व्हिएस न्यूज – मेघालयच्या मुख्यमंत्रिपदी नॅशनल पीपल पार्टीचे (एनपीपी) अध्यक्ष कोनराड संगमा विराजमान झाले असून संगमा यांना मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या सोहळ्यास गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित आहेत.
३४ आमदारांनी नॅशनल पीपल पार्टीला पाठिंबा दिला असून संगमा यांनी ४ मार्च रोजी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली होती. भाजप-एनपीपी यांच्या युती सरकारमध्ये युडीपीचे ६, एनपीपीचे १९,पीडीएफचे ४, एचएसपीडीपीचे २, भाजपचे २ आणि १ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस राज्यात सर्वाधिक २१ जागा जिंकलेला पक्ष आहे. पण ३१ हा बहुमताचा आकडा पार करण्यासाठी त्यांना मित्रपक्षांना सोबत घेता न आल्यामुळे त्यांना सत्तेत सहभागी होता आले नाही.
व्हीएस न्यूज - पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्सला कर्ज दिल्याप्रकरणी गंभीर आर्थिक फसवणूक चौकशी विभागाने (एसएफआयओ) आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोच्चर आणि अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा यांना समन्स बजावले आहे. चंदा कोच्चर व शिखा शर्मा यांनी स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीने आज एसएफआयओसमोर हजर राहून पीएनबीच्या बनावट एलओयूना प्रतिसाद देत गीतांजली जेम्सला ५ हजार २०० कोटी रुपये कसे दिले याची माहिती द्यावी, असे समन्समध्ये म्हटले आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी आरोपी आहेत. मेहुल चोक्सीच्या कंपनीला ५ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्यांमध्ये या बँकांचाही समावेश होता. तपासाबाबत या बँकांकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. कोच्चर व शिखा शर्मा यांनी स्वत: किंवा त्यांच्या प्रतिनिधीने एसएफआयओच्या कार्यालयात हजर राहावे, असे समन्समध्ये म्हटले आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी सीबीआयने आणखी एकाला ताब्यात घेतले. गीतांजली समुहाचा उपाध्यक्ष विपूल चितालीया याला सीबीआयने ताब्यात घेतले. मुंबई विमानतळावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. तिथून त्याला वांद्रे – कुर्ला संकुलातील सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. विपूल चितालीयाचा या घोटाळ्याशी नेमका काय संबंध होता, हे अद्याप समजू शकलेले नाही.
व्हीएस न्यूज - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थार येथील कृष्णाकुमारी कोहली यांनी नवा इतिहास रचला असून त्या पाकिस्तानच्या सिनेटवर विजय मिळविणाऱ्या पहिल्या हिंदू-दलित महिला बनल्या आहेत. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या ३९ वर्षीय कोहली या सदस्य आहेत.
कोहली अल्पसंख्यांकांच्या हक्क आणि अधिकारासाठी काम करतात. त्यांनी मुस्लिमबहुल प्रांतात मिळविलेल्या विजयाने अल्पसंख्यांकांसाठींच्या अधिकार चळवळीला बळ येणार आहे. थारमधील नगरपारकर जिल्ह्यात कोहली या राहतात. त्यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या कोहली यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्रात विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
व्हीएस न्यूज – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी २० मार्च रोजी कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार असून राहुल गांधी २० आणि २१ मार्चला ते म्हैसूर आणि किनारपट्ट्यातील विविध सभा आणि बैठकांना उपस्थित राहतील, अशी माहिती पक्षाचे राज्याचे सचिव के. सी. वेनुगोपाळ यांनी दिली. काँग्रेसने १० फेब्रुवारीला प्रचाराला सुरुवात केली. गांधींनी आत्तापर्यंतच्या २ टप्प्यात ६ जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. काँग्रेसने प्रचारासाठी ‘जनाशीर्वाद यात्रे’ची सुरुवात केली होती. राहुल गांधींनी या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांना भेटी दिल्या होत्या. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची समाप्ती २६ फेब्रुवारीला झाली. एप्रिल-मेमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून सध्याच्या सरकारचा कार्यकाळ २८ मे रोजी संपणार आहे. सध्या २१ राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे.
व्हीएस न्यूज – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ईशान्येकडील विजयानंतर नागपुरातील संघ मुख्यालयात पक्षाची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. तब्बल साडेतीन तास भागवत-शहा यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान त्रिपुरा, नागालँडच्या निवडणुकीसोबतच आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.
शहा यांची सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह भैय्याजी जोशी, सहसरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रय होसबळे आदी नेत्यांसोबत चर्चा झाली. नागपुरात ९ मार्चपासून अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात आली आहे. संघ आणि संघाशी संबंधित विविध संघटनांची यात महत्त्वपूर्ण बैठक मानली जाते. संघाची राजकीय शाखा म्हणून भाजपचे प्रतिनिधीही यात सहभागी होतात.
