व्हीएस न्यूज - शिक्षणाची रचना करताना शहरी व ग्रामिण भागाचा स्वतंत्र विचार व्हावा. आगामी शंभर वर्षांनी समाज कसा असेल? त्याला सामोरे जाण्यासाठी आजचे ‘हे’ विद्यार्थी सक्षम असावेत अशी शिक्षण पध्दती असावी. तसेच शिक्षण क्षेत्राबरोबरच भारतात मुलभूत ते अत्याधुनिक अशा सर्वच क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे. तंत्रज्ञान चांगले का वाईट हे वापरणाराच्या बुध्दीवर अवलंबून असते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग सतत वाढत आहे. त्याचा प्रभाव देखील माणसांवर वेगाने वाढत आहे. पध्दतीत बदल होण्याचा काळ कमी कमी होत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या रचनेत म्हणजेच ज्ञानरचनेत दूरगामी टिकेल अशी शिक्षण पध्दती शोधून काढावी लागेल. असे मार्गदर्शन जेष्ठ शास्त्रज्ञ राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर पुणे, नवी सांगवी येथे तीन दिवसीय 24 वे राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) झाला. यावेळी समारोप सत्राच्या कार्यक्रमात अनिक काकोडकर, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे संस्थापक प्रा. रमेश पानसे आदींसह राज्यभरातून सहभागी झालेले शिक्षक उपस्थित होते.
काकोडकर म्हणाले की, सरकारच्या कोणत्याही खात्यात ‘बालशिक्षण’ येत नाही. त्या दुर्लक्षित परंतू अत्यंत आवश्यक असणा-या क्षेत्रात महाराष्ट्र बालशिक्षण परिषद अनेक वर्षांपासून काम करते हे कौतुकास्पद आहे. पाश्चिमात्य देशात शिक्षण, मेंदू, तंत्र, तंत्रज्ञान या विषयी अधिक संशोधन झाले आहे. मात्र भारतात मेंदू या विषयावर संशोधन करणारे विद्यार्थी देखिल मिळत नाही हि चिंतेची बाब आहे. मेंदूचा विकास आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतो. असेही मागदर्शन अनिल काकोडकर यांनी केले.
एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, मानवी बुध्दीमत्ता विचारांची निर्मिती करु शकते, तर तंत्रज्ञान उत्पादनांची निर्मिती करु शकते. प्रज्ञा आणि प्रतिभेची निर्मिती करणे म्हणजे ज्ञान होय. तंत्रज्ञानाने माणसाला यंत्र करता आले. परंतू माणसामध्ये असणारी सर्जनशिलता, विवेक, भावना, निर्णयक्षमता यंत्रामध्ये आणता आली नाही. आपल्याला अजून मानवी मेंदूचे, बुध्दीमत्तेचेच पुर्ण आकलन झालेले नाही. मानवी बुध्दीमत्तेचा कृत्रिम अविष्कार अद्याप शक्य नाही. मानवी बुध्दीमत्ता आणि संगणची न मानवी बुध्दीमत्ता एकमेकाच्या विरुध्द टोकाला आहे. मानवी मेंदू जे करु शकतो ते तंत्रज्ञान, संगणक, गुगल करु शकत नाही. परंतू जे काम अनेक माणसांना, संस्थांना, सरकारला एकत्र येऊन देखिल करणे शक्य नाही ते काम संगणक त्याच्या आज्ञावली, प्रणाली नूसार क्षणार्धात करु शकते. मेंदूचे आकलन आणि संगणकाचे तंत्रज्ञान एकत्र येऊन अनेक नविन अविष्कार आगामी काळात जन्माला येतील. त्यातून पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, जागतीक तापमान, शिक्षण संपत्ती, जीवांचे रक्षण, ऊर्जेचा प्रश्न, सोलर, इलेक्ट्रिक कारची निर्मिती असे अनेक जटील प्रश्न सुटण्यास मदत होईल. असा आशावाद विवेक सावंत यांनी व्यक्त केला.
या अधिवेशनात बालकांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. तो खालील प्रमाणे
1) मानवाचा भविष्यकाळ हा बालकात साठवलेला असतो. कल्याणकारी मानवी जीवनाचे संचित बालकाच्या रुपाने मानवाच्या प्रत्येक पिढीत अस्तित्वात असते. मानवाच्या हितासाठी या पुढच्या पिढीचे जतन करणे, तिची जोपासना करणे आणि तिला नवजीवनाला तयार करणे हे प्रत्येक प्रौढ पिढीचे आद्य कर्तव्य असते.
