व्हीएस न्यूज - पोलिसात तक्रार दिली या रागातून शेजाऱ्यावरच कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना देहूरोड येथील आंबेडकरनगर येथे रविवारी रात्री आठ वाजता घडली. अविनाश ज्ञानदेव भोसले (वय 40 रा.आंबेडकरनगर) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. विजय राजू पिल्ले (रा. आंबेडकरनगर) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले व पिल्ले हे दोघे शेजारी राहतात. पिल्ले हा त्याच्या मित्रमंडळींना घेऊन रात्री दारातच गप्पा मारत बसतो. वेळोवेळी सांगूनही तो ऐकत नाही अशी तक्रार भोसले यांनी 2 जानेवारीला देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून 'तू माझ्या विरुद्ध अशी तक्रार पोलिसात का केली', असा जाब विचारात पिल्ले यांनी भोसलेच्या हातावर कोयत्याने वार केले. यामध्ये भोसले गंभीर जखमी झाले आहेत. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - विदेशी दारूची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. तळवडे येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांकडे नागरिकांनी यासंबंधी तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तळवडे येथील कृष्णाई हॉटेलवर कारवाई करून 1190 रुपयांची विदेशी दारू जप्त केली. हॉटेल मालक फरार झाला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - टेम्पो ट्रॅव्हलरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माणगाव, पारखी वस्ती येथे सोमवारी पहाटे घडली. मंगेश मुरलीधर कणसे (वय 25, मूळ रा, लिंबाचीवाडी सातारा) संभाजी बिराप्पा गराळे (वय 25, मूळ राहणार जत, सांगली) असे मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. याप्रकरणी वैभव कणे (वय-30, रा. जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश व संभाजी पिरंगुट येथे एका कंपनीत कामाला होते. सोमवारी पहाटे ते माणगावातून गोठवडे येथे दुचाकीवरून जात होते. पारखी वस्ती येथे एका टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. फौजदार महेश आबनावे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या दोन महिलांचे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दिड लाख रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. या घटना वाकड व हिंजवडीत रविवारी रात्री घडल्या.
वाकड येथील घटनेप्रकरणी 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी महिला वाकड येथील पलाश सोसायटी समोरून जात होती. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 38 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. हिंजवडी येथील घटनेप्रकरणी 57 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला बावधन येथील भगवती माईल्स्ट्रो इमारत येथून पायी जात होती. त्यांच्या गळ्यातील 1 लाख 12 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणी व मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेले. वाकड, हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - सद्य परिस्थितीत देशात शांतता,सहिष्णुता वाढीस लागण्यासाठी रक्त पिपासूंपेक्षा रक्तदात्यांची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी येथे केले.
विश्व विवेक फाऊंडेशन आणि नावंदर कुटुंबियांच्या वतीने प्राधिकरण निगडी येथील संत तुकाराम उद्यानात आज रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खा. साबळे बोलत होते यावेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी महापौर आर. एस. कुमार, संयोजक नगरसेवक बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर, भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सचिन नावंदर, विजय सिनकर, संजय मंगोडेकर,सुभाष नावंदर, सुरेश नावंदर, सचिन नावंदर, आधार ब्लड बँकेचे मकरंद शहापुरकर आदी उपस्थित होते.
साबळे म्हणाले, गेली एकवीस वर्षे कै. अशोक नावंदर यांनी सुरु केलाला रक्तदान शिबीराचा यज्ञकुंड असाच पुढे सुरु रहावा. निस्पृहपणे त्यांनी सुरु केलेले समाजकार्य त्यांची पुढची पिढी करीत आहे. नावंदर परिवाराने सुरु केलेली मोफत स्वर्गरथ रुग्ण वाहिका सेवा समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे. राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी देखील शुभेच्छा दिल्या. स्वागत बाबू नायर, सूत्र संचालन सलीम शिकलगार, राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - उत्तम वक्ता निर्माण होण्यासाठी अभ्यासूवृत्ती, वाचन, भाषेची जाण, वक्तशीरपणा, समयसूचकता या गुणांची आवश्यकता आहे. आपले मत मार्मिक पद्धतीने मांडल्यास समोरच्या व्यक्तींना पटते. वक्ता व श्रोता या दोन्हीही बाबी उत्तम वक्तृत्वासाठी आवश्यक असल्याचे मत ॲड. रविंद्र यादव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिचंवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 'स्पिकर्स फोरम' या विद्यार्थी केंद्रबिंदू असलेल्या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कलेची जोपासना करून त्यामार्फत विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करावी हा स्पिकर्स फोरमचा मुख्य हेतू आहे. यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, प्रा. विजय नवले, प्रा. नितीन धवस आदी उपस्थित होते.