वर्षभर झालेल्या कामाचा आणि पुढील वर्षी करावयाच्या कामांचे नियोजन या बैठकीत केले जाते. अमित शहा यांनी त्यानुसार सरसंघचालकांकडे भाजपचे रिपोर्ट कार्ड सादर केले तसेच पुढील तीन वर्षांच्या नियोजनावरही चर्चा केली. यावेळी संघातर्फे अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वाद निर्माण होत आहे त्या नेत्यांवर अंकुश ठेवावा, अशी भूमिका मांडण्यात आली तर, भारतीय मजदूर संघातर्फे सरकारविरोधात वक्तव्य केली जात आहे विहिपनेही एल्गार केला आहे संघाने त्यांची समजूत काढावी, अशी भाजपची मागणी आहे. ईशान्येकडील राज्यात घवघवीत यश संपादन केल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
व्हीएस न्यूज – व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकदा पाठवलेला मेसेज यापूर्वी डिलीट करता येत नव्हता. पण तो मेसेज अलीकडे काढून टाकता येऊ लागला होता, पण त्यासाठी सात मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. यापुढे ६८ मिनिटे म्हणजे ४०९६ सेकंदात तुम्ही व्हॉट्सअॅपवरचा मेसेज डिलिट फॉर एव्हरीवनच्या मदतीने काढून टाकू शकता.
ही सुविधा व्हॉट्सअॅपच्या बिटा आवृत्ती वापरणाऱ्यांना उपलब्ध असून बिटा २.१८.६९ ही ती आवृत्ती आहे. याशिवाय आता स्टिकर्स पाठवता येणार आहे. डिलिट फॉर एव्हरीवन सेवा आता आयओएसवर दिली जाणार आहे, जी अँड्राइड बिटा आवृत्तीत आहे. डिलिट फॉर एव्हरीवन ही सुविधा फार महत्त्वाची असल्यामुळे चुकीने पाठवलेले संदेश रद्द करता येतात. ही सुविधा स्नॅपचॅट व फेसबुक मेसेंजरवर आधीच होती.
व्हीएस न्यूज – शिवसेनेने त्रिपुरातील भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारे सुनील देवधर यांचे भरभरुन कौतुक केले असून आम्हाला त्रिपुरात भाजपला विजय प्राप्त करुन देणाऱ्या सुनील देवधर यांचा कौतुक आणि अभिमान असून त्रिपुरातील विजय हा वाळवंटातून केशराचे पंचवीस मण पीक काढल्यासारखे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
भाजपने गेल्या २५ वर्षांपासून डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुराच्या लाल किल्ल्यामध्ये भगवा फडकवला. महाराष्ट्रातील सुनील देवधर यांचे भाजपच्या या विजयात मोलाचे योगदान आहे. देवधर यांचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भरभरुन कौतुक करण्यात आले. काँग्रेसने ईशान्येकडील राज्यांकडे कधीच गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे ईशान्येतील सत्ता परिवर्तन महत्त्वाचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
सुनील देवधर आणि त्यांच्या टीमने अफाट मेहनत घेत त्रिपुरातील नापीक जमिनीत गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मराठी सुभेदार सुनील देवधर यांनी जे पेरले ते आता उगवले. सभा, भाषणे किंवा थापेबाजीमुळे नव्हे तर देवधर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हा विजय मिळाला, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले. भाजपचा एक तरी आमदार त्रिपुरात निवडून येईल का, अशी शंका असताना देवधर यांनी भाजपचे सरकार आणले. मेघालय व नागालँडमध्ये भाजपने विजयासाठी झोकून दिले. पण त्रिपुरात देवधर यांनी एकाकी खिंड लढवली. ‘त्रिपुरा’तील भाजप विजय हा उत्तर प्रदेश व गुजरात विजयापेक्षा मोठा असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. आतापर्यंत देशाला भाजपला विजय प्राप्त करून देणारी फक्त दोनच माणसे माहीत होती. मात्र, १० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे. ईशान्येमध्ये साजऱ्या झालेल्या ‘त्रिपुरी’ पौर्णिमेचे हेच महत्त्व असून ‘तिसऱ्या’ आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे, असे सांगत शिवसेनेने देवधर यांचे कौतुक केले आहे.
व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची धुरा सांभाळल्यापासून पोलीस दलाची कार्यशैलीही बदलली आहे. योगी सरकारच्या पहिल्या १० महिन्यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या भीतीने ५५०० आरोपींनी आपला जामीन रद्द केला आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक ओमप्रकाश सिंह यांनी दिली.