2) संपूर्ण प्राणीविश्वात फक्त मानवाचे बालक दीर्घकाळ परावलंबी असते, ही निसर्गदत्त बाब विचारात घेऊन, या परावलंबित्वाच्या काळात प्रत्येक बालकाचे संरक्षण करणे व त्यास आवश्यक ती मदत देऊन विकासप्रवण करणे, हे प्रत्येक कुटूंबाचे आद्दय कर्तव्य असते.
3) प्रत्येक बालकाला त्याच्या बाल्यावस्थेत, बालकाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. बालकाचे बाल्य हरवणार नाही याची काळजी समाजाने घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचे आचार, विचार, श्रम, विद्या यांचे प्रौढत्व बालकावर लादून त्याचे दमन व शोषण होणार नाही हे समाजाने व सरकारने पाहिले पाहिजे.
4) जन्मल्यापासून प्रत्येक बालक हे वयाने, शक्तीने, ज्ञानाने व अनुभवाने लहान असले तरी ते म्हणजे एक संपूर्ण मनुष्य आहे, त्याला त्याचे शरीर, मन आहे, त्याला त्याच्या भावना आहेत, त्याची कल्पनाशक्ती आहे, एवढेच नव्हे तर त्याची स्वतंत्र अशी तर्कशक्ती आहे याची दखल,कुटूंबातील व समाजातील सर्वांनी घेतली पाहिजे.
5)प्रत्येक बालकाला उपजत काही लाभ मिळालेला असतो. हे लक्षात घेऊन त्याच्या उपजत बुध्दिमत्तांचा शोध घेण्यासाठी त्याला अनुभवयुक्त शैक्षणिक संधी प्राप्त झाल्या पाहिजेत, त्याच्या बुध्दिमत्तांनुसार वाढण्याचा व विकासाच्या संधी त्याला मिळाल्या पाहिजेत.
6)प्रत्येक बालक म्हणजे एक स्वतंत्र नैसर्गिक घटक आहे. त्यामुळे त्याला स्वत:च्या क्षमतांनुसार, स्वत:चा कल लक्षात घेऊन प्रगती करण्यास वाव मिळाला पाहिजे.
7)प्रत्येक बालकाला त्याच्या कुटूंबात, समाजात व विश्वात समान स्थान व समान मान मिळण्याचा अधिकार आहे. धर्म, वंश, वर्ग, जाती, लिंग व स्थान यांवरून होणा-या भेदांपासून बालकाचे जीवन अलिप्त राहिले पाहिजे. कुटूंबातील व समाजातील सर्व सुख सोयींमध्ये बालकाचा समान वाटा मानला व राखला गेला पाहिजे.
8) समाजातील एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रत्येक बालक आदरास प्राप्त आहे. निसर्गाने त्याला बहाल केलेले स्वातंत्र्य जपण्याचा हक्क आहे आणि हेच त्याच्याप्रती इतरांचे कर्तव्य आहे.
9)बालकाच्या उपजत बुध्दिमत्ता, नैसर्गिक क्षमता व बालसुलभ इतर गरजा विचारात घेऊनच, बालकासाठी शिक्षणव्यवस्था निर्माण झाल्या पाहिजेत. तेथे स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे, त्याच्या स्वयंप्रेरणेला, स्वयंस्फूर्तीला आणि स्वयंशिस्तीला पूर्णांशाने वाव मिळाला पाहिजे.
10) बालकाच्या बौध्दिक, भावनिक आणि एकूण विकासक स्वातंत्र्यातच बालकात सुप्त असलेल्या प्रौढाचे स्वातंत्र्य अनुस्युत आहे. यातच राष्ट्राचे भवितव्य सुखरुप आहे आणि मानवी जीवनाचे विकासक स्वातंत्र्य अबाधित आहे. याची खूणगाठ प्रत्येक माणसाने आपल्या मनाशी बांधली पाहिजे. बालकाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक माणसाने झटले पाहिजे.
अहवाल वाचन आणि अधिवेशनाचा आढावा संस्थेच्या माजी सचिव आदिती नातू, स्वागत प्रशांत शितोळे, सुत्रसंचालन मेघना बाक्रे आणि आभार नजीर जमादार यांनी मानले.
