व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अपंगांच्या स्टॉल धारकांवर अतिक्रमणाच्या नावाखाली नोटीस न देता कारवाई करण्यात येत आहे, याबाबत संपूर्ण अहवाल तात्काळ अपंग कल्याण आयुक्तालयाकडे सादर करावा आणि पुढील आदेश देईपर्यंत अपंग स्टॉलवरील कारवाई स्थगीत ठेवण्याचे आदेश अपंग कल्याण आयुक्तांनी प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
कोणतीही पूर्व सूचना न देता कारवाई होत असल्याची तक्रार प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी केली होती. याची तात्काळ दखल पुणे अपंग कल्याण आयुक्तालयाने याची तात्काळ दखल घेतली व स्थगितीचे आदेश दिले व सात दिवसात विस्तृत अहवाल सादर सादर करावा व अपंग व्यक्तीबाबत अर्धन्यायिक प्रक्रिया अनुसरण्यात येईल. चौकशीचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित अपंग स्टॉल विरुध्दची कारवाई पुढील आदेशापर्यंत स्थगीत ठेवावी, अशी सूचना केली.
अपंग व्यक्तींना नियमानुसार समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग 1 जानेवारी 1996 पासून लागू केला. यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना व प्राधिकरणांना त्यांच्या क्षेत्रातील अपंग अर्थात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणकारी कामांसाठी दारिद्य्र निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तीन टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. नागरी भागात दिव्यांगांच्या कल्याणासाठी कोणत्या प्रयोजनानिमित्त हा निधी खर्च करावा? हा निधी अन्य कोणत्याही कामासाठी खर्च करू नये. यावर दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला निधी खर्च केला जातो का किंवा कशा पद्धतीने? याबाबत आढावा घेण्याची सूचना अपंग कल्याण संचालनालयाने संबंधितांना दिल्या आहेत.
राखीव निधी खर्च व्हावा…
दिव्यांगांसाठी निधी राखीव ठेवणे, तो त्यांच्याच कामासाठी खर्च करणे, याची पूर्तता होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी अपंग व्यक्ती अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, तसेच राखीव तीन टक्के निधीचा वापर त्यांच्यासाठीच करावा, अशी मागणी प्रहार क्रांती आंदोलनचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण यांचा आरोप
व्हीएस न्यूज – पोलिसांविरोधात आंदोलन केल्याने भाजप नगरसेवक तुषार हिंगे याच्या सांगण्यावरुन निगडी पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष रामा चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या खोट्या तक्रारीमधून वगळण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
नगरसेवक तुषार हिंगे व काही तरुणांमध्ये भांडण झाले होते. याचे पर्यावसन यमुनानगर चौकीसमोरच प्राणघातक हल्ल्यात झाले होते. मात्र, नगरसेवक तुषार हिंगे याच्याविरोधात तरुणांची तक्रार घेण्यास निगडी पोलीस टाळाटाळ करत होते. निगडी पोलिसांच्या या बेजबाबदार वर्तणुकीच्या निषेधार्थ या तरुणांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमरण उपोषण केले होते.
उपोषणकर्त्यांमध्ये संतोष चव्हाण यांचा देखील समावेश होता. त्यानंतर नगरसेवक तुषार हिंगेसह त्याच्या साथीदारांवर निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हिंगे यांच्या सांगण्यावरुन निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. दरम्यान, नगरसेवक हिंगे याच्यावर गुन्हा दाखल असताना देखील, त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
व्हीएस न्यूज - एशियन ओसिएन स्टॅंडर्ड सेटर ग्रुपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवाजी झावरे यांचा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
पश्चिम भारत प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष विष्णू अगरवाल, उपाध्यक्ष सर्वेश जोशी, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, अमोद भाटे, युवराज तावरे, प्राजक्ता चिंचोळकर, सुहास गार्डी, संतोष संचेती, अनिल अगरवाल,सचिन बन्सल आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम निगडी येथील शाखेच्या सभागृहात संपन्न झाला. एशियन- ओशिएन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुप ही आशियाई प्रदेशातील लेखा मानक संबंधित संघटना आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय मानकांचा अवलंब करण्यासंबंधित चर्चा तसेच उच्च गुणवत्तायुक्त जागतिक लेखा मानकांच्या विकासात सहभागी होण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली असून शिवाजी झावरे हे या संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिलेच भारतीय सनदी लेखापाल ठरले आहेत. शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींना पूरक ठरतील असे मानक बनविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे शिवाजी झावरे यांनी यावेळी सांगितले.