ते म्हणाले, मार्च २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी १३३१ एन्काऊंटर केले आहेत. ३०९१ वाँटेड गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. काही गुन्हेगार अनेक वर्षांपासून फरार होते. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मागील १० महिन्यात ५४०९ गुन्हेगारांनी न्यायालयामार्फत आपला जामीन रद्द केला आहे. यावेळी होळीदरम्यान दोन गटातील वादाचे १४ प्रकरणे समोर आले. यामध्ये काही सांप्रदायिक वादांचाही समावेश आहे. हे वर्ष २०१३ पासून प्रत्येकवर्षी सरासरी ६० प्रकरणांहून कमी आहे. संपूर्ण तयारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे यावेळी होळीचा सण शांततेत साजरा करण्यात आल्याचे सिंह यांनी म्हटले. पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर मुस्लीम नेत्यांनी नमाजाची वेळ बदलली होती. त्यामुळेही कायदा व सुव्यवस्थेवर ताण आला नाही. सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून सर्व सण आणि सार्वजनिक कार्यक्रम पार पाडणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या मजकुरात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण (एनसीईआरटी) समितीने अखेर महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याबद्दल यापूर्वीच्या पुस्तकात असणाऱ्या ‘अवर पास्ट-2’ या विभागात अत्यंत त्रोटक माहिती असल्यामुळेपाठ्यपुस्तकात बदल करण्यासाठी शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या मोगल राजांच्या माहितीसाठी सातवी इयत्तेच्या या इतिहासाच्या पुस्तकातील १५४ पृष्ठांपैकी बहुतांश पृष्ठे खर्ची घालण्यात आली आहेत, तर केवळ ६ ओळींत छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडून संपवण्यात आला, असे शिवसेनेचे म्हणणे होते.
त्याचबरोबर शिवरायांचे चित्र पुस्तकात जागा असूनही छापले नाही. याउलट बाबर आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांची छायाचित्रे मात्र पुस्तकात छापण्यात आली होती. शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला होता. राज्य सरकारला ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमात २५ टक्के बदल करण्याचा अधिकार असतो. तत्कालीन काँग्रेस सरकारने गोव्यात आंदोलन केल्यानंतर पूर्ण पाठ्यपुस्तकच बदलले होते. पण गेली ८ वर्षे केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करूनही, छत्रपतींच्या जन्म आणि कर्मभूमीतच त्यांची उपेक्षा होत आहे, असे मत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकात काही बदल ‘एनसीआरटी’कडून करण्यात आले. त्यानुसार आता ‘अवर पास्ट-२’ या विभागातील तिसऱ्या आणि दहाव्या धड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या मजकुरात १०० शब्दांची भर घालण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी महाराजांचे गनिमी पद्धतीचे युद्धतंत्र, लहान वयात त्यांनी जिंकलेल्या लढाया आणि त्यांनी कशाप्रकारे भक्कम साम्राज्याची पायाभरणी केली, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. याशिवाय या धड्यांमध्ये शिवाजी महाराजांचे चित्रही छापण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी पोटदुखी आणि अस्थमाच्या त्रासामुळे भुजबळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भुजबळांना अन्ननलिका आणि आतड्यांचा आजार आहे. याआधी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मनी लॉड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ मुंबईतील आॅर्थर रोड कारागृहात कोठडीत आहे. मागील वर्षी प्रकृती बिघडल्याचे कारण देत ३५ पेक्षा जास्त दिवस छगन भुजबळ यांनी बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये उपचार घेतला होता.
व्हीएस न्यूज – सध्या सोशल मीडियावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रकृतीवरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून कदम साहेबांची प्रकृती उत्तम असून अफवांवर कोणाही विश्वास ठेवू नये, असे आवाहन यावर विश्वजित कदम यांनी केले आहे.
नुकतीच एक शस्त्रक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्यावर पार पडल्यामुळे पतंगराव कदम हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. पण सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीवरून उलट- सुलट पोस्ट व्हायरल होत आहेत. पतंगराव कदम यांच्या पकृतीबद्दल सर्वच स्तरातून यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक जण यामुळे चिंता व्यक्त करत आहेत. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांसह हितचिंतकांमध्ये या सर्व प्रकारामुळे अस्वस्थता पसरली आहे.
पतंगराव कदमांच्या स्वास्थ्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांमुळे कदम कुटुंबीय हैराण झाले आहे. विश्वजित कदम यांनी त्यामुळेच अखेर याप्रकरणी पतंगराव कदम यांच्या प्रकृतीबाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे. ज्यामध्ये सर्वांच्या आशीर्वादाने कदम साहेबांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे आणि लवकरच ते सर्वांच्या भेटीला येतील. त्यामुळे कोणत्याही अफवेवर कार्यकर्त्यांसह जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज– केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या शेतकऱ्यांच्या शेती मालावर आधारित मेक इन इंडियामार्फत भारत विकास ग्रुप (बीवीजी) राबवत असलेल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचीही यावेळी उपस्थिती होती.
राज्यातील पहिल्या आणि अत्याधुनिक मेगा फूड पार्कचा उद्घाटन सोहळा सातारा येथे मोठ्या दिमाखात पार पडला. हा मेगा फूड पार्क एकूण ६६ एकरमध्ये उभारण्यात आला आहे. १ लाख मेट्रिक टन अन्नधान्यावर वर्षाला प्रक्रिया या पार्कमध्ये होईल. ५००० रोजगारांच्यासंधी या माध्यमातून निर्माण होणार असून याचा लाभ २३ हजारांवर शेतकर्यांना मिळणार आहे. २४ तास एक्सप्रेस फीडरने या पार्कला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतीवरील संकटे दूर करण्यासाठी शेती पूरक उद्योगांना चालना द्यावी लागेल, असे सांगितले. महाराष्ट्रातील कोल्ड स्टोअरेजना अल्पदरात वीज देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सोलर फिडर योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसादेखील वीज उपलब्ध करुन देता येईल, असेही ते म्हणाले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002