व्हीएस न्यूज - निगडी येथिल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयटी क्षेत्रातील अग्रगण्य प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीचा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. अभियांत्रिकी पदवी मिळविणा-या विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत असे वार्षिक 26 लाख रुपयांचे भरघोस पॅकेज देणा-या डायरेक्टी कंपनीच्या या रोजगार मेळाव्यात विद्यापीठाअंतर्गत शंभर महाविद्यालयातील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. उत्तम प्रोगॅमिंग कौशल्य असणाऱ्या अभियंत्यांची हि कंपनीची निवड करणार आहे. ऑनलाईन मुलाखतीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असून पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष मुलाखतीचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.
या रोजगार मेळाव्याच्या आयोजनासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर प्रा. हरिष तिवारी, पद्माकर विसपुते यांनी सहकार्य केले. आयोजनात ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, विजय टोपे, श्रेणीक ललवाणी, सायली पुजारी,मंगेश काळभोर, श्रीधर, सौम्या आदींनी सहभाग घेतला होता.
व्हीएस न्यूज - मुलांमध्ये निरीक्षण शक्ती वाढविणे, सर्जनशीलता जागृत करणे यासाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षकांनी पालकांसह एकत्रीत प्रयोग करावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ग्रहण शक्ती वाढते. मुलांना नुसती साधनं उपलब्ध करुन देऊन काही साध्य होणार नाही. त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांनी वेळ देणेही महत्वाचे आहे. व्हॉट्सअप, फेसबुक अशा नवतंत्रज्ञानाबाबत शिक्षकांनी भिती बाळगू नये. या तंत्रज्ञानातून अनेक चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवता येतील. बहुवर्ग अध्यापन पध्दती शक्य तेथे वापरावी. यातून वेळ वाचेल व अनुभवांची देवाणघेवाण करता येईल. तंत्रज्ञान हा पर्याय नसून एक जोड आहे. असे मार्गदर्शन जेष्ठ बाल शिक्षण तज्ञ सुचेता फडके यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर पुणे, नवी सांगवी येथे तीन दिवसीय 24 वे राज्य स्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. त्याच्या दुर-या दिवशीच्या ‘तंत्रज्ञान वापराचे माझे प्रयोग’ या चर्चासत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुचेता फडके बोलत होत्या. यावेळी अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष प्रशांत शितोळे, मृदुला धोंगडे, संजय अष्टेकर, वैशाली सुर्यवंशी, प्रमोद शिंदे आदींसह राज्यभरातून सहभागी झालेले शिक्षक उपस्थित होते.
मृदुला धोंगडे म्हणाल्या की, मोबाईल नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन पालकांशी दुहेरी संवाद वाढवावा. याबाबत पालकांमध्ये जागरुकता निर्माण करुन पाल्याच्या शिक्षणासाठी याचा फायदा होतो का? हे तपासावे. पालकांकडून पाल्याला मिळालेले अनुभव विचारात घेऊन त्याचा संकल्पनांचे दृढीकरण करावे. मुलांना शाळेत शिकवताना आलेले अनुभव पालकांनी गप्पांच्या माध्यमातून समजून घ्यावेत आणि ते पालक सभेत किंवा व्हॉट्सअपव्दारे इतर पालकांना कळवावे. व्हॉट्सअप, फेसबुक, ऑडीओ, व्हिडीओ चित्रफितीचा वापर करुन विद्यार्थ्यांची आकरण शक्ती वाढविण्यासाठी अनेक छोटे मोठे प्रयोग करणे सहज शक्य आहे. यातून मुल शिकण्यासाठी वा अनुभव संपन्न होण्यासाठी फक्त शाळेवर अंबलबूंन न राहता पालकांना आपल्या पाल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण विस्तारीत होईल. पालक, शिक्षक संवादाला तंत्रज्ञानाची जोड देऊन वैचारिक संवाद वाढविता येईल. असे धोंगडे म्हणाल्या.
संजय अष्टेकर म्हणाले की, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार बालकेंद्री शिक्षणासाठी ज्ञानरचनावादी संकल्पना मुळ धरु लागली आहे. यामध्ये बहुवर्ग अध्यापन पध्दतीचा वापर करणे गरजेचे आहे. यात ज्ञानरचनावादी उपक्रमाचा वापर केल्यास मर्यादित वेळेत कृतीयुक्त, आनंददायी व तणावमुक्त शिक्षण देता येणे शक्य आहे. यातून विद्यार्थ्यांना स्वअनुभवातून शिकण्याची संधी मिळते. असे अष्टेकर यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक तुषार गजानन कामठे यांच्याविरोधात बनावट कागदपत्रांद्वारे निवडणूक लढवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामठे यांनी १२ वी पास असल्याचा बनावट दाखल सादर केला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, नगरसेवक कामठे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाले आहे. कामठे यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत कामठे यांनी १२ वी पास असल्याचा बनावट दाखला दिल्याचे निष्पन्न झाले. तुषार कामठे यांनी डेक्कन येथील एका महाविद्यालयातून ११ वी नापास असताना १२ वी पास असल्याचा बनावट दाखला बनवून तो सांगवी येथील घोलप महाविद्यालयात सादर करुन पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांनी हाच दाखला निवडणुकीच्या काळात सादर केला होता.