व्हीएस न्यूज – ज्ञानाची हो माऊली, शीतल तिची साऊली, लवकर ये रे, ये, रे विठूराया, तु विठ्ठल, मी विठ्ठल, सकल जग विठ्ठल, अशा एकापेक्षा एक सरस अशा भावपूर्ण काव्यरचनांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. निमित्त होते ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त आयोजित हरी मुखे म्हणा या कवी संमेलनाचे.
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव होते. यावेळी साहित्यिक सुरेश कंक ज्येष्ठ कवी बाबू डिसूझा, कार्यक्रमाचे संयोजक व मंडळाचे कार्यवाह प्रदीप बोरसे, कवयित्री शोभा जोशी, शरद शेजवळ हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात राज अहेरराव यांनी सुरुवातीला आजच्या पावन दिनाची कशी होईल हो उतराई, आज पुरूष सारे विठ्ठल, स्ञिया दिसे रखुमाई या ओळी सादर केल्या. ते पुढे म्हणाले, संत ज्ञानेश्वर हे जगाच्या पाठीवर एकमेव असे संत होऊन गेले की त्यांनी विश्वात्मकतेचा संदेश दिला. ते समजण्यासाठी त्यांना देव म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून बघावे. त्यांनी आपल्या आचरणातून स्ञियांना सन्मान, सर्व पंथांना समदृष्टीने बघणे, सहनशीलता, विनम्रता, समता,बंधुता, अध्यात्मातून मुक्ती प्राप्त करून देण्याचे मार्ग सुचवले आहेत. त्यासाठी प्रत्येकाने ज्ञानेश्वर फक्त वाचू नये तर त्यांच्या अभंगाचा भावार्थ आचरणात आणावा. माउलींनी समाधी घेऊन 721 वर्षे झाली. आजही त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती आळंदीला येऊ शकते.
सुरेश कंक म्हणाले की, माउलींचे पसायदान प्रेम, करूणा आणि अखंड मानव जातीला त्यांच्या कल्याणाचा सन्मार्ग दाखवणारा महामंञ आहे. पसायदान आणि माउलींचा हरीपाठ तोंडपाठ असून चालणार नाही तर कृतीने अंगीकारला पाहिजे. दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरीनामाचा, भक्त नामात रंगला या भजनाने माधुरी विधाटे यांनी कवी संमेलनाचा प्रारंभ केला. याच पाञातून वाहे, शुद्धसा ओलेपणा. हे इंद्रायणीचे मनोगत नंदकुमार मुरडे यांनी व्यक्त केले. ज्ञानाची हो माऊली, शीतल तिची साऊली. हे गीत आय. के. शेख यांनी सादर केले. लुसलुसणारी हिरवी पाने, कोकीळेचे मंजुळ गान अशी सुंदर शब्दकळा लेऊन असा ऋतुराज वसंत अवतरला राजेंद्र घावटे यांच्या शब्दांतून. लवकर ये रे, ये, रे विठूराया अशी आर्त साद घातली नितीन यादव यांनी. तर तु विठ्ठल, मी विठ्ठल, सकल जग विठ्ठल अशा शब्दात एकत्वाची सुरेख अनुभूती वर्षा बालगोपाल यांनी दिली.