ॲड. यादव म्हणाले की, सकस विचार करणारे प्रभावी वक्ते समाजासाठी गरजेचे असतात. सचिव संतोष खांडगे म्हणाले की, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पिकर्स फोरमचे असणारे महत्व व उत्तम वक्ता निर्माण होण्यासाठी विद्यार्थी दशेतूनच आवश्यक असणारे प्रयत्न संस्था करीत आहे. विद्यार्थ्यांसाठी असा अभिनव उपक्रम चालू केल्याबद्दल त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थी विकसन विभागाचे कौतुक केले. येथे वक्तृत्व प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल. प्रास्ताविक प्रा. विजय नवले, सूत्रसंचालन प्रा. अर्चना भसे, आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची (पीसीसीओईआर) अंजली टेके या विद्यार्थिनीला जपान (टोकिओ) मधील आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी कंपनीत सतरा लाखांचे घवघवीत‘पॅकेज’मिळाले असल्याची माहिती पीसीईटीचे सेंट्रल प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी दिली. अंजली ही पीसीसीओईआर मध्ये संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. तिने जपानी भाषेत पारंगतता मिळविली असल्यामुळे ही संधी तिला मिळाली. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे अंजलीचा सत्कार करताना म्हणाले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅम्पस प्लेसमेंटची सुरुवात झाली आहे. यापूर्वीही अनामिका कुमारी हीला अकरा लाख तर व्यंकटेश अय्यर ह्यास बत्तीस लाखांचे पॅकेज मिळाले होते. परंतु अंजलीची ही नियुक्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर झाल्याने पीसीईटीच्या नावलौकिकात भर पडली आहे. यावेळी संस्थेचे सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस. डी. गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी तिचे कौतुक केले.
व्हीएस न्यूज - पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका कविता संदेश आल्हाट यांची महाराष्ट्र मुलींच्या (19 वर्षाखालील) कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुलनात डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे सराव शिबीर संपन्न झाले. कविता आल्हाट या कबड्डी राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच आहेत. तसेच मोशी येथील लक्ष्यवेध स्पोर्टस् फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. डॉ. डी.वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या मृदुला महाजन यांचे नेहमी आल्हाट यांना मार्गदर्शन लाभते. प्राचार्यांनी आल्हाट यांचे अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. जानेवारी 2018 मधील दिल्लीत होणा-या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आल्हाट या महाराष्ट्र कबड्डी मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी काम पाहणार आहेत.
रविवारी आकुर्डीत पुरस्कार वितरण सोहळा
व्हीएस न्यूज - आकुर्डीतील बीना एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा 2017 चा कौमी एकता पुरस्कार मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 7 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता बीना इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मैदानावर होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती बीना एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे सचिव रफीक आतार, मुख्याध्यापिका समीना मोमीन, खजिनदार हमजा खान, सरचिटणीस आझम खान, विश्वस्त मतलूब उस्मानी, अकमल खान, अब्दुलाह खान आदी उपस्थित होते.
या पुरस्काराचे वितरण कर्नल इर्षाद अहमद खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि प्रमुख पाहुणे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश पाटील आदी उपस्थितीत राहणार आहेत. मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना आतापर्यंत तीन राष्ट्रपती शौर्यपदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील गुन्हेगारी जगतावर प्रकाशझोत टाकणारे ‘बेमिसाल’खरे अनुभव इसाक बागवान हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांनी एकूण पस्तीस वर्षे पोलिस खात्यात सेवा केली. 1984 साली मन्या सुर्वे याचा मुंबईत एन्काऊंटर केला. 26/11 च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ला परतवून लावण्यात बागवान यांनी महत्वपुर्ण कामगिरी केली. अशी माहिती इकबाल खान यांनी दिली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002