तुषार कामठे हे पिंपळे निलख येथील प्रभाग क्रमांक २६ (ब) येथून निवडणुकीला उभे राहिले होते. या निवडणुकीत ते काँग्रेसचे सचिन साठे यांच्याविरोधात मोठ्या फरकाने निवडून आले होते.
दरम्यान, जनतेची आणि महानगरपालिकेची दिशाभूल करून कामठे निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी साठे यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्यूज - चिंचवड येथील दवाबाजार येथे प्रेमप्रकरणातून तरुणाचा दगडाने ठेचून खून केलेल्या दोघा संशयित आरोपींच्या निगडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अर्जुन जेटीथोर व सूरज निसर्गन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज खांबे या तरूणाचे एका तरूणीशी प्रेमसंबंध होते. या तरूणीचे लग्न अन्य ठिकाणी जमले होते. परंतु, त्यानंतरही ते दोघे एकमेकांना भेटत होते. मंगळवारी (दि. 24) रात्री दहा वाजता सुरज खांबे हा तरूणीशी बोलत बसला होता. त्यावेळी पाठीमागून येऊन आरोपी अर्जुन आणि सूरज निसर्गननी सुरज खांबेला दगडाने मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील भोसरीत पोलीस अधिकाऱ्यासह हवालदाराला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. अटक टाळण्यासाठी 50 हजाराची लाच स्विकारताना शुक्रवारी (दि. 27) ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस चौकीतील सहाय्यक निरीक्षक सोमनाथ नाळे (वय 42) आणि पोलीस कॉन्स्टेबल वैभव चौधरी (वय 31) यांनी एका तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. भोसरी पोलीस ठाण्यात घरगुती वादातून एक तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरील कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित व्यक्तीने याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे अधिकारी आणि कॉन्स्टेबलच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने आज सापळा रचला.
तक्रारदार दुपारी एकच्या सुमारास 50 हजार रुपये घेऊन भोसरी पोलीस चौकीत आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबलला लाच स्वीकारताना हातोहात पकडले. अवघ्या तीन दिवसातच लाचखोरीची दुसरी घटना समोर आल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.
व्हीएस न्यूज – शहरातील उघड्यावर शौचास बसणारी 52 ठिकाणे महापालिकेने निश्चित केली असून, त्या ठिकाणी सुमारे 244 “पोर्टेबल टॉयलेट’ उभारण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला.
स्वच्छ भारत अभियानतंर्गत पिंपरी-चिंचवड शहर हागणदारीमुक्त व्हावे, याकरिता महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियान विभागाकडून प्रयत्नाची पराकाष्टा सुरु आहे. परंतु, शहरातील काही ठिकाणे नागरिकांना किती प्रबोधन केले,तरीही ते लोक रस्त्यावरच्या कडेला उघड्यावरच शौचास बसत होते. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने “पोर्टेबल टॉयलेट’ उभारण्यात आलेले आहेत. यामध्ये शहरातील आठही प्रभागात उघड्यावर शौचास बसणाऱ्या 52 ठिकाणी 244 “पोर्टेबल टॉयलेट’ बसविण्यात आली आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर हागणदारी मुक्त शहरासाठी विविध उपक्रमांचे आयोजन सुरू आहे. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत साडेसात हजार वैयक्तिक शौचालयांची उभारणी केली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी,यासाठी सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथक कार्यरत आहे. उघडयावर नागरिक शौचास बसतात, त्या 52 ठिकाणे “गुड मॉर्निंग’ पथकाने शोधून काढली आहेत. यामध्ये रेल्वे स्थानक परिसर, रस्ते, मोकळ्या जागा,नाल्यांच्या जवळ, झोपडपट्टी आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिक उघड्यावर शौचास बसतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उघडयावर न बसता शौचालयांचा वापर करावा, यासाठी महापालिकेने विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले. यासाठी शहरात”पोर्टेबल टॉयलेट’ बसविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत “अ’ क्षेत्रीय कार्यालयात 50, “ब’ मध्ये 44 , “क’मध्ये 65 , “ई’ मध्ये 45 आणि “फ’क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 40 अशी तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारलेली आहेत.