अशोक कोठारी, नंदकुमार कांबळे, मधुश्री ओव्हाळ, राधा वाघमारे, भाग्यश्री कुलकर्णी, प्राची देशपांडे, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, सुमन दुबे या कवींच्या रचनांनी वातावरण भक्तीमय झाले. ह.भ.प. श्यामराव गायकवाड यांनी संजीवन समाधीचा सोहळा शब्दांतून मूर्तिमंत साकारला. माउलींचा जीवनपट उलगडत ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी सूञसंचालन केले. सुरेश पवार यांनी आभार मानले. पसायदानाने या भक्तीमय सोहळ्याची सुरेल सांगता झाली.
व्हीएस न्यूज – एका क्लिनरने आपल्या सहकारी चालकावर चाकू हल्ला केला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी अकराच्या सुमारास निगडीतील अंकुश चौकात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक रोशन वर्मा (वय 27, रा. डोंबिवली) आणि क्लीनर खिलेश्वर कुमार यादव (रा. बिहार) हे एकाच माल वाहतूक ट्रकवर कामाला होते. याप्रकरणी आरोपी खिलेश्वर कुमार यादवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
क्लीनर खिलेश्वरला नेहमी चालकापासून धोका असल्याचे भासत होते. त्यातूनच त्याने हे कृत्य केले. सकाळी डोंबिवली येथून भोसरीमध्ये पत्रे पोहचवण्यासाठी हे दोघे ट्रक घेऊन आले होते. मात्र, निगडीतील अंकुश चौकात आल्यानंतर अचानकपणे खिलेश्वरने चालकाच्या पोटात चाकूने वार केले यात चालक गंभीर जखमी झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – उभ्या केलेल्या वाहनाची काच फोडून रोख रकमेसह चीजवस्तु चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीला पिंपरी पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून साडे चार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
शंकर अशोक चव्हाण (वय 30, रा. खेड सटवाई, उत्तर सोलापूर), प्रकाश अशोक पवार (वय35, रा. हनमगाव, दक्षिण सोलापूर), प्रमोद विजय जाधव (वय 34, रा. शिवतीर्थ कॉलनी, थेरगाव) आणि करण मोहन सिंग (वय 25,चिंचपाडा, ऐरोली, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गेल्या आठवड्यात खराळवाडी पोस्ट ऑफीसजवळ डॉ. परेश चव्हाण यांनी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने एकूण दीड लाखांचा ऐवज चोरुन नेला. याच दिवशी डॉ. भूषण वाडेकर यांनी खराळवाडीतील केएसबी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या केलेल्या कारची काच फोडून रोख साडे पाच लाख रुपयांसह सहा लाख, 83 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.
या दोन्ही गुन्ह्याचा तपास करताना, या परिसरात एक रिक्षा संशयितपणे फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. या रिक्षाच्या क्रमांकावरुन मालकाचा शोध घेतला. प्रमोद जाधव ही रिक्षा चालवत असल्याचे समजल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींकडून रोख दोन लाख 40 हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व एक दुचाकी असा एकूण साडे चार लाखांचा ऐवज जप्त केला. पिंपरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – हातगाडी किंवा टपरीधारक अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यवसाय करताना स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिल्यास व्यवसाय वृद्धी होईल, असा विश्वास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अन्न विक्रेता विकास या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद केलेल्या शंभर विक्रेत्यांना परवाने व परन देण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी एस. एस. धुळे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, समिती सदस्य विजय शहापूरकर, अन्न सुरक्षा अधिकारी के. बी. जाधव, आर. जे. जेगटे, एल. एस. साळवे, आर. जी. नागवेकर, दिलीप करंजखेले आदी उपस्थित होते.
नारागुडे पुढे म्हणाले की, भविष्यात अन्न विक्रेता परवाने धारकास अन्न प्रशिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे. ग्राहक हा तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे खाण्यासाठी येत असतो. त्यांना स्वच्छ व आरोग्यदायी खाद्यपदार्थ देणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. या बाबतीत जो कायद्याचे उल्लंघन करेल त्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी शेवटी दिला.
