूज - शहरातील अनधिकृत पोस्टर्सविरुद्ध केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी एक जण कार्यालयात येऊन जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार सत्ताधारी भाजप नगरसेवकाने पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच धमकी देणारी व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे नगरसेवकाने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. भाजपचे पिंपळेनिलख, विशालनगर प्रभागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात एकुमसिंग कोहली (रा. दापोडी) याच्या विरोधात तक्रार दिली आहे. नगरसेवक कामठे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एकुमसिंग कोहली हा मला सातत्याने फोन करत आहे. तसेच शहरातील अनधिकृत पोस्टर्सविरुध्द केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रत्यक्ष आमच्या कार्यालयात येऊन मला दमदाटी केली. त्याने अनेक वेळा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही त्याला सौजन्याने फोनवर बोलूनसुद्धा त्याचा उर्मटपाण थांबला नाही. अनधिकृत फलकांविरुद्ध आम्ही उचललेले धोरण थांबविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत होता. एकुमसिंग हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे कामठे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच मला पोलीस संरक्षण द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत गाव घेण्यास विरोधासाठी मारुंजी ग्रामस्थांनी गुरुवारी कृती समिती स्थापन केली आहे. गावाच्या भल्यासाठी महापालिकेच्या या निर्णयाविरुद्ध प्रखर लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतने यापूर्वीच महापालिकेत गाव घेण्यास विरोध असल्याचे ठराव ग्रामसभेत मंजूर केले आहे. आजच्या ग्रामसभेतही असाच निर्णय घेऊन कृती समिती स्थापन केली आहे. यात अंकुश जगताप यांनी प्रास्ताविक मांडल्यावर समितीत जगताप यांच्यासह बाळासाहेब बुचडे (पाटील), गणपत जगताप, हिरामण बुचडे, आकाश बुचडे यांनी समितीत प्राथमिक सदस्य म्हणून भाग घेतला आहे. यानंतर समिती विस्तारणार आहे. अंकुश जगताप म्हणाले, "महानगपालिकेत गाव जाऊ नये. यासाठी कृतिशील विरोध दर्शविण्याचं काम होण्यास कृती समिती गरजेची ठरेल. रचनात्मक पद्धतीने विरोध करून ग्रामस्थांचा हा लढा यशस्वी करता येईल." बाळासाहेब बुचडे म्हणाले, "पालिकेचा पसारा आधीच वाढलाय. त्यावरच त्यांचं नियंत्रण राहिलं नाही. विकास आराखडा रखडलाय. त्याआधी गाव घेण्याची घाई कशाला." हिरामण बुचडे म्हणाले, " प्रशासकीय निर्णयांमुळे मारुंजीला यापूर्वी अनेकदा झळ बसली आहे. आता तरी बिल्डरांच्या हिताचे निर्णय होऊ नये. महानगपालिकेत गाव घेवू नये म्हणून विरोधी कृती समिती स्थापन करण्यास मारुंजीने पुढाकार घेतला आहे. इतर गावांमध्येही अशी कृती समिती स्थापण झाल्यास सर्वांचे संघटन करण्याची तयारी आहे. मारुंजीत ज्या ग्रामस्थांचा विरोध आहे ते दर्शविण्यासाठी घरोघरी सह्यांची मोहोम लवकरच राबविणार आहे. पालिकेचा ठराव नाकारावा यासाठी विरोधाच्या सह्यांची ही प्रत राज्य सरकारला पाठविणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. गाव समवेशाचा हा निर्णय प्रशासनाने रद्द करावा यासाठी मोठा लढा उभा राहील असं चित्र पंचक्रोशीत आहे.
व्हीएस न्यूज - लोणावळा-पुणे लोकल समोर उडी घेऊन एका इसमाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. नितीन आनंत गायकवाड (वय-37, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गायकवाड हे खासगी गाडीवर चालक म्हणून काम करत होते. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बिजलीनगर रेल्वे पुलावरुन लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसमोर त्यांनी चिंचवड येथील डी. वाय. पाटील रेल्वे पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्यूज - स्वयंपाक केला नाही या कारणावरून चिडून नवऱ्याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना नवलाख उंबरे गावच्या शिवारात भगवान संतू दरेकर यांच्या विटभट्टीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. अशोक विठ्ठल चौरे (वय40) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. शारदा अशोक चौरे (वय 34, रा.भगवान संतू दरेकर विटभट्टी, नवलाख उंबरे,ता. मावळ,जि.पुणे )असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात देवेश शंकर वाघमारे (वय 17 रा.भगवान संतू दरेकर विटभट्टी,नवलाख उंबरे,ता.मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याल फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण बनवले नाही या कारणावरून विठ्ठल चौरे याने चिडून पत्नी शारदा चौरे हिला लाकडी दांडक्याने मारहाण करून दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून तिचा खून केला. आरोपीला शुक्रवारी वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीने पत्नीचा खून केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर करीत आहेत.
व्हीएस न्यूज - स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या दोन एटीएममध्ये बॅकअपसाठी बसविण्यात आलेल्या ऍमरॉन कंपनीच्या सव्वा लाख रूपये किंमतीच्या 28 बॅटऱ्या चोरट्याने चोरून नेल्या आहेत. ही घटना पिंपळे-गुरव भागात गुरूवारी उघडकीस आली आहे. स्टेट बॅंकेचे चॅनल मॅनेजर चैतन्य शेट्टी (वय-29, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेचे पिंपळे-गुरव येथील सृष्टी चौकात व त्रिमुर्ती कंन्स्ट्रक्शन या इमारतीमध्ये एटीएम आहे. सृष्टी चौकातील एटीएममध्ये बॅकअपसाठी 100 पॉवर ऍमरॉनच्या 22 तर त्रिमुर्ती इमारतीमध्ये एटीएममध्ये 6 अशा 28 बॅटऱ्या बसविण्यात आल्या होत्या. चोरट्याने एटीएम सेंटरचे दरवाजे तोडून एक लाख 32 हजार रूपये किंमतीच्या 28 बॅटऱ्या चोरून नेल्या. फिर्यादी यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फौजदार आर. पी. केंद्रे अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002