व्हीएस न्यूज – श्वानप्रेमीं मंडळींसाठी येत्या रविवारी (दि.29) चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय “ऑल ब्रीड चॅम्पीयन डॉग शो’ आयोजित करण्यात आला आहे. या “डॉग शो’मध्ये शहरवासीयांना 30 ते 35 प्रजातींचे श्वान पाहण्याची संधी मिळणार आहे.
वाल्हेकरवाडी रोड येथील आहेर गार्डन येथे सकाळी साडेसात पासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा “शो’ होणार आहे. डॉ. ओरलीनो होसाका (फिलीपीन्स) शरत शर्मा (गुडगाव), अंजली वैद (नवी दिल्ली) असे आंतरराष्ट्रीय पातळीचे परीक्षक, प्रशिक्षक, डॉक्टर्स व श्वानप्रेमी यांचा सहभाग यामध्ये असणार आहे.
मानव आणि श्वान यांच्यातील मैत्री वाढविण्यासाठी “डॉग शो’ सारखे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. याच हेतुने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी जर्मन शेफर्ड, बुलडॉग, हस्की, ब्रस्ट हौंड, बीगल अशा 30 ते 35 जातीचे300 पेक्षा जास्त श्वान या “शो’मध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती “शो’च्या समन्वयक संजीवनी पांडे यांनी दिली.
व्हीएस न्यूज – संजय लीला बन्साळी दिग्दर्शित “पद्मावती’ चित्रपटावर शुक्लकाष्ठ ओढावले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेल्या दृश्यांमध्ये राजपूत समाजासाठी देवीसमान असलेल्या राणी पद्मिनींबाबत अश्लील दृश्य दाखविण्याचा प्रयत्न भन्साळी यांनी केल्याचा आरोप राजपूत समाज संघटनेने केला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपट राजपूत समाजातील जाणकारांना दाखवून प्रदर्शित करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राजपूत समाजाने दिला आहे.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजपूत समाज संघटनेचे शहराध्यक्ष शिवकुमार बैस, राजपूत महामोर्चाच्या पिंपरी-चिंचवड प्रमुख नीता परदेशी यांनी शुक्रवारी (दि. 27) ही माहिती दिली. यावेळी युवा राजपूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर गिरासे, अनिल बैस, दीप्ती राजपूत, जगदीश सिंग भानूजा, अनिल सिंह बैस आदी उपस्थित होते. राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने पुणे जिल्ह्यात पद्मावती चित्रपटाचे एकही पोस्टर अथवा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना रविवार (दि. 29 ) निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी चित्रपट पद्मावतीच्या प्रदर्शनासाठी राजपूत समाज संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात येत आहे. राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली असून सरकारी शिष्टमंडळाने राजपूत समाजाला चित्रपट दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात प्रदर्शित करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. राजपूत समाजात पद्मिनी हे देवीचे स्वरूप आहे. तिने आपली अब्रू वाचविण्यासाठी आपल्या 16हजार दासी आणि राण्यांसोबत जोहर (सती) केला होता. अशा राणीचा अपमान चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. टीआरपीसाठी इतिहासात हस्तक्षेप केला जात आहे.
यापूर्वी देखील जोधा अकबर, बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित केल्यास भन्साळी यांना पुढील परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांच्या नेतृत्वाखाली राजपूत समाज संघटनेच्या वतीने राज्यस्तरावर किरण सिंह ठाकूर, नीता परदेशी, शिवकुमार बैस, श्रीराम परदेशी, अनिल सिंह बैस, किशोर सिंह गिरासे, दीप्ती राजपूत,करनी सेना जगदीश सिंह भाणुजा व इतर राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवार (दि. 24 ऑक्टोबर) रोजी महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात रावसाहेब दानवे, जयकुमार रावल, सुजित सिंह ठाकूर, रणजीतसिंह पाटील गृह राज्य मंत्री यांचा समावेश आहे. सरकारी शिष्टमंडळाने लेखी आश्वासन दिले की, पद्मावती हा चित्रपट राजपूत समाजाला दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार नाही. सरकारी शिष्टमंडळाने लेखी आश्वासन दिल्याने बुधवार (दि. 25 ऑक्टोबर) रोजी मुंबईत भाजप कार्यालय ते मंत्रालय असा काढण्यात येणारा नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
व्हीएस न्यूज – सुधारित नियामावलीमध्ये प्राधिकरण आणि महानगर विभागाचा समावेश केल्यामुळे प्राधिकरणमधील 22 हजार अनधिकृत घरांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. विकास आराखड्याचे पुनरावलोकन करण्याकरिता पुर्नसर्वेक्षण विकास आराखडा समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या अंतिम रिअलायमेंट अहवालासाठी नवनियुक्त अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी गती द्यावी, अशी अपेक्षा घर बचाव संघर्ष समितीकडून वर्तविण्यात येत आहे.