महासंघाचे अध्यक्ष नखाते म्हणाले की, नव्या युगात नव्या संकल्पनेचे आकलन करून संत गाडगे बाबांनी घालून दिलेल्या स्वच्छतेचा आदर्श समोर ठेवून आपली गाडी किंवा स्टॉल आपल्या घरासारखी स्वच्छ ठेवली पाहिजेत. आज आपल्या समोर मॉल संस्कृतीचे मोठ्या आव्हान आहे. त्यामुळे आपली बोलीभाषा व व्यावसायिक मांडणी यात आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. अन्यथा मॉल संस्कृतीत आपले अस्तित्व धोक्यात येईल.
यावेळी सुमारे पाचशे खाद्य पदार्थ विक्रेते सहभागी झाले होते. सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभागाबद्दल प्रमाणपत्रे देण्यात आले. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी धुळे यांनी दृकश्राव्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन अस्मिता गायकवाड यांनी तर आभार दिलीप करंजखेले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ खंडीझोड, कासीम तांबोळी, मनोज पाटील, किरण साडेकर, प्रकाश साळवे, नितीन भराटे, ओमप्रकाश मोरया, ज्ञानेश्वर बिरादार, तुकाराम माने, मधुकर वाघ, सुरेश देंड, मनीषा राऊत, सुनंदा चिखले, सलीम हवालदार, गोपाल अहीर, पोपट सकट, वहिदा शेख, तुकाराम माने यांनी परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार (दि. 15) रोजी पाटस (दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी नाभिक समाजाबद्दल अपशब्द बोलून अपमान केल्याच्या विरोधात मावळ तालुका नाभिक संस्थेच्या वतीने जाहीर निषेधार्थ शनिवार (दि. 18) रोजी सलून बंद ठेवून निषेध करण्यात येणार असल्याचे निवेदन शुक्रवारी (दि.17) सायंकाळी मावळ नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांना दिले. या वेळी चंद्रशेखर शिंदे, शांताराम गायकवाड, निलेश मोरे, सौरभ दळवी, विवेक गायकवाड, राजेंद्र मोरे, हर्षल शिंदे, रवींद्र राऊत, रोहिदास आंबेकर, किसान आंबेकर, ज्योतिराम गायकवाड ब बहुसंख्य नाभिक समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – महापालिकेचे भाजप नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य लक्ष्मण धोंडू उंडे यांच्या मुलाला दिघीतील स.नं.84/2 ब मधील अनधिकृत बांधकामाबाबत दीपक लक्ष्मण उंडे यांचे नावे कलम 53 अन्वये पालिकेने नोटीस बजाविली आहे.
पिंपरी महापालिका हद्दीतील मौजे दिघी येथील स.नं. 84/2 ब मधील नगरसेवक लक्ष्मण धोंडू उंडे यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत पालिका निवडणूक विभागाने अहवाल मागितला आहे. तसेच संबंधित नगरसेवक उंडे यांच्या विरोधात तक्रार करुन चौकशीची मागणीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने हे बांधकाम अनधिकृत असल्याने दीपक लक्ष्मण उंडे यांचे नावे कलम 53 अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहे. याबाबतचा पुढील कार्यवाहीसाठी अहवाल निवडणूक विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे.
व्हीएस न्यूज - लोककल्याणकारी योजनेवरील खर्च कमी करुन परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कामगार कायदे बदलण्याचा घाट घालत रोजगार निर्मितीच्या नावाखाली नॅशनल एम्प्लॉयमेंट इन्हान्समेंट स्कीम (नीम) सरकार लादू पाहत आहे. त्यामुळे जुने कंत्राटी व कायम कामगार उध्वस्त होणार असल्याची भीती कॉम्रेड भालचंद्र कानगो यांनी आकुर्डी येथे व्यक्त केली.
ग्रीव्हज कॉटन ऍण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियनची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आकुर्डीतील श्रमशक्ती भवनामध्ये पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानाहून कॉम्रेड कानगो बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी युनियनच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. सभेमध्ये 31 डिसेंबर 2016 पर्यंतचा आर्थिक वर्षाचा ताळेबंद व अहवाल सादर करण्यात आला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली.
कॉम्रेड कानगो म्हणाले की, मोदी सरकार कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल करु पाहत आहे. याचा परिणाम कामगार वर्गावर जाणवत आहे. नीमच्या नावाखाली जुन्या कंत्राटी व कायम कामगारांना पर्याय म्हणून स्वस्तात मनुष्यबळ मिळवून देण्याचा मार्ग भांडवलदारांसाठी सरकारने खुला करुन दिला आहे. यामुळे कामगारांना तात्पुरता रोजगार मिळेल. मात्र, कायमस्वरुपी नोकरीला त्यांना मुकावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून अल्प वेतन मिळणार असल्याने त्यात उदारनिर्वाह देखील अशक्य होणार आहे. एकीकडे कामगार वर्गात अस्वस्थता असताना दुसरीकडे सरकारने नोट बंदी केली. या निर्णयाला एक वर्ष झाले. परंतु, देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. जुन्या व पारंपारिक व्यवसायावर नोट बंदीचा मोठा परिणाम झाला आहे. काळा पैसा मिळाला नाहीच उलट सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
जीएसटी विधेयक लादल्याने महागाई, बेरोजगारी आणि विषमता वाढत चालली आहे. वेळोवेळी कर्जमाफी व शेतमालाला योग्य हमी भावाचे गाजर दाखवून तसेच व्यापार नियोजनाच्या अभावामुळे सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचा आरोप कॉम्रेड कानगो यांनी केला. कामगार संघटनांचे मूलभूत हक्क व मागण्यांकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करुन सरकार परदेशी गुंतवणूक देशात आणून कामगारांना त्यांचे गुलाम करु पाहत आहे. खोट्या जाहिराती करुन सरकार प्रसार माध्यमे विकत घेवू पाहत आहे. मोदी सरकार पुन्हा निवडून न येण्याची काळजी कामगार वर्गाने घ्यावी ही येत्या काळाची व देशाची गरज असल्याचे आवाहन कानगो यांनी केले. कामगार नेते एम. बी. रोहम, एस. डी. गोडसे, टी. ए. खराडे यांनी सभेत मार्गदर्शऩ केले. प्रास्ताविक व्ही. व्ही. कदम यांनी केले. एस. जी. सुळके, एन. आर. आकोटकर, एम. आर. कुंभार, ए. एम. रोहम, यु. टी. धर्मगुत्ते, आर. एल. घाडगे, एस. बी. चौधर यांनी संयोजन केले.
संघटनेची कार्यकारिणी जाहीर…
सभेमध्ये ग्रीव्हज कॉटन ऍण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी भालचंद्र कानगो, उपाध्यक्षपदी एस. डी. गोडसे, आर. एम. डेमसे, एस. जी. सुळके, सरचिटणीसपदी एम. बी. रोहम, सहसरचिटणीपदी व्ही. व्ही. कदम,सचिवपदी टी. ए. खराडे, डी. पी. गायधनी, एस. बी. चौधर, खजिनदारपदी एम. आर. कुंभार, सहखजिनदारपदी के. एम. भांगरे, सदस्यपदी एन. आर. आकोटकर, ए. एम. गायकवाड, एस. व्ही. गोडसे, पी. आर. चौधरी, डी. एम. देवकाते, एस. आर. माने, टी. एन. गाडे, आर. बी. शिरसाठ, बी. बी. मांडे, आर. के. सावंडे, शिवा शेट्टी तसेच सभासदपदी ए. एस. कदम, के. एस वालकर, एल. एस. मारु, आर. एम. लोंढे, ए. एम. रोहम यांची निवड करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची माहिती
व्हीएस न्यूज - भूखंडाचा चालू बाजारभाव आणि अवैध बांधकाम नियमितीकरण दंड आकारून पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) हद्दीतील बांधकामे नियमित केली जाणार आहे. त्यासाठी आकुर्डीतील पीसीएनटीडीए कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. शुक्रवारपासून नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. संपादित क्षेत्रावरील बांधकामे नियमितीकरणासाठी भूखंडाची किंमतही बांधकामधारकाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सतीशकुमार खडके म्हणाले, महापालिका क्षेत्र आणि पीसीएनटीडीए क्षेत्रातील बांधकामे हा वेगवेगळा विषय आहे. पीसीएनटीडीएने संपादित केलेल्या जागांवर झालेली बांधकामे नियमितीकरण सरकारी धोरणानुसारच केले जाणार आहे. त्यासाठी अवैध आणि अतिक्रमित बांधकाम अशी वर्गवारी करण्यात आली आहे. पीसीएनटीडीए कार्यालयात या कामी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी नागरिकांना अर्ज जमा करता येणार असून त्यासाठी प्रति अर्ज दोनशे रूपये शुल्क आकारले जाणार आहे. नामिकासुचीतील वास्तुविशारदांमार्फत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. 31 डिसेंबर 2015 पर्यंतचीच बांधकामे नियमित केली जाणार आहे.