अनधिकृत घरे नियमितीकरणासाठी नगररचना विभागाने 21 जुलै 2017 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2017 रोजी सुधारित बाबी समाविष्ट करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात आले. त्यामुळे रिंगरोड बाधितांना घरे अधिकृत होण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे. मागील 30 वर्षांपासून रिंगरोड बाधित तीन हजार रहिवासी हक्काच्या घरासाठी वाट पहात आहेत. त्याचप्रमाणे 100 फुटावरच 45 मीटरचा स्पाइन रोड असताना व 50मीटरचा रावेत-पुनवळे रोड काही मीटर अंतरावर अस्तित्वात असताना सदरचा एचसीएमटीआर 30 मीटरचा रस्ता दाट लोकवस्तीतून बनवणे घटनाबाह्य असल्याचेही समितीने म्हटले आहे.
घर बचाव संघर्ष समितीचा विकासाला आणि रिंगरोड प्रकल्पाला विरोध नाही. परंतु नागरिक व प्रशासनाचा सुवर्णमध्य काढून प्रकल्प जरूर राबवावा. रिंगरोडसाठी 20 टक्के जागेचाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्या जागेकरिता अध्यक्षांनी पर्यायी मार्गाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व नवीन कायद्यान्वये घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु करावी, अशी अपेक्षा घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विजय पाटील यांनी व्यक्त केली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेतील वाहन दुरूस्तीच्या ठेक्यात गोलमाल झाला असून तब्बल पाच कोटी रूपये वाढीव खर्चास स्थायी समितीने मान्यता दिल्याची तक्रार माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केली आहे. टक्केवारीच्या या उद्योगात सर्वपक्षीय नेते, अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदारांमध्ये संगनमत असून सर्वानी मिळून जनतेच्या पैशांवर दरोडा टाकला असून स्थायी समितीच्या कारभाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत वाहन दुरूस्तीच्या कामातील वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली. तत्पूर्वी, कार्यशाळा विभागाचे प्रमुख प्रवीण तुपे यांची सदस्यांनी झाडाझडती घेतली आणि याप्रकरणी लेखी खुलासा सादर करण्याचे आदेशही तुपे यांना देण्यात आले. यासंदर्भात, भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पिंपरी पालिकेची स्वतंत्र कार्यशाळा असतानाही कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभाल व दुरूस्तीचे काम ठेकेदारी पद्धतीने करण्यात येते. तीन वर्षांकरिता असलेल्या या कामासाठी श्यामराव गॅरेज यांना दोन, तर बालाजी गॅरेज यांना एका कामाचा ठेका देण्यात आला आहे. श्यामराव गॅरेज यांना दोन कामांसाठी 73 लाख 63 हजार रूपये प्रतिवर्षांसाठी आणि बालाजी गॅरेज यांना 33 लाख 94 हजार रूपये प्रतिवर्षी या दराने कामाचे आदेश देण्यात आले. ही तीनही कामे मिळून वाहन दुरूस्तीच्या कामाचा ठेका प्रतिवर्षी एक कोटी सात लाख रूपये देण्यात आला. प्रभागरचनेत बदल झाल्याने महापालिकेची खासगी कंपनीकडे असणारी वाहनेही परत पालिकेकडे आली आहेत.
या वाहनांची देखभाल दुरूस्तीही पालिकेला करावी लागली. त्यासाठी पहिल्या वर्षांकरिता एक कोटी 72 लाख रूपये तर दुसऱ्या वर्षांसाठी तीन कोटी 12 लाख रूपये वाढीव खर्च आला आहे. या दोन्ही खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सत्ताधारी नेते, पालिकेचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आदींचे यामध्ये संगनमत असून करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे. या संपूर्ण प्रकरणासह गेल्या सात महिन्यात स्थायी समितीच्या कारभाराची चौकशी करावी आणि त्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002