अर्जासमवेत भूखंड भोगवट्याबाबतचा कायदेशीर पुरावा, जसे भाडेपट्टा किंवा सातबारा किंवा इंडेक्ट टू, रजिस्टर्ड खरेदी खत, नोटरी केलेले खरदी खत किंवा कायदेशीर पुरावा आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2015 पूर्वी महापालिकेकडे टॅक्स भरलेले पुरावे, कर भरल्याची पावती, कर मागणीपत्र. बांधकामाचे खरेदीखत, अभिलेख पुरावा, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, विजेचे बील यासारखे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. नियमितीकरणाबाबतचे हमीपत्र, सिटी सव्रहे विभागाकडील मोजणी आणि मोजणी शुल्क, अधिकमुल्य, विकास प्रशमन शुल्क भरण्यासंदर्भात संमतीचे हमीपत्र, बांधकामाचे स्थळदर्शक नकाशे चतु:सीमांसह चार प्रति देणे आवश्यक आहे. तसेच स्ट्रक्चरल ऑडीटचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक सहधारक असल्यास त्या भूखंडावरील सहधारकांचे एकत्रित अर्ज आणि हमीपत्र देता येणार आहे.
असा असेल रहिवास क्षेत्रासाठी दंड…
रहिवास क्षेत्रासाठी चालू बाजारभावाप्रमाणे जागेची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्याचबरोबर विकास शुल्कही आकारण्यात येणार आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ गुणिले जमीनीचे बाजारमुल्य तक्यातील दर, गुणीले अर्धा टक्का, बांधकामाचे क्षेत्रफळ, जमीनीचे बाजारमुल्य तक्यातील दर गुणीले दोन टक्के असे विकास शुल्क तसेच इतकेच पायाभूत सुविधा शुल्क, तसेच प्रशमन शुल्क हे विकास शुल्काच्या दुप्पट असणार आहे.
वाणिज्य वापरासाठी दुप्पट दर…
रहिवास वापर आणि वाणिज्य वापरासाठी वेगवेगळे दर असणार आहेत. रहिवासासह वाणिज्य वापरासाठी रहिवास दराच्या दीडपट आणि वाणिज्य वापरासाठी दुप्पट दर लागू असेल. वाणिज्य वापरासाठी रेडीरेकनरच्या दुप्पट दर आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर विकास शुल्क, पायाभूत सुविधा शुल्क तसेच प्रशमन शुल्क भरावे लागणार आहे. पीसीएनटीडीए परिसरातील बांधकामांसाठी एक चटई निर्देशांक संमत आहे. याशिवाय बाल्कनी, पॅसेज, टेरेस, जिना या करीता अधिमूल्य (प्रिमीयम) भरावा लागणार आहे. वाढीव मजले नियमितीकरणासाठी जादा दर भरावा लागेल.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002